Friday, December 30, 2011

वारसा

आजकाल कोणी असं भेटलं की वडिलांचा मोठा बिझनेस आहे, पण मुलांपैकी कोणालाच त्यात इँटेरेस्ट नसतो. हळहळ वाटते अशा वेळी. आवड वगैरे सर्व गोष्टी मान्य करूनही असं म्हणावं वाटतं की असं असू नये. वारसा चालवणारं कोणीतरी पुढच्या पिढीत देखील तयार व्हायला हवं. इतकच नव्हे तर तो जोपासून समृद्ध करणारं ही कोणीतरी हवं. नुसतं "सांगे वडिलांची किर्ती" असे नको तर ती वाढवणारं आणि त्यांची किर्ती ताजी-तावानि राखणारं ही कोणीतरी हवं. कदाचित मागील पिढीनेच प्रयत्नपूर्वक ते घडवून आणायला हवं.


इतिहास हा शाळेत काही-जणांचा नावडता विषय असतो, तरी गोष्टिरुपात ऐकताना तितका कंटाळवाणा नक्कीच वाटत नाही. असं आपल्या मागच्या काही पिढ्यांबद्दल आपण ऐकलेले असते आणि काही गोष्टी ऐकताना खूप छान वाटलेलेही असते. मी लहान असताना आमच्या घरी माझे पणजोबा राहत असत. माझी पणजी  अतिशय देखणी होती. नावही किती छान श्रीधर आणि सौ.पद्मावती. उंचेपूरे पणजोबा आणि सुंदर अशी पणजी काय दिसत असेल तो जोडा. त्याकाळच्या फोटो मधे सुद्धा जाणवतं हे. ते त्यांच्या काळी मेकॅनिकल इंजिनीयर झालेले. आजीच्या लहानपणी त्यांची एक फॅक्टरी होती. काही जण नोकरी करत असत तिथे. दिवाळीत प्रत्येक कामगाराला सोन्याचे लक्ष्मीचे नाणे भेट म्हणून मिळत असे. मला तर हे ऐकून पेशवाईचीच आठवण आली.

पण मी त्याना पहिलं तेंव्हा यातलं काहीचं नव्हतं. तोपर्यंत त्यांचं वय खूप झालं होतं पण बुद्धिमत्ता तशीच होती तसेच स्मरण शक्तीही. वयाच्या ९५ व्या वर्षी हा गृहस्थ निसर्गोपचार केन्द्र चालवत असे, पुण्यात मध्य वस्तीमधे. रोज सकाळी १० नंतर काही पेशंट येत असत त्यांच्या कडे. फक्त उपाय सांगण्यासाठी ते त्या काळी म्हणजे जवळपास २५/३० वर्षांपूर्वी ४० रुपये घेत असत. त्याकाळी ही रक्कम नक्कीच मोठी होती. पण ज्या अर्थी लोक ते देत असत त्या अर्थी त्यात काही दम असला पाहिजे. मोडी लिपीत सतत काही लेखन चालू असे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांसारख्या लोकांशी त्यांचा संवाद असे. सकाळी सकाळी उठून वेगवेगळी स्तोत्रे, अभंग म्हणत असत. सगळी वर्तमानपत्रे वाचत असत. अतिशय कमी आहार असे तसेच हालचालही. त्यानी बनवलेली काही उपकरणे इतकी मस्त होती की तशी त्या नंतर कुठेच पहिली नाहीत. लाकडी टी-पोआय, नारळ खवण्याचे यंत्र, दाण्याचं कूट करण्याचं अशा अनेक गोष्टी त्यानी घरी बनवलेल्या होत्या आणि त्या तशा दुसरीकडे कुठेच नव्हत्या.

पण म्हणतात ना दिव्या खाली अंधार. असा वारसा काही कारणानी मागे पडतो, यातलं काहीच तुमच्या पर्यंत झिरपत नाही. तुम्ही पाहिलेले वास्तव काही वेगळेच असते. प्रश्न असा की वारसा जपला का जात नाही? का त्यांच्या वाटेवर पुढची पिढी नाही चालत? आमच्या त्या घरात ना दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर लोक जगत होते. एक ते असे आणि दुसरे माझे आई-बाबा आणि आम्ही भावंडे. आमची जगण्याची लढाईच वेगळी होती. पणजोबांची बुद्धिमत्ता, कर्तुत्त्व त्याकाळी आमच्या पर्यंत पोहचतच नव्हती. आज मागे वळून पाहाताना जाणवतं की किती मोठा वारसा होता तो. पण त्या काळी त्याचं महत्व जाणवलं नव्हतं कदाचित. आज उरली आहे ती एक खंत.....हळहळ वाटून घेण्याशिवाय, त्यांच्या बद्दल अभिमान बाळगण्याशिवाय दुसरे काही त्या समृद्ध वारशासाठी करू नाही शकत याची.

Wednesday, December 21, 2011

आरसाही खोटे बोलतो



आरसाही खोटे बोलतो

पाहू जाता मला रूप तुझेच दावतो
मोगराही खोटे बोलतो
माळता केसात त्यास गंध तुझाच दरवळतो
कशी ही तुझी भूल पडली मला
की शिशिरातही आठवे मज मोगरा 


Monday, December 19, 2011

समजून घे रे समजून घे


तूच तो निळासावळा
तीच ती मी तुझी राधा
तीच आपूल्या प्रीतीची गाथा
समजून घे रे समजून घे 


फुलतो दारात मोगरा
पाहते त्यातही तुजला
माळीते केसात त्याचाच गजरा
समजून घे रे समजून घे


पडला मागे तो आपुला गाव
आणते खोट्या सुखाचा आव
अन् झूरते क्षणोक्षणी तुजसाठी
समजून घे रे समजून घे

देवाचिये द्वारी

तशी मी धार्मिक कधी नव्हते. लग्न होईपर्यंत घरी कोणते धार्मिक कृत्य असेल तर नमस्कार करुन गोड-धोड जेवणावर ताव मारणे इतकाच माझा त्याच्याशी संबंध असे. अभ्यास आहे हे कारण ही खूप उपयोगी होते त्याकाळी, पण परीक्षेसाठी मात्र आवर्जून देवाला नमस्कार असे. पण त्याकाळी ही मला माहीत होते की माझयासारखे असे अनेकजण असतात म्हणून. नंतर सारे बदलत गेले. घरची नवी सून म्हणून काही गोष्टी करणे क्रमप्राप्त होते. त्याकाळी माझा माझयाशीच वाद असे. अनेक गोष्टी माझयावर लादल्या जात आहेत असे वाटत असे.


नंतर मीच बदलत गेले. गरजे साठी धार्मिक राहणे मनाला पटेना. पूर्णत: नास्तिक होणे ही जमले नसते मला. वाईट दिवसांत कोणाचा तरी आपण वापर करतोय हे न पटणारी गोष्ट होती मग तो देव असो, कोणी माणूस असो वा कोणी शक्ती म्हणू. मग मी विचारपूर्वक सश्रद्ध बनले. जे काही ते मनापासून करू लागले.

माझी साधी सोपी प्रार्थना असते. "माझी तुझयावर श्रद्धा आहे. माझा तुझयावर विश्वास आहे. माझयासाठी तू एक शक्ती आहेस, या विश्वाचा पालक आहेस. खूप काही मी तुझयाकडे मागून तू ते देण्यापेक्षा जे मला मिळवायचं आहे ते मिळवता येण्याची शक्ती तू मला दे. जर एखद्या क्षणी माझी परीक्षा पाहायची असेल तर समर्थपणे ती परिस्थिती पेलण्याची ताकद दे. यशासोबत पाय जमिनीवर राहतील अशी विचारधारा दे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझयापेक्षा दीन दुबळ्यांसाठीची कणव माझया मनात तेवती ठेव."

तरीही खूप या गोष्टींचे अवडंबर माजवणे मला पटत नाही. मी हे केले की देव मला ते देतो आणि नाही केले तर शिक्षा होते मला अशी विचारधारा मी जपत नाही. माणसासारखा विचार करणार्‍याला "देव" कसं म्हणावं? धार्मिक महत्त्व असणार्‍या दिवशी देवळात जाणं मी टाळतेच. किंवा सतत देव-दर्शन करणार्‍या लोकांना "आता कधी तरी त्या देवाला मोकळं सोडा, सारखा कोणकोणा कडे तो बघेल बिचारा " किंवा " तुमचं आणि देवाचं काय 3 -जी कनेक्शन आहे का की नुसतं मनात यायचा आवकाश की तुम्ही त्याच्या दर्शनासाठी पोहचताच" असं ही विचारते.


