Tuesday, July 24, 2012

"शनिवारची सकाळ"


पु.लंच्या "वाऱ्यावरच्या वरातीत" जी "रविवारची सकाळ" आहे, त्या पासून अनेक घरांमधील लोकांना स्फूर्ती मिळत असावी असा माझा अंदाज आहे.

ती: या घरात ना मला एकटीला कान, डोळे आहेत, कारण सगळ्यांना न सापडणाऱ्या गोष्टी मलाच फक्त दिसतात. समोर वस्तू असते पण ती बाकीच्यांना दिसतच नाही. सकाळी इतक्या वेळा घराची बेल वाजते, पेपरवाला, दुधवाला, कचरेवाला, इस्त्रीवाला..... पण एकाला ऐकू येईल तर शपथ.... सारी कामे करत मीच एक आहे धावाधाव करण्यासाठी. एक सुट्टीचा दिवस, त्यादिवशी पण शांत झोपता येत नाही....कारण बेल वाजल्यावर कोणाला सुद्धा जाग येणार नाही माझ्याशिवाय ......
:
:
:
(हे सगळ्यांना ऐकू गेलेले आहे पण यावर घरात फक्त शांतता)
(पुढचा आठवडा, शुक्रवार संध्याकाळ)


तो: "बायको" (हे तिचे नाव?) तू उद्या सकाळी लवकर उठू नकोस. दुधवाला येईल तेंव्हा मी उठेन, नंतर मी चहा करेन, मग तू उठ... पण सकाळी साडे सातच्या आत उठायचं  नाही. सहा वाजता उठून मला चहा बनव असं म्हणायचं नाही.

ती: असं कसं? तू उठ न कधीतरी लवकर. 


तो: जमणार नाही. तुला आयता चहा मिळाल्याशी कारण.


ती: बर, बघू.

दुसऱ्या दिवशी सकाळचे साडेपाच वाजलेत...तिला नेहमीसारखी जाग आलीये. खिडकीपलीकडच्या आंब्यावर कोकीळेसह अनेक पक्षी साद घालत आहेत. ती थोडावेळ खिडकीतून बाहेर बघत राहते. छान प्रसन्न वाटतंय. तो शांत झोपलाय. तिला हसू येतं, हा कधी जागा होणार आणि कधी चहा बनवून तिला उठवणार, त्यापेक्षा "झोपू दे त्याला शांत" असा विचार करून ती उठतेच. तयार होते, शांतपणे चहा पीत सगळे पेपर निवांत वाचून काढते. सकाळचे आठ वाजतात. ती पुन्हा किचन मध्ये शिरून नाश्त्याच्या तयारीला लागते. आठवड्यातून हे दोनच दिवस ज्यात एकत्र गप्पा मारत नाश्ता, जेवण होते. त्याला कांदे पोहे रोज दिले तरी आनंदाने ताव मारेल त्यावर इतके आवडतात. तिच्या मनात नेहमी विचार येतो देव तरी कशा अशा विरुद्ध व्यक्तिमत्वाच्या जोड्या बनवतो. त्याला कांदेपोहे तर तिला उपमा, त्याला डोसे तर तिला इडली चटणी, तिला पराठे आणि दही प्रिय तर तो म्हणे थालीपीठ आणि लोणीच मस्त. अशा भिन्न आवडी जपत, ती शेवटी बनवायला घेते कांदे-पोहेच. खमंग दरवळ त्याच्या पर्यंत पोहोचतोच...तो उठून किचन मध्ये येतो.

तो: अहाहा काय मस्त वास येतोय .... बायको, आज कांदे पोहे आहेत?


ती: हो.


तो: सुट्टीची चांगली सुरुवात!

भरपेट पोहे आणि त्या नंतर मस्त वाफाळता चहा पुन्हा एकदा होतो.

तो: पण आज तू का माझ्या आधी उठलीस? सांगितलं होतं ना तुला? काही लोकांच्या ना नशिबातच नसतो आराम.


ती: (हसत) अरे हो ना! तू लवकर उठून चहा बनवून मला दिलास तर मग नंतर मी कोणाला बोलणार... पण खरं सांगू का इतकी फ्रेश जाग आली होती मला....मग उठावे असेच वाटले. म्हणून उठले. शांत घरात चहा पीत मनसोक्त सगळे पेपर वाचून काढण्यात काय मजा असते तुला नाही कळणार.


तो: झालेत ना तुझे सगळे पेपर वाचून ....आता मी चाळतो थोडे...तोपर्यंत अर्धा कप चहा दे मला.


ती: ठीक आहे, तो पिऊन लवकर तयार हो. आठवड्याची भाजी, इतर सामान आणायला जायचे आहे. आज तू चल.


तो: मी कशाला? तू जा गाडी घेऊन, आरामात सगळ्या गोष्टी घेऊन ये. मला कुठे बाहेर जायचं नाहीये. लागलं तर मी अक्तीवा घेऊन जाईन.


ती: नाही नाही ....तुम्ही दोघं बाप-लेक चला बरोबर. आणि तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या मंडईत मिळतात त्या आणूयात, कारण मी आणलेल्या कोणत्याच भाज्या तुम्हाला आवडत नाहीत. 


