Sunday, June 25, 2017

समाज बदलताना

समाजची एक चौकट असते.. नियमांची, याेग्य अयोग्य, नैतिक अनैतिकतेची. जन्माला आल्यावर तिची लिखित प्रत कधी कोणी तुमच्या हाती ठेवलेली नसते. जसजसे तुम्ही समाजाचा हिस्सा बनत जाता तसतशी तुम्ही ती अंगिकारत जाता.

आपल्यापैकी कोणीच खरेतर हौस म्हणून उठसुठ या चौकटी मोडत नसते, येताजाता नियमांची पायमल्ली करत नसते. पण घडते असे कधीतरी की तुमची कृती ही चौकट मोडणारी ठरते. कधी परिस्थिती ते घडवते, कधी तुमची गरज असते, कधी तुमच्या भावना, तुमचा आतला आवाज ते घडवतो.

अनेक गोष्टी प्रथम घडल्या तेंव्हा त्या समाजाच्या चौकटीत बसणारया नव्हत्याच. पण कृती करणारयाने आपल्या भावनांशी, आपल्या आतल्या आवाजाशी प्रामाणिक रहायचे ठरवले आणि कृती केली, समाजापुढे मांडली, आपल्या कृत्याची जबाबदारी स्विकारली. समाजाने काही खुल्या दिलाने स्विकारल्या, काही अंशत: नाईलाजाने मान्य केल्या काही नाकारल्या. समाजाच्या चौकटीही अशाच विस्तारत जातात.

अनेक उदाहरणे देता येतील अशा समाजाच्या चौकटी बदलून टाकणारया व्यक्तींची, घटनांची. नोकरीसाठी सर्वात पहिल्यांदा आपल्या घराचा उंबरठा ओलांडला ती स्त्री, जी तिने आपल्या त्या चार दिवसांतली सर्व वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक बंधने झुगारली ती, ते पहिले जोडपे ज्यांना आपल्यातला बंध जपण्यासाठी, नाते फुलवण्यासाठी लग्नसंस्थेची गरज नाही असे ठामपणे वाटले आणि म्हणून त्यांनी लिव्ह इन रिलेशनशीप स्विकारली, आपले नाते जपले, टिकवले, फुलवले, आणि समाजाच्या चौकटीत न बसणारा आगळा संसार साकारला, तो किंवा ती जिने आपले विवाहबाह्य संबंध नाकारले नाहीत, समाजापुढे ठेवले, पण ते नातेही प्राणपणाने जपले, ज्याने कोणी आपण गे किंवा लेस्बियन आहोत हे जगापुढे मांडले....  अशी अनेक

खरेतर आपल्यापैकी प्रत्येकाला योग्य कल्पना असते आपली कृती समाजाच्या चौकटीत बसते की नाही याची, त्याच्या परिणामांची. तर अशी समाजाच्या चौकटीत न बसणारी कृती आपण करायला निघालो असू तर आधी विचार करायचा, हे आपल्याला पेलेल की नाही याचा उगीच नसती साहसे करायची नाहीत कारण त्याचे परिणाम दूरगामी असू शकतात. आपल्या क्षणिक भावनेतून, गरजेतून करण्याच्या या गोष्टी नव्हेत. कृती केल्यानंतर लगेच किंवा योग्यवेळी ती स्विकारणे, मान्य करून जबाबदारी घेणे हा एकच पर्याय असायला हवा. समाजाने ते मान्य करायचे कि नाही, तुम्हांला तुमच्या कृतीसह स्विकारायचे की नाही हा सर्वस्वी समाजाचा निर्णय....  तो जो जसा असेल तसा मान्य करून, त्याचा योग्य तो आदर करून पुढे जायचे. ही खरेतर अयोग्याला योग्य दिशा, अनैतिक कृत्यही नैतिकतेने निभावणे. या क्षणी कमकुवत नाही व्हायचे, त्या परिस्थितीपासून, माणसांपासून, आपल्या जबाबदारीपासून पळ नाही काढायचा.... ते खरे अयोग्य, अनैतिक.

समाजमान्यता नसलेली, रूढीमान्य नसलेली गोष्ट माझ्या हातून घडली. त्या सारयात मला कधी खोट्याचा आधार घ्यावासा नाही वाटला, त्याचे जे बरे वाईट परिणाम होते ते माझ्या वाट्याला आले. जे त्यापायी भोगावे लागले ते मी भोगले, खूप काही गमावलेही. पण मी परिस्थितीपासून पळ काढला नाही, जबाबदारी टाळली नाही, जे काही होते ते प्राणपणाने निभावण्याचा शक्य तेवढा चांगला प्रयत्न मी केला ही गोष्ट कदाचित शेवटच्या क्षणी समाधान देईल. या काळात असेही काही सुहृद होते त्यांना माझ्या कृतीला योग्य- अयोग्य असे कोणते लेबल लावायचे नव्हते, माझ्याशी असलेले जे काही त्यांचे नाते होते ते त्यांना बाकी सारयाहून महत्वाचे वाटले, माझ्या सोबत असणे, आधाराचा हात पुढे करणे हा त्यांनी स्विकारलेला पर्याय होता. मी आजन्म या सारयांची ॠणी राहिन.