Saturday, January 21, 2012

माझिया जातीचा मज कोणी भेटो..........

सध्या अनेक मराठी पुस्तकं वाचतीये...म्हणजे सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी एक, घरी आल्यावर एक, वीकेंड चा तिसरंच...मजा वाटत आहे. सर्वात वेड लावलंय ते "सुनीताबाई देशपांड्यांच्या - प्रिय जी. ए." या पुस्तकाने. "माझिया जातीचा मज कोणी भेटो" ही प्रत्येक माणसाला निरंतर वाटणारी ओढ असते. जी. ए. आणि सुनीताबाई मधील हा पत्र-संवाद ही काहीसा असाच. हा एकतर्फी संवाद इतका वेड लावतो तर दुतर्फी पत्रोत्तर वाचणे म्हणजे तर जणू एका सुंदर नात्याचे मूक साक्षीदार होण्याचे भाग्यच .... 


खरंतर यापूर्वी पण त्यांनी मला भारावून टाकलं होतं, जेंव्हा "मी आहे मनोहर तरी" वाचलं होतं. तेंव्हा कॉलेजमध्ये होते मी आणि ते पुस्तकं नुकतंच प्रकाशित झालं होतं , आणि त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, तेंव्हा मी कॉलेज च्या एका वार्षिक अंकात " आत्मवृत्तावर अशी झोड उठवणं कसं चुकीचं आहे" हे ठसवणारा लेख लिहिला होता. 

आत्ता पर्यंत अनेक व्यक्ती "बाप माणूस" वाटल्या, अनेक खूप आवडल्या पण कोणाचं अनुकरण करावं असा कधी वाटलं नव्हतं, ही पहिली व्यक्ती जिच्या पाऊल खुणा धुंडाळत आपण चालावं असं वाटून गेलं.

1 comment:

  1. नाहीच कुणी अपुले रे, प्राणावर नभ धरणारे
    दिक्काल धुक्यांच्या वेळी ह्र्दयाला स्पंदवणारे
    हज़ारों ख्वाहिशें ऐसी.

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!