Wednesday, June 5, 2013

एक दिवस खाता खाता, बनवणाऱ्याचे हात घ्यावेत ….….

कोणी प्रेमाने एखादा पदार्थ तुमच्यासाठी बनवला तर त्यात आनंद काही औरच असतो ना? यापूर्वी आई, आजी, मामी, आत्या, साबा  यांनी त्यांच्या हातचे मला आवडणारे पदार्थ खूपदा बनवले आहेत. यांच्या प्रत्येकीच्या अशा काही हातखंडा रेसिपीज आहेत. आई च्या हातचे दडपे पोहे, मसालेभात, ओल्या साल पापड्या, रवा नारळाचे खवा घातलेले लाडू, आत्याच्या हातची पुरणपोळी, सुरळीवडी, उपमा, मक्याची नारळाच्या दुधातील करी, साबांच्या हातची भरली वांगी, काजूची उसळ, गुळाची पोळी, तिळाचे लाडू, लसूण कुरकुरीत तळून घातलेला पातळ पोह्याचा चिवडा, मामी च्या हातच्या पाकातल्या पुऱ्या आणि साखरभात अशी यादी बरीच मोठी आहे आणि या साऱ्याजणी वेळोवेळी आमचे हे हट्ट पुरवत असतात देखील.
नवऱ्याच्या हातचा वीकेंडला सकाळचा चहा. जेंव्हा तो "तू झोप थोडा वेळ, मी चहा तयार झाला की तुला हाक मारतो" असे म्हणतो तेंव्हा  अजून जास्तीची अर्धा तास झोप मिळाल्यावर  आणि वर आयता चहाचा कप हाती आल्यावर अजूनच छान लागतो. या चहाशिवाय तो नियमित पणे फक्त रात्रीचा वरणभाताचा कुकर लावतो. तसा त्याचा स्वयंपाक घरातील वावर बराच असतो. सर्वात मोठे काम म्हणजे "सूचना". मीच काय पण त्याची आई, बहिण, सासू, मेव्हणी, माझ्या चुलत जावा, नणंदासुद्धा यातून सुटत नाहीत. इतर काही पदार्थ तो आवडीने बनवतो पण मी नॉन-व्हेज खात नसल्याने ते माझ्या काही कामाचे नसतात. पण तरी देखील, जेंव्हा घरात डोसे, पावभाजी, थालीपीठे असा कोणता तरी बेत असतो तेंव्हा बाकीच्यांचे जेवण आटोपून जेंव्हा मी एकदाच स्वत:चे पान वाढून घ्यायचा विचार करत असते, तेंव्हा मला गरम गरम खायला आवडते हे लक्षात ठेवून तो जेंव्हा "पहिला डोसा घेवून तो सुरुवात कर जेवायला, नंतरचा मी करून वाढतो" असे जेंव्हा म्हणतो तेंव्हा दोन घास नक्कीच जास्त जातात. 

सध्या तिसऱ्या व्यक्तीची लुडबुड या प्रांतात वाढत चालली आहे. माझ्या लेकीची संस्कृतीची! सुरुवातीला चहा, कॉफी, maggi, पास्ता किंवा आमच्या दोघांपैकी कोणीच घरी नसू आणि जेवायला येणार असू तर मग कुकर. मग मागच्या सुट्टीत फुलके करता येऊ लागले, त्याखेरीज कांदे पोहे, दही पोहे कधी मधी घरी संध्याकाळी बनू लागले. पण ह्याचा प्रसार फक्त बाबापुर्ताच होता. बाबाच सर्वात मोठा परीक्षक आणि कौतुकाने खाणारा असल्याने अनेकदा यातल्या अनेक गोष्टी माझ्यापर्यंत पोहचतच नसत. तशीही मी रात्रीच्या जेवणाच्या वेळेपर्यंत कशीबशी घरी पोहचते. 

मागच्या वर्षी पहिल्यांदा माझ्या वाढदिवसाला खास माझ्यासाठी एक सुंदर पदार्थ बनला. जे माझ्यासाठी सरप्राईज होते. मारी ची बिस्किटे, साखर, पाणी आणि कॉफी च्या मिश्रणात एक सेकंद बुडवून नंतर कोकोच्या पेस्ट चे आवरण त्यावर देऊन पुन्हा होती तशी रोल बनवून ठेवली, अल्युमिनीयम च्या फोईल  मध्ये गुंडाळून ३/४ तास फ्रीज मध्ये ठेवून बनवलेला एक सुंदर पदार्थ होता तो. 

गेल्या शुक्रवारी असाच अजून एक पदार्थ बनला होता. आधी मला विचारून झालं "घरात कॉर्नफ्लोर" आहे न? म्हणून. संध्याकाळी आले तर चीझ बॉल्स तयार होते. चीझ किसून त्यात आलं, लसूण, मिरचीची पेस्ट मिसळली होती, ते हलक्या हाताने वळून कॉर्नफ्लोर च्या पेस्ट मध्ये बुडवून घेतले आणि नंतर  ब्रेडक्रम्स वर घोळवून तळले होते.  इतके मस्त लागत होते ते! पण पहिला खाऊनच लक्षात आले एकंदरीतच हा पदार्थ खूप हेवी आहे. मग मला कळले कि ४ अमूल च्या चीझ क्युब्स चे फक्त ८ बॉल्स बनले आणि तरी माझ्या साठी चक्क ३ कसे  उरले होते ते. पण खायची आणि करून खिलवायची आवड निर्माण होते आहे हीच माझ्या साठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

(हे पदार्थ तिने बनवल्याचा आनंदात मी नेहमीप्रमाणे कॅमेरा हाती घ्यायला विसरलेच)

Wednesday, May 29, 2013

स्वच्छतेचे धडे … कोण शिकणार कोण शिकवणार?


फ्रेशरूम मधील डस्टबीन जे नेहमी  पायाने उघडले जाते, त्याच्यात बिघाड आहे, आता ते पायाने उघडत नाही, तर तुम्ही त्यात वापरलेले  टिश्यू पेपर कसे टाकाल?  उत्तरे - 
-हाताने डस्ट बीन चे झाकण हाताने उघडून 
-डस्टबीन च्या बाहेर कुठेही 
-आता डस्टबीन उघडतच नाही पायाने, तर टाकून देऊ  वाशबेसिन मध्ये 
-फ्रेश रूम स्वछ ठेवणे ही आपली जबाबदारी नाही, त्यामुळे काहीही करा 

हा न एका अभ्यासक्रमातला प्रश्न असायला हवा, आणि हा एकच प्रश्न नाही तर यासारखे असे अनेक …. आणि बालभारती किंवा सामान्य विज्ञान हे विषय शिकावायच्याही आधी हा विषय सर्व लहान मुला मुलींकडून घोटून घ्यावयास हवा. वर वर्णन केलेले उदाहरण गेले काही दिवस मी रोज पाहते आहे. शेवटी परवा एका मुलीला जी असेच टिश्यू पेपर जमिनीवर टाकून चालली होती तिला मी टोकले, पण मला माहित आहे असे वागणारी ती एकटी नाही. आसपास नुसते साक्षर भरलेत, सुशिक्षित कमीच. 

पाण्याचा वाहता नळ व्यवस्थित बंद करण्याचे कष्ट न घेणे, वाटेल तसे आणि वाटेल तितके टिश्यू पेपर वापरणे, अनेकींच्या पर्स मध्ये रुमाल वगैरे काहीच नसावे? बेसिन जवळ उभे राहून, केस सारखे करतांना, गळलेले केस तसेच सोडून जावे …. अशा एक न दोन अनेक गोष्टी. एका वाक्यात सांगायचे झाले तर "Toilet Etiquettes" शिकवलेलेच नाहीत यांना कोणी. बर पूर्वी कोणी शिकवले नाहीत तर आता समाजात वावरताना काही बघून, समजून घेवून काही चार चांगल्या गोष्टी शिकाल की नाही? अनेकदा मला या लोकांना एक प्रश्न विचारावा वाटतो "तुम्ही तुमच्या घरी असेच वागता का?" या प्रश्नांचे उत्तर जर हो असे असेल तर मग मात्र कठीण आहे. मग मात्र वयाच्या ३/४ वर्षीच एका अशा सक्तीच्या अभ्यासक्रमाची गरज आहे, जो पूर्ण केल्याखेरीज कोणत्याही शाळेत प्रवेश मिळणार नाही. 

मध्ये एक दिवस रात्री उशिरापर्यंत ऑफिस मधे होते, फ्रेश रूम मध्ये शिरले आणि तशीच उलट्या पावली परत फिरले कारण कोणाच्या तरी उलटी ने भरलेले वाशबेसीन तसेच होते. एवढेच नव्हे तर त्याचा दर्प तेथे भरून राहिला होता, अजून २ सेकंदभर तेथे असते तर मलाच मळ्मळायला लागले असते. हे लिहिताना सुद्धा मला इतकी किळस वाटते आहे, तर जिला कोणाला हे साफ करावे लागले तिचे काय? ते बेसिन तसेच सोडून जाताना त्या मुलीला/स्त्रीला काहीच कसे वाटले नाही? पण हे कोणी लक्षातच घेत नाही. 