तरीही अधून मधून काही ठराविक देवळात जाण्याची मला इच्छा होतेच. मग अनेक दिवस जायचं असं घोकत मी कधीतरी पोहचते. देवाचं दर्शन हा निव्वळ हेतू मनात ठेवून. त्यामुळे देवासमोर ठेवण्यासाठी खूप काही घेऊन जावं असं माझया मनात फारसं कधी येत नाही. पण तिथे देणगी स्वरूपात किंवा अभिषेक म्हणून काही तरी देणे मी पसंत करते. (असा संगितलेला अभिषेक ते लोकं खरच करतात या बद्दल मला शंका आहे.) पण देवस्थानला इतर काही चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता निधीची गरज असते या विचाराने.


पण तरीही काही तरी देवाच्या दारी जाउनही मला खटकते. ते म्हणजे तिथले पूजारी आणि त्यांची वागणूक. तुम्ही काय देवासमोर ठेवता त्याप्रमाणे ते तुमच्या हाती प्रसाद म्हणून काय ठेवायचे ते ठरवतात. म्हणजे तुम्ही काहीतरी मोठं देवाच्या समोर ठेवा, ते तुम्हाला नारळ, पेढे, देवाला वाहिलेली फुले, हार किंवा देवाचं वस्त्र असं काही तरी प्रसादाच्या रूपात देतात. नुसते जा हात जोडुन डोळे मिटून प्रार्थना करा तेंव्हा ते तुमच्या हातावर साधे साखर फुटाणे देखील ठेवत नाहीत. मी कधी या गटात नाही तर कधी दुसर्या गटात असते. पण दोन्ही वेळा मनात विचार येतो की किमान देवाच्या दारी अशी विषमता असू नये.

Friday, December 16, 2011

किती दिवस झालेत..........


खरतर गंमत असते, छानशा हवेत घराबाहेर पडावे कोणत्याच कारणाशिवाय. वाट फुटेल तसं चालत राहावं, कंटाळा आला की परतीची वाट धरावी. वाटेत एखादं देऊळ असावं, डोळे भरून मूर्तीकडे पाहावं, शांतपणे तिथे २ क्षण विसावा घ्यावा, किती दिवस झालेत पर्वतीवर नाही गेले, अनेकदा सारसबागेसमोरून जाते पण थांबून गणपतीचं दर्शन घ्यावं हे राहूनच जाताय.
किती दिवस झालेत, लक्ष्मी रोड किंवा एम जी रोड वरुन विंडो शॉपिंग करत भटकले नाही. कितीतरी दिवस झालेत घरी टेरेस मधे निवांत बसून चहा चा आस्वाद नाही घेतलाय, अनेकविध पदार्थांची चव या ना त्या कारणानी चाखत असते पण कितीतरी दिवस झालेत, तव्यावरची गरम पोळी आणि शिकरण मात्र विसरले आहे
किती तरी दिवस झाले काही कारण नसताना, मामा, आत्या, काका-काकू यांच्याकडे गेले नाही. की उगाचच कोणा मित्र-मैत्रीणीला फोन नाही केला. अनेकदा जी-टॉक किंवा एफ-बी वर अनेक जण ऑनलाइन दिसतात, पण गप्पा तिथेही होत नाहीत. माणसं आपल्या माणसांपासून तुटत जातात की स्वत:पासूनच?

Wednesday, December 14, 2011

जडणघडण

गेल्याच आठवड्यात एक सर्टिफिकेशनसाठी परीक्षा झाल्यानंतर, मी १०/१२ वी च्या परीक्षे नंतर सुट्टी जो आनंद असायचा तोच अनुभवत आहे. आणि त्याकाळात ही जो माझा आवडता छंद की मनसोक्त वाचन त्याकडेच वळले. नशीबवान मी की माझया लहानपणी आमच्या घरी माझे पणजोबा राहत असत आणि त्याच्याकरिता घरी सारी वर्तमानपत्रे येत आणि कोणी न सांगता ही रोज घरी येणारी सारी वर्तमानपत्रे मी वाचून काढत असे. ती सवय आजही कायम आहे. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे, मी पुण्यात राहत असताना घरातून दोन उड्या मारल्या की पुणे मराठी ग्रंथालयात पोहचत असे. रोज संध्याकाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे एका हॉल मधे अनेक पुस्तके ठेवलेली असत आणि कोणीही तिथे जाऊन पुस्तके वाचू शकत असे. अशा रीतीने प्रत्येक सुट्टीत माझे पुस्तक-प्रेम वाढतच गेले. बर्‍याचदा एकदा हाती घेतले की ते पुस्तक वाचूनच संपवायचे. अगदी जेवताना, रात्री झोपताना, तरीही शिल्लक राहीले तर सकाळी लवकर उठुनही. अनेकदा आईची बोलणी खाऊनही.

बर्‍याचदा एक पुस्तक मला दोनदा वाचायला आवडते. पहिलं वाचन रंजक गोष्टींमधे गुंतवून ठेवते, दुसर्यांदा हाती घेतले की या गोष्टी मागे पडतात, आणि पुस्तकाच्या गाभ्यापर्यंत पोचता येते आणि ते वाचन पहिल्या इतकेच गुंतवून ठेवते.

पुर्वी अनेकदा मी लायब्ररीतून पुस्तके आणून वाचत असे पण आजकाल स्वत:चा एक संग्रह बनविण्यातला माझा रस वाढला आहे. त्यामुळे आजकाल अक्षरधारा, एबीसी इथल्या माझया चकरा खूप वाढल्या आहेत. यावर्षी दिवाळीची खरेदी मी भरपूर पुस्तकांच्या रूपाने केली आणि जेंव्हा घरी भिंतीवर एका काचेच्या रॅक वर मांडून ठेवली तेंव्हा हरखून मी पाहताच राहीले माझया या संग्राहाकडे.

खूप वर्षांपूर्वी मी मीना प्रभू यांची "माझे लंडन" आणि "दक्षिणरंग" वाचली होती. खूप आवडली होती मला ती दोन्ही. विशेषतः दक्षिणरंग. खरोखर एक उत्तम प्रवासवर्णन! कदाचित प्रवासाच्या आधी लेखन हा उद्देश मनात नसावा. एकूणच पुस्तकाची भट्टी इतकी मस्त जमली होती की आपण एकटे प्रवास करणार असू तर एक उत्तम गाइड म्हणून ते पुस्तक उपयोगी पडावे आणि तरीही वाचनाकरिता रंजक असावे. हाच धागा मनात ठेवून त्यांची बाकी सारी पुस्तके जशी की " रोमराज्य, ग्रीकायन, तुर्क-नामा, इजिप्तायन, गाथा इराणी" मी विकत घेऊन आले. पण पदरी निराशा आली कारण ही सारी पुस्तके लिखाण हा हेतू मनात ठेवून केल्यासारखी वाटली. बराचसा एकटीने केलेला प्रवास, उस्फूर्तता हरवून बसलेली पुस्तके वाटली मला ती.

मग मी मागे एकदा वाचलेली "पानिपत" हाती घेतली आणि पुन्हा त्याचप्रकारे वाचून काढली. रात्री उशिरा घरी पोहचल्यावर, सकाळी उठल्यावर, ऑफीस ला जाण्यापुर्वी. असं पुस्तक जे हाती घ्यावं आणि तहान-भूक विसरून वाचतच जावे. डोळे उघडणारा मराठ्यांचा इतिहास. लढवय्येपणाची परिसीमा, त्याचप्रमाणे त्याकाळचे शासन, लढाया, राज्यविस्तार सार्‍या गोष्टी इतक्या सुंदर रित्या मांडल्या गेल्या आहेत. अनेकदा डोळे पाणावतात, अनेकदा मराठी असल्याचा अभिमान वाटतो, तर अनेकदा आजच्या सारखेच गळेकापू राजकारण त्याही काळी होते, ज्याने अनेक मोहरे गमावले याचा तिरस्कार वाटतो. आज २५० वर्षानंतरही जसाच्या तसा इतिहास जिवंत करणार्‍या या पुस्तकाला शतश्: प्रणाम.


