Monday, March 30, 2015

मितवाची कविता .......माझ्यासाठी!

काल मी मनाचा चाले मनाशी संवाद म्हणत सर्वांशी मन:चित्रे शेअर केली होती. हा संवाद कसा तर दोन्ही बाजूने आपणच सारीपाट खेळावा, आपणच प्रश्न विचारावेत आपणच उत्तरही द्यावे, आपणच मनात भातुकली रचावी, आपणच खेळ रंगू द्यावा, आपणच त्याचा आनंद लुटावा तसा हा संवाद! हा परीकथेतील राजकुमार माझ्या मनात वसणारा. माझ्या आनंदाचा ठेवा पुन्हा पुन्हा गवसणारा. मला सुखावणारा. 
मी मनोगतासाठी कवितेचे माध्यम वापरून त्याच्यापर्यंत ते पोहचवले तर त्यास ही ते जमायला हवे ना! म्हणून मनातल्या त्याला मी म्हंटले तू कधी व्यक्त होशील माझ्यासाठी असा? असं मी म्हंटल्यावर तो थोडीच मागे राहील? झरझर लिहिती झाली लेखणी माझी, कारण काव्य त्यास स्फुरले अन मी लिहू लागले असा हा अनुभव. 

वेड लागेल नाहीतर काय!!!

अशी भेट असे तुझे बोलणे
वेड लागेल नाहीतर काय!

असा पाऊस, तुझे चिंब होणे
वेड लागेल नाहीतर काय!

असा सुगंध, असे तुझे फुलणे
वेड लागेल नाहीतर काय!

अशी सांजवेळ, असे तुझे आठवणे
वेड लागेल नाहीतर काय!

असा स्पर्श, असे तुझे शहारणे
वेड लागेल नाहीतर काय!

असे भांडण, मग  तुझे रूसणे
वेड लागेल नाहीतर काय!

अशा तुझ्या रूपांत असे माझे हरवणे
आता वेड लागायचं राहिलंय काय!

Saturday, March 28, 2015

मितवा......

कवितेच्या गावा जावे पण तितके सोपे नसते ते. मनातल्या भावनांना नेमक्या शब्दात गुंफत, मात्रेच्या गणितात बसवत कविता करणे खरेच खूप अवघड असते. त्यामानाने भारंभार लिहिणे सोपे. शब्दांची मर्यादा नाही, मात्रेची गणिते नाहीत, यमकांची जुळणी नाही. मनातले सारे नीटसे उतरले वाटेपर्यंत लिहित रहावे बरे हेच खरे… 

पण तरीही घालतातच कविता भुरळ मनाला. अनेकदा एखाद्या प्रसंगाचे चपखल वर्णन करण्यासाठी, एखादी प्रतिक्रिया म्हणून, एखादी उपमा देण्यासाठी मला अनेकदा कवितेच्या ओळीच आठवतात.पण स्वत: लिहायचे झाले तर मात्र सगळा आनंद आहे. विचार करून थकते मी लोकांना कशा असंख्य विषयांवर कविता लिहिता येतात ज्या मला जमणे शक्य नाही. पण तरीही कविता या लेखन प्रकारावर प्रेम आहे माझे आणि प्रेम ही जगातली एकमेव सुंदर भावना आहे यावरदेखील. प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तू मला असे म्हणणाऱ्या नायिका बघत मोठ्या झाल्याचा परिणाम असेल कदाचित. 

प्रत्येक स्त्रीच्या मनात तिचा एक सखा असतो. नकळत्या वयापासून त्याची अनेक रूपे मनात उमलत असतात. काहीना तो गवसतो काहींचे आयुष्य सरते मनातल्या त्याला शोधण्यात. कॅलिडोस्कोपच्या नवनव्या रचनांनी भुरळ घालावी तशी साकार होत राहणारी त्याची रूपे, त्याचे भास. कधी तो माझा मित्र, कधी सहचर, कधी वेगवेगळी नाती  उभी करणारा, तर कधी चक्क देव बनून साकारणारा. असा मितवा जो माझ्या मनात वसतो, सदैव माझ्या सोबत असतो, अखंडपणे माझा त्याच्याशी संवाद चालतो. कधी प्रेमाचा संवाद तर कधी नुसताच वाद, रुसणे, फुगणे, समजूत घालणे म्हणजे जणू  मनाचा चाले मनाशी संवाद! असे हे सुंदर मनातले जग त्याचे आणि माझे माझ्या मनातले!!!

माझ्या मनातला माझा रावा 
त्याचा मनातच घेते ठावा 
मनातच त्याचा वाजे पावा 
मनातल्या मनातच त्याला  
राधेने निरोप कसा धाडावा

अशी अवस्था करणारा तो मितवा. मनीचे गूज त्याला तरी कवितांमधून सांगावे, तसा प्रयत्न तरी करावा. मनालाच मन वाचून दाखवावे तसे जणू. त्यामुळे चुकलेमाकले आपले आपल्याशी असेही. तर अशा या काही ओळी माझ्या मनातल्या राव्याला, माझ्या मितवासाठी, माझ्या सखयासाठी.........चांगले वाईट याची पर्वा न करता त्याला कल्पून लिहिलेले. माहीत नाही किती काळ त्याच्यासाठी लिहिणे जमेल, माहीत नाही कधी शब्द दुरावतील… त्यामुळे जसे मनात साकारले ते हे असे……. अशाच काही कविता एक दोन भागात मिळून.

गोधडी प्रेमाची ........