अशा ठिकाणी स्वच्छतेसाठी अनेक स्त्रिया काम करत असतात, पण त्याही माणूसच आहेत ना? का नाही आपण माणसांना माणसांप्रमाणे योग्य त्या मानाने वागवू शकत? का असे सर्वत्र पडलेले टिश्यू, केस त्या स्त्रियांनी गोळा करून डस्टबीन मध्ये टाकायचे? का अशा रितीने खराब केलेले बेसिन कोणी दुसरीने स्वछ करायचे? मला बाकी इंडस्ट्री जसे की मन्युफ़्रक्चरिङ्ग किंवा बँकिंग या बद्दल फार माहित नाही, पण माझ्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्या जणी किमान कॉम्प्युटर ग्राज्युएट किंवा  इंजिनीअर असतात ना? मग तरीही असे ? पुस्तकी शिक्षण आपल्याला योग्य तऱ्हेने जर जगायला शिकवणार नसेल तर मग काय उपयोग? अनेकदा आपण समाजाच्या निम्न स्तरातील अस्वच्छता या बद्दल तावातावाने बोलतो, अशा लोकांमुळे आपले शहर किती बकाल होत चालले आहे यावर बऱ्याचदा आपले एकमत असते, पण आपल्यातल्याच या लोकांचे काय करायचे?

एक स्त्री म्हणून मी या गोष्टी वारंवार पहाते, म्हणून त्याच सांगू शकते, पण याचा अर्थ बाकी सर्वत्र सर्व ठीक आहे असे नाही … कारण तसे असते तर अनेक वर्षांपूर्वी Infosys च्या एका induction मध्ये तेंव्हाचा FLM राहुल देव ला, नवीन joinees ना "don't spit out chewing gums in urinals, as it gets sticked there and a person cleaning it, needs to remove it with his hands, please try to respect those people who keep this World class campus beautiful"  असे सांगावे लागले होते यातच सर्व काही आले नाही?

Monday, May 20, 2013

छोटी छोटीसी बात …

खरंतर यापूर्वीच कधीतरी भाज्या आणि त्या आणायला मी किती आवडीने जाते हे लिहून झालंय …… पण तरीही काहीतरी उरतेच. अनेकांना मंडईत जाणे म्हणजे आपल्याच डोक्याची मंडई झाल्यासारखे वाटते.
माझी एक मैत्रीण तिथे शिरताच जी शिंकायला सुरुवात करते ती थेट बाहेर पडेपर्यंत…. त्यामुळे कधी एकदा भाजी घेते आणि इथून बाहेर पडते असे तिला होवून जाते. माझ्या नवरयाला भाजी मंडई म्हणजे तिथे पडलेली घाण, कचरा एवढेच नजरेसमोर येत असावे, त्यामुळे तो शक्य तेवढी टाळाटाळ करत असतो. परवा माझ्या एका नवीन लग्न झालेल्या मित्राला, बायकोने भाजी आणायला पाठवले, हा बाबा घेऊन आला "पालक, शेपू, मेथी, राजगिरा, अळू ,मुळा ……. अशा सगळ्या पालेभाज्या, त्या पण २/२ गड्ड्या प्रत्येकी" बिचारी पुन्हा कधी त्याला भाजी घेऊन ये म्हणणार नाही कदाचित!

पण माझे असे नाही, माझ्यासाठी तो एक आनंदाचा भाग आहे. भाजी आणायला जायचे म्हणजे, माझ्या डोळ्यासमोर येतात त्या ताज्या हिरव्यागार भाज्या फक्त, तळात कोबीची पाने किंवा केळीची पाने टोपलीत छानशा रचून ठेवलेल्या भाज्या, हिरव्या रांगोळीत रंग भरावेत तशी मधेच कोठे लिंबाचा, मधेच लाल भोपळा तर कुठे टोमाटो, तर कुठे लाल सिमला मिरची. भरताची कधी पंढरी वांगी तर कधी जांभळी वांगी, मुळा हि रंगांची उधळण अजूनच वाढवतात. हिरव्यात तरी किती छटा असाव्यात …… मटारचा हिरवा वेगळा, वाल पापडीचा अजून वेगळा, तर भेंडी काळ्या रंगाला जवळ करणारा, गवार, पडवळ यांचा वेगळाच! तेथे जाणवणारा प्रत्येक भाजीचा आपला एक दरवळ. लिम्बांपाशी वेगळा ताजा असा, आले, लसूण, मिरच्या यांजवळ एक तिखटसा, पालेभाज्यांजवळ एक वेगळाच असा मातीच्या जवळचा……

अनेक वर्षे अशा रितीने तिथे जाऊन अनेक भाजीवाल्या माझ्या चांगल्याच ओळखीच्या झालेल्या आहेत. "ताई, आज ही भाजी घेवून जाच किंवा आज ही नेऊ नका" असं त्यांनी सांगण्या इतक्या. अशीच एकजण होती. अगदी बोलघेवडी अशी. मंडईत शिरल्या शिरल्या पहिल्या २/३ गाळ्यातच ती भाजी घेऊन बसत असे. आपण समोर गेलो की आधी एक मोठ्ठं हसू. आणि मग आमच्यात संवादरुपी लटकी चकमक घडे.

मी: कोबी कसा दिला ताई?
ती: ४० रुपये किलो.
मी: आणि वांगी? गवार
ती: तीस रुपये किलो, गवार  ६०
मी: लोकांनी काय भाज्या खाऊच नयेत का? इतक्या महाग भाज्या असतील तर?
ती: महाग कुठे देते? चांगलं खावं, प्यावं, सारखा पैशाचा विचार करू नये.
मी: अर्धा किलो कोबी, दीड पाव वांगी द्या.
ती: आणि काकडी गाजर नको? बर ताई एक बोलायचं आहे तुमच्याशी.....
मी: काय?
ती: मोठ्या मुलाचं कॉलेज नुकतंच संपलय, तुमच्या ऑफिसमध्ये नोकरीला लाऊन घ्या न.....

एकीकडे हे बोलत तिने आपल्या मनानेच माझी भाजीची पिशवी तयार केलेली असते.

मी: काय शिकलाय? काय आवडतं त्याला? हा माझा फोन नंबर त्याला फोन करायला सांगा, मी बघते.
ती: साहेब येत नाहीत आजकाल?
मी: माझी मीच येते गाडी घेऊन.
ती: तुम्ही गाडी घेतली नवीन?
मी: नाही, जुनीच आहे, शनिवार, रविवार साहेब माझ्यासाठी ठेवतात गाडी.

नंतर काही दिवसांनी मंडईतल्या सगळ्या भाजी वाल्यांचे गाळे बदलले गेले. ही अगदी लांब गेली. पण गाडी पार्क करून आत शिरण्याचा माझा रस्ता तोच राहिला. तिच्या गाळ्यापाशी पोहचेपर्यंत माझी जवळपास सगळी भाजी घेऊन होत असे. तिच्याशी थोडे बोलून जावे म्हणून थांबले तर....

ती:  या! सगळी मंडई पिशव्या भरून भरून घेऊन यायचे, इथे काही घ्यायचे नाही! शोभतं का ताई तुम्हाला हे?
मी:  जागा तुम्ही बदलली आणि नावं मला ठेवा. एखादी भाजी इथून घ्यायची म्हणून आधी नाही घेतली, आणि तुझ्याकडे पण नसली तर, मला त्रास ना पुन्हा मागे जाऊन आणण्याचा?
ती:  तरी मटार न्याच आता, स्वस्त दिला ६० रुपये किलो. किती देऊ, २ किलो करू का?
मी:  नको, आता खूप भाजी घेऊन झालीये, एवढ्या भाजीचे निवडणे होणार नाही आज मला.. दोन         दिवसाच्या सुट्टीत किती कामे संपवायची मी?
ती:  मी निवडून ठेवू का? संध्याकाळी येऊन घेवून जाल का?
मी:  असं करा ना उसळच करून पाठवा घरी!
तोपर्यंत किलोभर मटार बाईने पिशवीत भरलेला असतो वर काकडी, टोमाटो.
मी: येवढे नको.
ती: खाता का नुसतंच त्याकडे बघून पोट भरता? मी पैसे मागितले का?
मी: अहो ताई, प्रश्न पैशांचा नाही, घरी इन मीन अडीच माणसे एवढी जास्त भाजी संपत नाही, इथे रुपया दोन रुपयांसाठी घासाघीस करायची आणि नंतर वाया घालवायची हे पटत नाही म्हणून.
ती: जिवाला खा जरा! एवढं काम करून पैसे मिळवता आणि खात का नाही? बघा आजकाल चेहरा कसा उतरून गेलाय तुमचा.
मी: हो गं बाई, तुझ्याकडची भाजी येत नाही न माझ्या घरी, त्यामुळे काही अंगीच लागत नाही बघ!

असाच अजून एक भाजीवाला आहे. दिवसा सरकारी नोकरी करतो. शेती करतो आणि संध्याकाळी भाजी मंडईत असतो. तो विकतो त्यापैकी बऱ्याच भाज्या त्याच्या घरच्या असतात. त्यामूळे कोथिंबीर घेतली की न्या घरचा आहे म्हणत पुदिना, कढीपत्ता पिशवीत जाऊन बसतोच. तिथेही, "साहेब नाही आले बरेच दिवसात, आजकाल धाकट्या ताईपण येत नाहीत तुमच्या संग" ही चौकशी होतेच. एकदा नवीन गाडी घेऊन भाजी आणायला गेले तर दोघांनीही विचारले "ताई पेढे नाही आणलेत?" आणायला पाहीजे होते असे प्रकर्षाने वाटून गेले…

चार शब्द प्रेमाने बोलायला कोणालाच पैसे पडत नाहीत. पण कधी कधी हेच लोकांना कळत नाही. आणि मग लोकं आयुष्यातले लहानसे आनंदाचे ठेवे हरवून बसतात.

Wednesday, March 20, 2013

“आपण करायचं का हे? काय वाटतं सगळ्यांना?” -लोकबिरादरी

“आपण करायचं का हे? काय वाटतं सगळ्यांना?” अशी या सगळ्याची सुरुवात झाली.