Saturday, December 10, 2011

जागे व्हा..............


निवडणूका अजून जाहीर नाही झाल्यात,  कोणाला तिकीट मिळणार याचा पत्ता नाही, तरीदेखील अनेक इच्छुक काय काय क्‍लूप्त्या लढवताना दिसतात. महिला मंडळाच्या ट्रिप्स, सांस्कृतिक कार्यक्रम, हेल्थ चेक अप,स्पॉन्सर्ड अर्थातच कोणीतरी निवडूणकोत्सुक. या आठवड्यात मी राहते त्या भागात सर्व प्रकारचे  मनोरंजनाचे कार्यक्रम या वीकेंड्ला आहेत....शुक्र-तारा, आयुष्यावर बोलू काही, स्वप्निल बांडोद्कार रजनी, भक्तीगीत .....बाप रे बाप इतकी आमच्या मनोरंजनाची काळजी या लोकाना अचानक का वाटू लागली? स्वत:च्या आई-बापाना काशी यात्रा घडवली नसेल पण सारे आधुनिक श्रावण बाळ मतदार आजी आजोबाना देव-दर्शन घडवून आणत आहेत.
एका नगरसेविकेच्या घराची (राजवाडा म्हणू) वास्तू-शांत होती, (निवडणूक जवळ आल्याचाच एक मुहूर्त मिळाला हो) सार्‍या प्रभागाला आमंत्रण होतं, आलेल्या प्रत्येक बाईला साडीचा प्रती आहेर होता, कमीत ४/५ हजार माणसे जेऊ घातली तिने.बघा किती प्रेम आपल्या भागातल्या मतदारांवर. 
आजच घरी एक पत्रक येऊन पडलं एका नगरसेविके ने आयोजित पैठणी चा खेळ. पहिले बक्षीस "स्कूटी पेप" दुसरे ६ चांदीचे ग्लास, तिसरे सोन्याचे कानातले, मग अंगठी, ओव्हन, पैठणी आणि काय काय...
प्रश्न हा आहे का जातात अशा ठिकाणी आपल्या सारखे लोक? मी राहते तो सर्व सुशिक्षीत लोकांचा आहे तर मग यांच्या या गोष्टीना भुलतं कोण? या पूर्वी मी या गोष्टी काही ठराविक भागातच घडताना पहिली आहेत, पण आता हे सारं तुमच्या माझयापर्यंत येऊन पोहचलं आहे. कदाचित आपण तथाकथित सुशिक्षित, सुजाण लोकाना ही या मार्गाने विकत घेता येतं असं राजकारण्याना वाटू लागलं आहे ....जागे व्हा.

Change is the only Constant...........

असं म्हणतात " Change is the only Constant " खरच आयुष्याचा अगदी अविभाज्य घटक. कधी खूप हवाहवासा तरी कधी नकोसा, आपल्यावर लादलेला. बरेच दिवस मनात होतं सद्ध्या ज्या बदलातून मी जात आहे त्याबद्दल काही लिहावं. खरतर लग्न आणि आईपण ही दोन आयुष्यातील स्थित्यंतरे अनुभवल्या नंतर कोणताच बदल कठीण वाटू नये. पण तसं घडत नाही. तसे बदल हे रोजचेच....बरेच दिवस घराकडे धड लक्ष नाही दिले आहे, कुंडी मधलं रोपटं किती मस्त वाढलं आहे, बरेच दिवसात मैत्रीणी बरोबर मनसोक्त गप्पा झाल्या नाहीत, आमचं पिल्लू आता बरच मोठं आणि शहाणं झालय,....एका रात्रीत घडत नाहीत हे बदल, दर दिवशी हर क्षणी जग बदलत आहे, आपल्याला ते काहीसं उशिरा जाणवतं बस इतकच.


मला आठवतो सर्वात मला आठवणारा नकोसा बदल म्हणजे मी दहावीत असताना आम्ही घर बदलले ते. नवीन घरात शिफ्ट झालो, घर लावून झाले, या घराला मागे पुढे आंगण होते, जून महिना, ढग भरून आलेले, आणि कातर वेळी मी उदास अशी अंगणात बसून, विचार करत "का इथे? मला पुन्हा जुन्याच घरी जायचं आहे" पळून जावं पुन्हा त्या जुन्या घरी. पण ते घर तर पाडलं होतं, त्याजागी एक शॉपिंग कॉंप्लेक्स उभा राहण्यासाठी. त्या वेळी शेजारच्या बंगल्यातून आर्त सूर आले "जीवलगा.........राहीले रे दूर घर माझे......." डोळे भरून आले.(ते आत्ता या क्षणी पण आलेत). तेंव्हापासून आजतोपर्यंत मी माझया घराशी इतकी अटॅच आहे की एखादा दिवस सुद्धा मला माझया घरी न राहण्याची कल्पना रुचत नाही. रात्री कितीही उशीर होवो, मला माझयाच घरी परत जायचं असतं.


दूसरा मोठा बदल म्हणजे काही वर्ष निभावलेल्या होम-मेकर च्या रोल मधून स्वत:ला बाहेर काढण्याचा केलेला खटाटोप. जरी हा ही बदल स्व-इच्छेने होता, तरी सोपा नक्कीच नव्हता. ए कंप्लीट मेक-ओव्हर. अनेक महिने मी मलाच तयार करत होते, आणि पुढची अनेक वर्षे गेली ....माझे आज मी आहे त्यात स्थित्यंतर घडून यायला.


गेल्या काही वर्षात जेंव्हा जेंव्हा मी नोकरीत बदल केला तेंव्हा तेंव्हा पहिल्या दिवशी नवीन ऑफीस मधून पळून जावं, पुन्हा त्याच जुन्या ऑफीस मधे, आपल्या माणसात. माझे प्रत्येक ऑफीस हे माझे दूसरे घरच होते. तिथल्या प्रत्येक गोष्टीशी मी इतकी  जोडलेली असते की दूर जायची वेळ आली की एक इतकी अस्वस्थता मला घेरून टाकते. जसजसा तो दिवस जवळ येतो तसा नवीन काहीतरी मिळवल्याचा आनंद मावळू लागतो, आणि काहीतरी गमावतो आहोत ही भावना प्रबळ होऊ लागते.


बर पण हे बदल काही कोणी लादलेले नसतात माझयावर. माझे मीच प्रयत्नपूर्वक ते घडवलेले असतात, तरी नाळ अशी तुटता तुटत नाही. यावेळी पण असंच घडलं होतं, मी स्वत:ला खरतर खूप फ्लेक्सिबल समजते, कुठे ही कोणाशीही मी अड्जस्ट करू शकते, असा एक विश्वास जवळ बाळगते. पण तरीही अवघड असतो तो ट्रॅन्ज़िशन चा काळ. जेंव्हा तुमची अवस्था "घर का ना घाट का" अशी असते. आसपासचा कोणताच माणूस आपला वाटत नाही, आजूबाजूच्या कोणत्याच घटनांशी आपला काही संबंध आहे असे वाटत नाही, मन जून्याच गोष्टींमागे धाव घेत राहतं.

पण ते ही दिवस सरतात, एखादी घटना, एखादी व्यक्ती, एखादी अवघड टास्क, तुमची नाळ नव्याशी जोडते, हळू हळू सूर जुळत जातात, एखादा विसंवादी इथेही असतोच. पण तसा तो सर्वत्र च असतोच हे मनोमन आपल्याला माहीत असते. इतके रुळून जाता तुम्ही त्या ठिकाणी, की काही काळानंतर सार्‍या गोष्टी अतिपरिचित, रूक्ष, त्याच त्या वाटू लागतात .....आणि मग सुरू होतो प्रवास पुन्हा एका बदलाच्या दिशेने.....

Tuesday, November 15, 2011

राम राज्य आणि प्रजा सुखी...............:(


सर्व सामान्य माणसाला चीड येणारी एखादी गोष्ट रोज केल्याखेरीज या सरकारला स्वस्थ बसवत नाही का? मुळात हे सरकार म्हणजे क्रिकेटच्या मैदानावर आलेला असा बॅट्समन जो स्कोर ही करत नाही आणि आउट ही होत नाही. भ्रष्टाचारात रूतलेले हे सरकार महागाई विरुद्ध एक पाऊल उचलत नाही, स्वतःच्या एअर इंडिया, इंडियन एअर लाइन्स सारख्या विमान कंपन्याना वाचवू पाहत नाही, पण त्या मल्या साठी मात्र धावत जाते. आणि कंपनी म्हणते त्याना आंतर-राष्ट्रीय खुल्या बाजारातून पेट्रोल घेण्याची परवानगी मिळावी. अरे....तिथे काय फुकट मिळणार आहे ?