जगणे जणू आपुले असे
गोधडीचे टाके जसे

एक टाका प्रेमाचा
वर्षाव आपुलकीचा

एक टाका मैत्रीचा
झरा अखंड हास्याचा

एक टाका हितगूजाचा
अव्यक्तातून व्यक्ताचा

एक टाका स्पर्शाचा
मोहरत हरखण्याचा

एक टाका नजरेचा
शब्देविण संवादाचा

एक टाका आठवणींचा
क्षण पुन्हा जगण्याचा

एक टाका विरहाचा
भरून आलेल्या आभाळाचा

एक टाका अश्रुंचा
सयींसह बरसण्याचा

एक टाका तुझा, एक टाका माझा
समांतर राहूनही, एकरूप होण्याचा


२) नाते.........
नात्यांचे बंध
बांधलेली मने
उमलणारी नाती
प्रेमाची झुळूक लाभताच
कोमेजणारीही नातीच
अंतराची झळ लागताच
जाणिवेतील बंध
नेणिवेत जाताना
क्षितिजच बदलून
टाकणारे तुझे माझे
नाते..........
नात्यांचे बंध
बांधलेली मने
मन तुझे मन माझे.....


३) सहजच.............
सहज कधी काही बोललो
सहज एका वाटेवर चाललो
चालता पावलांसवे एके दिवशी
सहजच प्रेमाच्या गावाशी पोचलो
सहजपणे जुळले बंध,
सहजच जुळले धागे
आपुले एकाकीपण मग
सहजच कसे मग पडले मागे
सहज मग लागे आस
सहजच नकळे जडला ध्यास
जगावेगळ्या अद्वैताचे
सहजच मग होती भास
सहज असा सूर सदा जुळावा
सहजच प्रवास मिळूनी घडावा
आनंदाच्या या वाटेवरती
सहजच अंतरातला गळो दुरावा


Monday, March 16, 2015

असे जगणे …

गेले चार दिवस प्राजक्ता  विचार करतीये खोलीत एक वेगळाच गंध जाणवतोय पण तो कशाचा हे काही पटकन सुचत नाहीये. कोणतेच नाव देता येणार नाही असा, ना गोडसर, ना तीव्र उग्र, ना विचित्र दर्प. कोणत्या फुलांचा नाही, एअर फ्रेशनरचा नाही, नवीन कपड्यांचा नाही.पण दर वेळी खोलीत शिरल्यावर तो जाणवतोय हे खरे. विशेषत: बाल्कनीचे दार उघडल्यावर. म्हणजे त्याचा उगम बाहेरून आहे हे नक्की. पण कशाचा नक्की आणि कोठून हे कोडे.

पण  तेही  सुटले जेंव्हा शेजारच्या ट्वीन बंगल्यात राहावयास आलेली श्वेता भाटीया तिच्या आठ नऊ महिन्याच्या मुलीस घेऊन, हिच्या घरी ओळख करून घेण्यास आली. आणि लक्षात आले हा गंध एखादे बाळ ज्या घरात असते तिथे येत असतो, त्याच्या साबणाचा, त्याला दिलेल्या धुरी शेकाचा, त्याच्या dettol मध्ये धुवुन वाळत घातलेल्या कपड्यांचा असे सगळ्याचे मिश्रण बनत जो येतो तोच हा गंध, जो काही दिवस जाणवतोय. त्या माय लेकी थोडा वेळ बसून गप्पा मारून गेल्या. सारावेळ हिचं लक्ष त्या मुलीकडे. कुरळे पण छान जावळ असणारी, गोबऱ्या गालांची परीच जणू. शांतही होती अर्धा तास आईला त्रास न देता बसू दिले म्हणजे. सुलक्षणाबाई प्राजक्ताच्या सासूबाई पण घरात होत्या. त्याही गप्पांमध्ये सामील झाल्या होत्या. त्यांचे सारे लक्ष त्या छोटीला न्याहाळणाऱ्या प्राजक्ताकडे होते.

त्या दोघी गेल्यावर मात्र प्राजक्ता सुन्न बसून राहिली सोफ्यावर. मनात पुन्हा तेच गुंजणारे वाक्य, " आपलं एक बाळ हवं होतं रे, तुझं माझं …. तुझ्यासारखे हुशार, देखणे, प्रेमळ, थोडे माझ्यासारखे." त्यावर त्याच्याकडून फक्त शांतता. कधी नुसताच एक  कटाक्ष तिच्याकडे टाकलेला, कधी बदललेला विषय तर कधी तिथून निघूनच जाणे. आज घरात रांगून गेलेल्या चिमुकलीला पाहून सारे आठवणे अगदी ओघानेच.

लहानपणापासून ती तशी गंधबावरीच जणू . हे तिच्या आईने तिला दिलेले विशेषण. पदार्थांच्या चवीपेक्षा सुंदर वासानेच सुखावणारी, फुलांच्या, फळांच्या  रंग रूपापेक्षा त्याच्या गंधावरच भाळणारी, घर साधेच पण महकणारे असावे असे म्हणणारी, धूप दीपाच्या सुगंधासाठी सकाळ संध्याकाळ घरच्या देवघरात जाऊन तो लावणारी. नवे कपडे तसेच न घालता धुऊन घालायची पद्धत असलेल्या घरात नवा ड्रेस दोन दिवस उशाशी ठेऊन त्याचा गंध मनात नाकात साठवून, मग धुणारी. इमारतीत रंगकाम काढले कि त्या रंगांच्या वासाने खूष होणारी, धुतलेले कपडे कडक उन्हात साठवुन त्यांचा तो वास नाकात भरून घेणारी अशा एक ना अनेक. 

तशात कॉलेजमधे असता तिची मोठी बहिण माहेरी आली. पहिल्या बाळंतपणासाठी. नव्या चिमुकल्याचे आगमन काय झाले, प्राजक्तास गंधांचे वेगळेच शोध लागले. बाळाच्या साबणाचा, त्याच्या तेलाचा, बेबी लोशनचा, धुरी शेकाचा, dettol चा मारा केलेल्या कपड्यांचा. कदाचित सर्वात जास्त वेड आतापर्यंत याच गंधाने लावले असावे. इतर सारे या पुढे फिके जणू. ह्याच वेळी अनेक जाणीवा विकसित झाल्या कदाचित, मुलामुळे मिळणारा आनंद, त्याच्या असंख्य छोट्या गोष्टी  करता मिळणारे सुख तिने तेंव्हाच अनुभवले.