लहान लहान मुलं. स्कूलबसच्या हॉर्नच्या आवाजावर सोसायटीच्या पेव्हमेंटवर आपली नाजूक पावलं दुडदुडत टाकत आपल्या कार्टूनच्या सॅक्स सांभाळत त्या दिशेने धावणारी मुलं आणि पाठीमागे त्यांचे उरलेलं सामान घेऊन धावणार्‍या मम्मीज. किती सुरेख चित्र आहे नं. पण सगळ्याच गोंडस मुलांच्या नशिबी असं चित्र असतेच असं नाही. कित्येक मुलांना शाळा म्हणजे काय आणि तिथे का जायचं असतं हेच माहित नसतं. आम्ही नाही का न शिकता जगलो, तसंच आमची मुलं जगतील अशाच समजुतीत त्यांचे पालक. पण हेच चित्र बदलण्यासाठी काही मंडळी मनापासून झटतायेत, नव्हे आपलं सगळं आयुष्य त्यांनी तिथे समर्पित केलंय. असेच एक कुटुंब म्हणजे आमटे परिवार. आता याबद्दल आम्ही काही सांगायला नकोच. बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्यापासून सुरु केलेले व्रत प्रकाशकाका, मंदाताई यांच्यासह तुमच्या आमच्या पिढीचे अनिकेतदादा पुढे चालवत आहेत. हर्क्युलसला पृथ्वी तोलताना कमी कष्ट झाले असतील, एवढ्या अडचणी या मंडळी आदिवासी जनतेच्या पुनुरुत्थानासाठी सोसत आहेत. त्यांची ध्येयासक्ती अमर्यादित आहे. त्याच प्रेरणेतून साकार झालेला लोकबिरादरी प्रकल्प. आदिवासी जनतेसाठी दवाखाना, शाळा, वन्य प्राणी अनाथालय असे अनेक लोकोपयोगी उपक्रम या परिवाराच्या पुढाकाराने सुरु केले आहेत.


त्यातलाच एक म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा. प्रकाशकाका आणि मंदाकाकींची मुलंही याच शाळेत आदिवासी मुलांसोबतच शिकली. या शाळेला दरवर्षी होणारा (रिकरिंग) खर्च म्हणजे शाळेचे युनिफॉर्म्स. प्रत्यक्ष अनिकेत आमटेंचा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पाठवलेला आलेला हा इमेलच त्यांची गरज सांगून देतो.



नमस्कार

इमेल बद्दल आभारी आहे .

रंग महत्वाचे नाहीत. उत्तम दर्जाचे व टिकावू नवीन कपडे हवेत.

२ ते २० वयोगटातील प्रत्येकी २० ड्रेस हवेत.



आता आपण वेगवेगळे पाठवणे म्हणजे वेगवेगळे रंग आणि मापं, शिवाय थोडे महागही पडणार. म्हणूनच आमच्या ब्लॉगर्स मित्रांनी मिळून एकत्र काही तरी करायचे ठरवले आहे. प्रत्येक वयोगटासाठी २०-२५ जोड याप्रमाणे इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या मुलांसाठी कपडे पाठवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी येणार्‍या खर्चाचा तक्ता खालीलप्रमाणे आहे.

FINAL Quotation for HEMALKASA UNIFORMS


AT LOKBIRADARI PRAKALP

Standard Boys(25)              Girls(25)

SHISHU 290                        370

I 320                                    370

II 320                                  380

III 340                                400

IV 360                               420

V 380                                440

VI 420                              460

VII 430                             480

VIII 450                            500

IX 550                              465

X 575                               475

XI 575                              485

XII 575                            495

     5585                           5740

5585+5740=11325



BOYS 25 X 5585/- = 1,39,625/-

GIRLS 25 X 5740/- = 1,43,500/-



GRAND TOTAL = 2,83,125/-

ADD = Transportation costs

Weight about 100 to 115 kgs.

आपल्याला काय करता येईल?
आमच्या प्रामाणिक हेतूबद्दल खात्री असेल तर आपला खारीचा वाटा उचलता येईलच. अर्थातच हिशोबात पूर्णपणे पारदर्शकता असणारच आहे. आपली एकत्रित मदत हेमलकसाला पोचली की सगळा हिशोब ईमेलवर मिळेल. आपली मदतीची इच्छा असेल तर कृपया या लिंकवर जाऊन आपले डिटेल्स भरा.



https://docs.google.com/forms/d/1uk0BrxZC2TqWIF9kJUrs2H3UcTNMoIQj2zPW4cQg_cc/viewform



आपणांस हवी असेल तर आपण डायरेक्टली त्यांनाही आपली मदत पाठवू शकता. परंतु थेंबाथेंबाने पोचणार्‍या मदतीपेक्षा तेच थेंब एकत्र करुन किमान घोटभर का होईना आपण मदत पोचवू शकू ना? म्हणूनच हा प्रपंच !



टीप: आपण वस्तुरुपाने मदत पाठवत असल्याने आयकरात सवलत मिळेल अशी पावती मिळणे शक्य आहे असे मला वाटत नाही. तसा टॅक्स बेनेफिट हवा असेल तर थेट लोकबिरादरीच्या साईटवर डिटेल्स आहेत तिथे मदत पाठवावी. त्याचाही लोकबिरादरीला फायदाच होईल.



http://lokbiradariprakalp.org/getting-involved/donate/
-

साभार - पंकज झरेकर, देवेंद्र चुरी



Saturday, February 16, 2013

समवेदना


"समवेदना"

ते २००३ साल होते. एका अस्वस्थ काळातून मी जात होते. पहिल्यांदाच आयुष्यात मला कोणत्या तरी अशा आधाराची गरज वाटत होती, कि जी नुसतीच मला त्यातून बाहेर काढेल नव्हे तर माझे मनोबल टिकवून देखील ठेवेल. सर्वकाही कोणावर तरी सोपवावे आणि त्याने आपल्याला सावरावे असे कोणीतरी.  त्या वेळी देवावर नेहमीपेक्षा जास्त (कारण मुळात मी सश्रद्ध आहे )विश्वास ठेवावा असे कुठेतरी वाटू लागले होते. आणि त्यानुसार मी, सोळा सोमवारचे उपास सुरु करून त्या भोळ्या सांबावर  सारा माझा भार सोपवून निर्धास्त झाले. जसजसे दिवस सरत होते तसतसे माझे मनोबलही वाढत होते. उपास तर केले आहेत, मग आता बाकी सर्वजण करतात तशीच आपणही याची सांगता करावी की आपल्या मनाचे ऐकावे हा विचार वारंवार मनात डोकावत होता. शेवटी कौल मनाचाच लागला. कारण माझ्यासारख्याच खावून पिऊन सुखी कुटुंबातील अनेकदा नात्यागोत्याच्याच १६/१७ जोडप्यांना बोलवायचे, गोडधोड जेवू घालायचे,दक्षिणा द्यायची......पण हे का करायचे? लोकांना मी नक्की कशाचे प्रदर्शन करायचे, मी किती उत्तम स्वयंपाक करू शकते, किती खर्च करू शकते, किती भारी वस्तू, साड्या मी दक्षिणा म्हणून देवू शकते, याचे????????  त्याने काय होते? माझ्या जवळच्या व्यक्तीना तर सारे माहीतच आहे आणि बाकीच्यांना हे नाही कळले तर काय बिघडते???

त्यापेक्षा व्रताची सांगता करायच्या दिवशी मी नेहमीसारखी मनापासून पूजा करेन, एखादे असे मेहूण ज्यांना माझ्याबद्दल आत्मीयता वाटते, मी ज्या अवघड काळातून गेले होते त्याची त्यांना कल्पना आहे अशा कोणालातरी बोलावेन आणि बाकी सारी रक्कम मी एखाद्या योग्य अशा संस्थेला देईन. याने देव पावला तर ठीक नाहीतर त्याची मर्जी. मुळात माझ्या दृष्टीने "देवाणघेवाणीचे" हिशोब ठेवतो तो "देव" कसा????

असे विचार मनात घोळत असतानाच "साप्ताहिक सकाळ" मध्ये समवेदना च्या नुकत्याच सुरु झालेल्या कामाबद्दल माहिती आली होती. डॉ. चारुदत्त आपटे यांचे नाव मी पूर्वी ऐकून होते.पुण्यात लहानाची मोठी झालेली असल्यामुळे "त्यांच्या वडिलांच्या "विद्यार्थी सहाय्यक समिती" बद्दल ही माहिती होतीच. माझी काकू सौ.केतकर हि त्यांची पेशंट होती. त्यानंतर एकदा माझ्या भावाला त्यांच्याकडे न्यावे लागले होते. तेंव्हा मी नाही पण माझा नवरा त्याला त्यांच्याकडे घेऊन गेला होता. नंतर  परत आल्यावर जे वर्णन त्याने केले, ज्या पद्धतीने त्यांनी माझ्या भावाला अश्वस्त केले होते त्यावरून एक चांगली प्रतिमा त्यांची माझ्या डोक्यात होतीच. त्यामुळे हीच संस्था नक्की झाली. त्यावेळी "समवेदना" नुकतेच लावलेले लहानसे रोपटे होते. हर्डीकर हॉस्पिटलच्या एका मजल्यावर एका लहानशा खोलीत तिचा कारभार चाले. ठरवल्याप्रमाणे एकदा त्या रकमेचा चेक देऊन आल्यावर माझे काम संपले होते. 