तो: खाऊ या आठवड्यात आम्ही दुधीभोपळा, दोडका, पडवळ अशा भाज्या. आण तुला ज्या आणायच्यात त्या. पण मी आता बाहेर येत नाही.

ती आणि कन्यका  बाहेरून तासाभराने परत येतात. घराची बेल वाजवते. कोणी दार उघडत नाही. पुन्हा पुटपुटते " या घरात कोणाला बेल ऐकू येईल तर शपथ" पर्स मधून किल्ली शोधून दार उघडते. बेडरूम मध्ये डोकावते. हा बाबा गाढ झोपलाय. 

ती: अरे झोपलायस काय....कळत नाही मला इतकी झोप येते कशी? 
तो: अगं, इतका मस्त नाश्ता झाल्यावर सुट्टीच्या दिवशी अजून काय करू शकतो? 

Monday, July 16, 2012

आता कुठून रे बाबा, यांना add करू?

अनेकदा तुमच्या ओळखीची, शेजारची, नात्यातली सगळीच मंडळी काही तुमच्या फेसबुकात फ्रेंड्स-लिस्ट मध्ये नसतात. कधी कधी तुम्हाला कल्पना पण नसते ही व्यक्ती फेस बुकवर आहे ते. सध्या काही दिवस मी अनुभवलेली गोष्ट- अशांपैकीच एखाद्या व्यक्तीचे निधन होते. मध्ये बरेच दिवस जातात. आणि काही दिवसांनी थोपू तुम्हाला "People You may Know - add friend " असं म्हणत त्यांचा प्रोफाईल दाखवत राहते. मी मनात म्हणते " आता कुठून रे बाबा,  यांना  add करू? नाही रे माझी रिक्वेस्ट त्यांच्या पर्यंत पोहोचणार, आता फार उशीर झालाय"

माझ्या लांबच्या नात्यातल्या एका हुशार काकांनी वर्षभरापूर्वी या जगाला कायमचं अलविदा म्हटलं. ते फेस-बुकवर असू शकतील असे मला कधी वाटलेच नाही. मुळात मी स्वत: फेस- बुक वर जेमतेम १०/११ महिन्यांपूर्वी दाखल झाले. आणि आता थोपू मला सतत यांचा असा रेफरन्स देत राहते. 
माझ्या एका कॉलेज मधल्या मैत्रिणीचा नवरा नुकताच एका भीषण अपघातात बळी गेला, ते ही प्रोफाईल मला अशाच रीतीने दाखवले जाते आहे. त्याच्या प्रोफाईल वरील त्या कुटुंबाचा हसरा एकत्र फोटो, आता मात्र मनाला वेदना देतो.

प्रत्येक वेळी खूप वाईट वाटते. जवळपास १०० पैकी ९९ केसेस मध्ये त्यांच्या जवळच्या कोणापाशी त्यांचे अकौंट डीटेल्स असण्याची शक्यता नसते. काय करता येईल? काही तरी यावर उपाय शोधावा लागेल......

Friday, July 13, 2012

सुखावणारा अनपेक्षित धक्का


शुक्रवारचा दिवस. ऑफिस मध्ये तसाही कामाचा मूड नसतोच. या दिवशी सगळी माणसे, या एका दिवसापुरती वेगळीच वाटू लागतात. सारं जग या दिवशीच कसं इतकं रंगीबेरंगी वाटू लागते हे इतक्या वर्षात कधी मला कळले नाही. फॉरमल्स आणि इनफॉरमल्स मुळे इतका फरक पडतो? पण असं होतं हे मात्र खरं आहे. या दिवशी ऑफिसला जावे असे वाटते, बाहेर हवा खूप छान आहे असे वाटते, एफ. एम. वर या दिवशीच सगळी चांगली गाणी लागतात, रोज नको वाटणारी त्या आर.जे. ची वटवट आज त्रासदायक वाटत नाही. पुढच्या दोन दिवसाच्या सुट्टीची तयारी प्रत्येकाच्या मनात चालू असते. अनेकदा असं घडतं की जर काही प्लान्स नसतील तर सुट्टी जास्त बोअर जाते, तरी तिची मनापासून वाट मात्र पहिली जातेच.