नुरियल रुबानि सारखा अर्थ-वेत्ता जवळपास दररोज युरोपमधील घडामोडींवर भाष्य करतो, त्याची दखल आपले महान पंतप्रधान, अर्थ मंत्री घेताना दिसत नाहीत, किमान तेथील घटनांवर आपले मत ही व्यक्त करत नाहीत. आगामी काळात जर २००८ पेक्षा अधिक तीव्रतेची आर्थिक संकटे आल्यास आपण कसे तोंड देणार देवच जाणे. शहरांमधे जी समृद्धीची झुळूक ज्या आय टी क्षेत्रा मुळे आलेली आहे त्यांचा उत्पन्नाचा अधिकतम हिस्सा युरोप आणि अमेरिकेतून येतो. जर अशी परिस्थिती उद्भवली तर सरकार काय पाऊले उचलणार?


मागे एका शेअर घोटाळ्या बद्दल संसदेत बोलताना आपले महान पंतप्रधान जे तेंव्हा अर्थमंत्री होते असं म्हणाले होते की " अशा घटनांमुळे मी माझी झोप उडवून घेत नाही" आता तरी ती सीमा आपण गाठली का? महागाई, भ्रष्टाचार, खूंटत चालेला विकास- दर, आंतर-राष्ट्रीय घटना कशाचं म्हणून या सरकारला घेणं देणं नाही. इतकी दयनीय परिस्थिती आपली या पुर्वी कधी नसावी. अराजक म्हणजे यापेक्षा वेगळं काय असतं? आता म्हणे "राईट टू रेकोल" पण एकाला परत बोलावून दुसर्‍या कोणाच्या हाती बॅट सोपवायची? दूर दूर पर्यंत त्या आघाडीवर कोणी भरवशाचा फलंदाज दिसत नाहीत. ऑफीस मधे जसं आपलं दरवर्षी आॅप्रेज़ल असतं तशी काही व्यवस्था सरकार बद्दल ही हवी. गवर्नमेंट या शब्दात अपेक्षित असलेला " Governance"च जर सरकारने गमावलेला असेल तर त्याला "पिंक स्लीप" देण्यासाठी निवडणूक|नंची गरज भासू नये.



एकंदरीत आपल्या व्यक्ती, समाज, आणि देश यांच्या विचार धारेत आमूलाग्र बदल घडण्याची गरज आहे, आपल्या विचार प्रक्रियेत काहीतरी घोळ आहे, अनावश्यक त्या सार्‍या गोष्टी आपल्या साठी अतिमहत्वाच्या बनत चाललेल्या आहेत. सभोवती नजर टाका...टाइम्स मधे पाने च्या पाने फक्त व्हाईट गूड्स च्या जाहिराती दिसतील, मोबाइल जवळपास फुकट दरात, घरासाठी लोन मागायला जा १५ दिवस ते १ महिना लागू शकतो, पण कार साठी मात्र एका दिवसात ते मिळू शकतं. अशा अनेक निरर्थक गोष्टींमधे आपण आणि आपला समाज गुंतून पडला आहे. अनेक पट्ट्या आपल्या डोळ्यावर बांधल्या आहेत जसं की त्या काढण्याची नितांत गरज आहे आणि त्यापलीकडचं जग बघण्याचीही.



Sunday, October 30, 2011

दिवाळी आणि दिवाळखोरी.....


दिवाळी आणि दिवाळखोरी यांचा खूपच जवळचा संबंध असावा....दिवाळी नंतर येते ती दिवाळखोरी असा तो असावा. नाही आर्थिक दिवाळखोरीबद्दल नाही बोलत मी. बौद्धिक दिवाळखोरीबद्दल बोलतीये मी. तथाकथित बुद्धिजीवी वर्गाच्या दिवाळखोरीबद्दल. तशी आपण ती वैयक्तीक आयुष्यात अनेकदा दाखवूनही देतो पण सरकार आपल्याला ती जाहीररित्या व्यक्त करण्याची संधी देतं दर पाच वर्षांनी आणि या वर्षी अगदी दिवाळीत आणि दिवाळीनंतर लगेचच ती चालून आली आहे.


आजच वर्तमानपत्रात जाहीर झाल्याप्रमाणे, पुणे महानगरपालिकेने नेहरू योजने अंतर्गत फक्त एक प्रकल्प पूर्ण केला आहे आणि तरी ३ पूर्ण केल्याचा दावा पालिका करत आहे....मी राहते त्या भागात एक उड्डाण पूल गेली चार वर्षे रखडलेला आहे आणि म्हणे तो १५ नोव्हेंबर पर्यंत पूरा होईल....कसा तो देव जाणे. त्याच योजनेअंतर्गत एक कचरा गोळा करणारी एक गाडी फिरते, जी फक्त मोठ्या रस्त्यांवरून फिरते आणि छोट्या गल्लीतील कचर्याला कोणी वाली नाहीये. गेल्या निवडणूकांच्या पुर्वी बनलेला रस्ता गेल्या पाच वर्षात इतका खराब झाला आहे, इतक्या वेळा तो काही ना काही कारणाने खोदला होता की त्यावरून चालणे महामुश्कील. तुमचा जीव मुठीत घेऊन चालण्याची संधी देणार्‍या त्या सर्वांचे आपण आभार मानायला हवेत.अशाच एका रस्त्यावर या वर्षी गणपतीत एक भलं मोठं कारंज भर रस्त्यात बनवून, उरलेल्या छोट्याशा रस्त्यावर गाडी चालवण्याची कसरत करण्याची संधी एक नगरसेविका या वर्षी घेऊन आली. कदरच नाही आपल्याला त्यांची.


तुम्हाला कदाचित माहीतही नसेल की कोण तुमचा नगरसेवक /सेविका आहेत ते. पण पहा त्याना तुम्ही माहीत आहात.......... तुमच्या घरी गेल्या पाच वर्षात प्रथमच एक मिठाईचा बॉक्स त्यांच्याकडून आलेला असू शकतो. घरातील प्रत्येक माणसाच्या नावे एक ग्रीटिंग कार्ड आलेलं असू शकेल, घराजवळ फ्लेक्स बोर्ड वर दिवाळी शुभेच्छा ची बरसात झालेली असेल,पाच वर्षात पहिल्यांदाच त्यांच्या पैकी कोणी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला असेल.


एकंदरच ही राजकारणी मंडळी खूप हुशार......कोणाचं महत्व कधी आणि किती, कोणाला कधी गोंजारायचं, कधी विसरायचं यात सार्‍यानी मास्टर्स केलेलं. फक्त झोपडपट्टी किंवा गरिबांना नव्हे तर, त्याना तथाकथित मध्यम, उच्च मध्यम वर्गीय नोकरदार, बुद्धिजीवी वर्गाला ही चांगल्या प्रकारे वापरता येऊ लागलं आहे, आपली बौद्धिक दिवाळखोरी त्याना चांगलीच ठाऊक आहे. आपण आपले करियर, छंद यात मग्न. एखादी ऑनसाइटची संधी, एखादी सेदान कार, एखादं सेकेंड होम, घराबाहेर पडून मजेत घालवलेले वीकेंड्स, मुलं सो कॉल्ड इंटरनॅशनल स्कूल मधे शिकायला पाठवणे, आणि नंतर त्यानी बाहेर देशात सेट्ल होणं यात झाली...... आपल्या आयुष्याची इति पूर्तता.


आपण आपल्या मुलाना राजकारण, समाजकारण या गोष्टींकडे प्रयत्न पूर्वक वाळवणे तर खूप दूरची बाब....आपल्या पैकी किती जण तो आलेला गिफ्ट बॉक्स नाकारू शकले, किती जण दिवाळी पहाट च्या कार्यक्रमवर बहिष्कार घालू शकले, किती जण दारी मत मागायला दारी आलेल्या नगरसेवकास " बाबारे, गेली पाच वर्षे तू कुठे होतास आणि गेल्या पाच वर्षात तू या भागासाठी, इथल्या विकासासाठी काय केलेस? तू खरच भ्रष्टाचारमुक्त राजकारण केल्याचे काही पुरावे आहेत काय? गेल्या पाच वर्षात तुझया आणि तुझया कुटुंबाच्या संपत्तीत किती पट वाढ झाली? आणि त्याचा उत्पन्न स्त्रोत कोणता?" असे प्रश्न विचारू शकतील.