काही महिन्यांनंतर माझ्या नावे  एक टपाल आले समवेदना कडून....काय असेल असा विचार करत ते उघडून पाहते तो आत एका पेशंटच्या डिस्चार्ज पेपरची प्रत आणि सोबत  त्याच पेशंटला का मदत केली गेली याची माहिती आणि त्याच्यावर केल्या गेलेल्या एकूण खर्चाचा भर कोणी आणि किती उचलला त्याचीही माहिती. त्या मोठ्या खर्चात माझी रक्कम खरतर फार लहानशी होती आणि तरीही त्यांनी मला हि सर्व माहिती पाठवणे उचित समजले होते. इतक्या पारदर्शक कारभाराची मी अपेक्षाच नव्हती केली. समवेदनच्या या कृतीने मीच भारावून गेले होते. "आपटे" या नावावर टाकलेला विश्वास नक्कीच खूप सार्थ होता याची खात्री पटली. याच ओघात मी अजून एक लहानशी रक्कम "समवेदना" च्या कार्यालयात पोचती करून आले. ही अशी लहानशी मदत दरवर्षी करावीच असे काही ठरले नव्हते. पण नंतरच्या प्रत्येक वर्षी श्री. सुनील हिंगणे दरवर्षी आठवणीने साधारण जानेवारी महिन्यात आधी फोन करून येऊ लागले, त्यांच्या येण्यापुर्वीच मागील वर्षातील दिलेल्या रकमेचा विनियोग कसा केला याची संपूर्ण माहिती पोस्टाने घरी आलेली असेच. श्री. हिंगणे सोबत वार्षिक अहवाल घेवून येत असत...नंतर नंतर प्रीती दामले यांच्याशी संपर्क वाढू  लागला. मधेच कधीतरी समवेदनाच्या कार्यालयातून शरयूचा दर महिन्याच्या एका गुरुवारी होणाऱ्या मीटिंगला येऊ शकाल का असा फोन येऊ लागला.त्यामुळे समवेदनच्या कामाची व्याप्ती कशी वाढते आहे याचा अंदाज येऊ लागला होता. नुसतीच गरजू रुग्णांना मदत नव्हे तर आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील स्त्रीयांसाठी कर्करोग तसेच स्त्रीरोग तपासणी उपक्रम, आणि आता पुण्यातील पहिली "त्वचा पेढी".

आपल्या ऑफिस मधून होणाऱ्या "CSR" मध्ये तर आपण अनेकदा सामील होतच असतो. पण तेवढेच या देशात, आपल्या समाजासाठी पुरेसे आहे असे मला वाटत नाही. प्रत्येक सुजाण नागरिकाने, आपला चिमुकला हिस्सा वैयक्तिक स्तरावर उचलून कोणत्या न कोणत्या स्वरूपाचे योगदान दिले तर खूप मोठे बदल इथे दिसून येतील हे नक्की. आपल्यापैकी प्रत्येकाला खूप मनापासून विनंती की "समवेदना" ची खालील माहिती एकदातरी जरूर वाचा.

समवेदना- 
  • गरीब व गरजू रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक मदत. 
  • सह्याद्री हॉस्पिटलच्या सर्व शाखांमधून सेवा उपलब्ध.
  • सह्याद्री हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांची सेवा याकरिता पूर्णपणे विनामुल्य.
  • सह्याद्री हॉस्पिटलकडून उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात सवलत.
  • देणगीदारांना त्याच्या निधीच्या विनियोगाची तपशीलवार माहिती पाठवली जाते.
  • सोबतच अशा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देण्याचे कामही ही संस्था करत असते, त्याकरिता कोणतेही मानधन आकारले जात नाही. 
  • निम्न आर्थिक स्तरातील महिलांसाठी मोफत कर्करोग पूर्वनिदान तपासणी उपक्रम, व  गरज पडल्यास उपचारदेखील.
  • ग्रामीण भागातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीरे.
  • गेल्या वर्षी समवेदनेने १२५ गरजू रुग्णांसाठी जवळपास १ कोटीच्या मदतीचा टप्पा गाठला.
  • फेब्रुवारी २०१२ मध्ये पुण्यातील पहिल्या "त्वचा बँक" या उपक्रमास सुरुवात झाली. मृत्युपश्चात "त्वचादान" या सर्वसामान्यपणे माहित नसलेल्या संकल्पनेचा प्रसार आणि प्रचार करण्याची जबाबदारी या संस्थेने घेतली आहे.

आपल्यापैकी कोणासही या कार्यास आपला हातभार लावावा असे वाटल्यास, समवेदनामध्ये आपले स्वागत आहे. देणगी स्वरूपात मदतीची आपल्याला जर इच्छा असेल तर त्यासाठीचा तपशील खालीलप्रमाणे.
Union Bank of india, karve road branch,
S/b Account No. 37000201090 2648 for indian passport holders 
Account No. 37000201090 0967 for foreign passport holders.
IFSC Code UBIN0537004


दरवर्षीच्या एका लहानशा रकमेच्या धाग्याने माझ्यात आणि या संस्थेत एक घट्ट धागा विणला गेला. असा धागा की पुढे मागे जर नोकरी सोडून मी एखाद्या सामाजिक कार्यास वाहून घ्यायचे ठरवले तर हीच ती संस्था असेल.....असे मनोमन ठरवले जाण्याइतका. "एकही गरीब व गरजू रुग्ण निव्वळ आर्थिक पाठबळ नाही म्हणून परत जाऊ नये" हे ध्येय समोर ठेऊन अखंडपणे गेली १० वर्षे "समवेदना" ज्या रीतीने कार्यरत आहे, त्या कळकळ, त्या प्रेरणेला मनापासून सलाम!

Saturday, February 9, 2013

एक धडा.............


दिवसाकाठी अनेक गोष्टी घडत असतात, त्या अनुभवतानाच या शब्दबद्ध कशा रीतीने करायच्या याचाही मनात विचार सुरू असतो. त्याप्रमाणे अनेकदा रात्री घरी आल्यावर मी लॅपटॉप उघडून बसते देखील, पण त्याच वेळी मनात लिहावे-नलिहावे याचे द्वंद्व सुरू असते. सद्ध्या तरी रोज "न लिहावे" याच बाजूने निकाल लागतोय. काय म्हणावे यास...आपल्याच कोषात जाणे? किती दिवस चालणार हे असे? डिसेंबर मधे मी एक गोष्ट लिहायचा प्रयत्न केला, त्याचे पुढचे २ भागही एका दमात तेंव्हा लिहिले गेले होते, पण  ते पोस्ट करण्याची इच्छाच जणू मरून गेली. अनेक दिवसांत मी माझ्या स्वत:च्या "मी....माझे....मला" कडे बघितलेदेखील नाहीये. माझ्या बाकी सार्‍या ब्लॉग मित्र मैत्रीणींच्या ब्लॉगवर मी अधून मधून डोकवते देखील ... पण लिहीत मात्र नाहीये.

तशा मी रोजच्या रुटीनच्या बाकी सगळ्या गोष्टी करते, घराकडे लक्ष देते, नवरा लेकीशी गप्पा होतात, ऑफीसला जाते, जिमला जाते, चांगली गाणी ऐकते, गप्पा मारते, सभोवताली घडणार्‍या गोष्टींवर बोलते ही, मान्य की चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींचं प्रमाण जास्त असते. रात्री घरी येऊन ठराविक कार्यक्रम टी.व्ही. वर पाहते, स्वत:बरोबर अनेक कडवट घटना नेहमीप्रमाणेच "जाऊ दे ना" म्हणत मागे टाकते. पण लिहीत मात्र नाहीये.

आज मी एक धडा शिकले. तो मात्र मी लिहिलाच पाहिजे. आपण नेहमी म्हणतो "गोष्टी वेळच्या वेळी कराव्यात" ....याच बाबतीतला एक धडा मी आज शिकलीय... आणि सकाळपासून तो माझ्या मनात घर करून आहे. आज मी गेले होते सकाळी एका गाण्याच्या वर्गाच्या एका कार्यक्रमाला. माझी लेक या क्लासला जाते. गेले काही दिवस त्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती.

कॉलेजला असताना माझ्या एका मैत्रीणीची बहीण होती, जी तेंव्हा संगीत घेऊन बी.ए. करत होती. अधूनमधून आम्ही भेटत असू, तिचं गाणं ही कधीतरी ऐकत असू. नंतर ती गाण्याचे कार्यक्रम करू लागली. अशाच कार्यक्रमांचे निवेदन उत्तम रीतीने करणार्‍या एका उमद्या तरुणाशी ओळख आणि नंतर प्रेमविवाह ही झाला. मधली काही वर्षे मी इथे नव्हते, काही वर्षांनी जेंव्हा परत आले, तेंव्हा या जोडीचे या शहरात चांगलेच नाव झालेले होते, एक दोन वेळा आमची भेट झाली देखील. संस्कृती लहान असताना जेंव्हा तिला गाणे शिकवायचा विचार आला तेंव्हा हिचेच नाव समोर आले, आणि त्याप्रमाणे संस्कृती तिच्याकडे गाणे शिकू लागली. त्या निमित्ताने आम्ही अधून मधून भेटू लागलो. पण पुन्हा काही कारणानी संस्कृतीचे गाणे थांबले, आणि आमच्या भेटीही.