पुढे लग्न झाले, देखणा आदित्य, एका नावाजलेल्या कंपनीत उच्च पदावर असणारा. आई वडिलांनी सारं पसंत करून बघून सवरून थाटामाटात लाऊन दिलेले लग्न. सासरी माहेरी कौतुकाच्या वर्षावात नहात पहिले वर्ष कसे गेले कळलेच नाही. तिला नोकरी करण्याची गरज नव्हती. एकुलता एक मुलगा असणारा आदित्य, अजूनही स्वत:चा व्यवसाय छान सांभाळत असलेले सासरे, सासूबाई आणि प्राजक्ता असं चौकोनी कुटुंब. सासूबाई त्यांचे महिला मंडळ, थोडे समाजकार्य यात मग्न. घरी प्राजक्ता एकटीच तशी दिवसभर. घरात कामाला दोन तीन नोकर त्यामुळे तो हि फारसा प्रश्न नव्हता. शॉपिंग, टी व्ही, अधून मधून माहेरी जात राहणे,, कधी आदित्य सोबत कधी मैत्रीणींसोबत सिनेमा, हॉटेल मध्ये जेवण, त्याच्या सोबत मधेच घेतलेला एखादा छोटा ब्रेक कधी देशात कधी परदेशात.

अजूनही ती तशीच गंधवेडी होती. आता उलट थोडं ते वाढतच चालले होते. देशी विदेशी उत्तम परफ्युम्स, घराभोवती नीट नेटकी ठेवलेली बाग ज्यात नानाविध फुले नित्य फुललेली. वासानेच भूक चाळवतील असे  विविध देशातील पदार्थांची रेलचेल कधी घरी, हवे तेंव्हा बाहेर. सारं कसं दृष्ट लागण्याजोगे. हिच्या आगमनानंतर घरच सुगंधाने दरवळू लागलं. दिवाणखान्यात, बेडरूम्स मध्ये फुले दिसू लागली. हिच्या खोलीत नित्य नियमाने निशिगंधाचा दरवळ असू लागला. सोनचाफा घरात वावरू लागला. आदित्यला खूप वेळ नसला ह्या साऱ्यात, तरी त्याची काही हरकतही नव्हती.

दोन वर्ष कशी सरली कळलंच नाही या साऱ्यात. लग्नाचा दुसरा वाढदिवस दोघांनी घरी सर्वांबरोबर साजरा करून दुसऱ्याच दिवशी आठवड्यासाठी केरळला प्रयाण केले. अधूनमधून आजकाल प्राजक्ताच्या मनात मुलाचे विचार येऊ लागले होते. पण आदित्यपाशी हे कधी आणि कसे बोलावे हे मात्र कळत नव्हते. केरळला जाऊन आल्यावर त्याच्याशी बोलायला हवे असे ती मनात घोकत राहिली. आई, सासूबाई यांनी अडून सुचवून झाले होते. तिलाही तसे वाटत होतेच. हवे तर अजून एखाद वर्षाने पण हवे नक्की होते. आपण लग्न करताना आदित्यशी या बद्दल कधी काही बोललोच नव्हतो, त्यानेही कधी हा विषय काढला नव्हता हे आजकाल तिच्या लक्षात येऊ लागलं होतं.
एकदिवस त्याला असलेला संध्याकाळचा निवांत वेळ पाहून तिने विषय काढला.

"आदित्य, आजकाल मला घरात एकटं वाटतं…… "
"कशात जीव रमव, काही नवे शिकायचे तर शिक, होम सायन्स मध्ये मास्टर्स केलेली तू, गरजेखातर नाही, हौसेखातर नोकरी केलीस तर माझी काही हरकत नाही"
"पण मी पण घराबाहेर जाऊ लागले तर घर कोण सांभाळेल?"
"तू नव्हतीस, तेंव्हा कोण सांभाळत होते, तसेच चालेल आताही ते, तू काळजी नको करूस"
"तसं नाही आदित्य, मी आज नोकरी करू लागणार आणि काही महिन्यांनी किंवा वर्षाने ती सोडणार मग कशाला?"
"का? का सोडणार तू नोकरी? कर की मजेत"
"परवा आई कडे गेले होते, ती म्हणाली वेळेत सारे होणे ठीक असते, दोन वर्ष झालीत आता तुमच्या लग्नाला, आता किमान विचार सुरु करा"
"स्पष्ट बोल…… कसला विचार, काय वेळेत व्हायला हवे आहे, घर दार, गाडी, भरपूर बँक शिल्लक सारे काही आहे आपल्याकडे. हे सारे मिळवण्यात लोकांची आयुष्य खर्ची पडतात"
"ते नव्हे रे…. आदित्य तुला नाही का वाटत, आपण आपल्या एका बाळाचा विचार करायला हवा. म्हणजे लगेच असे नव्हे पण काहीतरी यावर आपण बोलायला हवे, ठरवायला हवे"
" बोलू यावर आपण नंतर कधीतरी, जेवण तयार आहे का? भूक लागलीये"

यानंतरही तिने त्याला याबद्दल बोलते करायचे अयशस्वी प्रयत्न केले. वेळेस त्याने विषय टाळला, बदलला. प्राजक्ता ला नक्की काय चुकतंय तेच समजेना. कोणाशी बोलावे तरी कसे. गेली दोन अडीच वर्षे जीवाभावाचा ज्याला समजत होतो, आयुष्यभर एकत्र रहायची स्वप्न बघत होतो तो हाच आदित्य होता का? आयुष्यातील इतक्या महत्त्वाच्या निर्णयावर बोलायचं तो टाळू कसा शकतो? हा त्याचा किंवा माझा एकटीच निर्णय कसा असू शकेल? जे काही ते बोलून ठरवायला हवे ना? 

