Saturday, December 22, 2012

या वळणावर ......


कातरवेळा.... आदित्य अस्वस्थ. तरीही बाहेर पडलेला,उंचापुरा आदित्य, स्मार्ट, बारीक काड्यांचा चष्मा डोळ्यांवर, अंगात जीन्स आणि पांढरा  शर्ट. रस्ता फुटेल तसं चालत राहावं, बरोबर फक्त मोबाईल घेतलेला. गाणी ऐकत चालत राहावे हरवलेले काहीतरी पुन्हा परत मिळते का ते बघत. मोबाईलच्या कॉर्डचे एक टोक कानात, दुसरे मोबाईलशी जोडलेले आणि मधे हा सारा गुंता.  तो मनात म्हणतो "अगदी आपल्या दोघांची अशीच अवस्था आहे बघ.  दोन टोकांना आपण दोघे, आणि मध्ये हे सारे आपल्या प्रेमाचे, आठवणींचे, सुख-दु:खाचे हे सारे गुंते."
 
एकंदरीतच हा गुंता सोडवणे अवघड आहे. असा विचार करून  तो  गाणे सुरु करतो.........."रंजिश ही सही....दिल ही दुखानेके लिये आ...." का माझ्या प्ले-लिस्ट वर हीच गझल सर्वात पहिली लागते? पहिल्यांदा ऐकताच या गाण्याच्या प्रेमातच का पडायला झालं होतं? जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेंव्हा आपली भेट झाली नव्हती. म्हणजे तुझ्या भेटीपूर्वीच मी या गाण्याच्या प्रेमात होतो.  पण "दिल ही दुखाने के लिये आ" हे मागणे मी कधी मागितले नाही, तरी हेच का?" 
 
मनात आलेली गोष्ट मिळाली नाही असे कधी होते हेच त्याला  जिथे माहित नव्हते, तिथे इतक्या खोलवर पोहोचणाऱ्या दु:खाची कल्पना केवळ अशक्य. पण हे गाणे कुठेतरी खोलवर जाऊन रुतलेले. अशा अचानक भेटलेल्या, अचानक गवसलेल्या गोष्टी तुमचे आयुष्य बघता बघता बदलून टाकतात नाही? या गाण्यानंतर तो  मेहंदी हस्सन, बेगम अख्तर, गुलाम अली, जगजीत-चित्रा यांचा दिवाना होत गेला.  दु:ख वेड  लावते म्हणतात ते कसे ते त्याला तेंव्हा कळू लागले.
 
रेडीमेड असे करिअर समोर होते, एका दिवसाच्या नोटिशीवर तो  घरचेच ऑफिस जॉईन करू शकणार होता, नव्हे करणारच होता. एकदा का इथून इंजिनिअर झाला  कि दोन अडीच वर्षे अमेरिकेत पूढील शिक्षणासाठी आणि तिथून थेट घरच्याच कंपनीत ....सिनिअर पोस्टवर. सारे कसे अगदी आखीव रेखीव. तेंव्हाच त्याची  भेट झाली उल्काशी, कॉलेजमधल्या एका सोशल अवेअरनेस च्या एका मीटिंग मध्ये. झोपडपट्टीतल्या एका शाळेत महिन्यातून दोन रविवारी ती  शिकवायला जायची. या साऱ्या गोष्टी तेंव्हा मैलोनमैल दूर होत्या त्याच्यापासून. ती  बोलत होती,  वर्गातल्या मुलांना आवाहन करत होती थोडा वेळ या कामासाठी देण्यासाठी. आदित्य ऐकत होता  कि नव्हता  ठाऊक नाही पण भारावून गेला होता.. पुढच्या रविवारी उल्का बरोबर जायचे त्याने कबूल केले आणि चक्क सकाळी ९ वाजता त्या शाळेत पोहोचला  देखील!
 
मग अनेक रविवार तो  उत्साहाने तिथे जातच राहिला. अक्षरा नावाची एन.जी.ओ. होती जी झोपडपट्टी, तसेच बांधकामावरील मजुरांच्या मुलांसाठी या शहरात शाळा चालवत होती. उल्काची आई त्या एन.जी.ओ. शी संबंधित होती ओघाने उल्का अधून मधून तिथे शिकवायला जाताच होती.  दोन्ही कारणे होती आदित्यसाठी तिथे जाण्याची.  तिच्या सोबत राहणे तर होतेच पण या मुलांना शिकवणेही  इतके आनंददायी होते कि बाकी त्याच्या नित्याच्या अनेक एषो आरामाच्या गोष्टी तितक्या त्याला  महत्त्वाच्या वाटेनाशा होत गेल्या. सवयी बदलत गेल्या. अनेक तडजोडी तो  सहजगत्या करू लागला. त्यांचे शेवटचे वर्ष होते ते. त्यामुळे प्रोजेक्ट सबमिट करण्याचे कामही होतेच. त्यामुळे रात्र रात्र जागून प्रोजेक्टचे मित्रांसोबत बसून केलेले काम. उल्का त्याच्या पेक्षा २ वर्षे मागे होती. तसे फार दिवस आदित्यचे  इथे राहिले नव्हतेच. एकदा शेवटचे सेम संपले कि मला लगेचच पुढच्या तयारीला लागायचे होते. ही गोष्ट आतापर्यंत इतकी साधी सरळ होती कि काही त्यावर विचार करायचे काही कारणच नव्हते.
 
पण त्याच्या  मनात मात्र काही वेगळेच विचार सुरु झाले होते. इथे राहून हे काम करण्यात मोठी मजा वाटू लागली होती. समाज बदलवण्यात आपला सहभाग त्याला आनंददायी वाटत होता. आयुष्यात प्रथमच समाजात तो इतका मिसळून गेला होता. अक्षरात येण्यापूर्वीचे आणि त्या नंतरचे त्याचे जगच निराळे होते. अक्षराने त्याचे विचार, राहणीमान, सवयी, आवडी-निवडी बऱ्याच बदलून टाकल्या होत्या. शिवाय उल्काच्या सहवासाची ओढ होतीच. एकीकडे हळूहळू त्यांच्या गाठीभेटी वाढू लागल्या होत्या. तशी उल्का एक हुशार, पण थोडी लाडावलेली मुलगी होती. आईने समाज कार्यात स्वत:ला झोकून दिलेले होते, घरी पैशाला काही कमी नव्हती. मजा म्हणून ती हे शाळेत शिकवण्याचे काम रविवारी करत होती. इंजिनीअर का व्हायचे होते याचे पण कोणते कारण तिच्याकडे नव्हते. बाबा म्हणाले म्हणून ती इथे आली होती.  थोडक्यात अभ्यासात हुशार, दिसायला गोड अशी, लाडावलेली, श्रीमंत घरातली, पण करीअर वगैरे गोष्टींचा फारसा विचार न केलेली, आयुष्याबद्दल फार मोठी स्वप्ने नसलेली.
 
एके  दिवशी सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर सहजच त्याने हा विषय काढला.
 
"बाबा, मी आता असे केले कि पुढच्या शिक्षणासाठी  एखाद दोन वर्षे मधे जाऊ देवू का? "
"का रे आदित्य? काय विचार आहे पुढे तुझा?"
"हि सेम संपल्यावर सरळ आपली कंपनी जॉईन करतो, आणि नंतर २ वर्षांनी जाऊन पुढचे शिकेन, शेवटी बाबा अनुभव महत्वाचा असे तुम्हीच नेहमी म्हणता ना?"
"अरे, हो ते आहेच. पण आता तुला जे काही शिकायचे ते शिकून घे. मी कंपनी सांभाळायला समर्थ आहे. परत आलास कि मग तुलाच सांभाळायचे आहे सारे कामकाज. थकलो आता मी."
"असे काय बोलता बाबा?"
"आता मी जात नाही, नंतर पाहू."
"बरं, तुला जसे ठीक वाटेल तसे. माझे काही म्हणणे नाही"
 
हेच हवे होते त्याला. मग मात्र त्याने अक्षराच्या कामात अगदी झोकून दिले स्वत:ला. सोबत मधून मधून घराच्या कंपनीत जाणे चालूच होते. जात्याच हुशार आणि लहानपणापासून घरात बिझनेसचे बाळकडू मिळालेले असल्याने त्याला ते फारसे जड गेले नाहीच. उल्काची आणि त्याची मैत्री दिवसेंदिवस गहरी होत चालली होती. निदान असे त्याला वाटत होते. अक्षराच्या कामात ती थोडा वेळ  त्याच्या सोबत असे. बाकीचा वेळ तिचा कॉलेज आणि  मौजमजा करण्यात जात असे. पण संध्याकाळी कॉफी शॉप, कधी ट्रेक तर कधी सिनेमा असे छान दिवस चालले होते. पण उघडपणे या नात्याबद्दल बोलावे असे कोणालाच वाटत नव्हते. अक्षराच्या आता अशा ३ ठिकाणी पूर्णवेळ शाळा सुरु झाल्या होत्या. आणि त्याचे बरेचसे श्रेय आदित्यला जात होते. त्यामुळे उल्काची आईपण आदित्यवर खूष होती.

(क्रमश:)

Wednesday, November 28, 2012

कांदा मुळा भाजी.......


लहानपणापासून मंडईत जाणे हि माझ्या आवडीची गोष्ट! तेंव्हा घरी फ्रीज नसल्याने २/२ दिवसांची भाजी घरी येत असे. भाज्यांचे नीट रचून ठेवलेले ढीग. सर्वत्र जाणवणारा ताजेपणा, रसरशीतपणा इतका मोहवणारा असतो की .....नंतर कॉलेजला जावू लागले तो पर्यंत घरी फ्रीज चे आगमन झाले होते, त्यामुळे मी खूप आनंदाने रविवारी भाजी घेऊन येत असे, नुसती भाजीच नव्हे तर फळे, देवपूजेसाठी आठवडभर पुरतील इतकी फुले असं सारं घेऊन आले कि मग मला खूप छान वाटत असे. नंतर त्या घरी नेलेल्या भाजीची निवडा निवडी करण्यासाठी आईला काय कष्ट पडतात याची तेंव्हा कल्पनाच नव्हती. ढीगभर भाजी घरी घेऊन येण्यात, तिच्या ताजा वास श्वासात भरून ठेवणेच इतके आनंददायी असते की हा त्रासाचा विचार ठेव्हा मनात कधी येतच नसे.
अजूनही ही गोष्ट तितकीच आवडीची आहे. भाजी मंडईत जावे, ताज्या ताज्या भाज्या बघितल्या की काय घेऊ अन काय नको असे होऊन जाते. दिवसाचे १०/१२ तास ऑफिसमध्ये जिचे जातात तिला रोज जाता येता भाजी घेणे शक्यच नाही. त्यामूळे आठवड्याची भाजी एकदमच हा शिरस्ता गेली अनेक वर्षे आमच्याकडे आहे. अशारितीने भाजी आणणे, निवडून वेगवेगळ्या प्लास्टिक मध्ये ठेवणे म्हणजे आठवडाभर आज काय भाजी करावी ही चिन्ता मिटते. मात्र वीकेंड मधल्या कोणत्या दिवशी भाजी आणायची, किती आणायची, तिची उस्तवार करायला कशी जमणार आहे याचा आधी विचार करावा लागतो, पण म्हणून काही  त्यातली मजा कमी होत नाही. त्यातून हा ऋतुच आनंदाचा ठेवा असावा असा ताजा तवाना. 
रविवारी सकाळीच मंडईत शिरावे. कोणत्या नव्या भाज्यांचे आगमन झाले आहे याचा अंदाज घ्यावा. तुरीच्या शेंगा, गाजर, मटार आणि मेथीच्या ताज्यातवान्या गड्ड्या दिसू लागणे ही माझ्या मंडईत जाण्याच्या आनंदाची परिसीमा असते. उंधियो, मेथीचे विविध प्रकार जसे की ठेपले, भरपूर लसूण  घालून केलेली सुकी भाजी, मेथी गोटे, गाजर हलवा, मटार करंजी, मिक्स भाज्यांचे सूप, लोणचे असे विविध प्रकार मनात डोकावू लागतात. त्यामुळे भाज्या घेत घेतच माझा आठवडाभराचा मेन्यू मनातल्या मनात तयार होतो. आत शिरल्याबरोबर मिरची, आले लसूण याचा गाळा असतो. थंडी पडू लागलीये, थोडे आले जास्त घेवूया म्हणजे वड्या करता येतील. लसूण ही घ्यायला हवा, थोडी सुकी चटणी करून ठेवायला हवी. मग पुढचा गाळा असतो रसरशीत टोमाटोचा. रविवारी पुलाव आणि सार करावे का? कोणी पाहुणे येणार आहेत का, कोणता सण आहे का, एखादा खास पदार्थ बरेच दिवसात झाला नाही अशी घरच्या दोन थोर व्यक्तींकडून तक्रार येण्याची शक्यता आहे का  या आठवड्यात हे एकदा आठवून पाहावे आणि त्या नुसार भाज्या घेत जावे. किती पालेभाज्या आपल्याचाने निवडून होतील याचा अंदाज घेत त्यांना ही पिशवीत जागा करून द्यावी. मग स्वीट कॉर्न मला न्या म्हणत मागे लागतो, म्हणून त्यास घ्यावेच लागते. आजकाल लाडावलेल्या मुलासारखा तो झाला आहे. उपासाचे दिवस असतील तर मग रताळी कुठे दिसतात का ते पाहावे लागते, म्हणजे एकादशीची सोय होईल, रताळ्याच्या गोड काचऱ्या, तिखट कीस, हे पदार्थ साबुदाण्याचे  वडे किंवा थालीपीठ  सोबत तांबड्या भोपळ्याचे भरीत, ओल्या नारळाची चटणी  असले की उपासाचे ताट कसे भरल्यासारखे वाटते नाही?  
तुरीच्या शेंगा दिसल्या की उन्दियोच्या इतर भाज्या जसे की कंद, सुरती पापडी, कच्ची केळी  आल्यात का हे पहावे, सगळ्या पाव पाव किलो घेत घरी जावून उंधियो बनवावा आणि पुढचे २/३ दिवस मनसोक्त त्यावर ताव मारावा  नाहीतर तुरीच्या शेंगाना घरी नेवून मीठ हळद घालून उकडून टेबलवर ठेवून द्याव्यात, बघता बघता संपून जातात. भाद्रपदात मिळणाऱ्या मावळी काकड्या दिसल्या की मग हळदीची पाने कुठे मिळतील ते पाहावे म्हणजे गोड पानग्या करता येतील. भरपूर कोथिंबीर आली की मग एकदा वड्या झाल्याच पाहिजेत. छान केशरी दळदार भोपळा आहे, तो  घारगे बरेच दिवसात झाले नाहीत अशी आठवण करून दिल्याखेरीज राहात नाहीत. मटार चांगला आला आहे, भरपूर घरी न्यावा, एकदा मटार उसळ आणि पाव हा बेत, कधी मटार भात तर कधी मटार करंजीचा बेत करावा. फेब्रुवारी संपता संपता फणसाच्या कुयऱ्या दिसतात का याचा शोध घ्यावा किंवा आसपासच्या कोणत्या घरी फणसाचे झाड आहे ते लक्षात ठेवून त्यांना सांगून ठेवावे. आजकाल मला वर्षभर ओले काजू सुकवून ठेवता येण्याची पध्दत कळली आहे, त्यामुळे फणस आणि ओले काजू याची भाजी, त्याला वरून लाल मिरचीची फोडणी म्हणजे सुख! तसा नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ म्हणजे या सुखाचा परमावधी. इतक्या प्रकारच्या भाज्या या दरम्यान उपलब्ध असतात की काय घेऊ आणि काय नको असे मला होऊन जाते. घरी नेलेल्या भाज्यांची उस्तवार करता यावी आणि विविध चवींचे खास पदार्थ बनवता यावेत म्हणून न या कालावधीत वीकेंड २ नाही तर ३/४ दिवसांचा असावा अशी फार इच्छा आहे.... :) 

आवळे घरी न्यावेत, किसून सुपारी, थोडा मोरावळा करून ठेवावा. थोडे लोणचे करावे त्यात थोडी आंबे हळद जी ओली मिळते या काळात, ती घालावी. लिम्बांचे गोड लोणचे बनवून ठेवावे, उन्हाळ्याची बेगमी म्हणून सरबताची सोय करून ठेवावी. पालक वर्षभर मिळतो, पण या काळात तो जास्तच ताजा टवटवीत वाटतो, त्याच्या पुऱ्या कराव्यात. भरली वांगी किंवा खानदेशी वांग्यांचे भरीत करावे, सोबत गरमागरम भाकरी आणि ताजे लोणी. किंवा भरपूर लसूण आणि तेल घालून केलेली आंबाडीची भाजी .... आहाहाहा..... एरवी जास्त न आवडणारे पावटे पण या काळात कधीतरी उसळ करून चविष्ट लागतात. नवरात्रात कधी काकडीसारखी लांबसडक जांभळी वांगी मिळतात, त्यांचे काप करावेत, डाळीचे पीठ, मीठ तिखट लावून थोड्या तेलावर भाजले की किती खातो हेच कळत  नाही, तीच गत सुरणाच्या कापांची.

