Saturday, August 18, 2012

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे .......पण लक्षात कोण घेतो?

Technology चा प्रसार थोड्या धीम्या गतीने झाला असता तर किती बरं झालं असतं,  असे अनेकदा माझ्या मनात येते. या विचार रुजला एक दोन वर्षापूर्वी. तेंव्हा मी सकाळी लवकर ऑफिसला जात असे. इन्फिची बस घराजवळच काही अंतरावरून मी पकडत असे. रोज रस्त्यात एका दुकानाबाहेर एक स्त्री बसलेली दिसे. तशी टापटीप असे, जरा बरी साडी, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, पायात पैजण, चेहराही बरा नटवलेला आणि हातात कानाशी धरलेला मोबाईल. एक दिवस असा गेला नाही की मी तिला तिथे बसून फोनवर बोलताना पहिले नाही. अनेकदा मनात प्रश्न पडे ही बाई अशी का इथे बसून फोनवर बोलते? तिला जावून विचारावं असंही मनात अनेकदा आला. पण मीच इतकी घाईत असे. एक दिवस चुकून लवकर घराबाहेर पडले, आणि सावकाश चालत राहिले. दुरूनच ती दिसली. लांबवरून तिचे निरीक्षण मी सुरु केले. तिचा फोन कानाला लावून बोलणे चालूच होते. मग माझे लक्ष तिच्या बाजूला असलेल्या खराट्या कडे गेले. आणि लक्षात आले, ही कॉलनीत झाडू मारते. पहिला विचार आला " सारा वेळ  रोज इथे बसून बोलते, तर काम कधी करते? दुसरा की या कामात कमावते किती आणि गमावते किती फोनवर बोलण्यात?" त्याच वेळी माझी कंपनी  दरमहिन्याला ७५० रु. पर्यंतचे  माझे मोबाईल बिल भरत असे. ऑफिसचे आणि पर्सनल असे दोन्ही फोनचे माझे बिल 3०० पेक्षा जास्त कधी होत नसे. म्हणजे बघा एकीला परवडू शकते, पण ती या गोष्टींवर पैसा खर्च करत नाहीये, किंवा त्यासाठी तिच्याकडे वेळच नाहीय,  दुसरीची कदाचित खायची प्यायची चिंता मिटत नसेल, पण असे खर्च चालूच.  मला तिला खूप मनापासून असं सांगण्याची इच्छा होती " बाई, आजचा वेळ आणि पैसा असा वाया घालवू नको, पोटापुरत  कमवत जरी असलीस, तरी, गाठीशी थोडा वेळ असेल तर  थोडं  अजून  शिक काही, ज्याचा काही उपयोग होईल. कशाला इथे बसून अशा गप्पा मारत, मोबाईल कंपन्याची धन करतेस?"  पण धीर नाही झाला. न जाणो त्या न वापरत्या खराट्याचा वापर केलान असता!

मधे घरी येणाऱ्या केर-फरशी करणाऱ्या बाई सकाळी लवकर माझ्या वेळात घरी आल्या. काम माझ्याकडे असे होते की त्यांना ३००० रु हवे होते. त्या गेली जवळपास १० वर्षे माझ्याकडे काम करतात, त्यामुळे मी देणार नाही असा प्रश्न नव्हता. पण मी कारण विचारलेच. उत्तर आले " लेकाला नवा मोबाईल हवा आहे, रोज तो डोकं खातो माझं, आज तोच येणार होतात, पण मीच म्हटलं " तू नको येवू, मी विचारते ताईना" माझा पुढचा प्रश्न " काय करतो तो आता, आजकाल पेपर टाकायला येत नाही तो?" उत्तर " ते काम आवडत नाही त्यास, सकाळी फार लवकर उठावं लागतं ना, मग आता जातो एका दुकानात कामाला" 
"३००० चा मोबाईल हवाय त्याला ? एखादा साधा घेवून नाही का काम भागणार? तुम्ही सकाळी १० ते रात्री आठ घरोघरी जावून कामे करता ते काय अशा गोष्टींवर उडवण्यासाठी?"
"ताई, तो ५००० मागत होता, पण मी म्हटलं ३००० पेक्षा जास्त देणार नाही" 
त्यांना माझा फोन दाखवला आणि म्हटलं " हा ४५०० रु चा आहे, आणि गेली ४ वर्षे मी तो वापरतीये. "माहित होतं मला पुत्र प्रेमापोटी बाकी काही त्यांच्या डोक्यात शिरणार नव्हते ते. दिले पैसे. 

