Thursday, June 14, 2012

चलो एक बार फिरसे....................

आजकाल अधून मधून लेकीचं बौद्धिक घ्यावं लागतं, अनेकदा विषय असतो ती आणि तिच्या मैत्रिणी. अनेक माझे सल्ले तिला पटतच नाहीत. ते वयच असं असतं ना. आपणही गेलेलो असतो त्यातून, आईशी भांडलेलो असतो. "काय बोलायचं ते मला बोल, तिला नावे ठेऊ नको" हा आवडता डायलॉग असतो. आपली मैत्री म्हणजे एकदम जगावेगळी, ग्रेट असे भ्रम जपत आपण ती फुलवत असतो. मैत्रीण किंवा मित्र या शब्दाला लहानपणी कसलं खास महत्व असतं ना. अनेकदा मी स्वत:लाच बजावते, तिला तिच्या अनुभवातून शिकू देत. चांगलं काय वाईट काय तिचं तिला ठरवू देत. पण पिढी दर पिढी असंच होत असावं.


लहानपण पुण्यातल्या एका वाड्यात गेलेलं. त्यामुळे तिथे भरपूर बच्चे कंपनी . शिवाय आजूबाजूच्या वाड्यांमधील पण जमा होत असत. त्याकाळी त्यावर काही बंधन नसे. पण या सगळ्या मुलामुलींमध्ये तेंव्हा मला एकाच मित्र वाटत असे. त्याचे नाव पराग. आम्ही दोघं एकाच वयाचे होतो. कधी अभ्यास मात्र बरोबर करत नसू. सगळेजण मला सतत त्याचे उदाहरण देत " बघ, तो किती अभ्यास करतो" . मला काही त्याने फरक पडत नसे. एकदा उन्हाळ्यातल्या दुपारी आम्ही दोघे बर्फाचा गोळा खात होतो. त्याचे घर पहिल्या मजल्यावर होते. तो गोळा खात वर गेला. घराच्या सज्जातून खाली डोकावला, आणि खाली रस्त्यात पडला. त्याची आई म्हणजे इन्ना संचेती हॉस्पिटल मध्ये नोकरी करत असे त्या काळी. या बाबाला तिथे ठेवले एक दिवस, तर हा तिथे ही अभ्यास करत होता. आणि बोलणी मी खात होते. तरीही तो माझा चांगला मित्र होता.


शाळेतही काही मैत्रिणी होत्या. पण घट्ट मैत्रीण म्हणावी अशी एकच होती. खरंतर आमच्यामध्ये काहीच समान नव्हतं आणि तरीही आम्ही मैत्रिणी होतो. तिची अजून पण एक मैत्रीण होती. खरंतर त्या दोघी खूप सारख्या होत्या, घर,पैसा, अभ्यास यामध्ये. अधूनमधून आमची भांडणे पण होत असत. बऱ्याचदा भांडणाचे खरे कारण ती तिसरीच असे, पण तसे बोलून दाखवता येत नसे. शाळा सुटली, तरी मैत्री तशीच राहिली ती अगदी कालपरवा पर्यंत. बदलत्या आयुष्याने आमचे नाते नाही बदलले. काळ सरला, बरेच पाणी वाहून गेले. आयुष्यभर नाती जशीच्या तशी राहत नाहीत याचा साक्षात्कार कधीतरी कोणालातरी व्हावाच लागतो. आजही मैत्री या नावाबरोबर हीच फक्त दोन नावे ओठी येतात. काळाच्या ओघात काही दिवसच सरत नाहीत फक्त, माणसेही बदलतात, त्यांचे विचार, त्यांची मुल्ये बदलतात.


"एकला चलो रे" हेच बरे वाटू लागते. अनेक नाती काळाच्या कसोट्यांवर तपासून पाहू नयेत असे वाटू लागते, भीती वाटते, नव्या बंधांची, नव्या नात्यांची. आहेत ती पण घट्ट धरून ठेवण्याचा अट्टाहास नको वाटतो. माणसे कारणपरत्वे आयुष्यात येतात, तशीच जातातही. एखादी व्यक्ती जितके दिवस आपल्याबरोबर आहे तितके दिवस आनंदात घालवावे. साहिरच्या ओळी मला म्हणूनच फार भावतात. कमीत कमी शब्दात जीवनाचे सार सांगतो साहीर.


तार्रुफ रोग हो जाये तो उसको भुलना बेहतर
तालुक बोझ बन जाये तो उसको तोडना अच्छा
चलो एक बार फिरसे....................




No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!