Friday, June 15, 2012

लखलख चंदेरी तेजाची..............


ऑफिस मधून घरी जाण्याच्या माझ्या वाटेवर काही मंगल कार्यालये आहेत. तिथे शक्यतो संध्याकाळी होणारी लग्ने होताना दिसतात. ऑफिसच्या परिसरात  सारे गुंठा-मंत्री राहत असल्यामुळे साधारण तिथे होणारी लग्ने पण तशाच प्रकारची असतात. असंख्य गाड्या रस्त्यावर असतात, जवळपास सगळ्या स्पेशल नंबर गाड्या. त्यामुळे त्या योग्य रीतीने  पार्क करणे वगैरे काही भानगड नाही. माणसाची मस्ती त्याच्या अनेक वस्तूंमधूनही व्यक्त होत असते. लग्नाच्या थोडे आधी तुम्ही तिथून जात असाल तर वैताग येतो. घोड्यावरून जाणारा नवरदेव, समोर आपल्याच बापाचा रस्ता आहे असे समजून नाचणारे लोक. मोठ्या स्पीकरच्या भिंती मधून गाणे ऐकू येत असते " मै परेशान" किंवा ऊ ला ला ? अरे देवा ! काय गाणी आहेत ही?  अनेकदा मला प्रश्न  पडतो " या घोड्यावर  बसलेल्या  गाढवाला  इतकंही कळू  नये की आपल्या आयुष्यातील सर्वात  महत्वाच्या दिवशी  आपण (मनातल्या मनात का होईना ) लोकांच्या  शिव्या खात आहोत."  त्यामुळे अर्थातच ट्राफिक जॅम ही ओघाने आलेच. पण जर लग्न लागून गेलेले असेल तर मात्र  हा ट्राफिक जॅम मला अगदी मनापासून आवडतो. अगदी घरी जायला उशीर होत असला तरी. 
कमाल आहे! हिंजवडी आय टी पार्क मधून संध्याकाळी बाहेर जाणारा प्रत्येक जण ट्राफिक जामवर वैतागलेला असतो, आणि मी म्हणे मला तो आवडतो??? आय टी वाले मला वेड्यात काढतील! पण खरंच जर त्या रस्त्यावर एखादे लग्न लागून गेले  असेल आणि जर त्यामुळे ट्राफिक जाम होत असेल तर मला खूप आवडते. त्याचे कारण म्हणजे लग्न लागल्याबरोबर आकाशात होणारी आतषबाजी. जरी मी दर वर्षी दीपावलीत लोकांना " गो ग्रीन " असा सल्ला देत असले तरी मला अगदी मनापासून ही आतषबाजी आवडते. आवाज करणारे फटाके जरी कधीच आवडले नाहीत तरी शोभेची दारू मात्र यास अपवाद. जशी नववर्षाच्या स्वागतास जगभर केली जाते.  सारं काही विसरून मी ती पाहत राहते. ते रंग, ती आकाशातून खाली उतरणाऱ्या चांदण्या इतका आनंद देतात. अगदी लखलख चंदेरी तेजाची  दुनियाच ती. भान हरपून मी ती पहात राहते. चांदण्या आकाशात विरू लागल्या की  ते क्षण घट्ट हाती पकडून ठेवावेसे वाटतात.
मधे एका रात्री असेच घडले. IPL चे दिवस होते ते. त्या दिवशी पुणे v s मुंबई चालू  होती  मी जेंव्हा घरी पोचले तेंव्हा. मी IPL पहात नव्हते पण एव्हढी जुजबी माहिती असते मला. रात्री अचानक झोपेतून फटाक्यांच्या आवाजाने जाग आली. मी थोडा पडदा बाजूला सरला आणि बसल्या जागेवरून होणारी आतषबाजी पाहू लागले. जवळपास सलग एक तास आकाशात सुंदर मनोहारी दृश्य दिसत होते. त्याने  आकाशच  नव्हे तर माझ्या मनालाच उजळवून टाकले होते. मनात एकदाच विचार आला पुणे जिंकले वाटते. इतके त्या आतषबाजीने वेड लावले की रात्री १ वाजेपर्यंत असे कोण फाटके वाजवेल असाही प्रश्न मला पडला नाही.    
तशी तेजाचा कवडसा वाटेल अशी उजळवून टाकणारी कोणतीही गोष्ट मन प्रसन्न करतेच. तो सूर्य असो पौर्णिमेचा चंद्र असो वा द्वितीयेची कोर वा असो शुक्राची चांदणी.  लक्ख घासून नुकतीच लावलेली समयी असो, संध्याकाळी लावलेले निरंजन, किंवा औक्षणासाठी लावलेल्या दोन ज्योती असोत, दिवाळीचे आकाशकंदील असोत, की पणत्यांची रांग असो, गंगेच्या पात्रात पानांवर सोडलेले दिवे असोत. इतकंच काय जेंव्हा देवासमोर रांगोळी रेखाटते, तेंव्हा त्यात काढलेला दीप असो. असं वाटतं की त्यातून असंख्य प्रभा फाकल्या आहेत आणि आणि त्यांच्या प्रकाशात सारं जीवन अवघं उजळून गेलं आहे.

2 comments:

  1. ही पोस्ट वाचली. गुलजार व फराज यांच्यावरच्याही पोस्ट वाचल्या. तुम्ही स्वतःही शायरी करता ?

    ReplyDelete
  2. नाही. शायरी आवडते मला पण मी नाही करत. पण फराज, फैज, गुलजार मला फार आवडतात.

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!