थोडी शोधाशोध केली तर लसणीची पात मिळते कधी...थोडी कधी आमटीत टाकावी नाहीतर कधी छानशी चटणी करावी. इतर कोणत्याही सिझन मध्ये मिळणारा मुळा या ऋतूत मला नेहमीच चविष्ट वाटत आलाय. जवळपास चक्का वाटावा इतकं घट्ट दही घ्यावे, त्यात ओला नारळ, कोथिंबीर, एखादी हिरवी मिरची मिठाबरोबर वाटून,सोबत चिमुटभर साखर...सही लागते ही कोशिंबीर!
याच काळात फळे ही भरपूर येतात यामुळे चिकू शेक, स्ट्राबेरी किंवा सफरचंद शेक, फ्रुट सलाड हे ओघाने आलेच. (दूध आणि फळे एकत्र करून खावू नये या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून) नुकती नुकतीच दिसू लागलेली द्राक्षे, स्ट्राबेरी संत्री यांचा घरी वावर वाढतो तो थेट आंब्यांचे घरी आगमन होई पर्यंत. फळांची रेलचेल मग कधी इतकी होते की मग कोबीच्या कोशिम्बीरीत द्राक्षे दिसू लागतात, काकडीसोबत घट्ट दह्यात मीठ मिरची लावून डाळिंबाचे दाणे जावून बसतात तर कधी सफरचंद, डाळिंब, काकडी, अननस आणि थोडे अक्रोड चुरून घातले की थोड्या मीठ मिरपुडीने सुरेख सलाड तयार होते. कधी सफरचंदाचा कधी अननस घालून केलेला शिरा जेवणाची  लज्जत वाढवतो. तर कधी क्रीम मध्ये थोडी साखर घालून फेटले आणि भरपूर स्ट्राबेरी त्यात घातल्या की एक सुंदर डेझर्ट तय्यार!
बघता बघता हा हिरवागार सीझन संपू लागतो, हळू हळू मंडई रुक्ष भासू लागते. त्याच त्या ४/५ भाज्या दर आठवड्याला घरी नेतोय की काय असे वाटू लागते. थोडा पाराही चढा होवू लागतो. जेवण तितके आनंददायी वाटेनासे होते. मग फळांचा राजा पुन्हा अवतरतो आणि सारा रुक्ष नीरसपणा दूर करतो. पानात रोज सकाळ संध्याकाळ आमरस असला गरमागरम पोळी किंवा भातासोबत की मग कोणती भाजी आहे किंवा नाही याने काही फरक पडेनासा होतो. आंबा, फणस, जांभळे, करवंदे, चेरी, खरबूज, कलिंगड ही फळे मात्र दिवस रसदार करतात आणि उन्हाळा थोडा सुखाचा जातो. याच उन्हाळ्यात थोडी पावसाळ्याची बेगमी म्हणून थोडे सांडगे, भरल्या मिरच्या, थोड्या कुरडया (भाजी साठी) करून ठेवाव्यात. पावसाळ्यात मंडईत जाणेच नकोसे होते. कसेबसे ते दिवस ढकलून मी मनापासून वाट पाहत राहते या हिरव्यागार, ताज्या टवटवीत दिवसांची!


(त्याचं काय आहे की एखादा पदार्थ बनवताना किंवा खाताना मी त्यात इतकी गुंतलेली असते की त्यांचे फोटो काढणे वगैरे माझ्या लक्षात येणे केवळ अशक्य...त्यामुळे सर्व फोटो आंतरजालावरून साभार.)

Tuesday, November 20, 2012

शतकानिमित्त संवाद.....


हे मात्र अगदी ठरवूनच होते. १००वी पोस्ट कशी असावी याचा विचार साधारण ९६/९७ वी पोस्ट ब्लॉगवर टाकतानाच सुरु झाला होता. आवडीच्या विषयावरच असावी हे नक्की झालं होतं. लिहिताना आवडीचा विषय म्हणजे खादाडी. तसंही "इस बात पे सेलिब्रेशन तो बनता है" :) पण झालं काय की मधल्या २/३ पोस्ट साठी काही लिहिणेच होईना. हे म्हणजे कसं की "९६ वर असताना १०० वी रन कशी घ्यायची हे नक्की करायचे, पण मधल्या ३ धावा घेतानाच इतके चाचपडत खेळायचे की कधीही आउट होईल" असे झाले.

तसा मी ब्लॉग सुरु केला तो २००९ मध्ये. काय आणि कसं लिहायच याचा फारसा अंदाज आणि आराखडा नव्हताच. नंतर मी माझ्या कामात आणि अभ्यासात इतकी व्यस्त होऊन गेले की या गोष्टी जवळपास विसरूनच गेले. त्यामुळे आरंभशूरपणा या गटात हा ब्लॉगही लगेचच सामील झाला. याचे दुसरे कारण म्हणजे इन्फी बीबी आणि इन्फी ब्लॉग ज्यामुळे व्यक्त होण्यासाठी इतर कशाची गरजच नाही उरली.

त्यामुळे खऱ्या अर्थाने मी या ब्लॉगवर कधी लिहू लागले तर ते २०११च्या एप्रिल-मे महिन्यात. तो कोण वाचतय, नाही वाचत आहे, याकडे सुरुवातीला फारसे माझे लक्षही नव्हते. फेसबुकवर पण मी त्याचसुमारास अवतरले त्यामुळे तशा दोन्ही गोष्टी अपरिचितच...... मग परिचय होण्याचा सुरुवातीच्या काळात असतो तसा बुजरेपणा आणि एक प्रकारचे अवघडलेपण तेंव्हाही होतेच. नावाप्रमाणेच हा ब्लॉग माझे मला असाच होता. थोडा लोकांपासून अलिप्त असा. अनेक दिवस काही न लिहिता जात, ज्याचे फार काही वाटतही नसे. नंतर कधीतरी मराठी-ब्लॉग विश्वावर हा जोडला आणि खऱ्या अर्थाने ह्या जगाशी माझी ओळख झाली. तत्पूर्वी काही ब्लॉगर मित्र मैत्रिणी होत्या जसे की श्रीयुत धोंडोपंतांचा ब्लॉग त्यांचाच दुसरा सांजवेळ, अजून एक मित्र आनंदचा ब्लॉग आणि अजून काही निवडक.

मुळात मी आळशी जमातीतली. नेटाने एखादी गोष्ट करण्यासाठी तितकंच मोठं कारण हवे. यावेळी ते कारण माझे मीच होते त्यामुळे हा प्रवास किती चालू राहील याबद्दल साशंक होते. तरीही मी खऱ्या अर्थाने लिहिती झाले. कोणी वाचतंय किंवा नाही, हे न पाहता व्यक्त होण्यातला आनंद घेवू लागले. खरतर हे अशा प्रकारे व्यक्त होणे याला मर्यादा आहेत, याची जाणीव असूनही हा प्रवास १००व्या पोस्ट पर्यंत चालू राहिला. याचे श्रेय आपणा सर्वाना. सहज,उस्फूर्त असे जेवढे लिहिणे जमेल तेवढेच लिहायला आजतरी मला आवडते आहे. त्यामुळे ठरवून काही लिहिणे थोडे अवघडच जाते. मग  ती कविता असो, किंवा इतर लिखाण असो अगदी कोणावर टीका असो, नाहीतर आठवणीना उजाळा. याच ब्लॉगने काही नवीन मित्र-मंडळही मिळवून दिले. त्यांच्या या ब्लॉगवर किंवा मेल, फेसबुकवर मिळणाऱ्या प्रतिक्रिया मला लिहिते ठेवत गेल्या, आणि मी लिहित गेले. या साऱ्यांचे मन:पूर्वक आभार!

१०० व्या पोस्टनंतर आता असे वाटते की स्वत:च्या जगापलीकडे जाऊन आता लिहिता आले पाहिजे. म्हणजे अट्टाहास नाही पण तरी देखील. नाव जरी मी....माझे.....मला असले तरी त्यापलीकडचे पण एक विशाल असे जग जे आहे त्याला या ब्लॉगवर माझ्या नजरेतून वाचता यायला हवे. "मी"ला वगळून लिहिता यायला हवे. खादाडीवर लिहायला हवे. पण सध्यातरी रेसिपी शेअर करणे हा हेतू नाहीये. त्याकरिता अनेक उत्तम असे ब्लॉग्स, उत्तम अशी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. मी त्यापेक्षा वेगळं काय लिहू शकते? सर्वसाधारण नाही तरीदेखील किमान "अनघास्पेशल" अशातरी रेसिपी या ब्लॉग वरून शेअर व्हायला हव्यात, स्वयंपाक या कलेविषयी लिहायला हवे, विविध प्रदेशातील खाद्य परंपरा, त्यांची वैशिष्ट्ये या बद्दल लिहायला नक्कीच आवडेल. मुळातच भारतीय खाद्य परंपरा मला खूप भावते कारण त्यामागे केलेला विचार, त्यातील वैविध्य मला मोहून टाकते. पण अजून अंदाज येत नाहीये की हे लिहिणे कसे आणि किती दूरपर्यंत पेलवेल?

तरीही हा ब्लॉग माझ्यासाठी एक सेतू बनला "virtual" जगाशी जोडले जाण्याचा. जितके आनंददायी आहे स्वत:कडून सशक्त असे काही लिखाण घडणे, तितकेच आनंददायी आहे ते इतरांचे असेच ब्लॉग वाचणे. अनेकजण इतके सुंदर आणि सकस लिहितात की, त्यांच्या नवीन लिखाणाची मी वाट बघत असते. वेळ मिळेल तसे वाचूनही काढते. दिवसातून एकदातरी, त्यांच्यापैकी कोणी काही नविन लिहिले कि नाही ते पाहते. धोंडोपंत, महेंद्रकाका, वटवट सत्यवान हेरंब, तन्वीचा सहजच, अनघाचा ब्लॉग, जागेची टंचाई असण्याच्या काळात शब्दांना अब्द अब्द जागा करून देण्याऱ्या साविताताई, अपर्णाची माझिया मना म्हणत घातलेली साद, आनंदचा White lily, संवादिनी, अजूनही फळ्यावर लिहिणारे विसुभाऊ (गुरुजी होते का हे पूर्वी?), भानस, चकली प्रमाणेच मस्त असा वैदेहीचा ब्लॉग असे अनेक. यांच्यापैकी अनेकांशी माझा प्रत्यक्ष परिचय नाही. पण अनेक वर्षांचा परिचय असावा अशी ओळख त्यांच्या ब्लॉगमुळे वाटते. मी मागे म्हंटल्या प्रमाणे "संवाद संपला की नाती संपतात, म्हणूनच मला जपायचा आहे हा सेतू, हे नातं. संवाद संपला की सारे जगणेच रुक्ष कोरडे होवून जाते. म्हणूनच "आपुला हा संवाद आपणाशी" असाच चालू राहो."

Monday, November 12, 2012

ते ३ शब्द.....त्या साऱ्या आठवणी

मेल बॉक्स उघडल्यावर  नवीन येऊन पडलेल्या मेल्सवर आधी एक नजर टाकली. एका मेल कडे लक्ष गेले अन सब्जेक्टलाईन मधल्या त्या ३ शब्दांनीच पौर्णिमेच्या चंद्रासारखे हसू माझ्या चेहऱ्यावर पसरले. अगदी आतून आलले खरेखुरे! मन अलगद कापसाप्रमाणे उडत मागे गेले. अनेक आठवणी पहाटे उमलणाऱ्या प्राजक्तासारख्या दरवळू लागल्या. 

नाही नाही .... जास्त उत्सुकता मी ताणत नाही. "ते ३ शब्द" असे  म्हणता, जे पहिले स्वाभाविक पर्याय येतील हे ते नव्हते. :) नवीन काळे लिहित असलेल्या "सॉंग ऑफ द डे" या ब्लॉग वर add झालेल्या नवीन पोस्ट ची ती मेल होती आणि "ते ३ शब्द" होते "दिन ढल जाये ....." खरं सांगू का या शब्दांच्या जागी इतर कोणतेही  शब्द जसे की "आज फिर जीनेकी तमन्ना", "पिया तोसें नैना लागे", "गाता राहे मेरा दिल" "सैया बेईमान" "तेरे मेरे सपने" किंवा "वहा कौन हे तेरा" असते ना तरी मी इतकीच खुश झाले असते. बाकी सगळ्या मेल्स बाजूला ठेवून, त्या ब्लॉगवर जाऊन हि पोस्ट वाचायला घेतली. तसंही नवीन काळे जेंव्हा एखाद्या गाण्या बद्दल लिहितात ना तेंव्हा त्याचे इतरही अनेक संदर्भ, त्या गाण्यासंबंधी किस्से सांगत जणू तो सगळा काळ तुमच्या समोर उभा करतात. फ्रेम बाय फ्रेम गाणे तुमच्या नजरेसमोर जिवंत करण्याचे कसब त्यांच्या लेखणीत आहेच. आणि जेंव्हा ते गाणे "दिन ढल जाये" सारखे असते तेंव्हा तर बात काही और असते.

