Thursday, January 12, 2012

याचसाठी केला होता अट्टाहास.

एखादी महफिल असते. कधी कान इतके तृप्त होतात, वाटतं बस हेच ते, याचसाठी केला होता अट्टाहास. तर कधी सूर लागतात कधी लागत नाहीत, कधी तानपुरे जुळतात कधी जुळत नाहीत, कधी कधी सर्वोत्तम गायकाला मनाजोगी साथ मिळत नाही, कधी सर्व काही उत्तम जमून येते तरीही रसहीन होते महफिल. तरीही रसिक सवाई गंधर्वला जाणे सोडत नाहीत. एखाद दिवशी एखाद्या महान गायकाचं गाणं रंगलं नाही म्हणून त्याला ऐकणं कोणी सोडत नाही. त्याचं महत्त्व काही कमी होत नाही.
आयुष्य म्हणजे वर्ल्ड कप फायनल नसते की आज नाही जिंकलो तर संपले सारे. जिंकणे हरणे काही क्षणांची बात.
आयुष्य म्हणजे अशीच रोज नव्याने जमणारी मैफील असते. सतत कलाकार बदलत असतात प्रत्येकाची तऱ्हा निराळी, हर एकजण आपल्या गळ्यातून काय हरकती काढेल माहीत नाही. कोणी मनात मावणार नाही इतका आनंद देवून जाईल तर कोणी निराशा करेल. दर दिवशीचे वेगवेगळे राग निराळे, आपण कधी कलाकार तर कधी रसिकजन. मैफिलीला रोज उपस्थिती लावणे हे आपले काम.

1 comment:

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!