आज शुक्रवार आहे. तो ही लास्ट वर्किंग डे ऑफ द मंथ, अधून मधून प्रत्येकाचं लक्ष आपल्या मोबाईलकडे, बँकेच्या मेसेज साठी. त्यातून आज salary revision ची मेल पण अपेक्षित आहे. सकाळचे  ९  वाजलेत प्रत्येक जण "friday fever" सह ऑफिसमध्ये पोहचतो. आणि ऑफिसमध्ये पोहचल्यावर लक्षात येतं की पूर्ण क्लायंत नेटवर्क  डाऊन आहे. त्यामुळे काही काम होणार नाही. थोडक्यात ऑफिसमध्ये येऊनही काम होणार नाही. एक मोठी टीम. काही जण वैतागतात. लवकर काम संपवून घरी जाण्याचा त्यांचा  बेत धोक्यात आलेला असतो. एखादा नुकताच जॉईन झालेला फ्रेशर्स ग्रुप असतो. त्यांना फरक  पडणार नाहीये. त्यांचे संध्याकाळचे  हार्ड रॉक कॅफे किंवा हाय स्पिरीटस चे प्लान तयार आहेत. वेगवेगळे ग्रुप्स, वेगवेगळ्या फूड-कोर्ट मध्ये जावून येतात. कोणी फक्त चहा, कोणी चहा आणि खाणे, कोणी चहा आणि सिगारेटसाठी बाहेर चक्कर टाकणारा, तर कोणी नुसताच टेरेस वर बसून गप्पा मारणारा. थोडा वेळ जातो. पावसाचे दिवस, त्यामुळे ODC मध्ये परत यावेच लागते. मग आपापल्या डेस्कपाशीच  फक्त खुर्च्या फिरवून गप्पा सुरु आहेत. यात पण अनेक छटा आहेत. दोन तीन जण आपापल्या मशीन्सवर अंग्री बर्डस खेळण्यात मग्न आहेत, काही गाणी ऐकत आहेत. गप्पांच्या ग्रुपमध्ये ही दोन तीन वेगवेगळे ग्रुप आहेत. एका ग्रुपला वाढत्या डॉलरची चिंता आहे, एकाला आज रिलीज होणाऱ्या सिनेमांची. मधूनच कोणालातरी बाहेर पडावं वाटू लागतं, मग तो किंवा ती " ए, चला ना दोन तीन गाड्या काढून लांब पर्यंत फिरून येऊ,  बाहेर किती मस्त हवा आहे. बोअर आहे असं इथे बसून राहणं" चा नारा लावतं. बाकीच्यांवर त्याचा काही परिणाम होत नाही. दोन तीन मुली, त्यांना वीकेंड ला करण्याचा शॉपिंगचे वेध लागलेत  आणि  मी नेहमीप्रमाणे कुमार गंधर्व  ऐकत आहे.

एका ग्रुप कडे लक्ष जातं, ते चर्चा करत आहेत इतिहासावर, मोगल इतिहासावर. वाटलं नव्हतं या मंडळीना या बद्दल फार काही माहित असेल. पण ऐकताना छान वाटत होते. बसतात ना असे अनपेक्षित धक्के. हळू हळू सारे जण या ग्रुपकडे आकर्षित होवू लागतात. इतिहासावरील चर्चा मनोरंजक वाटू लागते. गाडी पानिपतावर पोहचते. आता मी ही मागे वळून या गप्पांमध्ये सामील होते.  एकजण  इतर वेळी ज्याला इतका सिरिअस बोलताना कधी ऐकले नव्हते, खरं तर  तो फारसा कोणाशी बोलतच नाही,  तो बोलतोय ..... बोलण्यात आवेश पण असा  की त्याने जणू याची देही, याची डोळा हे सारे पहिले आहे,  इतिहास जणू तो जगला आहे. असं वाटत होतं की जणू बाबासाहेब पुरंदरेच समोर बसून इतिहास जिवंत करत आहेत.

"पानिपत हा एक निव्वळ पराभव नव्हता तर मराठ्यांसाठी ती एक भळभळती जखम होती. "लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही. विश्वासराव आणि सदाशिवराव या दोन मोत्यांसह २७ सरदार आणि सैन्यासह काफिला मारला" हे वर्णन अंगावर काटा आणणारं त्याने जसच्या तसं सामोर उभे  केले. दुपारपर्यंत लढाईवर मराठ्यांचा ताबा होता पण गणितं चुकली आणि लढाई फिरली . अब्दालीने डाव साधला, रसद रोखली आणि पानिपताची भूमी मराठी रक्ताने न्हाहून गेली. असं असतानाही ज्याच्याकडून पराभव पत्करला त्या अब्दालीने सुद्धा ज्यांच्याबद्दल कौतुकाचे चार शब्द लिहावेत यातच त्यांचे महान योध्येपण सामावले आहे."

टीम मध्ये मराठी न समजणारे पण काही जण आहेत, त्यांना शब्द न शब्द कळत नाहीये पण भावना पोहचत आहेत असं वाटतंय. एककंदरीत  त्याचं अवांतर वाचन खूपच चांगलं आहे याचा अंदाज आलाय. विश्वास पाटलांच्या पानिपतची तर त्याची पारायणे झाली असावीत. ऐकायला छान वाटतंय, अनपेक्षित धक्का आहेच पण तो सुखावणारा आहे. सलग तासभर तो एकटाच बोलतोय आणि एक न एक टीम मेम्बर्स  श्रोते आहेत.  काम होत नाहीये, आणि सोमवारी खूप लोड असणार हा विचार हळूहळू मागे पडत चालला आहे, मोबाईलकडे कोणाचं इतका वेळ लक्ष गेलं नाहीये. मेल्स कोणी चेक करत नाहीये. असं मुळातच सारं काही विसरून जाणं फार कमी वेळा घडतं. श्रवणीय अशा या तासानंतर मनोमन वाटले, वीकेंडची या पेक्षा चांगली सुरुवात नाही असू शकत.