सात आठ वर्षे मधे अशीच गेली. अजून एका मैत्रीणीच्या बोलण्यातून हिची खुशाली कळे. गेल्यावर्षी एप्रिलमधे एकदा दुपारी मैत्रीणीचा फोन आला "अनघा, "XXX"च्या मिस्टारांचा अपघात झालाय, आय.सी.यू.मधे आहेत ते" हे ऐकून थोडे सुन्न व्हायला झाले. नंतर थोड्याच वेळात भावाचा फोन आला, हीच बातमी सांगणारा. नंतरचे ३/४ दिवस या बद्दल मैत्रीण आणि भावाकडून त्यांच्या खालावत जाणार्‍या तब्येती बाबत. एक दिवस त्यांच्या जाण्याची बातमी आलीच. मैत्रीण आणि माझा भाऊ तिथेच होते. माझा आणि तिचा भाऊ हे गेली अनेक वर्ष चांगले मित्र आहेत. एकदा मनात विचार आला होता, तिला भेटायला जाण्याचा. पण का कोण जाणे तो मी टाळला, बरेच वर्ष काही संपर्क नसताना अशा प्रसंगी जाऊन काय बोलायचे. कोणाच्या शब्दांनी हलके व्हावे इतके लहानसे दु:ख नव्हते तिचे. चाळिशीत जोडीदार अचानक सोडून जातो, मागे त्याचे आई वडील, आपण आणि आपला मुलगा ठेवून ....तेंव्हा ते दु:ख काय असते हे मी माझ्या लहानपणी अनुभवलय. त्या नंतर काही दिवसांनी तिने गाण्याचे वर्ग पुन्हा सुरू केलेले पण मैत्रीणी कडून कळले. वाटले "बरे झाले, आता सावरेल थोडी." नंतर एकदा संस्कृतीने पुन्हा गाण्याचा विषय काढला आणि मी तिला फोन केला. तिच्याशी बोलले. दर्शनी तरी आता गाडी सावरलीये असे वाटून गेले. मध्यंतरी एकदा संस्कृतीला  मी मला गाणे शिकायचेय असे सांगितले, तिने तिच्या या ताईला सांगितले, निरोप आला "आईला म्हणावे, ये शनिवारी" मी म्हणाले "एवढे एक सर्टीफिकेशन आणि त्याची परीक्षा झाली की मग जायला लागेन"

आज सकाळी कार्यक्रमाच्या जागी पोहचले. आत शिरताच ती पुढे आली, आम्ही बोलू लागलो, आणि नकळत मला भरून येऊ लागले. स्वत:ला बर्‍यापैकी सावरत मी तिच्याशी बोलले. नंतर खुर्चीत जाऊन बसले आणि मग मात्र मी स्वत:ला थांबवू शकले नाही. तिच्या जोडीदाराच्या जाण्यानंतर तिने आयोजित केलेला हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. त्याना श्रद्धांजली वाहिली गेली. कार्यक्रमाला सुरूवात झाली, आणि निवेदन करणार होता तिचा ११/१२ वर्षांचा सुपुत्र. थोडाफार त्यांच्याच स्टाईलने त्याने काहीकाळ निवेदनाची धूरा छानपैकी सांभाळली. पण माझे मात्र डोळे सुरुवातीचा थोडावेळ भरून वहात राहीले.

एकीकडे ती ज्या पद्धतीने या प्रसंगातून धीराने बाहेर येते आहे, स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाला सावरते आहे, संभाळते आहे, लेकाला त्याच्या बाबांच्या मार्गावरून पुढे नेते आहे, कदाचित त्याच्या बाबांचेपण हेच स्वप्न असेल, हे बघून मला तिचे खूप कौतुक वाटत राहीले. त्या बरोबरच एकटीने हे सारे करण्याची वेळ नियतीने तिच्यावर आणली याचे वाईटही.
आणि धडा हा की "गोष्टी वेळच्या वेळी कराव्यात". त्या क्षणी तिला सावरण्यास अनेक हात तिच्यापाशी होते, माझ्या तिला भेटायला जाण्याने तिला काही फरक पडला असता, नसता, माहीत नाही. मला मात्र नक्कीच पडला असता. माझ्या भावनांचा योग्यवेळी निचरा झाला असता, आमच्या ओळखीतून जे बंध निर्माण झाले होते त्यासाठी तरी मी तिला भेटायला जायला हवे होते. ती तिची नाही तरी गरज माझी होती. ती जर मी वेळीच ओळखली असती असे अवेळीच डोळे भरून येण्याची वेळ माझ्यावर आली नसती.

Saturday, December 22, 2012

या वळणावर ......


कातरवेळा.... आदित्य अस्वस्थ. तरीही बाहेर पडलेला,उंचापुरा आदित्य, स्मार्ट, बारीक काड्यांचा चष्मा डोळ्यांवर, अंगात जीन्स आणि पांढरा  शर्ट. रस्ता फुटेल तसं चालत राहावं, बरोबर फक्त मोबाईल घेतलेला. गाणी ऐकत चालत राहावे हरवलेले काहीतरी पुन्हा परत मिळते का ते बघत. मोबाईलच्या कॉर्डचे एक टोक कानात, दुसरे मोबाईलशी जोडलेले आणि मधे हा सारा गुंता.  तो मनात म्हणतो "अगदी आपल्या दोघांची अशीच अवस्था आहे बघ.  दोन टोकांना आपण दोघे, आणि मध्ये हे सारे आपल्या प्रेमाचे, आठवणींचे, सुख-दु:खाचे हे सारे गुंते."
 
एकंदरीतच हा गुंता सोडवणे अवघड आहे. असा विचार करून  तो  गाणे सुरु करतो.........."रंजिश ही सही....दिल ही दुखानेके लिये आ...." का माझ्या प्ले-लिस्ट वर हीच गझल सर्वात पहिली लागते? पहिल्यांदा ऐकताच या गाण्याच्या प्रेमातच का पडायला झालं होतं? जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेंव्हा आपली भेट झाली नव्हती. म्हणजे तुझ्या भेटीपूर्वीच मी या गाण्याच्या प्रेमात होतो.  पण "दिल ही दुखाने के लिये आ" हे मागणे मी कधी मागितले नाही, तरी हेच का?" 
 
मनात आलेली गोष्ट मिळाली नाही असे कधी होते हेच त्याला  जिथे माहित नव्हते, तिथे इतक्या खोलवर पोहोचणाऱ्या दु:खाची कल्पना केवळ अशक्य. पण हे गाणे कुठेतरी खोलवर जाऊन रुतलेले. अशा अचानक भेटलेल्या, अचानक गवसलेल्या गोष्टी तुमचे आयुष्य बघता बघता बदलून टाकतात नाही? या गाण्यानंतर तो  मेहंदी हस्सन, बेगम अख्तर, गुलाम अली, जगजीत-चित्रा यांचा दिवाना होत गेला.  दु:ख वेड  लावते म्हणतात ते कसे ते त्याला तेंव्हा कळू लागले.
 
रेडीमेड असे करिअर समोर होते, एका दिवसाच्या नोटिशीवर तो  घरचेच ऑफिस जॉईन करू शकणार होता, नव्हे करणारच होता. एकदा का इथून इंजिनिअर झाला  कि दोन अडीच वर्षे अमेरिकेत पूढील शिक्षणासाठी आणि तिथून थेट घरच्याच कंपनीत ....सिनिअर पोस्टवर. सारे कसे अगदी आखीव रेखीव. तेंव्हाच त्याची  भेट झाली उल्काशी, कॉलेजमधल्या एका सोशल अवेअरनेस च्या एका मीटिंग मध्ये. झोपडपट्टीतल्या एका शाळेत महिन्यातून दोन रविवारी ती  शिकवायला जायची. या साऱ्या गोष्टी तेंव्हा मैलोनमैल दूर होत्या त्याच्यापासून. ती  बोलत होती,  वर्गातल्या मुलांना आवाहन करत होती थोडा वेळ या कामासाठी देण्यासाठी. आदित्य ऐकत होता  कि नव्हता  ठाऊक नाही पण भारावून गेला होता.. पुढच्या रविवारी उल्का बरोबर जायचे त्याने कबूल केले आणि चक्क सकाळी ९ वाजता त्या शाळेत पोहोचला  देखील!
 
मग अनेक रविवार तो  उत्साहाने तिथे जातच राहिला. अक्षरा नावाची एन.जी.ओ. होती जी झोपडपट्टी, तसेच बांधकामावरील मजुरांच्या मुलांसाठी या शहरात शाळा चालवत होती. उल्काची आई त्या एन.जी.ओ. शी संबंधित होती ओघाने उल्का अधून मधून तिथे शिकवायला जाताच होती.  दोन्ही कारणे होती आदित्यसाठी तिथे जाण्याची.  तिच्या सोबत राहणे तर होतेच पण या मुलांना शिकवणेही  इतके आनंददायी होते कि बाकी त्याच्या नित्याच्या अनेक एषो आरामाच्या गोष्टी तितक्या त्याला  महत्त्वाच्या वाटेनाशा होत गेल्या. सवयी बदलत गेल्या. अनेक तडजोडी तो  सहजगत्या करू लागला. त्यांचे शेवटचे वर्ष होते ते. त्यामुळे प्रोजेक्ट सबमिट करण्याचे कामही होतेच. त्यामुळे रात्र रात्र जागून प्रोजेक्टचे मित्रांसोबत बसून केलेले काम. उल्का त्याच्या पेक्षा २ वर्षे मागे होती. तसे फार दिवस आदित्यचे  इथे राहिले नव्हतेच. एकदा शेवटचे सेम संपले कि मला लगेचच पुढच्या तयारीला लागायचे होते. ही गोष्ट आतापर्यंत इतकी साधी सरळ होती कि काही त्यावर विचार करायचे काही कारणच नव्हते.
 
पण त्याच्या  मनात मात्र काही वेगळेच विचार सुरु झाले होते. इथे राहून हे काम करण्यात मोठी मजा वाटू लागली होती. समाज बदलवण्यात आपला सहभाग त्याला आनंददायी वाटत होता. आयुष्यात प्रथमच समाजात तो इतका मिसळून गेला होता. अक्षरात येण्यापूर्वीचे आणि त्या नंतरचे त्याचे जगच निराळे होते. अक्षराने त्याचे विचार, राहणीमान, सवयी, आवडी-निवडी बऱ्याच बदलून टाकल्या होत्या. शिवाय उल्काच्या सहवासाची ओढ होतीच. एकीकडे हळूहळू त्यांच्या गाठीभेटी वाढू लागल्या होत्या. तशी उल्का एक हुशार, पण थोडी लाडावलेली मुलगी होती. आईने समाज कार्यात स्वत:ला झोकून दिलेले होते, घरी पैशाला काही कमी नव्हती. मजा म्हणून ती हे शाळेत शिकवण्याचे काम रविवारी करत होती. इंजिनीअर का व्हायचे होते याचे पण कोणते कारण तिच्याकडे नव्हते. बाबा म्हणाले म्हणून ती इथे आली होती.  थोडक्यात अभ्यासात हुशार, दिसायला गोड अशी, लाडावलेली, श्रीमंत घरातली, पण करीअर वगैरे गोष्टींचा फारसा विचार न केलेली, आयुष्याबद्दल फार मोठी स्वप्ने नसलेली.
 