"आदित्य, आपण एकदा नीट बोलायला हवे ना?"
"कशावर ? तोच तुझा नेहमीचा हट्ट आहे का?
"हो, पण …. "
"मला हे मुल वगैरे नको आहे, एक जबाबदारी आयुष्यभरासाठी नको आहे. जे जसं आपलं आयुष्य आहे ते तसंच असायला हवे आहे मला, कोणासाठी तरी अडकून पडणे मला जमणार नाही. तू जशी आहेस तशीच हवी आहेस मला, एक मुल झाल्यानंतर तूच नाहीस तर सारे आयुष्यच बदलून जाईल आपलं, जे घडायला नको आहे मला. मिळालं उत्तर? चर्चा नाही करायचीये मला"
"अरे पण … असं नसतं रे, आपल्या आई वडिलांनी नाही का घेतली होती आपली जबाबदारी, ते तुझ्यासारखं म्हंटले असते तर? जगभर आई वडील हे सारे करतात ना आपल्या मुलांसाठी?"
" तर मग आपण ही चर्चा करत नसतो प्राजक्ता"
"तू नीट बोलायचं म्हणालीस म्हणून मी काय ते तुला सांगितलं, यावर अजून काही मला पटविण्याचा प्रयत्न्न करू नकोस"

असं म्हणून तो तिथून निघून गेला. नित्याचे आयुष्य वरकरणी तरी तसेच चालू दिसत होते, आत मात्र प्राजक्ता खोलवर दुखावली गेली होती. त्यानंतर दोघांच्यातील उत्कट क्षणांनंतर एक दोन वेळा तिने "आदि …. मला आपलं एक बाळ हवंय रे …. अगदी तुझ्यासारखं " असे म्हंटल्यावर त्याने तिला दूर सारले आणि तिच्याकडे पाठ करून झोपून गेला. 

एके दिवशी ती आणि सासूबाई दोघीच  घरात असताना तिने विषय काढला.
" आई, आदि पहिल्यापासून असाच आहे का? "
"असाच म्हणजे कसा प्राजक्ता? काय केले त्याने? भांडण वगैरे झाले आहे का तुमचे? गेले काही दिवस नेहमीसारखी प्रसन्न दिसत नाहीस, लक्षात येत होतं, पण तू काही सांगितल्याशिवाय मी आपणहून बोलणार नव्हते"
" नाही आई, भांडण नाही, वेगळाच मुद्दा आहे. तुमच्या कधी  पूर्वी लक्षात आले होते त्याला लहान मुले विशेष आवडत नाहीत ते? किंवा मुले हे त्याला लोढणे, जबाबदारी वाटते ते?"
"नाही … मुळात तो एकुलता एक, आणि दोन्हीकडच्या नात्यांत तोच शेंडेफळ. बाकी ती जबाबदारी म्हणशील तर तो विषय कधी निघालाच नाही, पण का गं, असं का विचारते आहेस? आता तुमचं आलं की घराचं गोकुळ होऊन जाईल, तुमचा विचार आहे ना?
प्राजक्ता हमसून रडू लागली. सुलक्षणा बाईंना काय झाले तेच कळेना.
" अगं, प्राजक्ता, आत्ता नको तर हरकत नाही तुमच्या मर्जीने काय ते होऊ दे" 
"आई, अनेकदा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न्न केलाय मी, त्याने परवा साफ सांगितले आहे, की त्याला मुल नको आहे, त्याला मुलाची जबाबदारी नको आहे, आहे त्या आयुष्यात, माझ्यात, त्याच्यात कोणते बदल नको आहेत"
"अगं, आत्ता नको असं म्हणाला असेल, तुझा काही गैरसमज झालाय का? नीट बोला एकदा दोघं"
"मी गेले चार महिने आदित्यला बोलतं करायचा प्रयत्न्न करते आहे, आम्ही केरळहून परत आल्यापासून, पण तो विषय टाळत होता, परवा त्याने हे सांगितले, मला कळत नाहीये  हे सारे असे का? लग्नापूर्वीच या विषयावर आम्ही बोलायला हवे होते का, जे नाही झाले पण…… "
"प्राजक्ता, तुला पश्चाताप होतोय का, आदित्यशी लग्न केल्याचा, आतापर्यंत तर दृष्ट लागण्याजोगा संसार होता तुमचा"
"तसं नाही पण हा मुल नको असा निर्णय त्याचा एकट्याचा होतोय, इतका महत्त्वाचा निर्णय त्याच्या एकट्याचा नाही असू शकत, पण मी ही माझे म्हणणे लादू नाही शकणार त्याच्यावर, इतका ठाम असेल तो तर काय करू शकते मी, काहीच नाही"
"पण मनापासून मला वाटते के आमचे एक असे मुल मला हवे आहे. आदित्यवर नाही फार जबाबदारी येऊ देणार मी, देव दयेने आपल्याला काही कमी नाही, मला नोकरी करण्याची गरज नाही, सगळी जबाबदारी मी पेलेन त्या मुलाची, त्याच्यावर कोणताही अजून भार पडणार नाही, हवं तर मी माझे चार खर्च कमी करेन, त्याला बाळाचे काही करायला सांगणार नाही"
"मला वाद, भांडण नको आहे, कारण त्यानंतर मनावरचे ओरखडे काही जात नाहीत, नात्यात दरी येतेच, विशेषत: अशा मुद्द्यांवर भांडून, पण मी काय करू कोणी मला सांगेल का? हे सारं आज तुमच्याशी बोलते आहे कारण तुम्ही दोघं त्याच्याशी काही बोलू शकाल तर, अजून हे सारे मी माझ्या आई-बाबांपर्यंत नेले नव्हते हा विचार करून की तुम्ही बोलून काही सुरळीत होणार असेल तर घरच्या गोष्टी बाहेर नकोत जायला."
"मी घालते यांच्या कानावर, बघतो, एकदा बोलून प्रयत्न्न करतो, वाटत नाही काही विशेष करू शकू असे, आदित्यने एखादी गोष्ट एकदा ठरवली की मग त्यापासून तो मागे फिरत नाही, अगदी लहानपणापासून. आत्तापर्यंत आम्हाला त्याचे याबद्दल कौतुक होते…… कदाचित आज त्यापायी निराश होण्याची वेळ येणार, तू खचून जाऊ नकोस, थोडा धीर धर"
"हम्म्म … ठीक आहे"

काही दिवसांनी सुलक्षणा बाई आणि विश्वासराव आदित्यशी बोलले, अर्थात ज्यातून काहीच साधले नाही. आदित्य त्याच्या मुल नको या निर्णयावर ठाम होता. हा आपलाच मुलगा आहे का जो इतर वेळी सरळ, सालस होता, पण याच एका महत्त्वाच्या विषयावर तो इतका आडमुठा कसा? आणि हे त्याचे विचार पूर्वी कधीच कसे लक्षात आले नाहीत या विचारांनी दोघं हैराण झाले.