ता. क. (आज जरी शुक्रवार असला तरी ही आजची गोष्ट नाही.)

वृक्ष वल्ली .....


या शनिवारी सर्वात महत्वाचं काम करायचं आहे.  खालच्या बागेत जाऊन झाडांना पाणी घालायचं आहे म्हणजे तरी पुण्यात  पाऊस पडेल. आता तुम्ही म्हणाल या दोन गोष्टींचा एकमेकींशी काय संबंध? कारण अनेक वर्षांच्या अनुभवातून माझ्या असं लक्षात आलंय की "देव हा आळशी लोकांनाच मदत करतो"  जर आळशी लोकांवर एखादे काम येऊन पडले तर तो तत्काळ त्यांची त्यातून सुटका करतो. तत्पूर्वी असे संवाद आमच्या घरी घडतात. " अनघा, नुसता बागेत झाडे लावण्याचा उत्साह दाखवतेस, पाणी कोण घालणार जाऊन त्यांना? नुसता आरंभशूरपणा!" इति........माझा नवरा (त्याच्याशिवाय माझी इतकी स्तुती कोण करू  शकतं?)  मग मी एक दिवस वेळात वेळ काढून बिल्डींग मध्ये तळमजल्यावर असलेल्या आमच्या बागेत जाते, झाडांना भरपूर पाणी घालते, थोडी छाटणी करते, नवीन काय लावता येईल याचा विचार करते, आणि बागकाम केल्याचं समाधान बाळगत घरी येते, मोजून १०/१२ तासात असा धोधो पाऊस पडतो की पुढचे काही दिवस तरी जाऊन पाणी घालण्याची गरज पडत नाही मग. आता यावर्षी पाऊस कुठेतरी गडप झालाय, आता बघते या उपायाने तरी तो परत येतोय का ते! 
वाशीत राहात असताना झाडे वगैरे लावावीत असं कधी वाटलं नाही अर्थात जागाही नव्हतीच, जेंव्हा चिंचवड मधल्या या घरी राहायला यायचं नक्की केलं तेंव्हाच ठरवलं की खूप मस्त बाग फुलवायची. बिल्डींगच्या तळमजल्यावरची  बाजूची एक ४० बाय ८ ची एक पट्टी मला बागेसाठी मिळाली होती शिवाय घराची टेरेस होतीच. त्यावेळी संस्कृती लहान होती आणि मी पण नोकरी करत नव्हते. मग या गोष्टींसाठी भरपूर वेळ हाताशी होता. पहिल्या वर्षी अनेक शोभेची झाडे, तुळस, पुदिना, गवती चहा येऊन टेरेस मध्ये विराजमान झाली.  पुदिना आणि गवती चहा तर इतके  उदंड वाढले की त्याचं काय करायचं हा प्रश्न पडला. प्रश्नांना उत्तरे मिळतातच. गवती चहा कापून सावलीत सुकवून त्याची पावडर चहात मिसळून टाकू लागले. पुदिना पण सुकवून पहिला, पण लक्षात आलं यात काही मजा नाही, तो रंग, स्वाद काही मी टिकवून ठेवू शकत नाही. मग बिल्डींगमधील शेजाऱ्यांना  सांगितले कोणाला कधी पुदिना हवा असेल तर माझ्या घरचा न्या. हळू हळू लक्षात आलं की या टेरेस मध्ये ऊन येतच नाहीये फारसं, वर्षाचे जवळपास ८ महिने. आणि उन्हाळ्यात इतकं ऊन की सकाळी १० वाजता पाय टाकवत नाही. २/४ दिवस बाहेरगावी गेलो तर झाडांची पार वाट लागणार आणि झालं ही तसंच. मग कुंड्या सुन्या सुन्या वाटू लागल्या, शेवटी त्या ही तिथून खाली हलवल्या. मग एकाच मोठी कुंडी उरली, जिच्यात ब्रह्मकमळ होते, फक्त पावसाळ्यात, फुले येणारे हे झाड, फुलाचं आयुष्य तरी किती एका रात्रीचं फक्त. कळी दिसू लागल्यापासून फूल उमलेपर्यंत वाट पाहणे. एका वर्षी २०/२२ फुले दोनवेळा आली आणि हे झाड सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरले.