एके  दिवशी सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर सहजच त्याने हा विषय काढला.
 
"बाबा, मी आता असे केले कि पुढच्या शिक्षणासाठी  एखाद दोन वर्षे मधे जाऊ देवू का? "
"का रे आदित्य? काय विचार आहे पुढे तुझा?"
"हि सेम संपल्यावर सरळ आपली कंपनी जॉईन करतो, आणि नंतर २ वर्षांनी जाऊन पुढचे शिकेन, शेवटी बाबा अनुभव महत्वाचा असे तुम्हीच नेहमी म्हणता ना?"
"अरे, हो ते आहेच. पण आता तुला जे काही शिकायचे ते शिकून घे. मी कंपनी सांभाळायला समर्थ आहे. परत आलास कि मग तुलाच सांभाळायचे आहे सारे कामकाज. थकलो आता मी."
"असे काय बोलता बाबा?"
"आता मी जात नाही, नंतर पाहू."
"बरं, तुला जसे ठीक वाटेल तसे. माझे काही म्हणणे नाही"
 
हेच हवे होते त्याला. मग मात्र त्याने अक्षराच्या कामात अगदी झोकून दिले स्वत:ला. सोबत मधून मधून घराच्या कंपनीत जाणे चालूच होते. जात्याच हुशार आणि लहानपणापासून घरात बिझनेसचे बाळकडू मिळालेले असल्याने त्याला ते फारसे जड गेले नाहीच. उल्काची आणि त्याची मैत्री दिवसेंदिवस गहरी होत चालली होती. निदान असे त्याला वाटत होते. अक्षराच्या कामात ती थोडा वेळ  त्याच्या सोबत असे. बाकीचा वेळ तिचा कॉलेज आणि  मौजमजा करण्यात जात असे. पण संध्याकाळी कॉफी शॉप, कधी ट्रेक तर कधी सिनेमा असे छान दिवस चालले होते. पण उघडपणे या नात्याबद्दल बोलावे असे कोणालाच वाटत नव्हते. अक्षराच्या आता अशा ३ ठिकाणी पूर्णवेळ शाळा सुरु झाल्या होत्या. आणि त्याचे बरेचसे श्रेय आदित्यला जात होते. त्यामुळे उल्काची आईपण आदित्यवर खूष होती.

(क्रमश:)

Wednesday, November 28, 2012

कांदा मुळा भाजी.......


लहानपणापासून मंडईत जाणे हि माझ्या आवडीची गोष्ट! तेंव्हा घरी फ्रीज नसल्याने २/२ दिवसांची भाजी घरी येत असे. भाज्यांचे नीट रचून ठेवलेले ढीग. सर्वत्र जाणवणारा ताजेपणा, रसरशीतपणा इतका मोहवणारा असतो की .....नंतर कॉलेजला जावू लागले तो पर्यंत घरी फ्रीज चे आगमन झाले होते, त्यामुळे मी खूप आनंदाने रविवारी भाजी घेऊन येत असे, नुसती भाजीच नव्हे तर फळे, देवपूजेसाठी आठवडभर पुरतील इतकी फुले असं सारं घेऊन आले कि मग मला खूप छान वाटत असे. नंतर त्या घरी नेलेल्या भाजीची निवडा निवडी करण्यासाठी आईला काय कष्ट पडतात याची तेंव्हा कल्पनाच नव्हती. ढीगभर भाजी घरी घेऊन येण्यात, तिच्या ताजा वास श्वासात भरून ठेवणेच इतके आनंददायी असते की हा त्रासाचा विचार ठेव्हा मनात कधी येतच नसे.
अजूनही ही गोष्ट तितकीच आवडीची आहे. भाजी मंडईत जावे, ताज्या ताज्या भाज्या बघितल्या की काय घेऊ अन काय नको असे होऊन जाते. दिवसाचे १०/१२ तास ऑफिसमध्ये जिचे जातात तिला रोज जाता येता भाजी घेणे शक्यच नाही. त्यामूळे आठवड्याची भाजी एकदमच हा शिरस्ता गेली अनेक वर्षे आमच्याकडे आहे. अशारितीने भाजी आणणे, निवडून वेगवेगळ्या प्लास्टिक मध्ये ठेवणे म्हणजे आठवडाभर आज काय भाजी करावी ही चिन्ता मिटते. मात्र वीकेंड मधल्या कोणत्या दिवशी भाजी आणायची, किती आणायची, तिची उस्तवार करायला कशी जमणार आहे याचा आधी विचार करावा लागतो, पण म्हणून काही  त्यातली मजा कमी होत नाही. त्यातून हा ऋतुच आनंदाचा ठेवा असावा असा ताजा तवाना. 
रविवारी सकाळीच मंडईत शिरावे. कोणत्या नव्या भाज्यांचे आगमन झाले आहे याचा अंदाज घ्यावा. तुरीच्या शेंगा, गाजर, मटार आणि मेथीच्या ताज्यातवान्या गड्ड्या दिसू लागणे ही माझ्या मंडईत जाण्याच्या आनंदाची परिसीमा असते. उंधियो, मेथीचे विविध प्रकार जसे की ठेपले, भरपूर लसूण  घालून केलेली सुकी भाजी, मेथी गोटे, गाजर हलवा, मटार करंजी, मिक्स भाज्यांचे सूप, लोणचे असे विविध प्रकार मनात डोकावू लागतात. त्यामुळे भाज्या घेत घेतच माझा आठवडाभराचा मेन्यू मनातल्या मनात तयार होतो. आत शिरल्याबरोबर मिरची, आले लसूण याचा गाळा असतो. थंडी पडू लागलीये, थोडे आले जास्त घेवूया म्हणजे वड्या करता येतील. लसूण ही घ्यायला हवा, थोडी सुकी चटणी करून ठेवायला हवी. मग पुढचा गाळा असतो रसरशीत टोमाटोचा. रविवारी पुलाव आणि सार करावे का? कोणी पाहुणे येणार आहेत का, कोणता सण आहे का, एखादा खास पदार्थ बरेच दिवसात झाला नाही अशी घरच्या दोन थोर व्यक्तींकडून तक्रार येण्याची शक्यता आहे का  या आठवड्यात हे एकदा आठवून पाहावे आणि त्या नुसार भाज्या घेत जावे. किती पालेभाज्या आपल्याचाने निवडून होतील याचा अंदाज घेत त्यांना ही पिशवीत जागा करून द्यावी. मग स्वीट कॉर्न मला न्या म्हणत मागे लागतो, म्हणून त्यास घ्यावेच लागते. आजकाल लाडावलेल्या मुलासारखा तो झाला आहे. उपासाचे दिवस असतील तर मग रताळी कुठे दिसतात का ते पाहावे लागते, म्हणजे एकादशीची सोय होईल, रताळ्याच्या गोड काचऱ्या, तिखट कीस, हे पदार्थ साबुदाण्याचे  वडे किंवा थालीपीठ  सोबत तांबड्या भोपळ्याचे भरीत, ओल्या नारळाची चटणी  असले की उपासाचे ताट कसे भरल्यासारखे वाटते नाही?  
तुरीच्या शेंगा दिसल्या की उन्दियोच्या इतर भाज्या जसे की कंद, सुरती पापडी, कच्ची केळी  आल्यात का हे पहावे, सगळ्या पाव पाव किलो घेत घरी जावून उंधियो बनवावा आणि पुढचे २/३ दिवस मनसोक्त त्यावर ताव मारावा  नाहीतर तुरीच्या शेंगाना घरी नेवून मीठ हळद घालून उकडून टेबलवर ठेवून द्याव्यात, बघता बघता संपून जातात. भाद्रपदात मिळणाऱ्या मावळी काकड्या दिसल्या की मग हळदीची पाने कुठे मिळतील ते पाहावे म्हणजे गोड पानग्या करता येतील. भरपूर कोथिंबीर आली की मग एकदा वड्या झाल्याच पाहिजेत. छान केशरी दळदार भोपळा आहे, तो  घारगे बरेच दिवसात झाले नाहीत अशी आठवण करून दिल्याखेरीज राहात नाहीत. मटार चांगला आला आहे, भरपूर घरी न्यावा, एकदा मटार उसळ आणि पाव हा बेत, कधी मटार भात तर कधी मटार करंजीचा बेत करावा. फेब्रुवारी संपता संपता फणसाच्या कुयऱ्या दिसतात का याचा शोध घ्यावा किंवा आसपासच्या कोणत्या घरी फणसाचे झाड आहे ते लक्षात ठेवून त्यांना सांगून ठेवावे. आजकाल मला वर्षभर ओले काजू सुकवून ठेवता येण्याची पध्दत कळली आहे, त्यामुळे फणस आणि ओले काजू याची भाजी, त्याला वरून लाल मिरचीची फोडणी म्हणजे सुख! तसा नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ म्हणजे या सुखाचा परमावधी. इतक्या प्रकारच्या भाज्या या दरम्यान उपलब्ध असतात की काय घेऊ आणि काय नको असे मला होऊन जाते. घरी नेलेल्या भाज्यांची उस्तवार करता यावी आणि विविध चवींचे खास पदार्थ बनवता यावेत म्हणून न या कालावधीत वीकेंड २ नाही तर ३/४ दिवसांचा असावा अशी फार इच्छा आहे.... :) 

आवळे घरी न्यावेत, किसून सुपारी, थोडा मोरावळा करून ठेवावा. थोडे लोणचे करावे त्यात थोडी आंबे हळद जी ओली मिळते या काळात, ती घालावी. लिम्बांचे गोड लोणचे बनवून ठेवावे, उन्हाळ्याची बेगमी म्हणून सरबताची सोय करून ठेवावी. पालक वर्षभर मिळतो, पण या काळात तो जास्तच ताजा टवटवीत वाटतो, त्याच्या पुऱ्या कराव्यात. भरली वांगी किंवा खानदेशी वांग्यांचे भरीत करावे, सोबत गरमागरम भाकरी आणि ताजे लोणी. किंवा भरपूर लसूण आणि तेल घालून केलेली आंबाडीची भाजी .... आहाहाहा..... एरवी जास्त न आवडणारे पावटे पण या काळात कधीतरी उसळ करून चविष्ट लागतात. नवरात्रात कधी काकडीसारखी लांबसडक जांभळी वांगी मिळतात, त्यांचे काप करावेत, डाळीचे पीठ, मीठ तिखट लावून थोड्या तेलावर भाजले की किती खातो हेच कळत  नाही, तीच गत सुरणाच्या कापांची.