ते दोघं त्याच्याशी बोलले ते प्राजक्ता समोरच, त्यामुळे वेगळे तिला काही सांगावे लागले नाहीच. पण ती अजून कोलमडली, हतबल झाली. काही दिवस मध्ये असेच जात राहिले. घरातला आनंद नाहीसा झाला, चार मुकी माणसे राहत आहेत असे घर होऊन  गेले. प्राजक्ता आदित्यमध्ये कोणताच संवाद उरला नाही.

आज त्यातच आलेली श्वेता आणि तिच्या मुलीमुळे घर थोडसं  हसलं. पण काही काळापुरतेच. नंतर एक प्रचंड उदासी घरात भरून राहिली. ज्यात जगणे दिवसेंदिवस प्राजक्तासाठी मुश्कील होत होते.आता पर्यंत हे सारे तिच्या आई-बाबांना हे कळले होते.  त्यांचाही  सूर "थोडे दिवस जाऊ देत, होईल सारे ठीक" असा होता, परंतु प्राजक्ता जे काही ठरवेल त्यात ते तिच्या पाठीशी असतील हे नक्की, हे तिला माहित होते.

असेच दोन महिने अजून गेले. गोष्टी तशाच होत्या, ज्यात बदलाची काही चिन्हे दिसत नव्हती. प्राजक्ताचे डोके विचार करून फुटायची वेळ आली होती. शेवटी एक दिवस तिने सकाळी चहा घेत असताना आदित्यला आणि त्याच्या बाबांना ते कधी येणार आहेत हे विचारून घेतले. रात्रीच्या जेवणानंतर मला तुम्हा तिघांशी बोलायचे आहे हे सांगितले. 

गेले काही दिवस विचारात एक सुसूत्रता आणायचा ती प्रयत्न्न करत होती. सोपे नव्हते या निर्णयापर्यंत येणे.  दहा वाजता चौघे तिच्या सासू सासऱ्यांच्या खोलीत जमले. तिने सुरुवात केली.
"आई - बाबा आणि आदित्य, गेले काही दिवस आपल्या घरात आपल्यात संवाद नाही, हसते खेळते घर कसं उदास होऊन गेलंय, मी गेले दोन महिने साऱ्याचा खूप विचार करतीये, की मी आता काय करायला हवे? आदित्यचा जो निर्णय आहे त्यावर माझी प्रतिक्रिया काय आणि कशी असायला हवीये? मी त्याने निर्णय बदलण्याची वाट पहायला हवी कि हा त्याचा अंतिम निर्णय आहे हे मान्य करून तो स्विकारायला हवा?"
"काही ठरवणे सोपे नक्कीच नव्हते माझ्यासाठी! पण अशी इतका मोठा निर्णय तो एकटा घेत असताना त्याच्या हो ला हो म्हणणे मला शक्य नाही."
" आदित्य, तुझा हा अंतिम निर्णय आहे हे समजून मी पुढचं बोलतीये."
आदित्यचा चेहरा निर्विकार, आईबाबांचा व्याकूळ.

"आयुष्यातील सर्वात  फुलपंखी दिवस मी आदित्य सोबत घालवले आहेत, या घरात घालवले आहेत, फुलपंखी असल्यामुळेच कदाचित त्यांचे आयुष्यही फार थोडे असावे. अगदी चारचौघींची असावीत अशी माझी स्वप्ने होती, प्रेमळ माणसे, कर्तुत्ववान नवरा, एखादे मुल आणि सुखी आयुष्य. अनेक गोष्टींमध्ये मला अपेक्षेपेक्षा खूप अधिक काही मिळाले."

"आता लग्नाला जवळपास तीन वर्षे होत येत आहेत तेंव्हा आदित्यच्या "मूल नको" या एका निर्णयामुळे मात्र आज सारी स्वप्ने उध्वस्त होणार आहेत, मला ती सारी अर्ध्यावरच सोडून जावे लागणार आहे. आता हे सारे सोडून मी वेगळ्या वाटेवर चालू इच्छिते. अनेकदा मनात आले होते, की आदित्यावरील प्रेमापोटी त्याचा हा निर्णय मी मान्य करून पूर्वीसारखे आयुष्य जगले तर त्याच्या आणि तुम्हा दोघांच्या दृष्टीने ते ठीक राहील. पण मला हे शक्य होणार नाहीये, मला माफ करा."

" मी या घरात आणि आदित्य सोबत न राहण्याचे ठरवले आहे. आयुष्यातील सर्वात मोठ्या निर्णयावर मन मारून मी इथे नाही राहू शकणार. माझा आत्मसन्मान गमावला असे वाटत राहील मला सतत. कारण मला मुल हवे होते. ते इथे न राहून मला मिळणार आहे का? असाही प्रश्न येईल तर नाही मिळणार पण दुसरा मार्ग तर निघू शकेल."
"आई -बाबा, आदित्य मी हे घर सोडून जायचे ठरवले आहे. आदित्य आणि माझे नाते सोडून बाकी सर्व नात्यात माझ्याकडून काही बदल होणार नाहीत. मला घटस्फोटही नको आहे, कारण दुसरे लग्न वगैरे गोष्टी माझ्या डोक्यात नाहीत. आपला आनंद दुसऱ्याच्या इच्छेने मिळावा हेच मला आता नकोय. पण उद्या आदित्यला तो हवा असल्यास तो या बंधनातून कधीही  मोकळा होऊ  शकतो. मी त्यात मध्ये येणार नाही. मला त्याच्याकडून किंवा या घरातून काही म्हणजे काही नकोय. मी माझ्या आई बाबांकडेही न जाण्याचे ठरवले आहे. वाईट त्यानाही वाटेल आपल्या मुलीचे असे आयुष्य पाहून तेंव्हा किमान त्यांच्या समोर राहून मी त्यात भर घालू नये असे मला वाटते."