अति परिचयात अवज्ञा ते हेच का? खरं तर या पूर्वीच मी याबद्दल लिहायला पाहिजे होतं. पण कसं ते माहित नाही पण कायम राहूनच जाते.  "गाईड" या सिनेमा बद्दल मी पूर्वीच काही लिहा बोलायला हवे होते इतका तो माझ्या काळजाच्या जवळचा आहे. किती वेळा मी तो पहिला असेल माहित नाही. पण असंख्य वेळा पाहूनही मन भरणार नाही असे जे मोजकेच चित्रपट आपल्याकडे बनतात त्यापैकी तो एक.  अगदी लहान असताना असे कुठेतरी बर्याच ठिकाणी लिहिलेले वाचले होते, "मिलीये राजू गाईडसे".....पण तरी म्हणजे काय ते अनेक दिवस कळलेच नव्हते. अंधुकसे आठवते ते म्हणजे जेंव्हा लहानपणी सर्वात पहिल्यांदा तो दूरदर्शनवर लागणार होता तेंव्हा आजी म्हणाली "लहान मुलांनी पहावा असा तो नाहीये"(म्हणजे तेंव्हाच्या प्रचलित कल्पना आणि संस्कारांप्रमाणे, आजचे मापदंड यास लागू होणार नाहीत.) तरी मी तो पहिलाच.(नेहमी असेच घडते न? मोठ्यांनी विरोध करावा आणि लहानांनी ती गोष्ट हमखास करावीच). त्या नंतर अनेकदा बघतच गेले. पण नुसताच बघितला आणि विसरून गेले असे नाही झाले.....प्रेमात पडले...या गाण्यांच्या,सचिनदांच्या, वहिदा रेहमानच्या जिच्या मुळे सौदर्याचे मापदंड खूप वर गेले..... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच सिनेमाने माझ्या  स्वप्नातल्या राजकुमाराची प्रतिमा रेखाटली. जी आयुष्याचा खराखुरा साथीदार मिळाल्यानंतरही मनात कायम राहिली. हळुवार, प्रेमळ देखणा "तेरे मेरे सपने अब एक रंग .....तेरे दु:ख अब मेरे, मेरे सुख अब मेरे" म्हणणारा..... जी सिनेमातले काही खरे नसते माहित असतानाही मी कित्येक वर्षे जपली.

पुढे अनेकदा हे असे हिंदी सिनेमाच्या सुवर्ण युगातले अगदी मैलाचे दगड नाहीत पण त्यांना बाजूला करून तो इतिहास पूराच नाही होवू शकणार असे सिनेमे पाहताच गेले. गोडी अशी लागत गेली जी आजही कायम आहे. जसे की देव आनंदचे हम दोनो, मुनीमजी, सी. आय डी. नौ दो ग्यारह, प्रेम पुजारी, ज्वेल थीफ, काला पानी, काला बाजार, जब प्यार किसीसे, तेरे घर के सामने, बंबई का बाबू, .... गुरुदत्त यांचे प्यासा, साहिब बीबी, आर पार  चौदावी का चांद ....अशी भली मोठी यादी आहे. आजही सर्वात छान माझी सुट्टीची कल्पना हीच आहे की " शांत निवांतपणे हे सगळे सिनेमे" पाहता यावेत अशीच आहे. 

गाईड हा सिनेमा ज्यातले प्रत्येक गाणे इतके सुंदर की मला कधी यातले सर्वात आवडते कोणते हे आजतोवर कधी ठरवता नाही आले. जर कधी सर्वात आवडणारी १० गाणी निवडावी लागली तर गाईड आणि प्यासा या दोन सर्वात सुंदर सिनेमातील नक्की कोणती १० हे ठरवताना माझी दमछाक होईल. प्रत्येक गाणे त्या कथेमध्ये असे बेमालूम गुंफलेले की त्या गाण्यानेच कथा पुढे न्यावी.या गाण्यांशिवाय ह्या सिनेमांची मी कल्पनाही करू शकत नाही, इतका ती गाणी प्राण आहेत या सिनेमांचा....नव्हे तर या युगातील अनेक अशा सिनेमांचा. या गाण्यांनी मला घडवलंय .....आज फिर जीनेकी तमन्ना है म्हणत पुढे सारे विसरून पुढे जगायला शिकवलंय, युं ही काहोगे तुम सदा के दिल अभी नाही भरा ...म्हणत संयम शिकवलाय, तेरे मेरे सपने म्हणत आयुष्यभराची साथ द्यायला, दिल ढल जाये..... ने विरहाची जाणीव करून दिलीये, चांद फिर निकाला...म्हणत कोणाचीतरी वाट पाहायला,  ये दुनिया अगर मिलभी जाये तो क्या ही....ने भीषण वास्तवाची जाणीव करून दिलीये...आणि तरीही सर जो तेरा चकाराये तो ....चा उपाय ही या गाण्यानीच सांगितलाय. या गाण्यांनी माझे भावजीवन समृध्द बनवले. खरे तर हे सिनेमे माझ्या पिढीच्या जन्माच्याही बरेच आधीचे.....पण आमच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या अनेक पिढ्यांवर या गाण्यांनी राज्य केलंय .... माझ्या प्रत्येक भावनेला चपखल शब्दात बांधणाऱ्या या साऱ्या गाण्यांना सलाम! 

Monday, November 5, 2012

आली माझ्या घरी ही दिवाळी.....

(खरतर ह्याला मागच्या दिवाळीची पार्श्वभूमी आहे....नवीन नवीन ब्लॉग लिहायला मागच्या वर्षी सुरुवात केली होती....त्यामुळे तेंव्हा लिहिलेली पोस्ट मनासारखी झाली नव्हती, तिचीच ही सुधारित आवृत्ती.)


दिपावली ४ दिवसांवर येऊन पोहचली, अजून मी घरात एकही फराळाचा पदार्थ बनवला नाही, आकाशकंदील लावले नाहीत, पणत्या शोधून ठेवल्या नाहीत. काल रात्री उशिरा घरी पोहचले, बिल्डिंग मधे शिरताना सहज वर लक्ष गेलं, एका घरी आकाशकंदील लागला होता, विचार आला अरे बापरे! अजुन आपण याचा विचारच केला नाहीये. दिवाळीचे वेध आजकाल लवकर लागतच नाहीत. पण असं म्हणावं तर नवरात्री पासूनच लक्ष्मी रोडवर पाय ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती असते. आता या सार्‍या गोष्टींसाठी वीकेंडची वाट पाहावी लागणार, किती कामे ठेवली आहेत त्या दोन दिवसांसाठी!

घरात शिरले समोर लक्ष गेलं, आणि चकित झाले, घर उजळून गेलं होतं, टेरेसभर चांदण्या उजळल्या होत्या. लेकीने आणि नवऱ्याने मिळून दिव्यांच्या माळा आणि आकाशकंदील लावले होते.छोट्या छोट्या गोष्टी किती आनंद देऊन जातात नाही? मग आठवत राहिली लहानपण ची दिवाळी. किती आधीपासून त्याचे वेध लागायचे. कारण घरात फराळाची तयारी सुरू होत असे, पणत्या शोधून ठेवल्या जात, आकाशकंदील नवा बनवला जात असे, मला किल्ला करायला खूप आवडत असे. आम्ही जिथे राहत होतो तिथे मी एकमेव मुलगी होते जिला किल्ला करण्यात इंटरेस्ट होता. मोठे दगड जमा करायचे, माती आणायची, दगड रचून त्यावर ओबडधोबड चिखल लिंपून किल्ला बनवायचा. त्यावर अळीव पेरायचे, सकाळ संध्याकाळ पाणी मारायचे त्यावर आणि कधी उगवतात याची वाट पहायची. किल्ल्याच्या खाली शेते, तळी, कारंजी बनवायची. बाबांच्या मागे लागून फटाक्यांबरोबर मातीची चित्रेही दरवर्षी आणायची. ती चित्रे कोणी पळवून नेऊ नये म्हणून काळजी घ्यायची. आणि शेवटच्या दिवशी किल्ल्याच्या गुहेत सुतळी बॉम्ब लावून तो फोडायचा. खूप मजा वाटायची त्यात मला. ती सवय आजही टिकून आहे .....आता किल्ले बांधले जातात मनातल्या मनात!


फराळाची तयारी बरीच आधी सुरु होत असे, जसे की अनारशांसाठी पीठ तयार करणे, भाजणी बनवणे, करंजाचे सारण बनवणे, एवढेच काय त्याकाळी पिठीसाखर देखील गिरणीतून दळून आणली जात असे. आईने लाडूसाठी पाकात टाकलेला रवा, खवा वाटीत घेऊन खायला खूप आवडायचं मला....पण मिळायचं नाही कारण नैवेद्य दाखवायचा असायचा. चकली, शंकरपाळे करताना मदत करायची असायची. आज फराळाचे बनवले तर उद्या सकाळी सुद्धा घरात तो सुवास दरवळत असे. सलग चार दिवस घरी फक्त फराळाचे बनत असे. जसे की चकली, शेव आणि चिवडा एका दिवशी, लाडूचा रवा सकाळीच भाजून पाकात टाकायचा, आणि मग करंज्या, चिरोटे करून घ्यायचे, मग शेवटी लाडू वळायचे. एक आख्खा दिवस शंकरपाळी आणि थोडे अनारसे. लक्ष्मीपूजनासाठी म्हणून मग थोडे बेसनाचे लाडू. सगळे मोठे डबे  आधीच घासून पुसून ठेवलेले असत, मग सगळे पदार्थ त्यात भरून ठेवायचे.

लहानपणी दिवाळी सुरूच मुळी होत असे ती वसुबारसेपासून. संध्याकाळी जवळच्या गाय असणाऱ्या ठिकाणी जायचे, तिला फराळाचा नैवेद्य दाखवायचा, त्या मालकाला दक्षिणा द्यायची आणि परत. मग धनोत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. अशी किमान ६ दिवसांची दिवाळी असे मधे एखादा भाकड दिवस आला तर तो बोनस. आजकाल सारखं नाही, जेवढे दिवस ऑफिसला सुट्टी तितकीच दिवाळी. प्रत्येक दिवशी काहीतरी खास असे. दिवसभराच्या घडामोडीत आणि जेवणातही. जसे कि पाडव्याला हमखास बासुंदी बनत असे, आई ओवाळणीत काय मिळणार याची उत्सुकतेने वाट पहात असे, दुसऱ्या दिवशी मामा येणार किंवा नाही यावर बेत ठरत असे. बाबा आत्याकडे जात आणि मामा आमच्याकडे.

कपडे खरेदी हा एक आवडता उद्द्योग....तसा तो आज ही आहे..... पण तेंव्हा वर्षातून एक दोनवेळाच ते मिळत त्यामुळे त्याचे जरा जास्तच कौतुक वाटे. ..... माझे बाबा खूप सारे फटाके घेऊन यायचे, त्याची तिघात वाटणी होत असे. एकमेकांचे फटके चोरणे आणि मग त्यात शेवटी भांडभांडी होत असे. सर्वात जास्त फटाके मी उडवत असे. दोन वेळा फटाक्यांमुळे भाजल्यावर देखील. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहिली माळ कोण लावणार अशी चुरस असे. खरच इतक्या पहाटे उठत असू की सकाळी ७ पर्यंत तेल, आंघोळ, फटाके, फराळ सगळं होत असे..... रेडीओवर पहाटे दिवाळीचे खास असे कीर्तन, ते वातावरण निर्मिती करत असे. मग पर्वती चढायला जाण्याचा कार्यक्रम. इतकी मजा यायची. ११ वाजेपर्यंत घरी परत. दहीभात खावून, चांदोबा, किशोर हे दिवाळी अंक वाचत मस्त झोप काढायची. संध्याकाळी पुन्हा फटाके, दारात रांगोळी.


 दिवाळीनंतर लगेच आजीकड़े जात असू. उरलेले फटाके तिथे घेवून जात असू. मामाची मुले आणि आम्ही तिघे भावंडे. आजोबांच्या घरी शेती होती, ज्यात तांदूळ पिकत असे, त्यामुळे त्याची काढणी आणि धान्य घरी येण्याचे अनेकदा तेच दिवस असत. तिथल्या देवळात पहाटे उठून काकड आरतीला जाणे. कुडकुडत जावे लागते म्हणून तिला काकड आरती म्हणत असे मला लहानपणी वाटे. अगदी शाळा सुरु व्हायच्या आदल्या दिवशीपर्यंत तिथे मुक्काम करूनच घरी परत येत असू. आजकाल बोलावल्याशिवाय सख्खे नातेवाईकही एकमेकांकड़े जात नाहीत. आता सगळं बदललं. सार्‍या गोष्टी पैशाने उपलब्ध झाल्या, वेळ दुर्मिळ झाला.आता पर्यावरणाच्या नावाखाली फटाके बंद झाले. फराळाचे पदार्थ सतत घरात दिसू लागले, काही मजा राहिली नाही.......

अहो......आठवणीत रमलेल्या काकू! काहीतरीच काय? म्हणे काही मजा राहिली नाही. किती मजा असते.....


किमान एक महिना आधीपासून चितळे, वृंदावन त्यांच्या मेल्स येवून पडतात, त्या पाहून किमान दोन- तीन आठवडे त्यांना जावून किंवा ऑन लाईन फराळाची ऑर्डर द्यावी लागते. कोणाकडे काय चांगले मिळते हे लक्षात ठेवावे लागते म्हणजे तो पदार्थ आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना खिलवून आपल्याला थोडा भाव खाता येतो. सगळेच पदार्थ स्वत: बनवणे शक्य नसले तरी, एखादा आपला असा खास पदार्थ घरी बनवायचा असतो. खरेदीसाठी कोणता वीकेंड यावर घरी जोरदार चर्चा घडवून आणावी लागते, एखाद्या वीकेंड वर एकमत झाले तर त्या दिवशी सहकुटुंब लक्ष्मी रोडवर सकाळीच पोहोचावे लागते, दुकाने उघडतील भले १० वाजता, पण त्यावेळी पार्किंगला जागाच मिळणार नाही. थोडा उशीर झाला तर मग दुकानातही उभे राहायला जागा मिळणार नाही. अशी "Shop till you drop" खरेदी झाली की मग पुन्हा कोणत्यातरी खास,गर्दी असणाऱ्या वैशाली, दुर्वांकुर नाहीतर श्रेयस मध्ये गर्दीत जेऊन घरी परत. हुश्श!!! पण सगळ्यांनी एकत्र जावून अशी खरेदी करण्यातही आनंद मिळतो ना!


दिवाळी पूर्वी करायचे अजून एक महत्वाचे काम म्हणजे एखाद्या लहानमुलांच्या आश्रमास दिवाळीच्या काही वस्तू पाठवून द्यायच्या. कोणाच्या तरी चेहऱ्यावर आपल्या या लहानशा कृतीमुळे हसू फुलत असेल तर त्या इतकी दुसरी चांगली गोष्ट आहे का?