थोडी शोधाशोध केली तर लसणीची पात मिळते कधी...थोडी कधी आमटीत टाकावी नाहीतर कधी छानशी चटणी करावी. इतर कोणत्याही सिझन मध्ये मिळणारा मुळा या ऋतूत मला नेहमीच चविष्ट वाटत आलाय. जवळपास चक्का वाटावा इतकं घट्ट दही घ्यावे, त्यात ओला नारळ, कोथिंबीर, एखादी हिरवी मिरची मिठाबरोबर वाटून,सोबत चिमुटभर साखर...सही लागते ही कोशिंबीर!
याच काळात फळे ही भरपूर येतात यामुळे चिकू शेक, स्ट्राबेरी किंवा सफरचंद शेक, फ्रुट सलाड हे ओघाने आलेच. (दूध आणि फळे एकत्र करून खावू नये या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून) नुकती नुकतीच दिसू लागलेली द्राक्षे, स्ट्राबेरी संत्री यांचा घरी वावर वाढतो तो थेट आंब्यांचे घरी आगमन होई पर्यंत. फळांची रेलचेल मग कधी इतकी होते की मग कोबीच्या कोशिम्बीरीत द्राक्षे दिसू लागतात, काकडीसोबत घट्ट दह्यात मीठ मिरची लावून डाळिंबाचे दाणे जावून बसतात तर कधी सफरचंद, डाळिंब, काकडी, अननस आणि थोडे अक्रोड चुरून घातले की थोड्या मीठ मिरपुडीने सुरेख सलाड तयार होते. कधी सफरचंदाचा कधी अननस घालून केलेला शिरा जेवणाची  लज्जत वाढवतो. तर कधी क्रीम मध्ये थोडी साखर घालून फेटले आणि भरपूर स्ट्राबेरी त्यात घातल्या की एक सुंदर डेझर्ट तय्यार!
बघता बघता हा हिरवागार सीझन संपू लागतो, हळू हळू मंडई रुक्ष भासू लागते. त्याच त्या ४/५ भाज्या दर आठवड्याला घरी नेतोय की काय असे वाटू लागते. थोडा पाराही चढा होवू लागतो. जेवण तितके आनंददायी वाटेनासे होते. मग फळांचा राजा पुन्हा अवतरतो आणि सारा रुक्ष नीरसपणा दूर करतो. पानात रोज सकाळ संध्याकाळ आमरस असला गरमागरम पोळी किंवा भातासोबत की मग कोणती भाजी आहे किंवा नाही याने काही फरक पडेनासा होतो. आंबा, फणस, जांभळे, करवंदे, चेरी, खरबूज, कलिंगड ही फळे मात्र दिवस रसदार करतात आणि उन्हाळा थोडा सुखाचा जातो. याच उन्हाळ्यात थोडी पावसाळ्याची बेगमी म्हणून थोडे सांडगे, भरल्या मिरच्या, थोड्या कुरडया (भाजी साठी) करून ठेवाव्यात. पावसाळ्यात मंडईत जाणेच नकोसे होते. कसेबसे ते दिवस ढकलून मी मनापासून वाट पाहत राहते या हिरव्यागार, ताज्या टवटवीत दिवसांची!


(त्याचं काय आहे की एखादा पदार्थ बनवताना किंवा खाताना मी त्यात इतकी गुंतलेली असते की त्यांचे फोटो काढणे वगैरे माझ्या लक्षात येणे केवळ अशक्य...त्यामुळे सर्व फोटो आंतरजालावरून साभार.)

Tuesday, November 20, 2012

शतकानिमित्त संवाद.....


हे मात्र अगदी ठरवूनच होते. १००वी पोस्ट कशी असावी याचा विचार साधारण ९६/९७ वी पोस्ट ब्लॉगवर टाकतानाच सुरु झाला होता. आवडीच्या विषयावरच असावी हे नक्की झालं होतं. लिहिताना आवडीचा विषय म्हणजे खादाडी. तसंही "इस बात पे सेलिब्रेशन तो बनता है" :) पण झालं काय की मधल्या २/३ पोस्ट साठी काही लिहिणेच होईना. हे म्हणजे कसं की "९६ वर असताना १०० वी रन कशी घ्यायची हे नक्की करायचे, पण मधल्या ३ धावा घेतानाच इतके चाचपडत खेळायचे की कधीही आउट होईल" असे झाले.

तसा मी ब्लॉग सुरु केला तो २००९ मध्ये. काय आणि कसं लिहायच याचा फारसा अंदाज आणि आराखडा नव्हताच. नंतर मी माझ्या कामात आणि अभ्यासात इतकी व्यस्त होऊन गेले की या गोष्टी जवळपास विसरूनच गेले. त्यामुळे आरंभशूरपणा या गटात हा ब्लॉगही लगेचच सामील झाला. याचे दुसरे कारण म्हणजे इन्फी बीबी आणि इन्फी ब्लॉग ज्यामुळे व्यक्त होण्यासाठी इतर कशाची गरजच नाही उरली.

त्यामुळे खऱ्या अर्थाने मी या ब्लॉगवर कधी लिहू लागले तर ते २०११च्या एप्रिल-मे महिन्यात. तो कोण वाचतय, नाही वाचत आहे, याकडे सुरुवातीला फारसे माझे लक्षही नव्हते. फेसबुकवर पण मी त्याचसुमारास अवतरले त्यामुळे तशा दोन्ही गोष्टी अपरिचितच...... मग परिचय होण्याचा सुरुवातीच्या काळात असतो तसा बुजरेपणा आणि एक प्रकारचे अवघडलेपण तेंव्हाही होतेच. नावाप्रमाणेच हा ब्लॉग माझे मला असाच होता. थोडा लोकांपासून अलिप्त असा. अनेक दिवस काही न लिहिता जात, ज्याचे फार काही वाटतही नसे. नंतर कधीतरी मराठी-ब्लॉग विश्वावर हा जोडला आणि खऱ्या अर्थाने ह्या जगाशी माझी ओळख झाली. तत्पूर्वी काही ब्लॉगर मित्र मैत्रिणी होत्या जसे की श्रीयुत धोंडोपंतांचा ब्लॉग त्यांचाच दुसरा सांजवेळ, अजून एक मित्र आनंदचा ब्लॉग आणि अजून काही निवडक.

मुळात मी आळशी जमातीतली. नेटाने एखादी गोष्ट करण्यासाठी तितकंच मोठं कारण हवे. यावेळी ते कारण माझे मीच होते त्यामुळे हा प्रवास किती चालू राहील याबद्दल साशंक होते. तरीही मी खऱ्या अर्थाने लिहिती झाले. कोणी वाचतंय किंवा नाही, हे न पाहता व्यक्त होण्यातला आनंद घेवू लागले. खरतर हे अशा प्रकारे व्यक्त होणे याला मर्यादा आहेत, याची जाणीव असूनही हा प्रवास १००व्या पोस्ट पर्यंत चालू राहिला. याचे श्रेय आपणा सर्वाना. सहज,उस्फूर्त असे जेवढे लिहिणे जमेल तेवढेच लिहायला आजतरी मला आवडते आहे. त्यामुळे ठरवून काही लिहिणे थोडे अवघडच जाते. मग  ती कविता असो, किंवा इतर लिखाण असो अगदी कोणावर टीका असो, नाहीतर आठवणीना उजाळा. याच ब्लॉगने काही नवीन मित्र-मंडळही मिळवून दिले. त्यांच्या या ब्लॉगवर किंवा मेल, फेसबुकवर मिळणाऱ्या प्रतिक्रिया मला लिहिते ठेवत गेल्या, आणि मी लिहित गेले. या साऱ्यांचे मन:पूर्वक आभार!

१०० व्या पोस्टनंतर आता असे वाटते की स्वत:च्या जगापलीकडे जाऊन आता लिहिता आले पाहिजे. म्हणजे अट्टाहास नाही पण तरी देखील. नाव जरी मी....माझे.....मला असले तरी त्यापलीकडचे पण एक विशाल असे जग जे आहे त्याला या ब्लॉगवर माझ्या नजरेतून वाचता यायला हवे. "मी"ला वगळून लिहिता यायला हवे. खादाडीवर लिहायला हवे. पण सध्यातरी रेसिपी शेअर करणे हा हेतू नाहीये. त्याकरिता अनेक उत्तम असे ब्लॉग्स, उत्तम अशी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. मी त्यापेक्षा वेगळं काय लिहू शकते? सर्वसाधारण नाही तरीदेखील किमान "अनघास्पेशल" अशातरी रेसिपी या ब्लॉग वरून शेअर व्हायला हव्यात, स्वयंपाक या कलेविषयी लिहायला हवे, विविध प्रदेशातील खाद्य परंपरा, त्यांची वैशिष्ट्ये या बद्दल लिहायला नक्कीच आवडेल. मुळातच भारतीय खाद्य परंपरा मला खूप भावते कारण त्यामागे केलेला विचार, त्यातील वैविध्य मला मोहून टाकते. पण अजून अंदाज येत नाहीये की हे लिहिणे कसे आणि किती दूरपर्यंत पेलवेल?