खालच्या बागेत सुरुवातीला तगर, जास्वंदीचे काही प्रकार मोगरा, गुलाब लावले. म्हटलं चला देवपूजेची सोय झाली. रोज बागेत जावून संध्याकाळी तिला पाणी देण्यात तिला मजा वाटू लागली. सर्वात मजा तेंव्हा आली जेंव्हा अबोलीच्या सुकलेल्या बियांवर पाणी पडलं आणि टपटप काही तरी उडू लागलं, संस्कृती घाबरली  आणि सुरुवातीस काही वेळ  हे काय याचा आम्हा दोघींना पत्ताच लागला नाही. बागेला फूल-चोरांपासून  वाचवणे हे किती कठीण असते याचा प्रत्यय याच  काळात  येऊ  लागला. कुठून पत्ता लागतो इतरांना तुमच्या बागेत अशी झाडे आहेत याचा?  माझी बाग तर बिल्डींगच्या मागील बाजूस आहे, तरी.......... मी सकाळी सहा वाजता जाऊन फुले काढणार तर त्यापूर्वीच झाडावरून फुले पसार होवू लागली. मग थोडे दिवस मी वेळा बदलून पहिल्या, आदल्या दिवशी संध्याकाळीच जाऊन कळ्या काढून घेवून येवू लागले. एक एक नस्ती काळजी लावून घ्यायला नको असं मी स्वत:लाच सांगत राहिले. हळूहळू मलाच कंटाळा येवू लागला या पोलीसगिरीचा. शेवटी विचार केला, जावू दे कोणाला न्यायची ते  घेऊन जावोत ती फुले, आपण दर आठवड्यात, फुलबाजारातून देवासाठी फुले आणून ठेवूया. उगीच चीडचीडच  नको. या बागेत एक गुलाबी आणि एक पांढरी जास्वंद होती. दोन्हीला भरभरून फुले येत, आणि एक दिवस तर पांढऱ्या जास्वंदीला फुले आली  ज्यांच्या २ पाकळ्या गुलाबी आणि बाकी पांढऱ्या, काय ही निसर्गाची किमया!  एक केशरी रंगाची, तर एक डबल जास्वंद लालभडक. दापोलीहून एक कुंदाच  रोप आणलं, खाली लावलं आणि दोराच्या आधाराने त्याला घराच्या बाल्कनी पर्यंत चढवलं. रात्री चांदण्याच उतरू आल्यात असं वाटावं, इतकं सुंदर दृश्य दिसत असे. पण मग डासांना त्यात नवीन घर मिळाले. तो वेळ छाटून टाकण्याशिवाय मग पर्याय उरला नाही. तेंव्हा पासून तो माझ्यावर जो रुसलाय, तो आजतागायत. खाली बागेत कुंद आहे, पण तेंव्हा पासून त्यास एकही फूल आले नाहीये. पण म्हणून त्याला काढून टाकण्याचा विचारही कधी मनात आलेला नाही. कारण जेंव्हा येत होती तेंव्हा त्याच्या फुलांनी इतका आनंद दिलाय.......... 

एकदा सोन-केळी लावली. तिच्या फुटव्यांच काय करायचं हा प्रश्न पडला. मग पलीकडच्या बंगल्यात राहणाऱ्या एक काकू म्हणाल्या  मी घेऊन जाते, आणि आमच्या शेतात लावते. असं करत  करत त्यांच्या शेतात १०० सोन केळीची झाडे  लागली. आता त्यांच्याकडे केळ्यांचे घड उतरवून आणले की त्या मला फोन करतात " अनघा, शेतातून सोनकेळी आली आहेत, ४०  रु. डझन, तुला हवी आहेत का? आपल्या लोकांसाठी स्वस्तात देते आहे." हसूच येतं मला अशावेळी. एकदा पालक लावला, छान आला, फक्त किती लावायचा याचा अंदाज नाही आला नि मोजून त्याची ५/६ रोपे आली.....एक मैत्रीण म्हणाली, एक पालकाची गड्डी आण, त्यात हा पालक घाल आणि सगळ्यांना खाऊ घाल.....घरच्या पालकाची भाजी म्हणून.....असं काही करणं जमलं नाही, एकदा पराठ्यात तो पालक मी वापरून टाकला. ५ वर्षांपूर्वी लावलेला एक फणस अजून मोठा व्हायलाच नकार देतोय. दापोली कृषी विद्यापीठातून आणलेला "all spice " इतका मोठा झालाय की घराच्या खिडकीतून आत डोकावतोय. तसाच शेजारच्या बंगल्यातला आंबा कायम  माझ्या खोलीच्या खिडकीतून "मला आत घ्या" असा हट्ट धरून असतो.  

माझं सोनचाफ्यावरील प्रेम माहित असल्याने,  एकदा नवरा एक सोनचाफ्याचं रोप घेऊन आला आणि म्हणाला " हे टेरेस मध्ये लावूयात, म्हणजे तुझ्या नजरेसमोर हा कायम फुललेला राहील"  मी नेहमीप्रमाणे त्याला चिडवलं " श्रीकृष्णानंतर, तूच  रे, त्याने बायकोसाठी पारिजात लावला, तू सोनचाफा लाव,  बहरला सोनचाफा  दारी, फूले का पडती शेजारी असं म्हण्याची वेळ माझ्यावर न येवो म्हणजे झालं."  पण या फुलासाठी खरोखरच मी खूप वेडी आहे इतकी की कोणी माझ्यासमोर ओंजळभर सोनचाफा धरला तर एका फुलाने भागत नाही, शक्य असल्यास ती सारी ओंजळभर फुले माझीच व्हावीत अशीच माझी इच्छा असते. आसपासच्या घरी कोणाकडे सोनचाफा आहे ते मला माहित असते, जाता येता त्या झाडावर फुले आहेत का हे पाहण्यास  एकदा तरी नजर जातेच. मध्यंतरी एक छंदच जडला मनाला, ऑफिसला जाताना रस्त्यातल्या एका सोनचाफयावर नजर टाकायची, एकतरी फूल दृष्टीस पडायलाच हवे, तरच दिवस छान जाणार, नाहीतर नाही. 