"आदित्य, इतर कोणतेही कारण असते, वैद्यकीयदृष्ट्या शक्य नसते तर मी ते स्विकारले असते. किमान योग्य चर्चेने आपण कोणतातरी निर्णय घेतला असता तर कदाचित मी याप्रत आले नसते. मी आता तुला दोष देण्यात काहीच अर्थ नाही कारण मनाने मी आपल्या नात्यातून तेंव्हाच मोकळी झाले ज्याक्षणी तू तुझा निर्णय ऐकवलास आणि यावर अजून चर्चा नाही असे सांगितलेस. माझी मते तुझ्यावर लादायची नाहीत, तू ते केलेस म्हणून मी ही तेच करण्याने आपण सुखी नव्हतो होणार. म्हणजे आज माझ्या या निर्णयाने आपण सुखी होणार ह्याची ही काही खात्री नाहीये. परंतु मनाविरुद्ध तुझा इतका मोठा निर्णय स्वीकारणे मला शक्य नाहीये आणि मग मी इथे असे राहण्यात ही कोणाचेच भले नाहीये. बाकी इतर कोणतेही छोटे मोठे मतभेद मी स्वीकारले असते पण हा नक्कीच नाही"

" मी या घराबाहेर पडून नोकरी करून एकटीने जगायचे ठरवले आहे. जिथे जगणे माझ्या मनासारखे असेल, माझा आत्मसन्मान जपला जाईल. नशिबाने स्वत:च्या पायावर पुन्हा उभी राहू शकण्याइतकी मी सक्षम आहे, थोडा त्रास नक्कीच होईल, सोपे नसेल कोणाच्याही आधाराशिवाय आयुष्य पुन्हा घडवणे याची कल्पना आहे मला. जर अगदी तशीच वेळ आली तर तुम्ही दोन्ही आई-बाबा आधाराचा हात पुढे कराल याची खात्री आहे. तेच माझे बळ असेल. पण मला प्रयत्त्न करू दे."

"आदित्य, इतका सालस, समजूतदार, एक कोणत्याही स्त्रीस हेवा वाटेल असा नवरा, तू या एकाच गोष्टीवर का असा अडून रहावास हे कोडे माझ्याच्याने सुटत नाही आहे, विचार करून मी थकले की तुझे कोणते रूप खरे, आधीचे प्रेमळ नवऱ्याचे की या तुझ्या या निर्णयानंतर बदलून गेलेल्या नवऱ्याचे, इतका कोरडा झालास तू मला तुझा हा निर्णय ऐकवल्यानंतर. आपला संवाद पूर्ण विझला. आपण एक सुखी संसार गेली अडीच वर्ष केला होता यावर विश्वास बसणार नाही इतका तू बदललास, ज्याने माझे बदलून जाणे हे ओघानेच. आजही  यावर अजून चर्चा करत, बदलण्याची संधी देणे यावर माझा विश्वास नाही. जे झाले ते झाले, तू तुझ्यासारखा वागणार असलास तर ती संधी मलाही मिळायला हवी, मलाही माझ्या मनासारखे जगता यायला हवे. इथून बाहेर पडून कदाचित लग्न न करता स्वत:चे एक मुल माझे  असणार नाही, कारण मला ते पटणार नाही. पण एखादे मुल मी दत्तक नक्कीच  घेऊ  शकेन. आई म्हणून एका जीवाचे आयुष्य घडवण्याची, त्यास आकार देण्याची क्षमता माझ्यात नक्कीच आहे. त्यातून मिळणारा आनंद नक्कीच हवा आहे मला, त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी आहे माझी. दोघांनी मिळून ते करणे जास्त आवडले असते मला पण तुला ते नको आहे म्हणून मी त्यावर पाणी सोडावे असे  नाही. पण हे सारे मी बोलतीये म्हणजे तू विचार बदलावास म्हणून नव्हे. हे फक्त मनातले एकदा बोलून मोकळे होणे आहे."

"आदित्य, तुझ्या माझ्या नात्यास मात्र इथेच पूर्णविराम देऊया, स्वल्पविराम देत नंतर पुढे चालू अशी संधी निर्माण व्हायला मला नको आहे. ते मला पटणार नाही, जे चांगले जगलो ते जपेन मी, जे झाले ते विसरणे मला शक्य नाही, कटुता नाही, दोष देत नाही तुला, जे नशिबात होते ते घडले हे खरेच. कागदोपत्री नाते आहे त्याचे काय करायचे हा निर्णयही सर्वस्वी तुझा. तसेही वेगळे होणे हवे असेल तर ते घडण्यास ही माझी ना नाही. फक्त शक्य असेल तर कोणते दोषारोप न करता सामोपचाराने घडले तर मला बरे वाटेल. तुलाही त्याची गरज वाटत नसेल तरी पुढे एक खात्री बाळग, घटस्फोट घेतला नाही म्हणून मी किंवा माझे दत्तक मुल हे नाव, हे घर दार किंवा तुझ्या कोणत्याही संपत्तीवर कोणताही अधिकार सांगणार नाही."