तरीही हा ब्लॉग माझ्यासाठी एक सेतू बनला "virtual" जगाशी जोडले जाण्याचा. जितके आनंददायी आहे स्वत:कडून सशक्त असे काही लिखाण घडणे, तितकेच आनंददायी आहे ते इतरांचे असेच ब्लॉग वाचणे. अनेकजण इतके सुंदर आणि सकस लिहितात की, त्यांच्या नवीन लिखाणाची मी वाट बघत असते. वेळ मिळेल तसे वाचूनही काढते. दिवसातून एकदातरी, त्यांच्यापैकी कोणी काही नविन लिहिले कि नाही ते पाहते. धोंडोपंत, महेंद्रकाका, वटवट सत्यवान हेरंब, तन्वीचा सहजच, अनघाचा ब्लॉग, जागेची टंचाई असण्याच्या काळात शब्दांना अब्द अब्द जागा करून देण्याऱ्या साविताताई, अपर्णाची माझिया मना म्हणत घातलेली साद, आनंदचा White lily, संवादिनी, अजूनही फळ्यावर लिहिणारे विसुभाऊ (गुरुजी होते का हे पूर्वी?), भानस, चकली प्रमाणेच मस्त असा वैदेहीचा ब्लॉग असे अनेक. यांच्यापैकी अनेकांशी माझा प्रत्यक्ष परिचय नाही. पण अनेक वर्षांचा परिचय असावा अशी ओळख त्यांच्या ब्लॉगमुळे वाटते. मी मागे म्हंटल्या प्रमाणे "संवाद संपला की नाती संपतात, म्हणूनच मला जपायचा आहे हा सेतू, हे नातं. संवाद संपला की सारे जगणेच रुक्ष कोरडे होवून जाते. म्हणूनच "आपुला हा संवाद आपणाशी" असाच चालू राहो."

Monday, November 12, 2012

ते ३ शब्द.....त्या साऱ्या आठवणी

मेल बॉक्स उघडल्यावर  नवीन येऊन पडलेल्या मेल्सवर आधी एक नजर टाकली. एका मेल कडे लक्ष गेले अन सब्जेक्टलाईन मधल्या त्या ३ शब्दांनीच पौर्णिमेच्या चंद्रासारखे हसू माझ्या चेहऱ्यावर पसरले. अगदी आतून आलले खरेखुरे! मन अलगद कापसाप्रमाणे उडत मागे गेले. अनेक आठवणी पहाटे उमलणाऱ्या प्राजक्तासारख्या दरवळू लागल्या. 

नाही नाही .... जास्त उत्सुकता मी ताणत नाही. "ते ३ शब्द" असे  म्हणता, जे पहिले स्वाभाविक पर्याय येतील हे ते नव्हते. :) नवीन काळे लिहित असलेल्या "सॉंग ऑफ द डे" या ब्लॉग वर add झालेल्या नवीन पोस्ट ची ती मेल होती आणि "ते ३ शब्द" होते "दिन ढल जाये ....." खरं सांगू का या शब्दांच्या जागी इतर कोणतेही  शब्द जसे की "आज फिर जीनेकी तमन्ना", "पिया तोसें नैना लागे", "गाता राहे मेरा दिल" "सैया बेईमान" "तेरे मेरे सपने" किंवा "वहा कौन हे तेरा" असते ना तरी मी इतकीच खुश झाले असते. बाकी सगळ्या मेल्स बाजूला ठेवून, त्या ब्लॉगवर जाऊन हि पोस्ट वाचायला घेतली. तसंही नवीन काळे जेंव्हा एखाद्या गाण्या बद्दल लिहितात ना तेंव्हा त्याचे इतरही अनेक संदर्भ, त्या गाण्यासंबंधी किस्से सांगत जणू तो सगळा काळ तुमच्या समोर उभा करतात. फ्रेम बाय फ्रेम गाणे तुमच्या नजरेसमोर जिवंत करण्याचे कसब त्यांच्या लेखणीत आहेच. आणि जेंव्हा ते गाणे "दिन ढल जाये" सारखे असते तेंव्हा तर बात काही और असते.

अति परिचयात अवज्ञा ते हेच का? खरं तर या पूर्वीच मी याबद्दल लिहायला पाहिजे होतं. पण कसं ते माहित नाही पण कायम राहूनच जाते.  "गाईड" या सिनेमा बद्दल मी पूर्वीच काही लिहा बोलायला हवे होते इतका तो माझ्या काळजाच्या जवळचा आहे. किती वेळा मी तो पहिला असेल माहित नाही. पण असंख्य वेळा पाहूनही मन भरणार नाही असे जे मोजकेच चित्रपट आपल्याकडे बनतात त्यापैकी तो एक.  अगदी लहान असताना असे कुठेतरी बर्याच ठिकाणी लिहिलेले वाचले होते, "मिलीये राजू गाईडसे".....पण तरी म्हणजे काय ते अनेक दिवस कळलेच नव्हते. अंधुकसे आठवते ते म्हणजे जेंव्हा लहानपणी सर्वात पहिल्यांदा तो दूरदर्शनवर लागणार होता तेंव्हा आजी म्हणाली "लहान मुलांनी पहावा असा तो नाहीये"(म्हणजे तेंव्हाच्या प्रचलित कल्पना आणि संस्कारांप्रमाणे, आजचे मापदंड यास लागू होणार नाहीत.) तरी मी तो पहिलाच.(नेहमी असेच घडते न? मोठ्यांनी विरोध करावा आणि लहानांनी ती गोष्ट हमखास करावीच). त्या नंतर अनेकदा बघतच गेले. पण नुसताच बघितला आणि विसरून गेले असे नाही झाले.....प्रेमात पडले...या गाण्यांच्या,सचिनदांच्या, वहिदा रेहमानच्या जिच्या मुळे सौदर्याचे मापदंड खूप वर गेले..... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच सिनेमाने माझ्या  स्वप्नातल्या राजकुमाराची प्रतिमा रेखाटली. जी आयुष्याचा खराखुरा साथीदार मिळाल्यानंतरही मनात कायम राहिली. हळुवार, प्रेमळ देखणा "तेरे मेरे सपने अब एक रंग .....तेरे दु:ख अब मेरे, मेरे सुख अब मेरे" म्हणणारा..... जी सिनेमातले काही खरे नसते माहित असतानाही मी कित्येक वर्षे जपली.

पुढे अनेकदा हे असे हिंदी सिनेमाच्या सुवर्ण युगातले अगदी मैलाचे दगड नाहीत पण त्यांना बाजूला करून तो इतिहास पूराच नाही होवू शकणार असे सिनेमे पाहताच गेले. गोडी अशी लागत गेली जी आजही कायम आहे. जसे की देव आनंदचे हम दोनो, मुनीमजी, सी. आय डी. नौ दो ग्यारह, प्रेम पुजारी, ज्वेल थीफ, काला पानी, काला बाजार, जब प्यार किसीसे, तेरे घर के सामने, बंबई का बाबू, .... गुरुदत्त यांचे प्यासा, साहिब बीबी, आर पार  चौदावी का चांद ....अशी भली मोठी यादी आहे. आजही सर्वात छान माझी सुट्टीची कल्पना हीच आहे की " शांत निवांतपणे हे सगळे सिनेमे" पाहता यावेत अशीच आहे. 

गाईड हा सिनेमा ज्यातले प्रत्येक गाणे इतके सुंदर की मला कधी यातले सर्वात आवडते कोणते हे आजतोवर कधी ठरवता नाही आले. जर कधी सर्वात आवडणारी १० गाणी निवडावी लागली तर गाईड आणि प्यासा या दोन सर्वात सुंदर सिनेमातील नक्की कोणती १० हे ठरवताना माझी दमछाक होईल. प्रत्येक गाणे त्या कथेमध्ये असे बेमालूम गुंफलेले की त्या गाण्यानेच कथा पुढे न्यावी.या गाण्यांशिवाय ह्या सिनेमांची मी कल्पनाही करू शकत नाही, इतका ती गाणी प्राण आहेत या सिनेमांचा....नव्हे तर या युगातील अनेक अशा सिनेमांचा. या गाण्यांनी मला घडवलंय .....आज फिर जीनेकी तमन्ना है म्हणत पुढे सारे विसरून पुढे जगायला शिकवलंय, युं ही काहोगे तुम सदा के दिल अभी नाही भरा ...म्हणत संयम शिकवलाय, तेरे मेरे सपने म्हणत आयुष्यभराची साथ द्यायला, दिल ढल जाये..... ने विरहाची जाणीव करून दिलीये, चांद फिर निकाला...म्हणत कोणाचीतरी वाट पाहायला,  ये दुनिया अगर मिलभी जाये तो क्या ही....ने भीषण वास्तवाची जाणीव करून दिलीये...आणि तरीही सर जो तेरा चकाराये तो ....चा उपाय ही या गाण्यानीच सांगितलाय. या गाण्यांनी माझे भावजीवन समृध्द बनवले. खरे तर हे सिनेमे माझ्या पिढीच्या जन्माच्याही बरेच आधीचे.....पण आमच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या अनेक पिढ्यांवर या गाण्यांनी राज्य केलंय .... माझ्या प्रत्येक भावनेला चपखल शब्दात बांधणाऱ्या या साऱ्या गाण्यांना सलाम!