थोडे दिवसांनी बागकाम करायला एक माळी ठेवला. थोडी बागेच्या तब्येतीत सुधारणा झाली, रोपांभोवती छानशी आळी तयार झाली, बाग साजिरी  दिसू लागली......पण थोडेच दिवस. माळीबाबा दांड्याच जास्त मारू लागले, थोडे दिवसात काहीकाही बागकामाची हत्यारे पण गायब होऊ लागली, एकदा बायको खूप आजारी आहे या कारणांसाठी माळीबाबा जे १००० रुपये घेऊन गायब झालेत ते आजतागायत. थोडक्यात माझे बागकाम ही "charity " च  जास्त होऊ लागली. तशी ती मी अनेकदा अनेक प्रकारे करत असतेच......जिम  लावून, एकही  वर्तमानपत्र वाचायला वेळ नसताना रोज सगळी वर्तमानपत्रे पेपरवाल्याला टाकायला सांगून, स्वत:साठी साड्या विकत घेऊन, बागकाम करून.  या वेगवेगळ्या लोकांचे  मी मागच्या जन्मीचे काही देणे लागत असावे, म्हणून अधून मधून मला हे उद्योग सुचतात. 
परवा एका कलीगशी घरातली बाग यावर बोलणं चालू होतं. दोघं आपापले बागकामाचे अनुभव शेअर करत होतो, आणि वाटलं......चला पुन्हा एकदा बाग फुलावूया. स्वप्ने पाहायचे काम मन अगदी तत्परतेने करते ना!  शनिवारी जाऊन आणावीत  थोडी रोपे, थोड्या कुंड्या, थोडे सेंद्रिय खत. गवती चहा, कोथिंबीर, पुदिना, मिरच्या, ओव्याची पाने,  कढीपत्ता आणि बनेल एक मस्त हिरवेगार किचन गार्डन............

Wednesday, July 4, 2012

कुछ मीठा हो जाये ....



पूर्वी कधीतरी म्हंटल्याप्रमाणे खाणे आणि करून खाऊ घालणे या दोन्ही गोष्टी मी अगदी मनापासून करते, अगदी "दिलसे" ! त्याच प्रमाणे अजून एक त्यासंबंधी गोष्ट आवडते ते म्हणजे खाण्यावर बोलणे. माझ्या यापूर्वीच्या ऑफिस मध्ये एक मैत्रीण होती जी माझं हे खाण्यावरच बोलणं आनंदाने ऐकत असे आणि नंतर म्हणे " चल, फूड-कोर्ट मध्ये जाऊ, तुला भूक लागलीये". अजून एका मैत्रीणीला मला चिडवायला खूप आवडत असे, मग दर वेळी माझ्या डब्यातले खाताना, "तुझ्या स्वैपाकाच्या बाईंना सांग " पदार्थ छान झाला होता" असे म्हणून मला चिडवत असे आणि मग मी पण हो त्यांनीच केलाय असा तिला सांगत असे. एखादा आवडता पदार्थ म्हणजे मी त्याच्या रंग, रूप, स्वाद, सुवास याने वेडी होऊन जाते. या साऱ्या गोष्टी मग खूप वेळ मनात घर करून राहतात. कधी काही पदार्थांची मला आठवण होऊ लागते आणि जणू ते पदार्थ समोर आहेत, किंवा त्यांचा सुवास घरभर पसरला आहे असं वाटायला लागतं, असं घडायला लागलं की मग तो पदार्थ बनवावाच लागतो. अशा पदार्थांची माझी लिस्ट ही खूप मोठी आहे. उदा. गव्हाचा चीक, कणसाचा उपमा, गार्लिक ब्रेंड, किंवा पिझ्झा, व्हेज ऑग्रटीन, हळदीच्या पानावर केलेले काकडीच्या रसातले पानगे, नारळ, खवा घालून केलेले रव्याचे लाडू, उकडीचे मोदक करताना शेवटी बनवलेल्या निवगऱ्या, नारळाच्या दुधासोबत फणसाची सांदणे, पाकातल्या पुऱ्या, तांदळाच्या ओल्या फेण्या, फणसाची भाजी, ओल्या काजूची उसळ किंवा त्याची गरम मसाल्याची आमटी, दुधी हलवा, खरवस असे एक ना दोन .......