"मला ठाऊक आहे या माझ्या निर्णयाचा आदित्यसह तुम्हा सर्वाना थोडा त्रास होईल. पण कदाचित हे होतंय हे सारे योग्य वेळेत होतंय. प्रत्येकास आपल्या मनासारखे जगण्याची संधी मिळायला हवी. अजून काही काळाने ते न जाणो शक्य झाले असते नसते. आत्ताच जीव इतका लागला होता कि काही ठरवणे अवघड होते. आमच्या दोघांमुळे तुम्हां दोघांना या वयात ही शिक्षा नको मिळायला हे हि मान्य आहे मला, पण परिस्थितीपुढे हतबल आहोत आपण सारे. तेंव्हा  नंतर कुतरओढ होण्यापेक्षा हे बरे असा म्हणून सर्वचजण पुढे जाऊया"

"आई मी माझ्या खोलीतल्या कपाटात साऱ्या महागड्या साड्या, तुम्हां सर्वांकडून मिळालेल्या उंची भेटवस्तू, ठेवल्या आहेत. या साऱ्याची आता मला गरज नाही. जे सर्वात मौल्यवान होतं ते नाते मागे सोडून जाताना या गोष्टीत जीव का अडकावा? जे माझे दागिने तुम्ही दिलेले होते ते तुम्हाला परत करत आहे, जे आई बाबांनी घातले होते लग्नात, ते त्यांना तसेच परत करणार आहे. स्त्रीधन म्हणून हे तुम्ही ठेऊन घे असे म्हणाल पण तसे नको. प्रयत्न्न करेन मी सारी कटुता विसरत सुरुवातीच्या दोन वर्षातील आनंदक्षण फक्त सोबत घेऊन जाण्याचा. माझ्या नोकरीचे काम झाले आहे. आता राहायची सोय पुढच्या काही दिवसात बघेन. उद्या सकाळी मी इथून जाईन. घराची सोय होईपर्यंत एखादा आठवडा आई - बाबांकडे राहीन. एकदा माझ्या घरी गेले कि पत्ता कळवेन, तुम्ही कधीही हक्काने येऊ शकाल आणि याल अशी खात्री बाळगते. नमस्कार करते"

Tuesday, March 10, 2015

संधिप्रकाशात अजून जो सोने....... तो माझी लोचने मिटो यावी....

एक  आजोबा… वय सत्तरीच्या आसपास, काही वर्ष गादीला खिळून, नंतर नंतर  तर कोणालाच न ओळखू शकणारे. आजी आजोबा दोघंही व्यवसायाने वैद्यकीय  क्षेत्राशी संबंधित. अनेक वर्ष मदतीला एखादी नर्स ठेवून आजी  देखभाल करत. म्हणजे घरात मुलगा, सून, नाती असा परिवार होता . ते लोकही आपल्या परीने काळजी घेत होतेच. सर्वांना वाटत असणारी शक्यता अशी की ते आजोबा आधी जातील, कारण आजी  तशा ठणठणीत होत्या. मग आजींच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण होऊ  शकेल कारण इतकं त्यांनी आजोबांच्या देखरेखीत गुंतवून घेतलं होतं  स्वतःला.

पण झाले उलटेच …… एक दिवस आजी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक गेल्या. आजोबा काही कळण्याच्या मनस्थितीत नव्हतेच, त्यांना काही सांगण्याचाही प्रश्न नव्हताच. पण सेवा करणारी प्रेमाची व्यक्ती आसपास नाहीये हे त्या जीवास कळत असावे का? स्पर्शाच्या, अस्तित्त्वाच्या जाणिवा टिकून होत्या का? मनाचे मनाशी असे घट्ट नाते तसेच टिकून असेल? कारण आजी गेल्यावर पाचव्या दिवशी आजोबाही गेले. मेंदूचा कल याला योगायोग मानण्याकडे झुकू शकतो. म्हणजे ते नक्कीच चुकीचे नाही कारण  तसं असू शकते. पण मग वर व्यक्त केलेली शक्यताही असू शकतेच की!

अजून एक आजी आजोबा  एकमेकांशी कधीही न पटणारे. आजी कर्तृत्त्ववान. आजोबा त्यामानाने कमी. आजी मोठ्या करारी, थोड्या हेकट सुद्धा म्हणाव्या अशा. आजोबा तितके नाहीत. एका शाळेची उभारणी करून, ती नावारूपास आणून, आपण थकल्या नंतर एका तितक्याच मोठ्या आणि तत्त्वनिष्ठ  शैक्षणिक संस्थेला ती सुपूर्त करण्याचे मोठे काम या दोघांनी मिळून केलेले.  दोघांनीही वयाची ऐंशी पार केलेली. पण आजी फारच थकल्या, दोघांनाही काही आजार नाही. म्हातारपण हेच आजारपण. पण आजी पार आडव्याच झालेल्या, त्यामानाने आजोबा हिंडून फिरून, घरात २/३ नोकर, स्वत: वयाची साठी पार केलेली त्यांची लेक तिच्या लेक सुनेसह घरात दिमतीला. आजींनी अशा अवस्थेतही सगळ्यांची आपल्या हट्टी हेकेखोर स्वभावाने त्रेधा तिरपीट केलेली. आपल्या तापट स्वभावाने सर्वाना नको नको करून सोडलेले.

सगळ्यांना वाटत असे आजी गेल्या कि आजोबा ज्यांची तब्येत तितकीशी वाईट नाही, विशेष कोणता आजार नाही ते थोडा मोकळा श्वास घेऊ शकतील. मोकळं आयुष्य काही काळ जगतील. अपेक्षेनुसार आजी गेल्या. पण आजोबांनी तेंव्हा ही त्यांची साथ सोडायची नाही असे ठरवले असावे कारण मोजून तिसऱ्या दिवशी आजोबांनी झोपेतच राम म्हंटले.

या दुसऱ्या घटनेने मात्र विचारांची आवर्तने निर्माण केली. एकापरीने त्या आजींच्या सोबत राहणे हा कोणालाही जाच वाटला असता, मग त्यातून सुटका मिळण्याचा आनंद ही खऱ्या अर्थाने मिळू नये? पण तसेही नसेल कदाचित. त्या साऱ्याची इतकी सवय असेल की त्याशिवाय आयुष्यात एक भली मोठी पोकळीच निर्माण झाली असेल की तिचा सामना करणे अशक्य झाले असेल. किंवा कोणता असा एकमेकांना बांधून ठेवणारा घट्ट धागा असतो जो वर वर पाहता कोणालाच दिसत नाही कोणालाही तो जाणवत नाही कदाचित त्या दोघांना ही तो जाणवलेला नसावा. वरकरणी मतभेद इतके तीव्र असले तरी, आत एकमेकांना घट्ट बांधून ठेवणारा ………

हिंदी चित्रपटात घासून गुळगुळीत झालेले "मै तुम्हारे बिना जिंदा नही रह सकता/ती" असे संवाद यांच्यात कधी घडले नसतील. असा विचारसुद्धा कधी दोघांपैकी कोणाच्या मनात आला नसेल,  एकंदरीत त्यांची असलेली घडण आणि विचारांची बैठक लक्षात घेता, हा अर्थात अंदाजच………… कदाचित याच्या अगदी विरुद्ध असू शकेल की मनात कुठेतरी हि स्पंदने असतील, ते विचारतरंग कधी बाहेर उमटले नसतीलही. पण मनाला मन उमजले असावे. तशीही मनाची ताकद खूप मोठी असते.