जाऊ दे हो हे सारे....नुकतीच मस्त दिवाळी साजरी झाली आहे, मोठी खरेदी, कपडे, फराळ, पाठोपाठ एक मस्त ट्रिप....कुठे असा विचार करून डोक्याला ताण देताय....त्यापेक्षा एक ठप्पा उमटवून किंवा मतदान न करून कोण्या एका नाकर्त्या पक्षाला सत्ता देऊन आपण आपली बौद्धिक दिवाळखोरी प्रदर्शित करण्याची चालून आलेली संधी साधू.

Monday, October 24, 2011

वाढदिवस

खरं तर प्रत्येकासाठी हा एक आनंद दिन असतो अशी माझी कल्पना आहे. मी अनेकदा अनेकांचे वाढदिवस विसरले आहे. अगदी काल रात्री पर्यंत लक्षात होता पण आज मात्र साफ विसरून गेले असं अनेकदा घडलं आहे. आणि अनेकांच्या रोषाची मी धनी झाले आहे. पण कोणी आपलाच वाढदिवस विसरतो, यावर मात्र माझा अजिबात विश्वास नाही.


मी देखील खूप आतूर असे या दिवसासाठी. पण आजकाल काहीतरी बिनसलय...मला तो दिवस जसा जवळ येऊ लागतो तसं एक अनामिक भीती वाटू लागते. काही लोकांच्या शुभेच्छा, फोनची मी एकीकडे वाट बघत असते, आणि दूसरीकडे अशावेळी काय बोलावे अशी भीती वाटत असते. त्यामुळे त्यानी तो विसरावा अशी मनोमन प्रार्थना करत असते. फोन आणि प्रत्यक्ष भेटणार्‍या व्यक्तींशी त्या दिवशी बोलताना मी खूप अवघडलेली असते. घरी दुसर्‍या कोणी स्पेशल जेवण मॅझयासाठी त्यादिवशी बनवायच्या भानगडीत पडलं तर माझा ठाम विरोध असतो, आणि मी स्वत:पण त्या दिवशी काही स्पेशल बनवायच्या विचारात नसते. बाकी घरातील सगळयांचे वाढदिवस मी प्लान करते, काहीतरी सरप्राइज़ असतं, काहीतरी त्यांच्या आवडीचे जेवण बनवते. इतर कोणाचा वाढदिवस असेल तर(लक्षात असेल तर) फोन करते गप्पा होतात. पण माझा वाढदिवस असेल तर मात्र यातलं काहीच मला नकोसं होतं. गप्प बसून असावे, फारसं काही बोलू नये, एखादं आवडीचं पुस्तक हाती असावं, आवडीचं संगीत हळूवार गुंजत असावं, साधसं काही जेवण असावं बस...अजून काही नको.

काही वर्षांपूर्वी मी माझी सोशल नेटवर्किंग प्रोफाइल डेलीट केले होते. त्यामुळे या दिवशी येणार्‍या फोन मधे निम्म्याने घट झाली, आणि मला हुश्श झाले. बाकी इतर वेळी मी इतकी गप्पिष्ट आहे पण या दिवसाच्या अवघडलेपणा मी काही कमी करू शकले नाहीये. तो एक दिवस कॅलेंडर वरून डिलीट व्हावा.


कळतं पण वळत नाही........

आज सकाळी उठून चहाचा मग घेऊन नेहमीप्रमाणे टेरेसमधे गेले, इतकी मस्त थंडी पडली होती.....अजून दिवाळी सुरू नाही झाली त्यामुळे हवाही प्रदूषीत नव्हती. मनात विचार आला, आता सकाळी चालायला जायला सुरूवात करायला हवी. पावसाळा संपला...आता न जाण्यासाठी काही कारण नाही.



....नाही नाही......कारणं अशी संपत नाहीत...खूप थंडी आहे, उन्हाळा आहे, काल रात्री खूप उशिरा घरी आले, काम खूप आहे, अभ्यास करायचा आहे, पाहुणे आहेत....न संपणारी कारणे. कशा ना काही गोष्टी आपण मनापासून टाळतो? आजकाल रोज दिवसभरात अनेकदा माझया मनात येतं.....उद्यापासून जिम, चालणे, योगा काहीतरी सुरू करेन....पण तो उद्या काही उजाडत नाही. काही तरी कारण सापडताच न जाण्यासाठी.


१ तारखेपासून, सोमवारपासून, नवीन वर्षाचा असे अनेक संकल्प करून झाले, गेल्या वर्षी या तीन्ही गोष्टी एकाच दिवशी जुळून आल्या पण माझा संकल्प जिथल्या तिथेच.अशी न आवडणार्या कामांची माझी एक मोठी लिस्ट आहे. जसं की जेवणानंतर टेबलाची आवाराआवारी, बँकेत जाणे, वाढदिवसाच्या दिवशी येणार्‍या फोनवर बोलणे, तसा अधूनमधून त्यांचा क्रम बदलत राहतो, पण व्यायाम कायम आपले प्रथम स्थान टिकवून आहे. किती प्रयत्न करून झाले, किती जिम ना देणग्या देऊन झाल्या पण नाही ती आवड मी काही केल्या निर्माण नाही करू शकले. मग कधीतरी समर्थन बुद्धिजीवी असण्याचं. कळतं पण वळत नाही, याचं यापेक्षा उत्तम उदाहरण दूसरं मिळणार नाही.

Thursday, October 20, 2011

आली दिवाळी....


दीपावली ३ दिवसांवर येऊन पोहचली, अजून मी घरात एकही फराळाचा पदार्थ बनवला नाही. काल रात्री उशिरा घरी पोहचले, बिल्डिंग मधे शिरताना सहज वर लक्ष गेलं, एका घरी आकाशकंदील लागला होता, विचार आला अरे बापरे अजुन आपण याचा विचारच केला नाहीये. आता या सार्‍या गोष्टींसाठी वीकेंड ची वाट पाहावी लागणार, किती कामे ठेवली आहेत त्या दोन दिवसांसाठी!

घरात शिरले समोर लक्ष गेलं, आणि चकित झाले, घर उजळून गेलं होतं, टेरेसभर चांदण्या उजळल्या होत्या. छोट्या छोट्या गोष्टी किती आनंद देऊन जातात नाही? मग आठवत राहिली लहानपण ची दिवाळी. किती आधीपासून त्याचे वेध लागायचे. कारण घरात फराळाची तयारी सुरू होत असे, पणत्या शोधून ठेवल्या जात, आकाशकंदील नवा बनवला जात असे, मला किल्ला करायला खूप आवडत असे. आम्ही जिथे राहत होतो तिथे मी एकमेव मुलगी होते जिला किल्ला करण्यात इँटेरेस्ट होता. खूप मजा वाटायची त्यात मला. ती सवय आजही टिकून आहे .....आता मी किल्ले मनातल्या मनात बांधते.

आईने लाडूसाठी पाकात टाकलेला रवा, खवा वाटीत घेऊन खायला खूप आवडायचं मला....पण मिळायचं नाही कारण नैवेद्य दाखवायचा असायचा. कपडे खरेदी हा एक आवडता उद्द्योग....तसा तो आज ही आहे..... पण आता ती मजा वाटत नाही. माझे बाबा खूप सारे फटाके घेऊन यायचे, त्याची तिघात वाटणी होत असे. मग त्यात शेवटी भांडभांडी होत असे. सर्वात जास्त फटाके मी उडवत असे. दोन वेळा फटक्या मुळे भाजल्यावर देखील. नारकचतुर्दशीच्या दिवशी पहिली माळ कोण लावणार अशी चुरस असे. खरच इतक्या सकाळी उठत असू की सकाळी ७ पर्यंत तेल, आंघोळ, फटाके, फराळ सगळं होत असे.....मग पर्वती चढायला जाण्याचा कार्यक्रम. इतकी मजा यायची.

