Tuesday, May 26, 2020

आजच्या खास दिवसाची कविता


तुला कधी जाणवते का रे
हा जो आपला संसार आहे
जिथे आपण दोघे नाही तिघे आहोत
जणू एका नात्याच्या धाग्याने आपण तिघे घट्ट बांधले गेलेले
तू, मी आणि देव एका चिमुकल्या जागेत
संसार करू पाहणारे आपण तिघे जण
एकमेकांशी जुळवून घेत चाललेला आपला संसार
आपण रोज तिघेही काडी काडी जमवतो
आणि संध्याकाळी घरट्यात परततो
एक अतूट प्रेमाचा बंध तिघांना एकत्र बांधतो
प्रेम चिंता भांडणे ओढ काळजी तिघांनाही
कोणी छोटा मोठा असे काही आपल्यात उरत नाही
एकमेकांवाचून हा संसार पुरा होत नाही
------------------------------------------------------------

तू नेहमी म्हणतोस ना
की तुझ्याहून अधिक तू मला कळतोस
हो ... किती खरे आहे हे
कारण माझ्या अस्तित्वाचे कारणच मूळी तू आहेस
मी आले आहे या जगात ते कारण
मला दगडातून तासून हिरा मिळवावा
तसे मिळवायचे आहे मला
तुझ्यातून तुलाच
आणि माझ्या हृदयात ठेवायचे आहे
तेंव्हा कुठे या देहात प्राण भरेल
तुलाच कधी उमजले नाही असे तुझे मन
जपायचंय माझ्या इवल्याशा ओंजळीत
फुलासारखे
माझ्या हृदयात जपलेला तू
माझ्या ओंजळीत भरून राहिलेले तुझे मन
आणि त्याच वेळी माझ्या मनात उमटणारी
एक प्रार्थना .....
आपले सारे जग तेजोमय करून टाकेल 
- अनघा




1 comment:

  1. किती छान आहेत ह्या कविता आजच्या आपल्या खास दिवसाला परिपूर्ण करणाऱ्या

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!