Saturday, May 12, 2012

असेच काही उदासवाणे

ऑफिसला जाताना रस्त्यात एक सिग्नल लागतो, तिथे हमखास दोनतीन गरीब मुले-मुली तुमच्या गाडीपाशी येतात. हातात एक फडकं असतं, काही न बोलता गाडीची समोरची काच पुसू लागतात, जो पर्यंत तुम्ही पर्समधून पैसे काढत नाही तोपर्यंतच मात्र ...अर्थात सिग्नल ही काही सेकंदाचाच असतो. मी दर वेळी २ रु. हाती ठेवते, विचार करते किमान काम करून पैसे मिळवावेत एवढं समजलं आहे हे ही नसे थोडके. या वर माझी चेष्टा करणारी माणसे माझ्या आसपास असतातच. 

ज्या समाज व्यवस्थेचा आपण भाग आहोत तेथे इतक्या मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे की ते कोणी एका दोघांच्याने दूर होणे शक्य नाही. पण मी पण या समाजाचाच जर एक भाग असेल तर मी कोणत्यातरी स्वरूपात माझा सहभाग त्याच्या निर्मूलनासाठी द्यायलाच हवा. अनेकदा मी चितळ्यांच्या दुकानात जाते, घरी विशेष अशा गोष्टी खाणारं कोणी नसतं तरी काही ना काही मिठाई, फरसाण घेवून येते, असू दे कोणी घरी अचानक आलं तर असावं म्हणून. त्या दुकानाच्या बाहेर अनेक लहान मुले भीक मागत असतात. त्या दुकानातून बाहेर पडताना मला इतका अपराधी वाटतं की नुसते एक दोन रु. हातात ठेवून काही फारसं साध्य होणार नाही. मग मी बाजूला एक दोन खाऊ ची दुकाने आहेत तिथून काहीतरी सामोसा, इडली वगैरे विकत घेवून त्यांना देते. तिथेच बाजूला इतर फुटकळ विक्रेते असतात जसे की लिंबे, गजरे, डाळिंबे विकणारे. परवा असंच काही एका मुलीला घेवून दिल्यावर बाजूला उभा असलेल्या गजरेवाल्याने ते तिच्या हातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. ते पाहून मी त्याला ओरडले, की तिला खावू दे. पण आपण तरी असे किती पुरे पडणार. अनेकदा नको असतानाही मी सिग्नलला गजरेवाल्यांकडून गजरे घेते. काही उपयोग नसतो  मला त्यांचा. थोडा वेळ गाडीत छान सुवास दरवळतो इतकेच. 

आज सिग्नलला उभी असता नेहमीप्रमाणे एका मुलगी गाडी जवळ आली, काच पुसू लागली, पैसे देवू केल्यावर, माझ्या बाजूच्या खिडकीतून  समोर ठेवलेले चुईंग गम सारख्या दिसणाऱ्या पाकिटाकडे बोट दाखवून ते मागू लागली, पण तिच्या दुर्दैवाने ते चुईंग गम नव्हतं, मी हातात पैसे ठेवून, ते देणार नाही सांगितला. सिग्नल संपून गाडी सुरु करेपर्यंत ती गाडी सोडेचना. आता जरी ते चुईंग गम असतं तर त्याने का तिचे पोट भरणार होते? इतकं उदास, इतकं हतबल वाटू लागलं नंतर मला की पुढे जावून मला गाडी  चालवयालाच  सुचेना, शेवटी मग गाडी बाजूला घेवून, थांबले, पाणी पिऊन, पाच मिनिटे तशीच शांत बसून राहिले मग पुढे गेले. पण प्रश्न हा की असा हे किती दिवस चालणार?

1 comment:

  1. hummh...khoop kahi badalvase vatat asete, pan shevati jitake aplykadoon hoiel tyavar samadhan manave hech khare.

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!