Wednesday, December 14, 2011

जडणघडण

गेल्याच आठवड्यात एक सर्टिफिकेशनसाठी परीक्षा झाल्यानंतर, मी १०/१२ वी च्या परीक्षे नंतर सुट्टी जो आनंद असायचा तोच अनुभवत आहे. आणि त्याकाळात ही जो माझा आवडता छंद की मनसोक्त वाचन त्याकडेच वळले. नशीबवान मी की माझया लहानपणी आमच्या घरी माझे पणजोबा राहत असत आणि त्याच्याकरिता घरी सारी वर्तमानपत्रे येत आणि कोणी न सांगता ही रोज घरी येणारी सारी वर्तमानपत्रे मी वाचून काढत असे. ती सवय आजही कायम आहे. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे, मी पुण्यात राहत असताना घरातून दोन उड्या मारल्या की पुणे मराठी ग्रंथालयात पोहचत असे. रोज संध्याकाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे एका हॉल मधे अनेक पुस्तके ठेवलेली असत आणि कोणीही तिथे जाऊन पुस्तके वाचू शकत असे. अशा रीतीने प्रत्येक सुट्टीत माझे पुस्तक-प्रेम वाढतच गेले. बर्‍याचदा एकदा हाती घेतले की ते पुस्तक वाचूनच संपवायचे. अगदी जेवताना, रात्री झोपताना, तरीही शिल्लक राहीले तर सकाळी लवकर उठुनही. अनेकदा आईची बोलणी खाऊनही.

बर्‍याचदा एक पुस्तक मला दोनदा वाचायला आवडते. पहिलं वाचन रंजक गोष्टींमधे गुंतवून ठेवते, दुसर्यांदा हाती घेतले की या गोष्टी मागे पडतात, आणि पुस्तकाच्या गाभ्यापर्यंत पोचता येते आणि ते वाचन पहिल्या इतकेच गुंतवून ठेवते.

पुर्वी अनेकदा मी लायब्ररीतून पुस्तके आणून वाचत असे पण आजकाल स्वत:चा एक संग्रह बनविण्यातला माझा रस वाढला आहे. त्यामुळे आजकाल अक्षरधारा, एबीसी इथल्या माझया चकरा खूप वाढल्या आहेत. यावर्षी दिवाळीची खरेदी मी भरपूर पुस्तकांच्या रूपाने केली आणि जेंव्हा घरी भिंतीवर एका काचेच्या रॅक वर मांडून ठेवली तेंव्हा हरखून मी पाहताच राहीले माझया या संग्राहाकडे.

खूप वर्षांपूर्वी मी मीना प्रभू यांची "माझे लंडन" आणि "दक्षिणरंग" वाचली होती. खूप आवडली होती मला ती दोन्ही. विशेषतः दक्षिणरंग. खरोखर एक उत्तम प्रवासवर्णन! कदाचित प्रवासाच्या आधी लेखन हा उद्देश मनात नसावा. एकूणच पुस्तकाची भट्टी इतकी मस्त जमली होती की आपण एकटे प्रवास करणार असू तर एक उत्तम गाइड म्हणून ते पुस्तक उपयोगी पडावे आणि तरीही वाचनाकरिता रंजक असावे. हाच धागा मनात ठेवून त्यांची बाकी सारी पुस्तके जशी की " रोमराज्य, ग्रीकायन, तुर्क-नामा, इजिप्तायन, गाथा इराणी" मी विकत घेऊन आले. पण पदरी निराशा आली कारण ही सारी पुस्तके लिखाण हा हेतू मनात ठेवून केल्यासारखी वाटली. बराचसा एकटीने केलेला प्रवास, उस्फूर्तता हरवून बसलेली पुस्तके वाटली मला ती.

मग मी मागे एकदा वाचलेली "पानिपत" हाती घेतली आणि पुन्हा त्याचप्रकारे वाचून काढली. रात्री उशिरा घरी पोहचल्यावर, सकाळी उठल्यावर, ऑफीस ला जाण्यापुर्वी. असं पुस्तक जे हाती घ्यावं आणि तहान-भूक विसरून वाचतच जावे. डोळे उघडणारा मराठ्यांचा इतिहास. लढवय्येपणाची परिसीमा, त्याचप्रमाणे त्याकाळचे शासन, लढाया, राज्यविस्तार सार्‍या गोष्टी इतक्या सुंदर रित्या मांडल्या गेल्या आहेत. अनेकदा डोळे पाणावतात, अनेकदा मराठी असल्याचा अभिमान वाटतो, तर अनेकदा आजच्या सारखेच गळेकापू राजकारण त्याही काळी होते, ज्याने अनेक मोहरे गमावले याचा तिरस्कार वाटतो. आज २५० वर्षानंतरही जसाच्या तसा इतिहास जिवंत करणार्‍या या पुस्तकाला शतश्: प्रणाम.


1 comment:

  1. नमस्कार, छान पोस्ट. माझीही काहीशी लहानपणची स्थिती तुमच्यासारखीच. नशिबाने मी आता लायब्ररीयन आहे. ब-यापैकी पुस्तके चाळायला मिळतात. इतर कामे भरपूर असतात.ः)).
    आपल्या वाचनासाठी शुभेच्छा. विशेष असा एखादा साहित्यप्रकार विकसित झालाय का तुमच्याबाबत ?

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!