काही पदार्थांची काही खास कनेक्शन्स असतात, की एक पदार्थ समोर दिसला की हमखास दुसऱ्याची आठवण होतेच. जसे की, लोणी कढवायला ठेवले, आणि तूप होत आले, की त्या तुपाचाच नव्हे तर तव्यावरच्या पुरणपोळीचा दरवळ मला जाणवायला लागतो, आणि तेंव्हाच नाही फक्त तर नंतर चे २/३ दिवस जेंव्हा जेंव्हा त्या साजूक तुपाचा डबा उघडते, तेंव्हा तीच आठवण होते. पुरणपोळी ही कशी तर, एक बाजू भाजून उलटली, की मग भाजलेल्या बाजूवर लिंबाचा रस पसरवायचा, त्यावर एक पिठीसाखरेचा थर द्यायचा, आणि नंतर त्यावर तुपाची धार! तो पर्यंत दुसरी बाजू ही भाजून झालेलीच असते. पोळी तव्यावरून ताटात अलगदपणे, अगदी उलथने वगैरे सुद्धा लावायचे नाही तिला आणि अशी मऊसूत की प्रत्येक घास जणू विरघळत गेला पाहिजे! आहा हा .....सुख सुख म्हणतात ते यापेक्षा वेगळं असू नाही शकत.

आंब्याचा सीझन आला की नुसती आमरस पोळी/पुरी खाण्यात मजा नाही. एकदा तरी पुरणपोळी तेंव्हा बनली पाहिजे घरी, हापूसचा रस आणि गरम तव्यावरची पुरणपोळी!!! या सीझन मध्ये एखाद्या सुट्टीच्या दिवशी सकाळीच आंब्याचा रस काढून त्यात मिरपूड, मीठ घालून फ्रीज मध्ये गार करत ठेवायचा. जेवणात गरम फुलके, आमरस, बटाट्याची भाजी आणि सर्वात कळस म्हणजे गरम वाफाळता भात त्यावर तूप आणि वरण/आमटीच्या ऐवजी फक्त आमरस!!! सुट्टीच्या दिवशी यापेक्षा सुंदर जेवण नाही असू शकत!

धो धो कोसळत्या पावसाचा आणि आपल्या सुट्टीचा दिवस. सकाळी आरामात उठावे, लागोपाठ २/३ कप आले, गवती चहा घालून बनवलेला चहा पीत घरी येणारे सगळे पेपर त्यांच्या पुरवण्यांसह आरामात वाचून संपवायचे. नाश्त्याला मस्त पैकी बटाटेवडे, लसणाच्या चटणीसह, आणि अगदी सत्यनारायणाच्या प्रसादाला बनवतो तसा मस्त शिरा. असा नाश्ता झाला की मग बाकी काही करू नाही शकत आपण. दुलई घ्यायची, एखादं आवडेल असं पुस्तक आणि आपण बस्स..... एखाद्या संध्याकाळी, साधं पण छान जेवायचा मूड असेल तर मग पुलाव, मक्याच्या कणसांची नारळाच्या दुधात बनवलेली करी आणि बटाट्याचा पापड!

लक्षात येतंय का तुमच्या किती बोलतीये मी खाण्याबद्दल! खरंच खूप भूक लागलीये......काहीतरी खाऊन येते तोपर्यंत तुम्ही आज वरील पैकी काय बनवायचे ते  ठरवा  बरं.

Tuesday, July 3, 2012

अरे देवा ! हा त्रास माझ्या लक्षातच नाही आला!!!!


ती "अरे, नुसता संध्याकाळचा रिकामा वेळ त्या टी. व्ही. समोर बसून वाया घालवतोस, काहीतरी नवीन शिक, एखादा अपूरा छंद जोपास पुन्हा"
तो " त्याने काय होईल?" 
ती " म्हातारपणी वेळ कसा घालवायचा याचा प्रश्न पडणार नाही, मन रमेल"
तो " ते तसं ही रमेल"
ती " ते कसं? की रम मध्ये रमेल?"
तो " म्हातारपणी कसा वेळ घालवायचा याचा माझा आराखडा अगदी पक्का आहे" 
ती "हो? कळू तरी दे मला काय तो"
तो " हे बघ, पहाटे साडेपाच ला उठेन, स्वत:पुरता चहा बनवून घेवून चालायला बाहेर पडेन. तासभर चालून येणार, मग परत येऊन घराच्या बागेत बसून मस्त तासभर पेपर वाचेन, चहा, नाश्ता होईल, मग तयार होवून पुन्हा बाहेर. बँकेची वगैरे कामे करून १२ वाजे पर्यंत घरी परत. बाहेर नाही पडलो तर मग रोज एक रूम आवरून ठेवेन. मग मस्त जेवून एक तास भर झोप."
ती " अरे वा! मस्त!!! पण रूम आवरायला आधी तिथे पसारा असला पाहिजे ना? "
तो " पुढे ऐक. मग दुपारचा चहा, मग थोडे बागकाम, एकीकडे छानसे संगीत चालू. संध्याकाळी प्राणायाम करून सहा वाजता एखाद्या क्लब मध्ये  जाणार. रात्री ९ वाजेपर्यंत परत. जेवायचं, थोडावेळ टी.व्ही. बघितला की संपला दिवस"
ती " सारे तुझेच फक्त प्लान्स झाले, यात मी कुठे आहे?"
तो " आहेस ना, यातला चहा, नाश्ता, जेवण बनवणारी तूच आहेस."
ती " आणि??? बाकी वेळा मी काय करेन?"
तो " तू ? तू काय करशील??? तू तर ऑफिसला जाशील"
ती " कसं काय ? तू म्हातारा होशील तरी मी नोकरीच करत राहीन? आणि जरी करत असले तरी रोज उठून ऑफिसमध्ये थोडी ना जाईन, जे काही असेल काम ते घरूनच नाही का करणार?" 
तो " अरे बापरे, तू सारा वेळ घरीच? हा एक त्रासच! लक्षातच आला नव्हता माझ्या"

Monday, July 2, 2012

क्षितिजे विस्तारताना......