अशा साऱ्या विचारांतूनच बर्फी चित्रपटाचा शेवट योग्य वाटतो. त्याचा मृत्यू झालाय, याची कदाचित जाणीव सुद्धा नसलेली ती त्याच्या जवळ जाते, थोडा त्यास सरकवून स्वत:साठी जागा करत त्या पलंगावर  आडवी होते, नेहमीप्रमाणे त्याच्या करंगळीत आपली करंगळी अडकवते आणि कायमसाठी त्याच्यासारखीच निद्राधीन होते.  मृत्यूचे हे अनपेक्षित रूप मात्र विचारात पडणारे. अशा जोडीदारापाठी जगूच न शकणाऱ्या व्यक्तींच्या रूपात घडणारे.  म्हणजे माहित असतं कि  हे असे घडणे आपल्या हाती नाही, जोडीदाराच्या नंतर मागे उरण्याची कल्पना कितीही त्रासदायक वाटली, नकोशी वाटली, कितीही इच्छा व्यक्त केली की तुझ्याशिवाय हे जगणे नको तरीही…अशी अनेक शक्य-अशक्यते वर आधारित असल्यामुळेच असे मृत्यूचे येणे ही कल्पना तशी मोहात पडणारी!

पण दुसऱ्या बाजूस असंख्य जोडप्यांमधील कोणी तरी एक मागे राहतो, गेलेल्याच्या आठवणीत जगतो, आपली कर्तव्ये पुरी करतो, जगणे सुसह्य व्हावे यासाठी शक्य ते सारे प्रयत्त्न करतो. पण जाणाऱ्या व्यक्तीसोबत आपला काही हिस्सा गेलेला असतो. दोघांमधील तो बंध गेलेला असतो. असंख्य गोष्टी दोघांनी एकत्र बोललेल्या, पाहिलेल्या, जाणीवेत उमटलेल्या ज्या फक्त त्या दोघांमधील असतात त्या आता एकाच्या मनाच्या कप्य्याचा हिस्सा बनून जातात आणि त्याच्यासवे त्याही जातात. पण म्हणजेच यातली कोणतीच गोष्ट आपल्या हाती नाही. काही म्हणता काही आपला त्यावर कंट्रोल नाही.असं आपल्यातून काहीतरी जाणे, नाहीसे होणे हा देखील मृत्यूच ना? 

मन:पटलावर कधी कधी असंख्य तरंग उमटतात, आतून इतकं काही बाहेर येऊ पाहते की त्या  सारयास सावरताना, समेटताना माझी दमछाक होते. तरीही अनेकदा काही हाती  लागतंच नाही. विचारांचा वेग इतका जबरदस्त असतो आणि एकातून दुसऱ्यात जाण्याची गती………… की काही करू शकत नाही मी. हातातून वाळू सुटत राहावी तसे….  कशालाच धरून ठेवता येत नाही. एक येतो जातो, पाठोपाठ दुसरा…. तिसरा …… हे चालूच एकाच्या अस्तित्त्वाचा अंत…. दुसऱ्याच्या …. तिसऱ्याच्या … हे नाट्य लागोपाठ माझ्याच मन:पटलावर घडणारे… असे जोडी जोडीचे मृत्यू अनुभवणारी…. हतबल, निराश…. माझाच काही हिस्सा हरवताना पाहणारी अन तरीही काही
करू न  शकणारी मी .
अनेकदा एखादा विचार, एखादा धागा जोडीदार गेलेल्याच्या मागे उरावा तसा एकटाच मनात उरणारा, अधून मधून त्याच्या अस्तित्वाची जाणिव करून देणारा, जणू त्याचे ते कर्तव्य असावे असा. त्याला मनातच राहू देणारी , पण त्यास घडविण्यास, फुलविण्यास काहीच न करणारी मी. नकळत माझ्या मनात एकटेपणाचे, खुरटलेले जगणे नशिबी घेऊन मग मृत्यू पावणारा तो.

असे दिवसागणिक मनात विचारांच्या मृत्यूचे थैमान कधी कधी चालू असताही, खऱ्या मृत्युच्या विचारांना सतत दूर लोटणारी किंवा फक्त स्वत:चाच एकतर्फी विचार करत जोडीदाराच्या मनाचे काय होत असेल हा विचार न करता,
नको तुळशीचे पान, नको गंगाजल
हात तुझा हाती असता व्हावा संधिकाल
असे म्हणणारी मी.

अनेक रूपात भेटणारा तो ,
आणि तरीही त्याच्या बद्दलचे
कुतूहल कधीही न शमणारे .
कधी चोर पावलाने येऊन
मागून कवेत घेणारा
कधी येतोय येतोय म्हणत
चकवा देत राहणारा
कधी परतीचे तिकीट
न मागताच हाती ठेवणारा
दोन बाजूस दोन रस्ते
खुणावत असतानाच
डेढ एंडचा फलक हाती
घेऊन सामोरा येणारा
चिंतेतून दर्शन घडवणारा
कधी चितेवरही विश्वास
न बसू देणारा
कधी शांत सात्त्विकतेने
कधी थैमान घालत
मनातल्या विचारांचा
फुटणाऱ्या लाटेचा
अंधार दाटून येताना
हातातून निसटून
जाणाऱ्या वाळूचा
संपणाऱ्या नात्यांचा, बंधांचा
मृत्यू ……………