Tuesday, June 24, 2014

मनाचिये गुंती ………भाग २

मनाचिये गुंती चा हा पुढील भाग पण त्यातील संदर्भांशिवायही वाचणे कठीण जाऊ नये. 

सकाळचे सात वाजलेत. शनिवारचा दिवस आहे, टेबलपाशी आजची वर्तमानपत्रे आणि सकाळ पासूनचा दुसरा कॉफीचा मग हाती घेऊन गायत्री बसून आहे. वर्तमानपत्राच्या पानांवरून नजर फिरतीये, वाचले काहीच जात नाहीये. आज सुट्टीचा दिवस. तसा काही विशेष सुट्टीचा प्लान नाही. तशीही सकाळी सात ही सारंगसाठी उठण्याची वेळच नव्हे. आजकाल गेली काही वर्षे तीही त्यास उठवण्याच्या फंदात नाही पडली कधी. 

"आठवावे लागेल शेवटचे सकाळी प्रेमाने त्याला, " उठ रे, उठ ना रे सारंग, बघ किती वाजलेत" म्हणत उठवले होते ते" 

"सगळ्या जोडप्यांचे पुढे असेच होते का? सहजीवनाची, एकमेकांच्या सोबतीची, त्यातून मिळणाऱ्या आनंदाची परिभाषा काळानुरूप बदलायला हवी. पण आपल्यासह अनेकांच्या बाबत असे घडताना दिसत का नाही? सध्या आपल्या आसपास जास्त अशाच गोष्टी का पाहायला मिळाव्यात? आज लग्नानंतर जवळपास चाळीस वर्षे होत आली आई-आप्पांच्या लग्नाला पण आजही त्याचे नाते कसे टवटवीत वाटते. म्हणजे ते तसे आहे की ते तसं दाखवतात? त्यांची लेक असून आपल्याला हा प्रश्न जर पडत असेल तर मग मात्र  ……"

" आसपास सगळी तकलादू नाती पाहिली कि कशाचाच भरवसा वाटू नये तसं झालंय आपलं." 

मधल्या काळात सखीचा रोहनशी घटस्फोटाचा निर्णय पक्का झाला, तिने तसा तो त्याला आणि दोघांच्या घरच्यांना सांगितला. बऱ्यापैकी घट्ट मनाने तिने हा निर्णय घेतला होता, ज्यावर ती तेवढीच ठाम ही होती, आहे. रोहन साठी हा धक्का होता, पण यास्थितीस तो ही कारणीभूत होताच,  सखीची बाजू इतकी पटण्याजोगी होती की रोहनची मैत्रीण असलेली गायत्री त्याच्याशी बोलण्याच्या किंवा दोघांत मध्यस्थी करण्याच्या मनस्थितीत नव्हतीच. 

इथे सारंग आकंठ कामात बुडालेला आहे. कधी कधी घरी पहाटे तीन चार वाजता येऊन सकाळी नऊ वाजता पुन्हा ऑफिसला जातो. कधी लवकर घरी आलाच तर, काम, ड्रिंक्स आणि तो हेच त्याचे जग झालेय. तो पुढच्या महिन्यात यु एस ला जाणार हे आता नक्की झालंय. किमान दोन वर्षांसाठी. त्याला हवी असणारी गोष्ट शेवटी तो मिळवणारच हे नक्की.  

या उलट गायत्रीची परिस्थिती आहे. तिचं आयुष्य काहीसं संथ पाण्यासारखं झालंय. घर आणि करिअर चांगल्यापैकी स्थिरावलेले. नवीन काही, का?, किती? आणि कोणासाठी?मिळवावे हा प्रश्न सतत छळतोय. लग्नाला दहा वर्षे होतील आता. सर्व शक्य होते ते प्रयत्न करून झाले, पण काही उपयोग झाला नाही. आता तर तिचीच इच्छा नाहीये. गेल्या काही वर्षातील तिच्यातील आणि सारंग मधील कोणत्याच कारणाशिवायचा वाढता दुरावा आणि आजूबाजूस असलेल्या इतर जोडप्यांमधील कुरबुरी पाहता कशासाठी अजून एका जीवाचे हाल असा प्रश्न पडू लागलाय. मूल नसल्याने दुरावा वाढतोय कि हा वाढता दुरावाच ते न होण्याचे कारण आहे? उत्तरेच नसणारे प्रश्न तरी का पडावेत? आणि हेच कारण होतं गायत्रीने यावेळी सारंग बरोबर सद्ध्या तरी जायचे नाही असे ठरवले त्याचे. त्यानेही विशेष आग्रह केला नाहीच म्हणा. 

