Saturday, December 10, 2011

Change is the only Constant...........

असं म्हणतात " Change is the only Constant " खरच आयुष्याचा अगदी अविभाज्य घटक. कधी खूप हवाहवासा तरी कधी नकोसा, आपल्यावर लादलेला. बरेच दिवस मनात होतं सद्ध्या ज्या बदलातून मी जात आहे त्याबद्दल काही लिहावं. खरतर लग्न आणि आईपण ही दोन आयुष्यातील स्थित्यंतरे अनुभवल्या नंतर कोणताच बदल कठीण वाटू नये. पण तसं घडत नाही. तसे बदल हे रोजचेच....बरेच दिवस घराकडे धड लक्ष नाही दिले आहे, कुंडी मधलं रोपटं किती मस्त वाढलं आहे, बरेच दिवसात मैत्रीणी बरोबर मनसोक्त गप्पा झाल्या नाहीत, आमचं पिल्लू आता बरच मोठं आणि शहाणं झालय,....एका रात्रीत घडत नाहीत हे बदल, दर दिवशी हर क्षणी जग बदलत आहे, आपल्याला ते काहीसं उशिरा जाणवतं बस इतकच.


मला आठवतो सर्वात मला आठवणारा नकोसा बदल म्हणजे मी दहावीत असताना आम्ही घर बदलले ते. नवीन घरात शिफ्ट झालो, घर लावून झाले, या घराला मागे पुढे आंगण होते, जून महिना, ढग भरून आलेले, आणि कातर वेळी मी उदास अशी अंगणात बसून, विचार करत "का इथे? मला पुन्हा जुन्याच घरी जायचं आहे" पळून जावं पुन्हा त्या जुन्या घरी. पण ते घर तर पाडलं होतं, त्याजागी एक शॉपिंग कॉंप्लेक्स उभा राहण्यासाठी. त्या वेळी शेजारच्या बंगल्यातून आर्त सूर आले "जीवलगा.........राहीले रे दूर घर माझे......." डोळे भरून आले.(ते आत्ता या क्षणी पण आलेत). तेंव्हापासून आजतोपर्यंत मी माझया घराशी इतकी अटॅच आहे की एखादा दिवस सुद्धा मला माझया घरी न राहण्याची कल्पना रुचत नाही. रात्री कितीही उशीर होवो, मला माझयाच घरी परत जायचं असतं.


दूसरा मोठा बदल म्हणजे काही वर्ष निभावलेल्या होम-मेकर च्या रोल मधून स्वत:ला बाहेर काढण्याचा केलेला खटाटोप. जरी हा ही बदल स्व-इच्छेने होता, तरी सोपा नक्कीच नव्हता. ए कंप्लीट मेक-ओव्हर. अनेक महिने मी मलाच तयार करत होते, आणि पुढची अनेक वर्षे गेली ....माझे आज मी आहे त्यात स्थित्यंतर घडून यायला.


गेल्या काही वर्षात जेंव्हा जेंव्हा मी नोकरीत बदल केला तेंव्हा तेंव्हा पहिल्या दिवशी नवीन ऑफीस मधून पळून जावं, पुन्हा त्याच जुन्या ऑफीस मधे, आपल्या माणसात. माझे प्रत्येक ऑफीस हे माझे दूसरे घरच होते. तिथल्या प्रत्येक गोष्टीशी मी इतकी  जोडलेली असते की दूर जायची वेळ आली की एक इतकी अस्वस्थता मला घेरून टाकते. जसजसा तो दिवस जवळ येतो तसा नवीन काहीतरी मिळवल्याचा आनंद मावळू लागतो, आणि काहीतरी गमावतो आहोत ही भावना प्रबळ होऊ लागते.


बर पण हे बदल काही कोणी लादलेले नसतात माझयावर. माझे मीच प्रयत्नपूर्वक ते घडवलेले असतात, तरी नाळ अशी तुटता तुटत नाही. यावेळी पण असंच घडलं होतं, मी स्वत:ला खरतर खूप फ्लेक्सिबल समजते, कुठे ही कोणाशीही मी अड्जस्ट करू शकते, असा एक विश्वास जवळ बाळगते. पण तरीही अवघड असतो तो ट्रॅन्ज़िशन चा काळ. जेंव्हा तुमची अवस्था "घर का ना घाट का" अशी असते. आसपासचा कोणताच माणूस आपला वाटत नाही, आजूबाजूच्या कोणत्याच घटनांशी आपला काही संबंध आहे असे वाटत नाही, मन जून्याच गोष्टींमागे धाव घेत राहतं.

पण ते ही दिवस सरतात, एखादी घटना, एखादी व्यक्ती, एखादी अवघड टास्क, तुमची नाळ नव्याशी जोडते, हळू हळू सूर जुळत जातात, एखादा विसंवादी इथेही असतोच. पण तसा तो सर्वत्र च असतोच हे मनोमन आपल्याला माहीत असते. इतके रुळून जाता तुम्ही त्या ठिकाणी, की काही काळानंतर सार्‍या गोष्टी अतिपरिचित, रूक्ष, त्याच त्या वाटू लागतात .....आणि मग सुरू होतो प्रवास पुन्हा एका बदलाच्या दिशेने.....

No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!