गेली दोनवर्षे  मी माझा असा फोन वापरतीये जो एकदा गाडी चालवताना मांडीवर ठेवला होता, मधेच तो खाली पडला, थांबल्यावर उचलू म्हणून मी लक्ष दिले नाही, तो जरा जास्तच पुढे पडला, आणि ब्रेक खाली आला. पण फोनला काही झाले नाही, एक चीर जाऊनही तो चालतो आहे, मी पण तो अजून तसाच वापरते आहे. कसं ना या गोष्टी इतक्या स्वस्त झाल्या नसत्या, आणि नको त्या वर्गाने त्यावर अनाठायी पैसे उडवले नसते. घरी धड खायला नसे ना का, की राहायला धड घर, पण घरात, टी. व्ही. केबल, हातात मोबाईल, चालवायला बाईक.....पण डोक्यात प्रकाश पडेल तर ? 

मी कॉलेज मधे असताना एक सौ. संध्या वर्तक नावाच्या प्रोफेसर उत्तम  इकॉनॉमिक्स, बँकिंग आणि फायनान्स शिकवायच्या, त्या " How rich become richer and poor poorer" हे स्पष्ट करून सांगताना नेहमी  एक उदाहरण द्यायच्या, तेंव्हा त्या म्हणायच्या " मध्यम वर्गात नेहमी एक प्रकारची इर्षा जागृत असते, दुसरयाचे अनुकरण, किंबहुना आपल्यापेक्षा वरच्या वर्गाचे अनुकरण करण्यात त्यास धन्यता वाटते. आपला शेजारी कोणती दुचाकी वापरतो, शेजारीण कशा साड्या, कसे दागिने वापरते या गोष्टींकडे त्याचे लक्ष असते.  त्यामुळे त्यांचे जास्तीत जास्त रेसोर्सेस अशा रीतीने खर्ची पडतात.  तोच एखादा उद्योजक असेल तर त्याला अशा गोष्टीनी काही फरक पडत नाही. त्याला सर्वात महत्वाचे असते ते योग्य प्रकारे पैसा आपल्या धंद्यात गुंतणे. पुढे त्या असे म्हणत,"उगीच नाही कंपन्या आपल्या उत्पादनांच्या जाहिराती "neighbor's envy, owner's pride " या शब्दात करत. हीच गोष्ट हेरलीये, बँकांनी, तुम्ही कार घ्यायला कर्ज मागा, तुमच्या घरी येवून देतील, पण एखाद्या उद्योगासाठी कर्ज मागायला जा, १०० खेटे मारायला लावतील." बघा हे १७ वर्षान पूर्वीचे उदाहरण आज ही लागू पडते, फक्त त्यातले वर्ग बदलले आहेत कदाचित. 

4 comments:

  1. सर्वाचे मनापासून आभार! हे लिहिताना या व्यक्तीना नावे ठेवणे हा उद्देश नव्हता. कारण ज्या परिस्थितीत माणसे जगतात, त्या नुसार त्याची विचार करण्याची पद्धत ठरते. रोजच्या भाकरीची चिंता असताना फार दूरवरचा विचार माणूस नाही करू शकत...पण अशीच माणसे नको त्या गोष्टींवर पैसा खर्च करताना पहिली की मनात येतं की " बुडत्याचा पाय खोलात" शहाणे करून सोडावे सकलजन हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे,(तेव्हढे शहाणपण माझ्याकडे तरी कुठे आहे?) अनेकदा आपणही कधी ना कधी अशा गोष्टी करतोही. झेपणाऱ्या असतात म्हणून निभावून जाते. तरी जिथे जिथे शक्य तिथे मी बोलून, समजावून सांगायचा माझा प्रयत्न सोडत नाही.

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!