घर अजून देखणे कसे दिसेल हे पहायचे असते. ठेवणीतले गालीचे, सजावटीचे समान बाहेर काढावे लागते. मायेचा हात घरातील वस्तूंवरही फिरवायचा असतो. दारात रांगोळ्या काढायच्या असतात, तोरणे बांधायची असतात. रांगोळी काढणे हा आज देखील माझ्या दिवाळीचा एक मोठ्ठा भाग असतो. येते काढता येते मला फक्त टिपक्यांचीच रांगोळी. दिवाळीच्या आदल्यादिवशी, रात्री उशिरा घरी पोहचले तरी सुद्धा रांगोळी काढायचीच असते, सोबतीला लेक असते आणि सूचना द्यायला तिचा बाबा! गप्पा मारत २/३ तासात एक रांगोळी पूर्ण होते तेंव्हा जवळजवळ रात्रीचे बारा एक वाजलेले असतात. पण अशी रांगोळी काढल्याशिवाय मला दिवाळी वाटतच नाही. पहाटे नटून थटून "दिवाळी पहाट" च्या एकद्या सुश्राव्य गाण्याच्या कार्यक्रमास हजेरी लावायची असते. एक दिवस सासरचे, एक दिवस माहेरचे, एक दिवस लेकीच्या मैत्रिणी, यांना घरी जेवायला बोलवायचे असते. सगळ्यांपेक्षा वेगळा आणि तरीही रुचकर, सुग्रास बेत करायचा असतो. त्या निमित्ताने चार दिवस आपल्या माणसांसोबत हसत खेळत घालवता येतात. हे ४ दिवस कसे उडून जातात ते कळतही नाही. पर्यावरणाचा विचार करून फटाके घरी आणून उडवणे केंव्हाच बंद झालंय....पण एखादा फायर वायर शो बघायला मजा येतेच ना? पाडव्याला सुग्रास जेवण जेवून सुस्तावलेल्या नवऱ्याला बाहेर न्यायला पटवावे लागते, तेंव्हा कुठे जाऊन पाडव्याची काही खास ओवाळणी पदरी पडते. मग आग्रह करून करून काहीतरी छानशी वस्तू त्याच्यासाठी घ्यायला भाग पडावे लागते. भाऊबीजेला अजून एकदा वसुली केली कि मग दिवाळी संपते. इतक्या दमल्या भागलेल्या जीवाला मग विश्रांती हवी असते, मग जोडून सुट्टी घेवून कुठे तरी ट्रीपला जावे, आपलाच खिसा थोडा हलका करून यावे लागते.

तर काकू......सगळ्या जुन्या आठवणीत रमणे छानच असते हो पण जुन्या आठवणींमध्ये जगत आजचा आनंद हरवू द्यायचा नसतो हो..........पण आताच्या काळातल्या सगळ्याच गोष्टी, प्रथा टाकावू नसतात ना?


(सर्व छाया चित्रे आंतरजालावरून साभार)




Wednesday, October 17, 2012

पुन्हा एकदा मला

पुन्हा एकदा मला दिवाळीत किल्ला बनवायचाय

माखल्या हातांनी स्वयंपाक घरात जावून डोकवायचंय

पेरलेले धान्य कधी उगवतं याची वाट पहायचीय

तिथे पहारा देत शिवाजीसह मावळ्यांचे रक्षण करायचय


पुन्हा एकदा भल्या पहाटे उठून पर्वती सर करायचीय

थकून भागून परत येताच फराळाचे ताट फस्त करायचेय

भरल्यापोटी चांदोबा किशोरच्या साथीने परीराज्यात जायचेय

गोष्टी सांगणाऱ्या वेताळाला एकदातरी पकडून ठेवायचंय


पुन्हा एकदा मला आजोळी जायचंय

बस मधून उतरतानाच मामा दिसतो का ते पहायचय

पहाटे चुलीपाशी बसून आजीशी गप्पा मारायच्यात

रात्री जागून अंधारात घाबरले तरी भुतांच्या गप्पा ऐकायच्यात


पुन्हा एकदा मला दफ्तर घेऊन शाळेत जायचय

न येणारी समीकरणे आता सोडवता येतात का पहायचय

चित्रकलेच्या तासाला सुबक चित्रे काढायची आहेत

डब्यातला खाऊ खाण्यासाठी मधल्या सुट्टीची वाट पहायची आहे


येईल का जाता आता बालपणात पुन्हा?

येईल का होता अल्लड आता मला पुन्हा?

येईल का दारी भोलानाथ आता पुन्हा?

मिळेल का सुट्टी तळे साचून आता पुन्हा?

Tuesday, October 16, 2012

ऐलोमा पैलोमा गणेश देवा.

परवा गाडीत माझी आई, आणि माझा अडीच वर्षाचा भाचा होता. बरोबरचे भरपूर समान बाजूच्या सीटवर ठेवून त्या दोघांना मागे बसू दिले. थोड्या वेळाने गडी गाऊ लागला. आधी शाळेत शिकवलेल्या "पोएम्स" झाल्या. मग गाडी घसरली "शिवाजी अमुचा राणा" वर . हे ऐकून मी चकित. पूर्ण गाणे त्याला म्हणता येत होते. मधेच अडले तर शेजारी आजी होतीच. त्याला विचारले "कोणी शिकवले तुला हे?"

"माज्या आईला येतं हे गाणं, तिला खूप खूप गाणी येतात."

"हुशारच आहे तुझी आई. अजून काय शिकवले तुझ्या आईने?"

"जिलेबीचे गाणे, कारल्याचे गाणे, लाडूचे गाणे आणि शिवाजीचे" (आम्ही सारे खवय्ये! गाणी पण सारी खाण्याच्या पदार्थांचीच?)

"पण तुला तर गुमामाम (गुलाबजाम) आणि सिंघम आवडतात ना? मग तुला आईने गाणे जिलबीचे आणि शिवाजीचे का शिकवले?"

"तिला तेच येत मणून"

नातवाच्या तोंडी ही गाणी ऐकून आजीपण खुश. या संवादाने माझ्या आठवणी ताज्या झाल्या. पितृ पंधरवडा संपत येतो तसे नवरात्राचे वेध लागतात. कसे ते ९/१० दिवस संपतात काही कळत नाही. तसे ते लहानपणी पण लागत. तेंव्हा कारण मात्र वेगळे असे. कारण नवरात्रीचे अप्रूप बाकी इतर कारणांसाठी नव्हे तर त्यातल्या "भोंडल्या" साठी असे. तेंव्हा "गरबा" नामक प्रकार बोकाळला नव्हता इतका. अगदीच तुरळक शक्यतो गुजराथी लोकानी आयोजित केलेला एखादा पारंपारिक गरबा असे. त्याचे फार कौतुक काही वाटत नसे. पण भोंडला महत्वाचा. भल्या मोठ्या अंगणात रोज एक किंवा दोघींचा भोंडला. सगळ्या मैत्रिणी, मैत्रिणींच्या मैत्रिणी जमा होत असत. आमंत्रणाची तशी गरज नसे. आणि आताच्या आयांसारख्या तेंव्हाच्या आयाही नव्हत्या. म्हणजे तेंव्हा शिस्त नव्हती का तर कदाचित आतापेक्षा थोडी जास्तच होती, आई-बाप मुलांचे फाजील लाड अजिबात करत नसत. आमच्याकडे तर म्हंटलेच जायचे "खायचे प्यायचे लाड, नसते लाड नाहीत". सहामाही परीक्षा तेंव्हाही असतंच पण त्या कधी या भोंडल्याच्या आड आल्या नाहीत. तेंव्हा या भोंडल्याला जायला आम्हाला पूर्ण परवानगी असे, अर्थात सातच्या आत घरात हा नियम पाळूनच.


भोंडल्याच्या आधीपासून आईच्या मागे "सांग ना आपल्याकडे तू काय बनवणार?" ही भूणभूण सुरु असे. संध्याकाळी शाळेतून परत आल्यावर मग भोंडला असे. पाटावर हत्ती रेखाटण्यासाठी कोणालातरी पकडावे लागे.(इतकी ग्रेट चित्रकला होती माझी :) ) मग हत्ती काढून झाला की खाली टीपके काढायचे, जितके टीपके तितकी गाणी म्हणायची. जिचा भोंडला आहे, तिने पटावरच्या हत्तीची पूजा करायची मग त्या हत्ती भोवती फेर धरला की भोंडल्याची अशी खास गाणी गात तो सुरु. ऐलोमा पैलोमा ने सुरुवात होवून मग शिवाजीचे,कारल्याचे, कोथिम्बीरीचे, जिलेबीचे, एक लिंबू झेलू बाई अशी गाणी सुरूच राहत. तशी सगळ्या मुली आणि त्यांच्या आयांना ही सारी गाणी येतंच असत. कोणी कोणाला शिकवलेली नसत, जशा लहानपणी गणपतीत कशा ना सगळ्या आरत्या कोणी न शिकवताच पाठ होत तशी. जवळपास तासभर हा गाण्यांचा कार्यक्रम चाले. एकदा का "आड बाई आडोणी" वर गाडी पोहचली की शेवट. मग बाकी मुलीनी खिरापत ओळखायची. अनेकदा एक मुख्य खिरापत आणि सोबत अनेक छोटे छोटे पदार्थ असत. जसे की इडली-चटणी सोबत, घरी तळलेले वेफर्स, साबुदाण्याच्या पापड्या, कोणती तरी वडी किंवा लाडू,......अगदी काकडीचे काप, श्रीखंडाच्या गोळ्या इतक्या साध्या गोष्टींपर्यंत. जिचा भोंडला आहे तिचीच नव्हे तर शेजारच्या काकू, मावशी पण तिच्या भोंडल्यासाठी काहीतरी खिरापत बनवून देत असत. काय दिले ते महत्त्वाचे नसे तर त्यामागचे प्रेम. कोणालाच ओळखता येणार नाही अशी खिरापत आपल्या आईने बनवावी अशी फार इच्छा असे. शिरा, वाटलीडाळ, ढोकळा, आप्पे, घरी केलेला कुकर मधला केक, साटोरी, भाजणीचे वडे असे अनेक पदार्थ असत. एकदा का सर्व खिरापती आलेल्या मुलीनी ओळखल्या की मग सगळ्यांना अंगणात सतरंजीवर बसायला सांगून घरातून खिरापतीच्या प्लेटस आणायच्या, हसत खिदळत त्या फस्त करायच्या. असे सर्व होईतोवर सात साडेसात होत, दुसऱ्या दिवशी कोणाकडे ते पक्के करून सगळ्या पसार होत, पुन्हा दुसऱ्यादिवशी न चुकता भेटण्यासाठी.

संस्कृती जेव्हा लहान होती तेंव्हा हौसेने २/३ वर्षे मी तिचा हा भोंडला केला पण होता. पण आता ती मजा येत नव्हती, न तिला न मला. सर्वात मोठे कारण म्हणजे, तोच शाळेच्या परीक्षा असण्याचा काळ असतो. आणि आता स्पर्धेच्या युगात आई वडीलांना लहान मुलींच्या छोट्या छोट्या परीक्षांचाही खूप मोठा बाऊ वाटतो आणि मग या काळात या गोष्टींमध्ये २/३ तास त्यांना भोंडल्या सारख्या गोष्टींमध्ये घालवू देणे आता कदाचित कोणालाच शक्य नाही. करमणुकीची जेव्हा असंख्य साधने उपलब्ध आहेत तेंव्हा इतके कष्ट घेताय कोण मुलीना २/३ तास रमवण्यासाठी? दुसरा भाग असा ही असेल की नित्य नवीन चवी चाखणाऱ्या या पुढच्या पिढीला, भोंडला त्यातल्या खिरापती याचे विशेष अप्रूप उरले नसावे. मग जेमतेम २/३ लहान मुली, आणि त्यांच्या आया, संस्कृती आणि मी. काय मजा वाटणार?






पण पूर्वीच्या संदर्भात पहिले तर या एका गोष्टीतून अनेक गोष्टी साध्य होत असाव्यात. जसे कि मुलींसाठी एक करमणूक, त्यातली जास्तीत जास्त गाणी ही सासर-माहेर या गोष्टींवर बेतलेली आहेत. कदाचित अशा गाण्यांमधून त्यांची मानसिक तयारी करून घेणे हा एक उद्देश पण असेल. त्यातली काही गाणी तर इतकी मजेशीर आहेत जसं की वेड्याचं गाणं भोन्डल्यात कधी एकदा हे गाणे म्हणतोय आणि त्यातल्या प्रत्येक ओळीवर कधी खिदळतोय असे लहानपणी आम्हाला झालेले असे. ... कारल्याच्या वेलाच गाणं घ्या वेल लावण्यापासून त्याला कारली लागेपर्यंत, आणि ती लागल्यावर त्याची भाजी करून वर आपलं उष्टं काढून मग मुलीची वेणी-फणी करून मग तिला माहेरी धाडणार. म्हणजे इतकी वाट बघावी लागणार तेंव्हा कुठे माहेरी जायला मिळणार. मनात आलं आणि आणि लगेच गेली
असे घडत नाही. शेजारीच माहेर असणाऱ्या मला कदाचित त्याची एवढी किंमत वाटणार नाही, किंवा ऑफिसमधून परस्पर संध्याकाळी आईकडे जाऊन येणाऱ्या मुलींना पण नाही याचे फार अप्रूप वाटणार, पण माझ्या परदेशात असणाऱ्या मैत्रिणींना आजही हे भावेल, कदाचित अगदी सासरच्या लोकांनी जाऊ देण्याचा किंवा न देण्याचा  संदर्भ नसेल तरीही...

अगदी या भोंडल्याची सुरुवात ज्या गाण्याने होते हे गाणेच इतके मोहक आहे. त्यातल्या अनेक शब्दांचा अर्थ मला आजही कळला नाहीये तरी एवढं नक्की ही एक प्रार्थना, एक साकडंच आहे. माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा....अनेकदा वाटून जातं मला कि हा खेळ म्हणजे भातुकलीचा नव्हे तर खऱ्याखुऱ्या संसाराचा आहे. आयुष्याचे रंग त्यात ठळक दिसतात, त्यात आयुष्याचे मागणे मागितलेय,त्यात येता जाता पडणाऱ्या पावसाचे वर्णन आहेत, परतीचा पाऊस कसे कणसात धान्य धरायला मदत करतो याचे वर्णन आहे एवढेच नव्हे तर अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे असे ही वर्णन आहे. कदाचित सातव्या आठव्या वर्षी लग्न झालेल्या मुलींचाही १६ वर्षापर्यंत भोंडला करत असतील त्याकाळी. त्याकाळच्या अनेक गोष्टी ज्या अशा आखीव असत त्याचे आजही कुतूहल वाटल्याशिवाय राहत नाही.

ते दागिन्यांचे गाणे. म्हणजे त्यातूनही मोठी शिकवण आहे. कोणीही दिलेल्या दागीन्यापेक्षा नवऱ्याने दिलेला दागिना सर्वात महत्वाचा. आजच्या संदर्भात असे म्हणू हवे तर नवऱ्याने किंवा स्वत: घेतलेला. पण रुसून माहेरी आलेल्या मुलीने सासू, सासरे, नणंद, जाऊ हे सारे तिला परत न्यायला आले तर काय करावे की सगळे दरवाजे लावून घ्यावेत, त्यांनी दिलेले दागिने पण न घेता (अरे रे :(  सोनं किती महागलंय, असं नाही करायचं......)  झिपऱ्या कुत्र्याला सोडून द्यावे? संस्कार म्हणून पटत नाहीत पण कदाचित गमतीचा भाग असेल तो,  पण स्व-कमाईच्या वस्तूंची बात काही और असते हे लहानपणापासून याच गाण्याने ठसवलं.