घरून जेंव्हा ऑफिसचे काम करत नसे, त्याकाळी, कोणी जर म्हणाले, की घरून काम करते तर, मला वाटे, काय मजा आहे हिची. ऑफिसला जाण्यासाठी तयार नको व्हायला, वेळेत या म्हणून पोळीवाल्या काकू, इतर कामे करणाऱ्या बाईंच्या मागे नको लागायला, गाडी नको चालवायला, पेट्रोल नको जाळायला, ट्राफिकवर वैतागायला नको आणि घरी येताना त्यामुळे होणारी चिडचिड नको. कल्पनेप्रमाणे कितीतरी वेळ या एका गोष्टीमुळे वाचतो असे वाटत असे. आणि हे सगळे फायदेच फायदे बघून खरच त्या व्यक्तीचा मनोमन हेवा वाटत असे.

एक डिमांड पूरी झाली की मन लागोपाठ दुसऱ्याची तयारी सुरु करतं. जसं की फक्त रविवार सुट्टीचा असे तेंव्हा शनिवार-रविवार सुट्टी हवी होती. बस ने जाताना वाटे आपली गाडी कधी येणार. गाडी आली तेंव्हा ती चालवणे त्रासदायक वाटू लागले आणि ऑफिसनेच जाण्या-येण्याची सोय करावी ही इच्छा प्रकट झाली. शनिवार-रविवार सुट्टी मिळू लागली तेंव्हा वाटू लागले की शुक्रवारी सकाळी लवकर ऑफिसला जाता आले आणि दुपारी ४ नंतर घरी जाता आले तर किती बरं होईल. ते पण शक्य होवू लागले तेंव्हा घरूनच रोज काम करता आले तर किती बरं होईल! खरंच नेव्हर एन्डिंग स्टोरी!!!!

जेंव्हा एखादी गोष्ट मिळावी असं वाटत असते तेंव्हा ती मिळवताना आपण काय गमावणार आहोत याचा पत्ताच नसतो अनेकदा. मधे काही दिवस खरोखरच घरून काम करू लागले आणि लक्षात आले की काय काय हरवतंय रोजच्या आयुष्यातून ते. तत्पूर्वी एक आठवडा मस्त वाटत होतं. येण्याजाण्याचा वेळ वाचेल त्याचं काय काय करायचं याचे ही प्लान्स झाले. किमान सकाळी चालायला जाणे, संध्याकाळी गरम गरम जेवण. पहिले काही दिवस छान गेले. नंतर हळू हळू लक्षात आलं, ठरवलेला एकही प्लान प्रत्यक्षात येवू नाही शकला. इतर वेळी सगळी कामे आटपून सकाळी ११ वाजेपर्यंत ऑफिसला पोहते, तर जेमतेम तोपर्यंत बाकी घरची कामे आटपून मी लॉग-इन करू शकत असे. बर बाकी लोकांच्या दृष्टीने काय " तू तर घरीच आहेस सध्या असाच सूर असे. इतर वेळी घरातले दोघे जी कामे करत ती त्यांच्या दृष्टीने करण्याची गरज उरली नाही कारण मी काय घरी होते ना.

एकंदरच असे काम करणे नंतर कंटाळवाणे वाटू लागले. आजूबाजूस असणारी माणसे, कामासंबंधीच्या गप्पा, त्याशिवाय च्या गप्पा, एकमेकांवर होणारे विनोद किंवा होणारे थोडे वाद विवाद, गॉसिप्स, निरनिराळ्या कारणांनी होणाऱ्या पार्ट्या, एकत्र चहा, जेवण या सगळ्यात एक आनंद असतो. अगदी सर्वच माणसांशी आपली मैत्री असते असं नाही पण तरीही. लक्षात आले, घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. ५ दिवस ऑफिसमध्ये जावून काम केलं तरच शनिवार-रविवार घरी राहण्यात मजा आहे.एक आपलं असं दुसरं जग असणं, त्यातून होणारं शेअरिंग, नकळत सहकार्यांबद्दल वाटणारी आपुलकी. साऱ्या गोष्टी तुमच्या नकळत तुमच्या सवयीच्या होवून जातात. अगदी माझ्यासारख्या एकटेपण आवड्णारीच्या सुद्धा! प्रत्येक गोष्टीचा आनंद तिची किंमत मोजल्या नंतरच खऱ्या अर्थाने मिळतो. न जाणो उद्या या घर- ऑफिस पलीकडच देखील एक माझं जग बनेल, परवा अजून एखादं! क्षितिजे विस्तारत जातील आणि या साऱ्या पसारयात मी कुठेतरी हरवून जाईन आणि मग माझी मलाच मी नव्याने भेटत राहीन.