"सद्ध्या त्याच्या अनेक विचारांत, निर्णयात आपण नसतोच तसे यातही नव्हतोच. अपेक्षितच होता का त्याला आपला हा त्यासोबत न जाण्याचा निर्णय, की त्यालाही थोडी स्पेस हवीच आहे? हे थोडे अंतर गोष्टी थोड्या सरळ करतील का की अजूनच बिघडवतील. पण  काय बिनसलंय हे न कळताच आपण गोष्टी सुधारण्याची अपेक्षा का करतोय? वर वर तर सारे छान चालू आहे, इतर कोणाला पुसटशी शंकाही यायची नाही. सारंग जाण्यापूर्वी त्याच्याशी एकदा बोलायला हवे आहे का? मुळात तो आपल्यात सारे काही ठीक नाहीये हे तरी मान्य करेल की हे सारे तुझ्या मनाचे खेळ आहेत म्हणत आपले म्हणणे ऐकूनच घेणार नाही?"

"मध्यंतरी विराजने जो सल्ला दिला…… हळूहळू त्याने डोके पोखरून टाकले आहे "रिलेशन्स जप" असे म्हणाला होता तो. म्हणजे मी नक्की काय करू? नक्की कोणत्या नात्यांविषयी, कि सगळ्याच? म्हणजे मी आणि सारंग, मी आणि त्याचे आई वडील आणि इतर नातेवाईक, कि प्रोफेशनल रिलेशन्स? तशीही सर्वच नाती प्रवाही असतात, त्यामुळे रोज थोडी थोडी बदलतातच. ती थांबली कि मगच संपण्याकडे वाटचाल करू लागतात. पण मग अशा वाहत्या पाण्यास जपायचे आहे मी म्हणजे नक्की काय करायचे आहे? 

बरं,ती जपण्यासाठी मीच एकटी का प्रयत्न करू? प्रयत्न करू म्हणजे तरी नक्की काय करू? सदैव मी पडती बाजू घेऊ, की कोणत्याही परिस्थितीत मी शांत राहू? पण हे करण्यासाठी तरी काहीतरी घडावे लागेल. नक्की करू तरी काय? कशाने काय बिघडणार आहे हे कळले तर कोणी काही उपाय तरी करेल ना, इथे आता सगळेच हवेत.काही न घडताच गोष्टी बिघडत चाललेल्या. 

"अनेकदा फोन हाती घेतला होता त्याला फोन करून त्याच्याशी यावर अधिक बोलण्यासाठी. पण धीर झाला नाही. एकतर मुळात तो सारंगचा मित्र आहे.तर मग त्याने जरी सारंगने सांगितले म्हणून आपली पत्रिका पहिली असेल तरी आपल्याशी बोलायला नको होते यावर. दुसरीकडे आपला यावर विश्वास कधी नव्हता. आजवर आयुष्यातली कोणतीही महत्त्वाची गोष्ट करण्यापूर्वी आपण ज्योतिष, कुंडली हे पहिले नव्हते. अगदी अजून मूल नाही यासाठी सुद्धा नाही. तर मग आज का वळावे आपण या साऱ्याकडे? त्याच्या या सल्ल्याने आपण का त्रास करून घेतोय. त्यालाही चांगलेच माहित आहे आपला या गोष्टींवर विश्वास नाही ते"

आई आप्पांशी यावर बोलावे का एकदा? पण त्यांना ह्या गुंत्यांचा तरी त्रास आता या वयात नको द्यायला. मुळात आपल्याच कल्पना इतक्या धुसर आहेत कि त्यांच्यापर्यंत हे सारे पोहोचवावे तरी कसे. त्या दोघांनी दिलेले समतोल विचारांचं बाळकडू विसरत चाललोय का आपण? त्यातून आप्पांच्या सडेतोड प्रश्नांची उत्तरे देणे जमणार नाही आपल्याला. खरे तर त्यांच्याशीच एकदा मनमोकळा संवाद घडायला हवाय, कदाचित एखादी नवी दिशा त्यातूनच सापडेल आणि त्यावाटेवर चालता सारे कसे स्वछ आणि निरभ्र होऊन जाईल………

No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!