पण एकंदरीतच ज्याकाळात ही गाणी बनली त्याकाळचे किमान मुली, स्त्रिया यांचे जगणे यातून प्रगट होत राहते. म्हणजे पहा एखाद्या लहानवयात लग्न लागलेली मुलगी, आपल्या वेडसर नवऱ्याचे वर्णन कसे करेल? "अस्से कसे झाले, माझ्या नशिबी आले?" असेच ना? माहेर सासर यामध्ये मुलीना वाटणारा फरक कसा जसा च्या तसा त्या गाण्यांमधून उतरतो. सासरची प्रत्येक गोष्ट कशी वाईट, माहेरची कशी चांगली, ते अंगण असो, तिथला वैद्य असो. मुलीना वाटणारी माहेरची कमालीची ओढ प्रत्यक गाण्यात दिसतेच. त्यातूनच हे शिकवले जात असेल कि "बाई ग असं असून देखील तुला तिथेच राहायचे आहे, तिथेच एकरूप होवून जायचे आहे. निसर्गाशी जवळीक अनेकदा गाण्यांमधून दर्शवतेच. म्हणजे कोथिम्बिरीच्याच गाण्याचं पहा कि आता मिळत असलेली म्हणजे अश्विन महिन्यापर्यंत असणारी कोथिंबीर हळुहळू मार्केट मधून गायब होईल, मग परत कधी मिळू लागेल तर चैत्रात. आजकाल १२ महिने सर्व भाज्या फळे मिळणाऱ्या आम्हाला नाही यात काही विशेष वाटणार. पण त्या काळी ते महत्त्वाचे असेल ना? 

कोणतही यातलं गाणं घ्या, काहीतरी शिकवण आहेच त्यात. जिलबी बिघडली हे त्याचे उत्तम उदाहरण. अनेक वर्षे "जिलबी बिघडली" हे माझ्या तोंडी वाक्य येतंच हमखास, जेंव्हा माझा एखादा पदार्थ हातून बिघडतो तेंव्हा. हीच शिकवण घेवून पुढे गेलेल्या मला मग त्या बिघडलेल्यातून काहीतरी घडवताही येतेच. यात याहीपेक्षा काही महत्त्वाचे काय तर काहीतरी बिघडत असतानाही सगळं कसं निभाऊन न्यायचे याचे शिक्षण. आजच्या आपल्या जगात या गोष्टी आता बदलून गेल्या आहेत, म्हणून त्या मागे पडल्या. इतकीच शिकवण पुरणार नाही, पण म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. या गोष्टीना करमणुकीचे साधन म्हणून विशेष आता महत्त्व नाही, पण त्या काळी या गोष्टीतून सणवार म्हणून, प्रथा म्हणून केल्या गेलेल्या या भोंडल्या मधून करमणूक, शिक्षण अशा कितीतरी गोष्टी साध्य होत असतील नाही? तर अशी ही विस्मृतीत गेलेली गोष्ट. माझ्या लहानपणी तरी आम्हा मुलींच्या दृष्टीने भोंडला ही अतिशय आवडती गोष्ट होती. याची आठवण झाल्याबरोबर मी जवळपास सगळी गाणी म्हणून पहिली. अजूनही सगळी पाठ होती. भोंडला करून नाही तर निदान त्या काळात एक फेरफटका मारून येवून् मला ते क्षण पुन्हा एकदा जगता आले हे काय कमी आहे?



Wednesday, October 10, 2012

सांग सखया.........

चालताना तू थोडा थबकलास

नुसताच थबकलास का

दूरवर सोबत करण्याचा

विचार तुझा बदललास?


हाक मारताना तू अडखळलास

नुसताच अडखळलास की

ओठात माझेच नाव असण्याचा

तुझा रिवाज तू बदललास?


बोलताना तू जरासा थांबलास

नुसताच थांबलास की

माझ्यापाशीच मन मोकळे करण्याचा

तुझा हक्कच तू विसरलास?


निरोपाच्या क्षणी तू आवंढा गिळलास

नुसताच आवंढा गिळलास की

आयुष्यातून मला वजा करताना

स्वत:लाच भागून मोकळा झालास?


खरं सांग, सारे काही विसरलास? सारे काही संपले?

खरच संपलय कि

आजही प्रीतीचे नाव घेता

तुझे जग सारे माझ्याशीच येऊन थांबलंय

Saturday, October 6, 2012

क्षणभर विश्रांती ...

१५ दिवसांपूर्वी मी हातात "हिंदू - जगण्याची एकसमृद्ध अडगळ " वाचायला  घेतली. मुळात हे पुस्तक माझ्याकडे कसे आले हीच एक स्टोरी आहे. इतकी वर्षे पुस्तके कधी "buy " कधी "borrow " करत वाचली जात होती. मागच्या वर्षी ठरवले की आता फक्त "buy". नवऱ्याला म्हटलं की एखादा दागिना किंवा भारी साडी कमी घेतली गेली तरी चालेल...पण घरात माझी अशी स्वत:ची लायब्ररी असायला हवी. त्याची हरकत असायचं पण कारण नव्हते. त्या पूर्वी पण पुस्तके अनेकदा विकत घेतली जात असत, पण त्यामागे हा विचार नसे. मग गेल्या दिवाळीत अनेक पुस्तके माझ्या घरी दाखल झाली. जेव्हा ती घ्यायला अक्षरधारा मध्ये गेलो, तेंव्हा आम्ही दोघे ही आपापल्या आवडीची पुस्तके बघत होतो मी एक मोठा गठ्ठा घेवून बिलासाठी घेवून आले तेंव्हा नवरा हे पुस्तक घेवून आला. तरी मी त्याला विचारले " तू वाचणार आहेस का हे?" तर म्हणे "हो" मग मनात विचार आला कधी नव्हे तो बाबा स्वत: पुस्तक वाचेन म्हणतो तर असू देत. जेमतेम ५/१० पाने वाचून ते ठेवून दिले ते आजतोवर त्यास हात लावला नाही. वर्षभरात माझी बाकीची सर्व पुस्तके वाचून झाली. एकसलग वाचले तर दिवसाला किमान ३०० पाने वाचतेच.(घरात बाकी कामे मग कोण करतं, हा प्रश्न कोणी प्लीज विचारू नये), यातली अनेक पुस्तके मी पूर्वीच वाचलेली असल्याने, पुन:प्रत्ययाचा आनंद घेत मी ती वाचली. काही नव्यानेच वाचली. गेल्या महिन्यात काही ना काही कारणाने माझे अक्षरधारा, किंवा अप्पा बळवंत चौकात जाणे होत नाहीये. त्यामुळे वाचण्यासाठी हे एकच पुस्तक आता शिल्लक राहिले होते. वाचायला घेतले, १००/१२० पाने वाचून झालीत, पण रोज घर, ऑफिस, घर  आणि नंतर वेळ मिळेल त्यात फेसबुक, ब्लॉग यात माझा इतका वेळ खर्ची पडतोय की हे पुस्तक नुसतेच डोक्याशी पडून आहे. तर आता हे पुस्तक पूर्ण वाचून झाले की मगच फेसबुक, ब्लॉग. मधेच एकदा "English Vinglish" पण बघायचा आहेच :)

Thursday, October 4, 2012

६५ वी कला

वर्तमानपत्रात आजकाल अनेकदा पहिले पानभर जाहिरात असते, अशी दिसली की प्रचंड राग येतो. पण मला जाहिराती आवडतात, कोणतेही माध्यम असो. वृत्तपत्रीय जाहिराती पाहताना तर मी उजव्या कोपऱ्यातील जाहिरात कंपनीचे नावही आवर्जून पाहते. हळूहळू असे होऊ लागले की आधी मी ते नाव कोणते आहे ते पाहू लागले आणि मग जाहिराती वाचू लागले. पुण्यात एक प्रथितयश बांधकाम व्यावसायिक आहेत. लहानपणापासून मी त्यांच्या प्रोजेक्ट्स च्या जाहिराती पहात आले. त्यापैकी कित्येक आजही मनात घर करून आहेत. मराठी माणसाची अचूक नस पकडणाऱ्या जाहिराती हे यांच्या यशाचे एक सूत्र होते, असे नेहमी वाटत आले. आणि त्यांच्या या यशाचा "सेतू" बांधणारी जाहिरात एजेन्सी फार महत्वाची होती. त्यांनी त्यांच्या एका प्रोजेक्ट च्या हस्तांतरणाची जाहिरात अशी केली होती " सासुरयास चालली शकुंतला, लाडकी शकुंतला......चालतो तिच्यासवे तिच्यात जीव गुंतला"..... अगदी याच भावना मनात ठेवून *** चं हस्तांतरण आज मी करत आहे" किंवा आज घर बुक करा आणि उद्या स्वत:च भूमिपूजनास बसा.....नक्कीच कुठेतरी आत जाऊन पोहचतात त्या जाहिराती. कदाचित माझ्या घरी पण हाच बिझिनेस आहे म्हणून या साऱ्या गोष्टी माझ्यापर्यंत खोलवर जाऊन पोहचतात. एखादी बिल्डींग बांधताना आणि नंतर तिचे हस्तांतरण करताना ना अगदी मुलीला सासरी पाठवतानाच्याच भावना मनात असतात. नंतर त्या कंपनीने जाहिरात एजेन्सी बदलली हे कोणी न सांगताच बदलेल्या जाहिरातींच्या स्वरूपावरूनच लक्षात आले. मग मात्र ते म्हणजे घराण्याचे नाव रोशन करणाऱ्या गायकाने कुठलीही गाणी गावीत तसे वाटू लागले.


गेल्या काही दिवसात काही नव्या जुन्या ads पहिल्या ऐकल्या आणि यावर लिहावे असे तीव्रतेने वाटू लागले. जसे बर्फी बघताना त्यातला मर्फी , त्यातल्या एका दृश्यात ऐकू येणारा जुन्या प्रेस्टीज च्या जाहिरातीचा आवाज. लगेचच नंतरच्या वीकेंड ला T -२० पाहताना बघितलेल्या काही ads . आजकाल जाहिरातींवर मी प्रचंड कमेंट्स करते. शंका येऊ लागली की आपले वय व्हायला लागले काय? ज्या त्या जाहिरातीवर कसे आपले काही वेगळेच म्हणणे आहे? कला आहे ना ती? हा ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीचा भाग आहे ना, मग?

६५ वी कला जिला म्हंटले जाते तिने आपले आयुष्य इतके व्यापले आहे, की वर्तमानपत्र, आकाशवाणी, FM , टी. व्ही., रस्त्यावरचे होर्डींग्स, बस, ट्रेन्स मधील जाहिराती, इतकेच काय फेसबूकावरील जाहिराती. कुठेतरी प्रत्येक जाहिरातीची मनात नोंद होतेच. मार्केट ड्रिव्हन इकॉनोमीचा तो अविभाज्य भाग आहे. सेकंदास लाखो रुपये मोजून तुमच्या आमच्या पर्यंत पोचणाऱ्या त्या साऱ्या खरंच तितका परिणाम आपल्यावर आणि पर्यायाने त्या कंपनीच्या नफ्यात वाढ होण्यावर करतात का? नाही म्हणजे तशी नफ्यात वाढ अनेक रीतीने दाखवता येते. ते तितके महत्त्वाचे नाही, पण आपले काय विकत घ्यायचे आणि काय नाही यावर त्या नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात परिणाम घडवतात.

लहानपणी माझा भाऊ जाहिराती चालू असे पर्यंतच टी.व्ही पहात असे, त्या संपल्याकी हा उठून जाई. आजही माझ्या माहितीत अनेक लहान मुले अशी आहेत की जाहिराती ती फार आवडीने पाहतात, जसे की "तुम्हारा साबून स्लो है क्या" किंवा गाडी पार्क करतानाची "लगा क्या?", आय. पी. एल च्या वेळच्या झू, झू च्या जाहिराती, टमी की सुनू या ममी की म्हणत केलेली नॉर सूपची किंवा पिअर्स ची मासूम पिअर्स म्हणत केलेली.
सगळ्यात लाडकी माझी जाहिरात म्हणजे "अमूल बटरची" ची. एखाद्या प्रोडक्टची दर आठवड्याला वेगळी जाहिरात बनते, आणि चालू घटनांचा आधार घेत ती तुमच्या चेहऱ्यावर एक हलकेच हसू आणते ते पण गेली कित्येक वर्षे. कमाल आहे. अनेक जिंगल्स माझ्या फोनची ट्यून बनून माझ्या सोबत असतात. जसं की एअर-टेल ची ज्यात "जाये बसो किन देस पियाजी" हे गाणे वापरले होते. अनेकदा त्या जिंगल्स मुळेच त्या जाहिराती आवडत्या होतात....जसे की जब घर की रौनक बढानी हो, अमूलची जरासी हसी प्यार जरासा,किंवा पूर्वी लागणारी बजाज ची "ज़ब मै छोटा बच्चा था बड़ी शरारत करता था", जुनी डेअरी मिल्क ची त्या मुलीची किंवा सिनेमा पहायला गेल्यावर लागणारी विको ची पूर्ण जाहिरात आठवते? काही जाहिराती जशी की धारा- जलेबी, हमारा बजाज, उस्ताद झाकीर हुसैन यांची वाह ताज, होर्लीक्सची ये है बढता बच्चा कपडा छोटा होता जाये, फ्रेश n juicy असणारी फ्रुटी, गोदरेज ची खुशियोन्के आंगन में पहला कदम........ही लिस्ट थांबतच नाही.

माझ्या मते चांगली जाहिरात(visual media) ती की जी एखाद्या आपण बघत असलेल्या कार्यक्रमाच्या मध्ये व्यत्यय वाटत नाही, बरोबर बसलेल्या कोणाबरोबरही ती बघताना अवघडलेपण येत नाही, हलकेच एक हसू तुमच्या चेहऱ्यावर येते, आणि सहजगत्या नंतर तुम्ही आधी पाहत असलेल्या कार्यक्रमात पोहचता. जर एकंदर जेवढा वेळ मी टी. व्ही. समोर असते त्यापैकी निम्मा वेळ जर जाहिराती बघितल्या जाणार असतील तर, मनोरंजनाचेच निकष त्याला ही लावायला नकोत का? खरंच ती वस्तू विकत घ्यायची की नाही घ्यायची हा नंतरचा विचार.
जो माझा प्रांत नाही, पण मला त्यांच्या जाहिराती मात्र आवडतात, अशा काही त्यांच्या जिंगल्स मुळे किंवा अशीच जाहिरात म्हणून आवडतात. जशी सध्या लागणारी segram ची लिफ्ट मधली "प्यार की राह में चलना सीख ,. इश्क की चाह में जलना सीख. हवासे भी कर बातें लेकिन,. राज चुप्पी का उलझना सीख" किंवा दुसऱ्या दिवशी काहीच न आठवणारा किंवा तसं दाखवणारा सुमीत राघवन. bacardi ची ad ही तशीच त्याच्या जिंगल मुळे आवडणारी. ज्यातल्या काही अजिबात आवडत नाहीत जशा धर्मेंद्र, त्याचा तो सनी यांच्या जाहिराती मात्र .......जाऊ दे अजून काही बोलूया नकोत. खरं तर ज्या गोष्टीना मी सपोर्ट करत नाही त्यांच्या बद्दल काही बोलतही नाही. या काही मात्र त्यास अपवाद.

