Friday, December 30, 2011

वारसा

आजकाल कोणी असं भेटलं की वडिलांचा मोठा बिझनेस आहे, पण मुलांपैकी कोणालाच त्यात इँटेरेस्ट नसतो. हळहळ वाटते अशा वेळी. आवड वगैरे सर्व गोष्टी मान्य करूनही असं म्हणावं वाटतं की असं असू नये. वारसा चालवणारं कोणीतरी पुढच्या पिढीत देखील तयार व्हायला हवं. इतकच नव्हे तर तो जोपासून समृद्ध करणारं ही कोणीतरी हवं. नुसतं "सांगे वडिलांची किर्ती" असे नको तर ती वाढवणारं आणि त्यांची किर्ती ताजी-तावानि राखणारं ही कोणीतरी हवं. कदाचित मागील पिढीनेच प्रयत्नपूर्वक ते घडवून आणायला हवं.


इतिहास हा शाळेत काही-जणांचा नावडता विषय असतो, तरी गोष्टिरुपात ऐकताना तितका कंटाळवाणा नक्कीच वाटत नाही. असं आपल्या मागच्या काही पिढ्यांबद्दल आपण ऐकलेले असते आणि काही गोष्टी ऐकताना खूप छान वाटलेलेही असते. मी लहान असताना आमच्या घरी माझे पणजोबा राहत असत. माझी पणजी  अतिशय देखणी होती. नावही किती छान श्रीधर आणि सौ.पद्मावती. उंचेपूरे पणजोबा आणि सुंदर अशी पणजी काय दिसत असेल तो जोडा. त्याकाळच्या फोटो मधे सुद्धा जाणवतं हे. ते त्यांच्या काळी मेकॅनिकल इंजिनीयर झालेले. आजीच्या लहानपणी त्यांची एक फॅक्टरी होती. काही जण नोकरी करत असत तिथे. दिवाळीत प्रत्येक कामगाराला सोन्याचे लक्ष्मीचे नाणे भेट म्हणून मिळत असे. मला तर हे ऐकून पेशवाईचीच आठवण आली.

पण मी त्याना पहिलं तेंव्हा यातलं काहीचं नव्हतं. तोपर्यंत त्यांचं वय खूप झालं होतं पण बुद्धिमत्ता तशीच होती तसेच स्मरण शक्तीही. वयाच्या ९५ व्या वर्षी हा गृहस्थ निसर्गोपचार केन्द्र चालवत असे, पुण्यात मध्य वस्तीमधे. रोज सकाळी १० नंतर काही पेशंट येत असत त्यांच्या कडे. फक्त उपाय सांगण्यासाठी ते त्या काळी म्हणजे जवळपास २५/३० वर्षांपूर्वी ४० रुपये घेत असत. त्याकाळी ही रक्कम नक्कीच मोठी होती. पण ज्या अर्थी लोक ते देत असत त्या अर्थी त्यात काही दम असला पाहिजे. मोडी लिपीत सतत काही लेखन चालू असे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांसारख्या लोकांशी त्यांचा संवाद असे. सकाळी सकाळी उठून वेगवेगळी स्तोत्रे, अभंग म्हणत असत. सगळी वर्तमानपत्रे वाचत असत. अतिशय कमी आहार असे तसेच हालचालही. त्यानी बनवलेली काही उपकरणे इतकी मस्त होती की तशी त्या नंतर कुठेच पहिली नाहीत. लाकडी टी-पोआय, नारळ खवण्याचे यंत्र, दाण्याचं कूट करण्याचं अशा अनेक गोष्टी त्यानी घरी बनवलेल्या होत्या आणि त्या तशा दुसरीकडे कुठेच नव्हत्या.

पण म्हणतात ना दिव्या खाली अंधार. असा वारसा काही कारणानी मागे पडतो, यातलं काहीच तुमच्या पर्यंत झिरपत नाही. तुम्ही पाहिलेले वास्तव काही वेगळेच असते. प्रश्न असा की वारसा जपला का जात नाही? का त्यांच्या वाटेवर पुढची पिढी नाही चालत? आमच्या त्या घरात ना दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर लोक जगत होते. एक ते असे आणि दुसरे माझे आई-बाबा आणि आम्ही भावंडे. आमची जगण्याची लढाईच वेगळी होती. पणजोबांची बुद्धिमत्ता, कर्तुत्त्व त्याकाळी आमच्या पर्यंत पोहचतच नव्हती. आज मागे वळून पाहाताना जाणवतं की किती मोठा वारसा होता तो. पण त्या काळी त्याचं महत्व जाणवलं नव्हतं कदाचित. आज उरली आहे ती एक खंत.....हळहळ वाटून घेण्याशिवाय, त्यांच्या बद्दल अभिमान बाळगण्याशिवाय दुसरे काही त्या समृद्ध वारशासाठी करू नाही शकत याची.

No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!