Thursday, March 8, 2012

पराधीन आहे जगती

परवा ती गेली. ती म्हणजे खरंतर नाव ही लक्षात नाहीये तिचं. बऱ्याचदा तिचा उल्लेख xxx ची बायको, xxx न्ची सून असाच होत असे. एकदाच भेटलो होतो आम्ही. पण तिचं जाणं चटका लावून गेलंय. दोन रात्री पाठ टेकली की तीच आठवते आणि डोळे भरून यायचे थांबतच नाहीत. या आधी गेल्या आठवड्यात एकदा तिने झोपेतून मध्यरात्री जागं केलं होतं. त्याचं असं झालं, की जेंव्हा आम्ही भेटलो होतो, घरी आली होती ती, मुलाच्या मुंजीचं आमंत्रण करायला. सर्वसाधारण IT वाल्या लोकाना गळ्यात ID सोबत किल्ल्या आणि RSA टोकन अडकवायची सवय असते. पण हिच्या हातात किल्ल्यांचा जुडगा होता ज्यात टोकन होतं. गेल्या आठवड्यात स्वप्नात तोच जुडगा पहिला. किल्ल्या कमी झाल्या होत्या आणि RSA टोकन नव्हतंच. जाग आली आणि तीच आठवली. काहीही स्वप्न पडतात असं म्हणत झोपी गेले पुन्हा, पण टोकन नव्हे तीच हरवून जाईल असं नव्हतं वाटलं. तिच्या आजारपणाची पण कल्पना नव्हती. आजारपण तरी कसलं... कर्करोग झालाय आणि ७/८ महिन्यात सर्व खेळ खतम. माझ्या नात्यात एक जण आहेत ज्यांना ४० वर्षांपूर्वी कर्करोग झाला होतं आणि आजही त्या निरामय आयुष्य जगत आहेत.




पहिल्या लग्नाचे उलटे पडलेले फासे, त्यानंतर आता कुठे सारं सुरळीत होतंय असं वाटत होतं आणि तीच निघून जावी? का ग आयुष्याची लढाई इतक्या पटकन हरलीस? का नाही त्या लेकरात जीव अडकला? त्याच्या नशिबी आई-बाप जवळ असण्याचं सुख नाहीच का? आणि तो तुझा सखा ज्याने प्रवाहा विरुद्ध जावून तुला साथ दिली? त्याची साथ कशी ग सोडावीशी वाटली? तुझी स्वप्न? अगं आता कुठे जगायला सुरुवात केली होतीस ना? इतक्यात कंटाळलीस?


फारशी ओळख पाळख नसतानाही तिचं असं जाणं अस्वस्थ करून गेलंय. गेल्या काही दिवसात असं अजून एकीने अस्वस्थ केलं होतं. पण तेंव्हा त्यात mix भावना होत्या. तिने आत्महत्या केली होती त्यामुळे एकीकडे वाईट वाटत होतं पण राग ही आला होतं तिचं. शेवटी रागाने मात केली आणि वाईट वाटणं थोडं कमी झालं. पण हिच्या बाबतीत असं नाहीये. हिची प्रतिमा एक लढाऊ व्यक्ती अशी होती. कदाचित वयाने थोडी लहानच होती. तिचं जाणं मला जागं करून गेलं. पुन्हा एकदा आयुष्याच्या क्षणभंगूरतेची जाणीव करून देणारं. वाटलं काय मी पुढच्या ३/४ दशकांचां नियोजन करत आहे? इथे तर क्षणाचा भरवसा नाही. अस्वथता घेरून टाकतीये. अनेकदा जवळची नात्याच्या माणसांचं जाणं ही इतका अस्वथ करत नाही.

Status update

व्यक्त होणं तशी प्रत्येकाची गरज. कधी एखाद्या खास व्यक्तीपाशीच वा कधी फक्त आपल्या मनातलं बोलता येणं. कोणी ते ऐकताय, वाचतंय, प्रतिसाद देतंय याच्याशी फारसं देणं-घेणं नसलेलं. हे असं व्यक्त होणं खूप तात्कालिक असतं, जरुरी नाही काही दीर्घकालीन असं काही त्यातून गवसेल. पण किमान स्वत:च्याच विचाराकृतींचे विविधरंगी आकृतीबंध पुढे जावून जे कदाचित हास्यास्पद वाटतील, कदाचित मोहक वाटतील. पण ती काळाची गरज असते.




जोपर्यंत मी एका सर्वोत्तम IT कंपनीचा भाग होते तोपर्यंत तेथील BB किंवा blog माझी ही दुसऱ्या प्रकारची गरज तरी पूर्ण करत असे.. जेंव्हा बदलाची चाहूल लागली तेंव्हा मी फेसबुक चा विचार सूरू केला. तोपर्यंत मला कधी त्याची गरज वाटलीच नव्हती. आता ६ महिन्यांपेक्षा जास्त दिवस झालेत पण काहीतरी मिसिंग आहे. सावरीची वाळकी शेंग उघडली जावी आणि त्यातला कापूस (लहान मुलांच्या भाषेत "म्हाताऱ्या") हवेत भिरभिरत राहावा तसं काहीतरी दिवसरात्र डोक्यात भिरभिरत असतं. पण कित्येक दिवस झालेत, त्यांची एकसंध गुंफण मी करू नाही शकलेली. ही देखील एक प्रकारे घूसमटच. अनेकदा असं वाटून जातं की ही डोक्यातली सारी चक्रे थांबवीत. एका शांत झोपेतून फ्रेश जाग यावी आणि सारे विचार, ताण हलके होवून जावेत. पण असं घडत नाही. आजकाल जेंव्हा जेंव्हा मी फेसबुक ला लॉग-इन होते तेंव्हा बऱ्याचदा इथल्या चर्चा, status updates माझ्या अस्वस्थतेत भर घालतात. खरंतर या अवस्थेस माझी मीच कारणीभूत असेन, तरीहि असं वाटतंय की थोडे दिवस यापासून दूर राहून पाहावं. स्वत:च स्वत:शी संवाद साधावा. थोडे म्हणजे किती माहित नाही. असं नाही घडलं तर काय माहित नाही. असं ठरवून आखीव रेखीव असं आयुष्य थोडंच असतं?