पण या जाहिराती फक्त पूर्वीच चांगल्या बनत असत असे काही नाही. आजही अनेक उत्तम जाहिराती बनतात जसे की रेड लेबल, डेअरी मिल्क, एअर टेल, आईडिया, एशिअन पेंट्स, रेमंड्स, टाटा nano ची एका लहान मुलीची. जशा ना एअर टेल च्या दोन्ही जाहिराती एक वर उल्लेख केलेली, किंवा दुसरी आर्मीतल्या मुलाची...वोडाफोन पपीची जो त्या मुलीला शाळेच्या बस मागे पळत तिने विसरलेली वस्तू नेऊन देतो, डेअरी मिल्क ची "करेलावाली" मात्र खासच. पूर्वी थोडेच दिवस एक अमिताभ करत असे ती डेअरी मिल्क ची "मिस पालनपुर" ची म्हशीची...ती पाहताच मी उद्गारले की " आता हिला पण सून करून घेणार का?" :D

समाजाचं बऱ्याचदा खरं प्रतिबिंब जाहिरातींमधून उतरतं, त्यामुळेच जर असे घडत असेल की या क्षेत्रातून काही अभिनव, मनमोकळे हसवणारे, किंवा दर्जेदार असे काही येत नसेल तर कदाचित एकंदरीत समाजाचीच अभिरुची बदलत चालली आहे. पण अनेकदा जाहिराती अशा का बनवलेल्या असतात असा प्रश्न सुटत नाही जसे की सध्या दिसणाऱ्या सगळ्या डीओ किंवा परफ्युम्सच्या ....मारा डीओ लागतील मुली/मुले मागे....अरे कोणीतरी जावून सांगा यांना "अरे बाबांनो, असे काही घडत नाही" कोणताही आणि कुठूनही आणलेला परफ्युम असो. तसं पहिला जावे तर तसा थोडा जमानाच "तमीझ" नसण्याचा आहे त्यामुळे सध्या T 20 मध्ये असणाऱ्या पेप्सीच्या जाहिराती, किंवा कोणत्या तरी एका फोन ची ज्यात ती मुलगी आपल्या बापाच्या वयाच्या माणसाला अंकल म्हणत चिडवते आणि हसते. किंवा जेवणाच्या टेबल वर स्वत: न जेवता, फक्त कॅडबरी खाणारी आणि ती बाकी कोणाला न देणारी मुलगी मला आवडली नाही. तशी सध्या एक कोका -कोलाची लिंटास ने बनवलेली "तापमान ४२ डिग्री वाली ...त्यातला सुरुवातीचा सगळा भाग छान वाटतो, अगदी "इस जमीन की सच्ची ख़ुशी है" पर्यंत पण अशा स्थितीत सचिनने येऊन स्वत: कोला पीत "खेलते रहो, खुश रहो" सांगणे हे पटत नाही. त्यापेक्षा नंतर फक्त "कोका-कोला" एवढेच आले असते तरी चाललं असतं ना? असो. पण चांगल्या वाईट गोष्टीनीच तर अनेक गोष्टी अर्थपूर्ण बनतात ना?

Sunday, September 30, 2012

चला चंगळवादी होऊयात .... ? का कशासाठी ???


३०/०९/२०१२
मा. गिरीश कुबेरजी,
नमस्कार,
आज लोकसत्ता मध्ये चतुरंग सोबतच लोकरंगही पाठवलात त्याबद्दल मनापासून आभार. काय होतं ना वर्तमानपत्र न येण्याचा दिवस जर शनिवार किंवा रविवार असेल ना तर मी फार अस्वस्थ होते, चतुरंग /लोकरंग वाचायला मिळणार नाही म्हणून. तसे वर्तमानपत्र डोळसपणे मी वाचायला सुरुवात केली ते माधव गडकरी संपादक असण्याचे शेवटचे दिवस असावेत. तेंव्हापासून लोकसत्ता फार आवडीने वाचते आहे. अगदी केतकरांचा प्रो कॉंग्रेस असणे याकडे डोळेझाक  करून. आपण संपादकपदी आलात, तेंव्हा वाटले चला बरे झाले. अनेकदा आपले "अन्यथा" हे सदर मी नुसतेच वाचत नाही तर फेसबुकवर किंवा पूर्वी इन्फी बीबी वर शेअरही करत असे. तर जशी तुमची पटणारी मते/ यांना शेअर केले तसे न पटलेल्या गोष्टींचे ही व्हावयास हवे म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच एक सांगू इच्छिते की मी कोणत्याही राजकीय पक्षाची नाही. कारण राजकारणी लोकांनाच मुळात राजकारण सोडून बाकी कशाशी बांधिलकी नसते. मला वाटतं नमनाला इतकेच  तेल पुरे......कारण जगण्याच्या अपरिहार्यतेने असले तरी मनापासून मी "चंगळवादी" संस्कृतीचा भाग होवू इच्छित नाही.

तर आपण म्हणता त्या प्रमाणे चंगळवादाची व्याख्या करता येत नाही. आपण म्हणता त्या अर्थी खरेच असेल ते. पण काही उदाहरणे बघू आणि त्यातून मला  काही बोध होतो का ते पाहू. समजा मला १ लिटर पेप्सी ची बाटली घरी आणायची आहे. समजा त्याची किंमत ५०/- आहे. घराजवळचा किराणा किंवा जनरल स्टोअर्स मध्ये मी चालत जाते, ५० रु. देते आणि पेप्सी घरी घेऊन येते. पण मी बिग बझार, मोअर, स्टार बझार मध्ये जाते, जाते तीच मुळात थोडा खर्च करून पेट्रोल जाळून, मग आणखी थोडे पेट्रोल जाळते पार्किंग साठी जागा शोधताना. तिथे आत जाते. कोणता तरी स्वस्त दिवस असतो तो. त्यामुळे तिथे पेप्सीच्या २ बाटल्या ९० रु. त मिळत असतात मला वाटते चला पैसे वाचत आहेत घेवून टाकू दोन लिटर. इथेच हे थांबत नाही, तिथे अजून अशाच चार सो कॉल्ड स्वस्त गोष्टी असतात. मी त्याही उचलून आणते घरी. शेवटी बऱ्यापैकी खिसा रिकामा करून पुन्हा पेट्रोल जाळून मी घरी पोहचते. आता बघा माझी गरज होती (?) १ लिटर पेप्सीची त्या स्वस्तच्या मोहापायी मी किमान ९० रु आणि पेट्रोल चे थोडे असे पैसे त्यावर खर्च केलेत कमाल  किती राम जाणे. माझ्या दृष्टीने गरज नसतानाही गरज असल्याचा आभास निर्माण करणे, व त्यासाठी खर्च करणे हा चंगळवाद.
तुम्ही म्हणता त्या प्रमाणे १०० रु. लिटर चे तेल ९५ रु. लिटर प्रमाणे देणे त्यांना परवडते. साधारण सर्व शहरांमध्ये होलसेलची दुकाने असतात, जिथे हेच तेल जर १२ चा बॉक्स घेतला तर ८५ रु. लिटर प्रमाणे मिळते. ते देखील हवा असलेला ब्रान्ड. असं कधी अनुभवलंय का कोणी की या सुपर मार्केट्स मध्ये काही ठराविक ब्रान्ड च मिळतात. म्हणजे पुन्हा ५ रु स्वस्त साठी तडजोड आलीच.

तुमच्या म्हणण्यानुसार "अंथरूण पाहून पाय पसरावेत" या पूर्वापार चालत आलेल्या म्हणीत विकृती आहे. माझ्या मते आज झोपताना अंथरूण पाहून पाय पसरावेत, उद्या सकाळी उठून ते मोठे कसे होईल ते पाहावे आणि त्या दृष्टीने पावले उचलावीत. गैर मोठे होण्यात नाही हो. कसे होतां यावर सारे अवलंबून आहे. तुम्ही प्रयत्नांनी अंथरूण लांब करत राहा हो आणि खुशाल पाय पसरत राहा, पण प्रत्येक वेळी अंथरुणावर टेकल्यावर "अंथरूण पाहून पाय पसारा" हे लागू होतेच ना? 

तुमच्या म्हणण्याप्रमाणे सधन लोकांनी सर्व वस्तू सुविधा विकत घ्यावात जेणेकरून रोजगार निर्माण होतो. या न्यायाने तुमच्या घरी लोणची, पापड, चिवडा चकली, लाडू इतकेच काय रोजचा चहा, नाश्ता जेवण हे पण बाहेरूनच येते का हो? मी ज्या इंडस्ट्रीचा भाग आहे, त्या आमच्या विरुद्ध अशी ओरड समाजात नेहमी आढळते ती म्हणजे सारी महागाई आमच्या मुळे आहे, आमच्यामुळे चंगळवाद बोकाळलाय. तुम्ही म्हणता तसं  लोक जास्त हॉटेल मध्ये जातील तर, ती चांगली चालतील, तिथे काम करणाऱ्यांचे वेतन आणि राहणीमान उंचावेल.....खरच असं घडेल का हो. नाही, कारण माझ्या घराजवळ एक  छान हॉटेल आहे त्याच्या मालकाचा बंगलाही माझ्या घराजवळच आहे, राहणीमान गेल्या १२ वर्षात मला फक्त तिथेच उंचावताना दिसले आहे. टेबल साफ करणाऱ्या मुलांचे किंवा वेटरचे नाही. दुसरा मुद्दा असा की जी गोष्ट घरी बनवताना मी "दिलसे" बनवते, तशी बाहेर कोणी बनवून देतं का हो? कितीही पैसे मोजायची तयारी ठेवली तरी माझ्या घरच्यांना सेम माझ्या हातची चव विकत आणता येईल का? 

तुम्ही म्हणता तरुण मुलीना लोणची पापड घरी न करता, विकत घेण्या बद्दल अनेक तरुण मुलीना ओरडा खावा लागतो. मला वाटता यात दोन मुद्दे आहेत, करता येणं आणि करणं आणि या दोन अतिशय भिन्न बाबी आहेत. माझ्या मते न करता येण्या बद्दल तो ओरडा असतो. न करण्यासाठी नाही. जसा की गेली काही वर्षे दिवाळीत फराळाचा एकही पदार्थ मी घरी बनवू शकले नाही, उत्तमोत्तम पदार्थ पुरवणाऱ्या  चितळे, वृंदावन या दुकानांवर मी अवलंबून आहे. कारण वेळ नसणे हे अपरिहार्य कारण त्यास जबाबदार आहे. मला त्याबद्दल कधी कोणी काही बोलले नाही, कारण चकली पासून चिरोट्यापर्यंत प्रत्येक पदार्थ मला उत्तम बनवता येतो हे मी या पूर्वी सिद्ध केले आहे. आणि आता ऐन दिवाळीचे सुट्टीचे मिळणारे दोनच दिवस, घरचे लोक, नातेवाईक यांच्या सोबत न घालवता चकली चिवडा बनवण्यात घालवावे अशी कोणाचीच अपेक्षा नाही. पण रोजगार निर्माण होतोय म्हणून काही या दुकानांमधून मी पदार्थ विकत आणत नाही हो.

सधन आहे, रोजगार निर्माण होतो म्हणून मी वस्तू विकत आणते का ? तर नाही. गणपतीत उकडीचे मोदक साधारण १०० लागतात दुपारच्या जेवणासाठी १७/१८ माणसांसाठी, पैसा आहे म्हणून मी १५/१६ रु. ला एक या दराने १०० मोदक विकत आणेन का? आणि जर आणलेच तर नवरा त्यावर ताव मारून ५/६ मोदक तरी खाईल का तो मोदकांचा भाव ऐकून? खर तर नाही.

सधन आहे, रोजगार निर्माण होतो म्हणून मी रोज घरी स्वयंपाक किंवा किमान पोळ्या विकत आणते का? ५ रु एक पोळी मिळते. त्यापेक्षा उत्तम प्रतीचे गहू तेल घरी विकत आणून, एका उत्तम पोळ्या बनवणाऱ्या गरजू स्त्रीस घरी कामास ठेवणे मला चालेल जर इतकाच माझ्या वेळेचा प्रॉब्लेम असेल तर. यातूनही रोजगार निर्माण होईलच ना?

सधन आहे आणि सो कॉल्ड बिग बझार, मोअर सारखी किंवा उद्या येवू घातलेली परदेशी वाण्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतात म्हणून मी तिथे जावे का? किंबहुना मी सधन आहे म्हणूनच  मला गुलटेकडी सारख्या किंवा  वाशीतील ए. पी. एम सी. सारख्या मार्केट मध्ये जाणे शक्य आहे. वर्षाचे उत्तम क़्वालीतीचे  समान आणणे शक्य आहे, ते साठवून ठेवण्यासाठी करावी लागणारी उस्तवार मी करू शकते आणि उत्तम प्रतीचे धान्य वर्षभर खाऊ शकते. असे करूनही जे काही थोडे समान दर महिन्याला आणायचे असते, ते जर मी घराजवळच्या किरकोळ वाण्याच्या दुकानातून आणले तर समजा माझे १००० रु. खर्च होत असतील तर मोअर, बिग बझार येथे जावून मी किमान दीडपट पैसे खर्च करून येते. कारण इतक्या तेवढी गरज नसलेल्या वस्तू तुमच्या बरोबर अशाच घरी येतात.....याला चंगळवाद म्हणू यात का?

तुम्ही म्हणता "आपल्याला घाऊक बाजारातील दर आणि या किरकोळ विक्रीच्या दुकानातील दर यांत प्रचंड फरक आढळतो." अगदी खरं ! पण मोअर, स्टार बझार ही दुकाने आपल्यास घावूक भावात खरंच या गोष्टी देतात का? याच वर्षीचे उदाहरण आहे. गुलटेकडी तून तुरडाळ उत्तम प्रतीची मला मिळाली ५० रु. किलो, आणि त्या नंतरच्या आठवड्यात स्टार बझार ने स्वस्त ची जाहिरात केली त्यात भाव होता ७० रु. जी स्वस्त ते विकत होते, ६५ रु किलो.....आता हे स्वस्त घाऊक भावात झाले  का?

जुने ते सर्व वाईट, टाकावू  किंवा आपल्याकडची सर्व मुल्ये टाकावू असे का आपले होते आहे. गरजेशिवाय केलेला अफाट खर्च म्हणजे चंगळवाद असे ठरवले तर हे नक्की ही सारी मोठी चकाचक दुकाने चंगळवाद वाढवण्यास नक्कीच मदत करतात. तरीही आपण त्यांचे समर्थन करायचे आहे का? 

Saturday, September 29, 2012

गणपती बाप्पांच्या डायरीतून .....


"चला पुन्हा एकदा १०/११ दिवसांसाठी पृथ्वीवर पाहुणे म्हणून जायची वेळ झाली. आजकाल ना नको वाटतं हे दर दर वर्षी तिथे जाणं. काय काय पाहावं लागतं, फार मनस्ताप होतो. पण काय करू ठरवल्या प्रमाणे जावे लागेलच....उंदीरमामा, चला तयार आहात ना?"

"हुश्श, पोचलो एकदाचा, काय हे ट्राफिक या शहरात, किती गाड्या रस्त्यावर! काय झालंय या देशात?  मंत्री, पंतप्रधान राष्ट्रपती येणार म्हंटल्यावर रस्ते लोकांसाठी बंद करायची पद्धत आहे, पण माझ्यासाठी नाही, कसाबसा उंदीरमामांबरोबर पोहोचलो. सकाळी ९:३० पर्यंतचा मुहूर्त एका पंडितांनी सकाळ मध्ये दिला होता, म्हटलं आपल्यामुळे मुहूर्त चुकायला नको. पण दमलो बुवा."