लगेच नंतर आजीकड़े जात असू. आजकाल बोलावल्याशिवाय सख्खे नातेवाईकही एकमेकांकड़े जात नाहीत.
आता सगळं बदललं. सार्‍या गोष्टी पैशाने उपलब्ध झाल्या, वेळ दुर्मिळ झाला.आता पर्यावरणाच्या नावाखाली फटाके बंद झाले. फराळाचे पदार्थ सतत घरात दिसू लागले, आणि सारी मजा हरवून गेली.




Tuesday, October 18, 2011

सुनीताबाईं

आठवतं ते अनेक वर्षांपूर्वी जेंव्हा सुनीताबाईंचं " आहे मनोहर तरी" पुस्तक नुकतच प्रकाशित झालं होतं, कॉलेज च्या मासिकात त्यावर मी एक लेख लिहिलेला होता...तो आता नीट आठवत नाही. पण तेंव्हापासून त्या मझयासाठी मॉडेल बनल्या मॅझयाही नकळत. आज पुन्हा एकदा ते पुस्तक पुन:प्रत्यायचा आनंद तर देतच पण अनेक त्यांच्या आचार-विचारांच्या पाऊलखूणा मी मझयात पाहू शकते अगदी त्यांच्या आईच्या देखील.



"आहे मनोहर तरी गमते उदास" अशी मनाची स्थिती अनेकदा होते, अनेकदा माझी मी नसतेच अशी अवस्था, कोणी आसपास असू नये, कोणी बोलू नये, डिस्टर्ब करू नये, फक्त स्वत:चाच स्वत:शी संवाद चालू राहावा...वेगवेगळे आठवणींचे पक्षी सतत मनात पिंगा घालत असतात, कधी हवेसे, तर कधी नकोशा आठवणी. जगापासून तुटक राहायला मनापासून कधी कधी आवडत्न मला. तसाच जीवन मूल्य जपायला. याच धारेत मी जगापासून दुरावते...पण त्याचीही खंत फारशी वाटत नाही मला.

नाती निभावणे तसं सोपं कधीच नसतं आणि त्या व्यक्तींसाठी ज्या सूक्ष्म विचार करून प्रत्येक गोष्ट करतात त्यांच्याकरिता तर ती एक तारेवरची कसरत बनून राहते. पु. ल. सारख्या व्यक्तीची सहचरि बनणं हे तर नक्कीच साधा सुधं काम नव्हतं.अनेक रोष पत्करून त्यानी ते निभावलं. आपल्याच जवळच्या व्यक्तींकडे इतकं तटस्थपणे पाहणं, त्यांच्या गुण-दोषांसह त्याना स्वीकारणं आणि असं करताना आपल्यातलं वेगळेपण तरीही जपणे. अजून एक गोष्ट त्या काळातच परिणाम करून गेलेली होती ती म्हणजे आयुष्यावर ठसा उमटवणार्यांच्या बद्दल ऋण व्यक्त करण्याची त्यांची सवय.... नेमक्या व्यक्त केलेल्या त्यांच्या भावना, उगीच कोणताही खोटा मुलामा न चढवता......बोरकर, जी. ए., आई, आप्पा, सासूबाई, अगदी भाई सुद्धा सुटले नाहीत यातून. सोप्या नसतात या गोष्टी. ह्या खूप भावतात मला. आयुष्यात भेटलेल्या आणि न भेटलेल्या अनेक व्यक्ती कळतनकळत तुम्हाला घडवतात. सुनीताबाईंचा वाटा त्यात थोडा जास्तच.



"संधिप्रकाशात अजून हे सोने, तो माझी लोचने मिटो यावी" ही सुनीताबाईंच्या आवडत्या बोरकरांची कविता तर पु. लं च्या ओठी नसेल ना?

Wednesday, October 12, 2011

छोट्या छोट्या गोष्टी

अनेक दिवस मोबाईलचं बिल नवरा भरत असे आणि आजकाल मी अचानक प्रीपेड वापरायला सुरूवात केली आणि मला दरवेळी रीचार्ज करावा लागू लागला. मग मला नवीन शोध लागू लागले. एक वेबसाइट सापडली, जिच्यावरून मोबाईल रीचार्ज विकत घेतला की मग तितक्याच रकमेचे दुसर्या कोणत्यातरी प्रॉडक्ट चे डिसकाउंट कूपन मिळते. मला मजाच वाटली. पण हे दुसरे प्रॉडक्ट म्हणजे सार्‍या चैनीच्या गोष्टी. डॉमीनोस पिझा, मॅक, फर्न अँड पेटल्स असे. ते डिसकाउंट मिळवण्यासाठी आधी एका मोठ्या रकमेची त्या प्रॉडक्ट ची खरेदी करायची आणि मग खूश व्हायचं डिसकाउंट मिळवल्याबद्दल. तोच मोबाइल रीचार्ज मी विकत घेऊ शकते समोरच्या छोट्या दुकानातून. पण नाही इंटरनेट च्या युगात आहोत ना आपण.


सुरुवातीला मी पण याच मताची होते की मस्त स्कीम आहे ही. आणि जेव्हा असा काही मला खरेदी करायचं असेल तेंव्हा असं डिसकाउंट वापरण्यात काय चूक आहे? पण तसं होत नाही. अनेकदा माझयाकडे ही कूपन्स आहेत म्हणून आपण खरेदी करतो.


शेअर्स कोणते खरेदी करावे याच्या लिस्ट मधे मी नेहमी एक नाव घेते, ज्यूबाइलंट फुड्स जी कंपनी डॉमीनोस पिझा चेन चालवते....आता बघा जी कंपनी १०० रुपयात बनतो असा पिझा आपल्याला ४५० रुपयात विकते, आणि आपण सारे तो विकत घेतो. किती काळजी आपल्याला त्या कंपनीच्या प्रॉफिट ची. मग का नाही आपण ही तिचा प्रॉफिट शेअर करू?


मला मी त्या चंगळवादी संस्कृतीचा भाग आहे याचे वाईट वाटते. लोकांना अधिकाधिक रक्कम या गोष्टींवर खर्च करायला लावा. भाजी घेताना रुपयासाठी हुज्जत घालणारा आपला समाज या बाबत कधी आवाज उठवत नाही. ग्लोबल होताना आपण जास्तीत जास्त कमवायला लागलो, जास्तीत जास्त खर्चही करू लागलो आणि ब्रँड, इंटरनॅशनल च्या नावाखाली अशा कंपन्यांचे खिसे भरू लागलो. पण असं करताना मी त्या छोट्या दुकानदाराचं तुटपुंजे उत्पन्न अजून कमी करतीये हे आपल्या लक्षात कधी येणार? थोडा विचार जागतिकीकरणाच्या दुष्परिणामांपासून आपल्याला वाचवू शकतो.

Tuesday, October 11, 2011

भविष्यात डोकावताना

परवा एक सुरेख मैफल रंगली होती गप्पांची! अचानक आमची गाडी मुलांच्या शाळा आणि त्यापायी मोजावे लागणारे लाखो रुपये यावर घसरली. मी या मताची होते की वय वर्ष ३ असताना तुम्ही अशा रीतीने खर्च करता त्यांच्यावर तेंव्हा आपोआप तुम्ही तुमच्या अपेक्षा त्यांच्यावर लादू लागता, प्रत्येक गोष्ट सहजगत्या त्यांच्या हाती देऊन, काही मिळवल्याचे सुख त्याना कधी गवसत नाही. या ओघात मी असं म्हणाले की काही वर्षानंतरची परिस्थिती मला खूप भीषण भासते आहे. पण म्हणजे नक्की काय?


याच आमच्या ग्रूप मधे एक जोडपे आहे, काही वर्षांपूर्वी लग्न झाले, आईवडिलानी घरदार बांधून ठेवलेले, हे दोघे दोन वेगवेगळ्या सेक्टर मधले, ती आय टी वाली..... गेल्या दोन वर्षात त्यानी दोन घरे विकत घेतली....गुंतवणूक म्हणून. मी अशी तर समाजवादी कधी नव्हते, पण या एका बाबतीत मला तो भावतो. काय आयुष्य करून घेतलाय आपण....नोकरी मिळताच पहिला विचार सुरू होतो तो घराचा. आई बापाने सोय केलेली असली तरी. मग लग्न होतं कमवती बायको येते, १५ वर्षांसाठीचं लोन ७/८ वर्षात संपून जातं, मग आपण म्हणतो आता मी मॅझया मुलासाठी पण एका घराची सोय करू पाहतो, तो पर्यंत आई बापाचं घर ही रिकामं झालेलं असतं, तरी आपण घराचाच विचार करतो.


मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला तर किमती वाढतात या अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे सदैव गगनाला जागांच्या किमती. आणि घर या गोष्टीकडे गुंतवणूक म्हणून पाहणारे आपण. काही काळानंतर गरीब आणि श्रीमंत यातील ही दरी इतकी वाढलेली असेल की श्रीमंत किंवा आपण तथाकथित मध्यमवर्गीय माणसाना आपणच कमावलेली संपत्ती संभाळताना नाकी नाउ येतील.


त्या एका गरीबाला विचारा काय कष्ट आहेत, एक वन रूम किचन चे स्वप्न बघून ते साकारताना. कुठे तरी हे कष्ट करून कमवायची लिमिट संपेल, आणि त्याचा उद्रेक होईल....."पा" मधील दृष्य आठवा, सारे गरीब संपादकाच्या घरात घुसलेले. काही वर्षांनंतर अशी परिस्थिती खरोखर उद्भवली तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही मला.


हाच पैसा आपण काही वेगळ्या सेक्टर मधे नाही का गुन्तवू शकणार? जर खरोखर आपल्याकडे गरजेपेक्षा खूप जास्त पैसा असेल तर दोघांपैकी कोणी एक फक्त मुलांकडे नाही का पाहू शकणार? सो कॉल्ड ग्लोबल शाळेत शिकणारी आपली मुलं खरच जागतीक स्पर्धेला तोंड देण्यासाठी तयार होत आहेत का? वाटत नाही मला असं. बाइक ला पैसे हवे म्हणून आजीचा खून करणारा, भन्नाट वेगाने गाडी चालवून मृत्यूला जवळ करणारा आझरुद्दींचा मुलगा, अशी अनेक उदाहरणे आसपास दिसतील. वयाच्या ५व्या वर्षी फेसबूक वर पडीक राहणारी तासन्तास मोबाइल वर गप्पा छाटात असलेली, जंक फुडवर पोसली जात असलेली, शाळेत जाताना काही हजारो रुपये पॉकेटमनीं म्हणून खर्च करणारी ही पिढी काय मूल्य घेऊन जगणार आहे, कष्टाचं मोल कधी जाणू शकतील ते? समवेदना म्हणजे काय हे अनुभवलं असेल त्यानी? एकीकडे अशी कमकुवत मूल्य घेऊन जगणारी आपली मुले नि दुसरीकडे असुया, चीड, द्वेष मनात बाळगणारा एक मोठा समाज. स्फोटक असेल परिस्थिती.

Monday, October 3, 2011

कोठे गेली ती गावे, ती राने त्या वस्त्या?

परवा एका एन जी ओ मधे जाताना लक्षात आले की या रस्त्यावरून आपण यापूर्वी गेलो होतो. एक सहा सात वर्षांपूर्वी कदाचित. पण आता तो भाग ओळखू येवू नये इतका बदलला होता. पुर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणारी हिरवाई नाहीशी होऊन सिमेंट चे जंगल उभे राहीले होते. हा बदलाचा वेग फार जबरदस्त आहे. आपण शहरीकरणा साठी खूप काही गमावतो आहे. आपली अशी संकल्पना काही काळापर्यंत होती की शहराच्या बाहेर गेला की निसर्गरम्य गावे, शेते दृष्टीस पडतात. पण आता कदाचित यात बदल करावा लागेल, आणि शहराच्या बाहेर पडल्यावर दुसरे शहरच लागते असे म्हणावे लागेल. ज्या रस्त्याचा वर उल्लेख केला तो माझया ऑफीस जवळच आहे. हे आय टी पार्क जिथे वसलेलेआहे त्यात ही मधे मधे येथे पुर्वी एखादे गाव वसलेले असण्याच्या काही तुरळक खुणा आढळतात. मग गेलं कुठे हे गाव, इथली वस्ती इथले उद्द्योग? या आय टी पार्क ने इथल्या तमाम लोकाना रोजगार दिला का? नाही. अचानक जमिनीला सोन्याचा भाव आलान, टाकल्या विकून मग. मोठे मोठे कॉंप्लेक्स उभे राहीले, यांच्या दारात एस यू व्ही उभ्या राहिल्या. पैशाची काही किमत राहिली नाही. याचं एक उत्तम उदाहरण नुकतेच पाहिलेले.


मी ड्रेस शिवायला टाकण्यासाठी दुकानात गेले होते. माझया आधी तिथे २ मुली होत्या. साधारण गाववाल्या वाटणार्‍या. एक मोठी गाडी चालकासह बाहेर उभी होती. किमान १ तास वेगवेगळ्या फॅशन त्या ड्रेस मधे सुचवून त्याना त्या पसंत पडत नव्हत्या. शेवटी अनेक फॅशन मासिके चाळून त्यानी कसा ड्रेस शिवायचा ते नक्की केला. मी वैतागले होते हा प्रकार पाहून. त्यांचा संपल्या शिवाय टेलर दुसर्या कडे वळणार नव्हता. त्याने त्यांच्या सर्व गोष्टी चा बिल केलं रु.१०४५ ...एका ड्रेसची शीलाई! तसं मटेरियल ही अगदीच साधा वाटत होतं, म्हणून त्या गेल्यावर मी कापडावरचा प्राइस टॅग पहिला तो होता रु. ३२५/- फक्त. आता बोला.


एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरीकरणाची आपल्याला खरंच गरज आहे का? अशी वेळ काही वर्षानंतर येणार तर नाही ना की अन्न धान्य आपण १००% आयात करू आणि तरीही महासत्ता होण्याची स्वप्ने पाहू. शेत, हिरवळ हे सारं आपल्या पुढच्या पिढ्या चित्रात पाहतील नाहीतर भरपूर पैसे खर्च करून एखाद्या पर्यटनस्थळीच पाहू शकतील. देवा, तो दिवस बघायला मला या जगात ठेवू नकोस रे बाबा. :(

Friday, September 16, 2011


विचारू नका कवीला त्याच्या कवितेचे मूळ,
नसतात ते नुसते शब्द, असते ती भळभळती जखम
कोणाची एक नजर, एक हाक, एक आठवण पुरेशी
पण आनंदाने उरी जपावे असे वार फारच थोडे असतात नाही

Wednesday, September 7, 2011

कोण्या देशीचे पाखरू


मी काही दिवसांपूर्वी ब्लॉगवर लिहिलेल्या कवितेला, माझया ऑफीस ब्लॉग वर मिळालेले हे उत्तर. मूळ कविते इतकच सुंदर!

कोण्या देशीचे पाखरू उतरले मनाच्या अंगणात
बांधले घरटे जमवूनि काडी काडी
नाचले बागडले मनमुक्त विहरले
व्यापून टाकले सारे अवकाश त्याने

मी ही वेडी सुखावले
वाटले हे सारे आपुल्यासाठीच
हे घरटे त्याचे नि माझे,
फुलवलेला पिसारा ही माझ्याचसाठी

अंगणात वेचायचे दाणे संपले कदाचित
जन्माच्या शपथा बांधू नाही शकल्या
मोडून घरटे निघाले पाखरू
आता कशी मना सावरू


अधीश गोखले-


वेचावयाचे दाणे, अनेक होते,
बंध युगांचे, बांधेलच होते,
तरीही निसर्गाचे, नियम अनेक,
पालन कराया, पाखरू उडाले,

ऋतू बदलला, गारेगार झाला,
घरटे मोडुन पक्षी उडाला,
त्याच्या स्वत:च्या स्वप्नांच्या गावी,
जिथे उन्हाची ऊब असावी,

येईल उन्हाळा तेव्हा परतेल,
काड्या जमवूनी, घरटे करेल,
पुन्हा आनंदे, फुलवेल पिसारा,
वाहतील आनंद अश्रूंच्या धारा

Tuesday, August 30, 2011

उगाच काय ग छोट्या-मोठ्या गोष्टींवरून इतके वाद?


