Thursday, March 8, 2012

Status update

व्यक्त होणं तशी प्रत्येकाची गरज. कधी एखाद्या खास व्यक्तीपाशीच वा कधी फक्त आपल्या मनातलं बोलता येणं. कोणी ते ऐकताय, वाचतंय, प्रतिसाद देतंय याच्याशी फारसं देणं-घेणं नसलेलं. हे असं व्यक्त होणं खूप तात्कालिक असतं, जरुरी नाही काही दीर्घकालीन असं काही त्यातून गवसेल. पण किमान स्वत:च्याच विचाराकृतींचे विविधरंगी आकृतीबंध पुढे जावून जे कदाचित हास्यास्पद वाटतील, कदाचित मोहक वाटतील. पण ती काळाची गरज असते.




जोपर्यंत मी एका सर्वोत्तम IT कंपनीचा भाग होते तोपर्यंत तेथील BB किंवा blog माझी ही दुसऱ्या प्रकारची गरज तरी पूर्ण करत असे.. जेंव्हा बदलाची चाहूल लागली तेंव्हा मी फेसबुक चा विचार सूरू केला. तोपर्यंत मला कधी त्याची गरज वाटलीच नव्हती. आता ६ महिन्यांपेक्षा जास्त दिवस झालेत पण काहीतरी मिसिंग आहे. सावरीची वाळकी शेंग उघडली जावी आणि त्यातला कापूस (लहान मुलांच्या भाषेत "म्हाताऱ्या") हवेत भिरभिरत राहावा तसं काहीतरी दिवसरात्र डोक्यात भिरभिरत असतं. पण कित्येक दिवस झालेत, त्यांची एकसंध गुंफण मी करू नाही शकलेली. ही देखील एक प्रकारे घूसमटच. अनेकदा असं वाटून जातं की ही डोक्यातली सारी चक्रे थांबवीत. एका शांत झोपेतून फ्रेश जाग यावी आणि सारे विचार, ताण हलके होवून जावेत. पण असं घडत नाही. आजकाल जेंव्हा जेंव्हा मी फेसबुक ला लॉग-इन होते तेंव्हा बऱ्याचदा इथल्या चर्चा, status updates माझ्या अस्वस्थतेत भर घालतात. खरंतर या अवस्थेस माझी मीच कारणीभूत असेन, तरीहि असं वाटतंय की थोडे दिवस यापासून दूर राहून पाहावं. स्वत:च स्वत:शी संवाद साधावा. थोडे म्हणजे किती माहित नाही. असं नाही घडलं तर काय माहित नाही. असं ठरवून आखीव रेखीव असं आयुष्य थोडंच असतं?

No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!