" सकाळपासून इथे येऊन बसलोय, मंडप सजवलाय, पण कार्यकर्ते कुठे आहेत? आजूबाजूच्या घरातून सुग्रास भोजनाचा सुवास दरवळतोय, पण पूजा झाल्याखेरीज कोण मला नैवैद्य दाखवताय? शोधलं पाहिजे कारण या थंड्या स्वागताच पुढच्या दहा दिवसात इथे बसल्या बसल्या"

"जेवण नाही, वामकुक्षी नाही, हे काय चाललाय? रात्रीचे साडेसात वाजले, बाजूच्या आपटे काकूंनी काय काय बनवले होते, मोदक, अळूवडीचाच नव्हे तर संध्याकाळच्या प्रसादाचा ही सुवास दरवळला. दणक्यात तास भर आरतीही चालू आहे. इथले लोक कुठे गायब आहेत? मागच्या वर्षी अनेक  माणसे रोज सकाळ संध्याकाळ येऊन पाया पडत होती, बाप्पा या वेळी निवडून येवू देत म्हणत होती, रस्ता अर्धा अडवून तिथेच कारंजे बनवले होते, मग या वर्षी काय झाले? अजून माझी प्रतिष्ठापना नाही. पृथ्वीवर "गुरुजींचा" मोठाच तुटवडा आहे वाटतं?"

"आले एकदाचे. बरोबर एक किरकोळ गुरुजी घेवून,  काय पुटपुटत होता तोच जाणे. शेवटी एक दोन आरत्या कोणी तरी म्हंटल्या आणि मग सुरु " ओम गं गणपतये नमः: ची सी डी. दरवर्षी १० दिवस रोज संध्याकाळी इथे फक्त हेच वाजते."

"आरतीला दरवर्षी एक आपटे काकू यायच्या, त्यांच्यामुळेच सर्व आरत्या रोज संध्याकाळी कानी पडायच्या. फार हौस हो त्यांना. भजनाचा एक कार्यक्रम ही करायच्या. आज त्या आल्या नाहीत पण स्टेजवर त्यांचा फोटो हार घालून ठेवलाय. अरे अरे. गेली ३० वर्षे मी त्यांच्याच आवाजातली  आरती ऐकतोय, त्यांनी बसवलेले करमणुकीचे कार्यक्रम आनंदाने पाहतोय. किती दिवसांच्या तयारीने छोट्या छोट्या  मुलांकडून त्या ते करून घेत असत, कौतुकाने मी सारे बघत असे. या वर्षी यांनी आरतीची पण सी डी आणली आहे तर."

"सकाळी कोणी फिरकत नाही संध्याकाळी कोणीतरी सहा वाजता येते, पडदा सरकवून जाते, दिवा बत्ती करून जाते, पुन्हा कोणी नाही. नगरसेवक नाहीत, आमदार नाहीत, पुन्हा स्वर्गात परत गेलो की इथला एकदा हिशोब पहिला पाहिजे, कोणी काय मागितलं, आणि आपण कोणाला काय काय दिलं ते. मी ही विचार करतोय, या लोकांसारखेच, आपणही दर पाच वर्षांनी यावे काय?"

"आज एक नगरसेवक बाई आल्या होत्या सकाळीच, सोबत आमदार होते, त्यामुळे बाईंचे माझ्याकडे लक्षच नव्हते. त्या आमदारांच्याच सर-बराईत गुंतल्या होत्या. रक्तदान शिबीर आयोजित केले होते, दोघांनी तिथे पण भाषण केले. शब्दा शब्दाला मला हसू येत होते. आख्या ४ तासात अवघ्या १० लोकांनी रक्तदान केले. यांनी का नाही केले, आणि त्यांचे टगे कार्यकर्ते? ते नुसतेच गाड्या उडवत आले आणि गेले, कठीण आहे, पण सांगू कोणाला, १० दिवसांची शिक्षा आहे मला ही दरवर्षी."

"तरी बरं, दर वर्षी लोकमान्य मी स्वर्गात परत गेल्यावर विचारतात इथला इति-वृतांत.तेंव्हा  त्यांना मी हे काही सांगत नाही. उगीच बिचारे दु:खी व्हावयाचे. त्यांना उगीच अजून वाटते की त्यांनी सुरु केल्या प्रमाणे हा उत्सव चालतो, भजन, पोवाडे, भाव-भक्तीगीते, शास्त्रीय संगीताचे  कार्यक्रम, मोठ्या मोठ्या वक्त्यांची भाषणे, अहो लोकमान्य, ते शेवाळकर, शिवाजीराव, वसंतराव, भीमसेन  आता तुमच्याच सोबत आहेत ना? मग भाषणे देणार कोण आणि शास्त्रीय संगीत गाणार कोण?" 

"आज नववा दिवस. सत्यनारायणाची पूजा झाली. हुश्श जायचा दिवस जवळ आला म्हणायचा. आता शेवटचा एक दिवस स्पीकर वरून कोणतीही गाणी ऐकवून घेतील, असो, पण उद्या परत जायचे आहे. पूजेला पुन्हा नगरसेवक बाई आणि त्यांचे पतीदेव आले होते. जात पडताळणी च्या केस मधून सलामत सुटू दे असं काहीसे म्हणाल्या. हे काय असतं मला माहित देखील नाही. आणि श्री. नगरसेवक म्हणाले बाप्पा मध्यावधी निवडणुका होवू देत म्हणजे, हिलाच आमदारपदासाठी उभे करतो. सोबत त्यांचे चिरंजीव होते म्हणाले बाप्पा तेवढी जमीन लाटल्याच्या प्रकरणातून सोडव बाबा, आणि कित्येक दिवस आई-बाबांकडे एक ऑडी मागतो आहे, या वर्षी ती मिळूदे बाप्पा. पूजा झाली, धार्मिक कार्यक्रम संपले, आता आयटम नंबर ची गाणी सुरु. दरवर्षी माझ्या माहितीत भर पडते, इथे येऊन. मग मी ती स्वर्गात जावून इतर देवांना ऐकवतो. तसा माझ्या इतका मुक्काम एक देवी सोडल्यास कोणीच करत नाही ना इथे." 

"अजून वाजले की बारा आहेच का? नवीन काय तर म्हणे हलकट जवानी? हे काय प्रकरण? बाकी शीला, मुन्नी, जलेबीबाई अजून आहेतच. सोबत पुणेकर बाई आणि त्यांची गाणी होतीच. उद्या जायचे आहे, आता शांत झोपू द्या रे"

"जायचे म्हणून भल्या पहाटे उठून तयार बसलोय, पण अजून कोणी फिरकले नाही. आठ वाजले आता"

"सकाळी ९ वाजता कोणीतरी आले, सगळ्या भूपाळ्या लावून गेले, गणपतीसमोर सगळ्या देवांना उठवून झाले, घनश्याम सुंदर, उठी श्रीरामा, उठ पंढरीच्या राया, उठा उठा हो गजानना, अरे देव म्हणजे काय तुमच्या सारखे आहेत का ९/९ वाजे पर्यंत झोपून राहणारे?

"जायचे जायचे म्हणता, संध्याकाळचे ९ वाजलेच. सात वाजल्या पासून इथे नुसतेच एक ढोल पथक आणि झांज पथक वादन करतंय. पण जायचं कुठे अडलंय? समोर रांगोळी काढून झाली, मग निघालो, हळू हळू  ठिक  ठिकाणी थांबत, महापौर, उप-महापौर, अनेक राजकीय पुढारी यांना  दर्शन देत निघालो. महत्वाची माणसे ना ती. त्यांनी मंडळाच्या अध्यक्षांना नारळ दिला, तो कशाला? या वर्षी इको फ्रेंडली म्हणत गुलाल नव्हता. ते एक बरे झाले, इतका उधळत असत तो, नंतर चार दिवस डोळे नुसते चुरचुरत माझे. एकदाचा नदीवर पोहचलो. मोठा जयघोष झाला. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! कुठेतरी आजी आजोबांचे डोळे पाणावले, काकूंना वाईट वाटले, बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळले मला निरोप देताना, त्या साऱ्यांसाठी तरी मला परत यायलाच हवे. मनात म्हटलं येतो बाबांनो! 

पुनरागमनायच .....

Friday, September 28, 2012

गाय जशी हंबरते तसेच व्याकूळ व्हावे, बुडता बुडता सांजप्रवाही, अलगद भरुनी यावे.....

असं कधी झालंय का तुमच्याबरोबर ? की एखादी व्यक्ती, जिची आणि आपली प्रत्यक्ष ओळख नाही, आपले लौकिक अर्थाने काही नाते नाही, जिला आपण ओझरते देखील भेटलो नाही, आता ती व्यक्ती या जगात नाही, अशा व्यक्तीची तुम्हाला आठवण येते आणि डोळे वाहू लागतात. असं घडत होतं मध्यंतरी काही दिवस माझ्याबरोबर. रात्री गादीला पाठ टेकवली, आणि शांत विचार सुरु झाले की त्यांची आठवण.................. अनेक त्यांच्या तोंडाची वाक्ये जशीच्या तशी आठवत. तोच चेहरा भरल्या डोळ्यासमोर तरळत राही. तोच तो गोल चष्मा, कपाळावर थोडे वर लावलेले कुंकू, नीटनेटकी साधीशीच साडी, ओठांच्या या टोका पासून त्या टोकापर्यंतचे हसू. असे वाटे की आत्ता गप्पा मारायला सुरु करतील, मधेच अनेक कविता, संत साहित्याचा दाखला देत आपले म्हणणे पटवून देतील. कधी बा.भ., कधी आरती प्रभू, कधी मर्ढेकर तर कधी जी.ए. त्यांच्या बोलण्यातून डोकावतील. मनातलं सारं खरंखुरं बोलून मोकळे होणे हेच पटेल, अनेकदा ते बोलणे कडवट, दुसऱ्यांवर टीका केल्यासारखे पण वाटेल, पण ते खरे असेल.



काल घरात दिवाळीत कुठेतरी ४ दिवस फिरून येवू अशी चर्चा चालू होती. खरतर मनापासून मी या गोष्टींसाठी तयार नसते. मुळातच फार हिंडण्या फिरण्याची मला आवड नाही आणि जायचंच तर त्या साऱ्या प्रवासात घरापेक्षा चांगल्या गोष्टी आणि कमालीची शांतता मिळणार असेल तरच जायची माझी तयारी असते. नाहीतर घरच्यांसोबत चार सुट्टीचे दिवस घरीच मी आनंदाने घालवू शकते. तशीही माझ्या घराइतकी चांगली जागा या जगात दुसरी कुठेही नाही यावर मी ठाम आहे. त्यामुळे अनेकदा चर्चेची सुरुवातच मुळी माझ्या नकाराने होते. पण फक्त "तारकर्ली जवळ "धामापूर" आहे या एका गोष्टी साठी मी तयार झालीये. खूप मनापासून वाटतंय की जिथे त्यांचे बालपण गेले त्या धामापूरच्या तळ्याकाठी काही शांततेचे क्षण अनुभवावेत. काही दोघींमधील नात्याचा धागा सापडतो का ते पाहावे. अगदी कळत्या वयापासून खरतर कोणाचे अनुकरण करावे असे वाटले नाही पण या मात्र अपवाद ठरल्या. माझ्यात अनेकदा मी त्यांना पाहते. गुण आणि दोष यांच्या सीमारेषेवर आढळणाऱ्या काही गोष्टी आमच्यात समान असतीलही. पण कधी कधी ना त्या माझे मनच सारे व्यापून टाकतात. तशा काही ना काही समान गोष्टी अनेक माणसांमध्ये असतातच ना मग कुठे आपण तेंव्हा प्रत्येकवेळी हे धागे शोधतो का? मग यांच्याच बाबत असे का?


त्या गेल्या तेंव्हा काहीकेल्या मनाची अस्वस्थता जात नव्हती. मग पुन्हा एकदा त्यांची जमेल ती पुस्तके पुन्हा पुन्हा वाचतच गेले. आमच्या काय नक्की नाते आहे हे तपासत राहिले. काही ठोस म्हणावे असे सापडले नाही, पण त्यांच्याशी जुळलेली मनाची नाळ मात्र तुटायचं नाही म्हणत राहिली. त्यामुळे आज लौकिकार्थाने नाहीत पण त्या माझ्याशी जोडलेल्याच आहेत.


मी त्यांच्या इतकी करारी आणि प्रज्ञावंत नाही, आग्रही नाही, नीट नेटकी नाही. अनेक वेळी माझी स्मरणशक्ती दगा देते, आणि काही वेळा काही गोष्टी विसरू म्हणता विसरू देत नाही. त्यांच्या इतकी प्रत्येक गोष्टीसाठी मी आग्रही राहत नाही आणि काही गोष्टींचा हेका मात्र मी सोडत नाही. स्वत:च्या अनुभवातून त्यांच्यासारखेच शिकत आले मी. त्या मुळे त्यातून शिकलेल्या गोष्टी मात्र आनंदाने मी जपते आणि स्वत:बाबत तरी याच गोष्टींसाठी खूप आग्रही आहते. थोडे थोडे करून जमवलेल्या माझ्या विश्वातील प्रत्येक माणसावर, प्रत्येक वस्तू वर नको इतका माझा जीव आहे, पण जेंव्हा वेळ येईल तेंव्हा एकाही गोष्टीत माझा जीव गुंतणार नाही हे मला माहित आहे. या समाजाचे आपण देणे लागतो ते कसे द्यावे याचे कोडे त्यांचे त्यांना सुटले होते. या बाबतीत किती नशीबवान होत्या त्या! आणि त्यांच्याच कल्पनेतून अनेक मोठी समाजोपयोगी कामे त्यांच्या नावाचा मोठा उदो उदो न करताही उभी राहिली आणि आजतोपर्यंत चालू ही आहेत. घर, आपली माणसे आणि त्यांची पुढील आर्थिक सोय आणि ती कधी पर्यंतची करायची, गरजा कुठे सीमित करायच्या याची उत्तरे अजूनतरी मला सर्वार्थाने सापडली नाहीत, त्यामुळेच समाजाचे देणे मी नक्की कोणत्या तऱ्हेने फेडणार आहे या प्रश्नाला आजतरी उत्तर नाही. एखाद दोन संस्थाना दरवर्षी थोडी आर्थिक मदत पाठवली की आपले काम झाले ही चुकीची कल्पना मनात नसल्याने, ती पाठवूनही मनाची अस्वस्थता काही कमी होत नाही. तिचे तुटपुंजेपण मनाला सतावत राहते.

ही एकच नाही तर अशा अनेक प्रकारे अस्वस्थता मला घेरून टाकते. आजूबाजूच्या अनेक घटना त्यास कारणीभूत असतात. सगळ्याच थेट माझ्याशी संबंधित नसतातही तरीही. असंच काहीसं त्यांच्या बाबतीत पण झालं असेल का? कशी त्यांनी त्यावर मात केली असेल? सुख-दु:ख सारेच परस्वाधीन, ही अवस्था तर आजही तशीच कायम आहे, मग गुंते सोडवले कसे? असे विचार मनात काहूर माजवत असताना भरून येणारे डोळे हे काही यावरचे उत्तर नाही असू शकत. आहे मनोहर तरी..... म्हणतच ह्या साऱ्याला सामोरे जावे का?  


















(छायाचित्रे- आंतरजाल आणि शीर्षक-कवी ग्रेस यांच्या कवितेतून साभार.)

Sunday, September 23, 2012

गजरा महिरप आणि कमळाचे फुल

 मणी, मोती यांच्याशी तशी  फारशी माझी कधी जवळीक नव्हती. दागिन्याची विशेष आवड नसल्याने ती वेळ कधी आली नाही. लहानपणी दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हा बहिणींना कशात तरी गुंतवून ठेवावे लागे, नाहीतर सतत "कंटाळा आला" हा एकच घोषा ऐकावा लागे. त्याचाच एक भाग म्हणून एक वर्ष आई तुळशी बागेतून थोडे मणी घेवून आली. लागोपाठ इतर मुलींच्या घरी पण ते आणले गेले. सर्व मुलीनी मण्यांच्या कला कुसरीच्या वस्तू बनवण्याची टूम निघाली. कित्येक प्रयत्नानंतरही मी ते करू नाही शकले, कधी दोराच अडकून पडायचा, कधी मोतीच मोजायला चुकायचे ....शेवटी कंटाळून तो नाद मी सोडून दिला. आणलेल्या मोत्यांची आई ने एक वस्तू बनवली. या अनुभवातून ती पण एक शिकली की कला कुसरीच्या वस्तूंचे आणि आपल्या लेकीचे काही जमणार नाही. हिला आपली सुट्टीत पुणे मराठी ग्रंथालयाची वर्गणी भरून द्यावी, तिने पुस्तके वाचावीत आणि सुट्टी सार्थकी लावावी हे बरे! शाळेत सुद्धा "चित्रकला, शिवण, लोकरीचे काम, किंवा भरत-काम करावे लागणे म्हणजे माझ्यावर संकट ओढावे. अनेक गोष्टी माझ्या साठी आई, शेजारच्या काकू यांनी पूर्ण केल्या आहेत.




पुढे कॉलेजला सुद्धा आसपासच्या मुली काहीतरी बनवत असत, मी त्यात लुडबुड करायचा प्रयत्न केला तर शेजारच्या एक काकू आणि माझी बहिण लगेच मला म्हणत " जा तू आपली दलाल स्ट्रीट, कॅपिटल मार्केट वाच" ही कामे तुझी नव्हेत. मला पण ते पटे. मी दरवेळी इतरांना असे नेहमी सांगत असे, की तुमच्या अर्थार्जनाच्या गोष्टी खेरीज एखादी तरी कला तुमच्या कडे असायला हवी, जी थोडा रिकामा वेळ मिळाल्यावर तुमच्या सोबत असेल. पण अशी कोणती कला माझ्याकडे आहे हा प्रश्न मला स्वतःलाच पडणे थांबत नव्हते.  

काही वर्षांपूर्वी संस्कृती लहान असताना मी जेंव्हा घरी होते, तेंव्हा मला माझ्या चुलत सासू-बाईनी एक मोत्यांची महिरप दिली. खूप सुरेख दिसत होती ती. घरीच होते म्हणून स्वत: जावून थोडे मोती घेवून आले. थोडे प्रयत्न करून तशीच दुसरी बनवता आली. मग एका पाठोपाठ बनवत गेले. त्या वर्षी दिवाळीत बहिण, नणंद, जावू प्रत्येकीला या अशा बनवलेल्या महिरपीच भेट म्हणून दिल्या. पण ते तेवढ्या पुरतेच ....नंतर काहीच दिवसात मी पुन्हा नोकरी करू लागले आणि या साऱ्या गोष्टी एका पेटीत बंद होवून माळ्यावर जावून बसल्या. काही महिन्यांपूर्वी अशाच एक दोन नाजूक मोत्यांनी बनवलेल्या गोष्टी माझ्या नजरेस पडल्या आणि वाटले कदाचित आपण हे करू शकू. माळ्यावरून मोती शोधून काढले आणि ती फुले करून पहिली, आणि पहिल्याच प्रयत्नात ती जमली देखील. तेंव्हा लक्षात आले, जरी लहानपणी नाही, तरी आता आपल्याला ह्या गोष्टी कोणीही न शिकवता देखील जमू शकतात. मग त्यात थोडे प्रयोग करून पहिले. एका मैत्रीणीला दाखवले. तिने लगेच तिच्या साठी  या गोष्टी बनवायला सांगितल्या. गणपती आठवड्यावर आलेले. ती म्हणे मला हे गणपतीसाठी करून दे. वाढता वाढता एक ऑर्डरच झाली. गणपतीच्या आधी १०/१२ दिवस मी रात्री जागून, पहाटे लवकर उठून फक्त हेच काम करत होते. ती ऑर्डर लहान की मोठी हा मुद्दा गौण आहे. त्यातले पैसे महत्वाचे नाहीत, एखादी वस्तू सहज स्वत:ला बनवता येणं ही मला त्यातली फार मोठी गोष्ट वाटली. २/३ घरांमधले गणपती-गौरी या माझ्या कलाकारीने सजले, नैवेद्याची ताटे महिरपिंनी नटली असतील. हा विचार खूप सुखावणारा आहे. 



Saturday, September 22, 2012

तू सुखकर्ता .....

कामावरून यावे, संध्याकाळी जवळच्या सार्वजनिक गणेश-उत्सवाच्या तयारीच्या बैठकांना उपस्थित राहावे. एकीकडे मनात घरच्या गणपतीला यंदा कोणती सजावट करावी याची आखणी करावी. मग बच्चे कंपनीला हाताशी धरून थर्माकोलची एक सुंदरशी सजावट करावी. मोठ्या उत्साहाने गणपतीची प्राण-प्रतिष्ठा सकाळी सकाळी करून मग पुन्हा मंडळाचा गणपती आणायला जावे. दाहीदिवस तिथे आपला सक्रीय सहभाग असावा, नाना स्पर्धा, करमणुकीचे कार्यक्रम याचे बेत पार पडावेत. असे माझे बाबा! आज मागे वळून पाहते तेंव्हा विचार येतो कसं जमत असेल हे त्यांना तेंव्हा. त्यांच्यात अती उत्साह होता की माझ्यातच उत्साहाचा थोडा अभाव आहे?

साधारण राखी पौर्णिमेनंतरच आमच्या घरादाराला गणपतीचे वेध लागत. कारण बाबा संध्याकाळी त्या संबंधीच्या मंडळाच्या बैठकांना जात असत. जिथून गणेश मूर्ती आणत असू तिथे मूर्ती आल्या आल्या आम्ही तो बुक करून येत असू आणि आम्हा सर्वांमध्येच प्रचंड उत्साह संचारत असे. आईची स्वयंपाकघरात तयारी सुरु होई. घराची विशेष साफ-सफाई, गणपतीसाठी जे काही होते त्या फर्निचरची हलवाहलवी होई एका सुट्टीच्या दिवशी. बाबा एकीकडे मंडळाच्या कार्यक्रमाची तयारी आणि घरच्या गणपतीची सजावट यात अगदी गढून जात. आम्हा भावंडांची त्यात लुडबुड असेच. वाड्यात सर्वात सुंदर सजावट आमच्या घरी असे. हरतालिकेच्या आदल्या दिवशी एकीकडे जोरदार तयारी आणि दुसरीकडे स्वयंपाक घरात मस्त मेनू शिजत असे, ज्यात मटार भात टोमाटोचे सार, शिरा असा बेत असे. आज पर्यंत मला तो का असे याचे कारण कळले नाही. दुसऱ्या दिवशी हरतालिकेची पूजा जी एकत्रितरित्या वाड्यातील सर्व बायका आणि मुली करत असत. त्यासाठी सकाळीच फुले आणि पत्री गोळा करून आणायचा भारी सोस असे. एकदा पूजा पार पडली की दुसऱ्या दिवशीचे वेध लागलेले असत. त्यातच कोण किती कडक उपास करते याची चर्चा असे आणि आया अगं, कडक नको, खाऊन उपास करा म्हणत आमच्या मागे लागत. उपास आणि दुप्पट खाणे हा प्रकार या दिवशी पण असे. खिचडी, वराई-दाण्याची आमटी, भरली केळी, रताळ्याचा कीस, खजूर, भोपळ्याचे भरीत असे नाना प्रकार त्या दिवशी बनत. रात्री उशिरापर्यंत बाबांची मखर बनवण्याची लगबग सुरु राही. ते बनल्यावरच ते झोपत. दुसऱ्या दिवशी भल्या पाहते सर्व उठत. जवळपास सकाळी ८ वाजता गणपतीची प्राण-प्रतिष्ठा होत असे, आणि ती झाली की बाबा लगेच मंडळाच्या गणपती बसवायला जात आणि आई स्वयंपाक घरात. यथासांग मोदकाचे जेवण पार पडले की जी सुस्ती येई. नित्य नियमाने आम्ही बच्चे कंपनी घरच्या गणपतीची, वाड्यातल्या गणपतीची आणि मंडळाच्या गणपतीची आरती करून येत असू. त्यातच एकी कडे गणेश उत्सवाच्या कार्यक्रमांची तयारी करत असू. बाबा कार्यकारणीवर असत, त्यामुळे आम्ही त्यात भाग घेणे ओघाने येतच असे. छान छान फ्रॉक किंवा कधी साडी, हाताला आणि पायाला लावलेला अल्ता, कधी नव्हे ते रंगवलेले ओठ फार मजा वाटे या साऱ्यात. दुसरी मजा वाटे नंतर या साऱ्याचे फोटो शाळेत नेवून दाखवून भाव खाण्यात. 

प्रत्येक दिवशी घरी दारी काही ना काही कार्यक्रम असेच. ऋषी पंचमीचे खास जेवण, मग गौरी आणण्याची लगबग, गौरी जेवण आणि मग गौरी आणि गणपतीचे एकत्र विसर्जन. हे ५ दिवस कधी घराला कुलूप लागत नसे. एकदा गौरी गणपतीचे आंब्याची डाळ आणि खिरापत या सोबत विसर्जन केले, की मग त्यादिवशी रात्री पासून आम्ही पाची जण गणपती पहावयास बाहेर पडत असू. आठ च्या सुमारास जेवून बाहेर पडायचे, आणि रात्री १२ पर्यंत घरी परत. पायी पायी फिरत २/३ दिवसात सारे पुण्यातले गणपती पाहून होत. त्या काळातही त्या दिवसात रस्त्यावर अनेक लहान मुलांसाठी खास अशा वस्तूंची रेलचेल असे. आम्ही हट्टही करत असू. काही वस्तू, खेळणी मिळतही. पण तो काळ, मनातला अमाप  उत्साह  आणि खिशातल्या तुटपुंज्या नोटा यांचे व्यस्त प्रमाण असण्याचा होता. वाड्यात एवढ्या उत्साहाने दरवर्षी गणपती बघणारे आम्ही एकमेव घर होतो. विसर्जनाच्या दिवशी आमच्या घरी अनेक वर्षे संध्याकाळी मोठ्या प्रमाणात भेळ बनत असे. बाबा तर मंडळाच्या गणपती सोबत असत. पण लक्ष्मी रोड पासून घर दोन मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे, अनेक नातेवाईक त्या दिवशी आमच्या कडे दुपार पासूनच येवू लागत. दुपारी ३ च्या सुमारास पहिला मानाचा गणपती शगुन चौकात पोहचत असे, तर तिथे जावून आधी पासूनच जागा पकडावी लागे. संध्याकाळ पर्यंत गणपती बघायचे, घरी यायचे, भेळ खायची, पुन्हा जायचे रात्री १०/११ पर्यंत रोषणाई चे गणपती पाहून मग मात्र डोळे मिटू लागत. घरी जाऊन झोपत असू. पहाटे कोणी तरी येवून उठवे की "चला मंडई आणि दगडूशेठ चे गणपती येत आहेत." त्यांची रोषणाई आणि त्यांच्या समोरील  वाद्य पथके पाहणे फार मौजेचे वाटे त्या काळी. एकदा गणपती विसर्जन झाले की लक्षी रोड कसा सुना सुना वाटू लागे.

हे सारे करत असता आम्ही कधी शाळेला कधी दांडी मारली नाही, आमच्या मागे कधी कोणी अभ्यास करा म्हणून लागले नाही. कार्यक्रम, स्पर्धा यात भाग घेण्यापासून आम्हाला कधी कोणी अडवले नाही, रात्री १२ पर्यंत पायपीट करूनही दुसऱ्या दिवशी सर्व गोष्टी करण्यासाठी तेवढाच उत्साह असे. कमावता माणूस एक आणि खाणारी तोंडे ५, दर महिन्याचा खर्च भागवताना नाकीनाऊ येत असण्याच्या काळात माझ्या आई बाबांकडे एवढा अमाप उत्साह कुठून बरे येत असेल? मला राहून राहून त्या मागचे गमक कधी कळले नाहीये. 

आता  मी काय करते? तोच वारसा मी पुढे चालवते आहे का?  घरच्या गणपती साठी तेवढाच जोरदार उत्साह असतो. कोकणस्थ असून हे दोन दिवस सारा कारभार देशस्थी असतो. कारण घरी दुपारी जेवायला बहिण, नणंद, दीर आपापल्या कुटुंबासमवेत असतात. अशारितीने आम्ही १६/१७ जण असतो. उकडीच्या मोदकांचा बेत असतो. सजावट नेहमी फुलांचीच असते, त्याच सोबत हार घरीच बनतात. दुपारी जेवण अटपतानाच ३ वाजतात. साधारण सकाळी ११.३० ते २ मी फक्त मोदकच बनवत असते. जेवणे पार पडून सर्व जण थोडे पडतात, आणि मला संध्याकाळच्या आरतीचे वेध लागतात. ज्यास एक तिखट आणि एक गोड असे दोन  ताजे नैवेद्य असतात आणि आरतीला साधारण ५० जण असतात. या साऱ्या गोष्टींची कोरडी तयारी किमान आधीचे ३/४ वीकेंड्स आणि गणपतीच्या आधीचे २ दिवस सुट्टी घेवून चालू असते. पण बास इतकेच.एकदा दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले की भरले घर सुद्धा सुने सुने वाटू लागते.  कॉलनीत कुठे अन कसा गणपती बसतो ह्याचा सुद्धा मला पत्ता नसतो. गेल्या कित्येक वर्षात मी जावून गणपती पहिले नाहीत. नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींकडे श्रींच्या दर्शनाला मी जर या दीड दिवसा नंतर एखादा वीकेंड आला, तरच जाऊ शकते. गौरी आणते, पण तिची सवाष्ण नवरात्रातल्या सवाष्णी सोबत बोलावते. कारण तेंव्हा खात्रीने एक वीकेंड मिळतोच. आज काल सार्वजनिक गणेश उत्सवात काही गाण्याचे कार्यक्रम, इतर स्थानिक लोकांचे विविध गुण दर्शनाचे  कार्यक्रम, काही स्पर्धा होतात की नाही ते मला माहित देखील नाही. कॉलनीतल्या गणपती पुढे स्पीकर लावून संध्याकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत गाणी (भक्ती गीतेच, किंवा गायत्री/गणेश मंत्र) चालू असतो, त्यामुळे या दिवसात घरून काम करण्याचा मी विचार सुद्धा करू नाही शकत. पुण्यातालीच काय पण चिंचवड मधील विसर्जन मिरवणूक कशी असते ते देखील मी गेल्या काही वर्षात पाहिलेली नाही. थोडक्यात काय? तशी आज आताही सारी गणिते व्यस्तच आहेत कारण पैसा आहे पण वेळ आणि तेवढा उत्साह मात्र कुठून उसना मिळत नाहीये.