संदीप खरे माझा अजून एक खूप आवडता कवी. त्याचा माझयाकडून असा एकेरीत उल्लेख ऐकला की माझा एक मित्र मला चिडवतो "संदीप अगदी आपल्या घरचाच आहे नाही?" साध्या सोप्या शब्दात तुमच्या भावना तुमच्या पर्यंत तोच पोहचावतो. तुम्ही जगलेले क्षण तो तुमच्यासमोर असे काही उभे करतो आणि तुम्ही विचार करत राहता "अरे, हे तर माझेच अनुभव, अगदी अचूक कसे याने शब्दात पकडलेले?" खरच बाप माणूस आहे तो.


मला कधीतरी कविता जन्माला येते ती कशी हे खूप जवळून अनुभवायचं आहे. माझया विश-लिस्ट वर एक गमतीशीर गोष्ट आहे. देवा पुढचा जन्म माणसाचा असेल तर या माणसा सोबत तो असू देत...कोणत्याही नात्याने चालेल...........त्याची सर्वात जवळची मैत्रीण असो, त्याची बायको म्हणून असो, बहीण म्हणून असो अगदी त्याची मुलगी म्हणून सुद्धा चालेल. त्याच्या कविता त्याच्याच शब्दात ऐकणे हा तर एक सुरेख अनुभव असतो. असं वाटतं की लय या कवितेतच आहे, संगीतकाराला फारसे कष्ट त्यावर घ्यावे लागत नसतील.


मी मला खूप नशीबवान समजते की अशा मातीत मी जन्माला आले.....की जिथे कला, साहित्य. संस्कृती यांचा उत्तम संगम आहे. खूप मोठा वारसा आपल्यापाशी आहे. किशोरी ताइंचं, जसराजांचं गाणं, गुरुदत्त वहिदा यांचा अभिनय, रेहमान, पंचम, सलील चौधरी असे एक से एक सरस संगीतकार, गुलजार ते तर चिरतरुण आहेत. बा. भ. बोरकर,शांताबाई, कुसुमाग्रज,सुरेश भट असे अनेक कविवर्य, लता,आशा, रफी यांचे गुंजणारे सूर, कुमार गंधर्वांचे निर्गुनि भजन गाताना लागलेला सूर..........प्रत्येक गोष्टीने भारून गेलीये मी. या पैकी अनेकाना मी कधी प्रत्यक्ष पहिलं किंवा प्रत्यक्ष ऐकलेले नाही तरीही....


तोच वसा मला माझया पिढीत काहीजण चालवताना दिसतात जसं की राहुल देशपांडे, संजीव अभ्यंकर, संजीव चिमलगी, वैभव जोशी, सलील कुलकर्णी आणि संदीप. त्याचीच एक अत्यंत अर्थवाही आणि प्रवाही देखील कविता...................


उगाच काय ग छोट्या-मोठ्या गोष्टींवरून इतके वाद?
उगाच काय माझ्यासकट जगण्याचाही सोडतेस नाद?


मी, तू, जगणे, पृथ्वी कुणीच इतके वाईट नाही
अधीरपणावाचून इथे दुसरे कोणी घाईत नाही


अगं विरस व्हावा इतके काही उडाले नाहीत इथले रंग
स्पेशल इफेक्टशिवायसुद्धा शहारून येऊ शकते अंग


अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत
अजून तरी दाही दिशा आपल्या आपल्या जागी आहेत


पैसे भरल्यावाचून अजून डोळा तारे दिसत आहेत
झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत


अजूनतरी कर नाही आपले आपण गाण्यावर
सा अजून सा च आहे , रे तसाच रिषभावर


अजून देठी तुटले फूल खाली पडते जमिनीवर
छाया पडता पायाखाली, सूर्य असतो डोईवर


स्पॉन्सर केल्यावाचून अजून चंद्र घाली चांदडभूल
अजून कुठल्या वचनाशिवाय कळी उमलून होते फूल


सागर अजून गणती वाचून लाटेमागून सोडी लाट
अजून तरी कुठलीच जकात घेत नाही पाउलवाट


थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन
पाउस पडता अजूनसुद्धा माती हसते आनंदून


काही काही बदलत नाही…. त्वेषाने वा प्रेमाने
जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने


आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही
आणि इतक्या लवकर होईल प्रलय असे काही वाटत नाही

Saturday, August 27, 2011

आये कुछ अब्र कुछ शराब आये...........


ऑफीस मधे माझया बाजूच्या क्यूबिकल मधे एक महान आत्मा बसतो. एक गमतीदार व्यक्तिमत्व आहे ते. एखादी गोष्ट तुम्हाला गूगलवर सापडत नसेल तर फक्त त्याला सांगा...अर्ध्या तासात तो तुम्हाला ते मिळवून देणार. एखादी मैफील तुम्हाला आठवते आहे आणि त्याचा रेकॉर्डिंग मिळत नाहीए, त्याला सांगा... आणि असं असतानाही आमच्यात खूप कमी संवाद होता. 


सद्ध्या ऑफीस मधे माझी सामानाची बांधा बांध सुरू आहे :) त्यामुळे मी काही डेटा त्याला ट्रान्स्फर करत होते. त्यात त्याला एक  फराझ नावाचं डॉक्युमेंट दिसलं, आणि आमच्यात संवाद सुरू झाला.त्याच्या कडे असंख्य गाणी आणि गझलांचा खजिना आहे. तो जगजितसिंग यांचा शिष्य आहे. असं अनेकदा घडतं, की आपल्या जवळच्या बरोबर संवाद नसतो आणि फेसबूकवर मात्र आपण शेकडो मित्र मिरवत असतो. तसंच काहीसं हे देखील! बोलता बोलता क्षणात त्याने जवळपास 8 जी बी चा डेटा मला ट्रान्स्फर केला, ज्यात मेहन्दी हस्सन आहे, मदन मोहन आहेत, जयदेव आहेत. त्यापैकीच एक गझल फैज अहमद फैज यांची....मेहन्दी हस्सन यांच्या आवाजातील....खूप सुंदर आहे....


आये कुछ अब्र कुछ शराब आये
उसके बाद आये जो अज़ाब आये


बाम-ए-मीना से माहताब उतरे
दस्त-ए-साक़ी में आफ़ताब आये


कर रहा था ग़म-ए-जहाँ का हिसाब
आज तुम याद बेहिसाब आये


हर रग़-ए-ख़ूँ में फिर चराग़ाँ हो
सामने फिर वो बे-नक़ाब आये


उम्र के हर वरक़ पे दिल की नज़र
तेरी मेहर-ओ-वफ़ा के बाब आये


इस तरह अपनी ख़ामुशी गूँजी
गोया हर सिम्त से जवाब आये


'फ़ैज़' की राह सर-ब-सर मंज़िल
हम जहाँ पहुँचे कामयाब आये

Saturday, August 20, 2011

चळवळी, आंदोलने, उपोषणे आणि आपण...................


गेले काही दिवस सर्वत्र फक्त अण्णा अण्णा आणि अण्णा असं वातावरण आहे. ऑफीस मधे बुलेटिन बोर्डवर फक्त हाच एक विषय आहे. अचानक सर्वत्र चैतन्य पसरल्यासारखं मला वाटत आहे. असं काही जेंव्हा समाजात घडत असतं तेंव्हा लोकांच्यात काहीतरी संचारते. कदाचित माणसाच्या सामाजिक असण्याच्या गरजा यातून भागवल्या जातात. अनेकानी मला विचारलं की इतकं सारं चालू असताना तुझयाकडून काहीच प्रतिक्रिया कशी नाही? तू खरच इतकी कामात व्यग्र आहेस का? नाही...... असं काही नाहीये. खूप सजगपणे मी या सार्‍या घटना बघू इछिते. या सार्‍या गोष्टींकडे बघण्याचा माझा एक दृष्टिकोन आहे.

एक जन लोकपाल विधेयक जादू ची कांडी बनेल आणि सारे प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही. गरज असणार्‍या अनेक उपायातील तो एक घटक आहे. ही चळवळ योग्य की अयोग्य याबाबत मी काही बोलणार नाही. परंतू एखादी चळवळ उभी राहताना तिच्यातून काय मिळवायचा प्रयत्न आहे हे जसं नक्की माहीत हवं तसच ती गोष्ट मिळवल्यानंतर काय? याचं ही उत्तर खूप सुस्पष्ट असायला हवं.पुढचा मार्ग खूप सुस्पष्ट नजरे समोर हवा आणि सर्व समाजाला सोबत घेऊन त्या वाटेवर चालू शकेल असं भरभक्कम नेत्रुत्वही! कदाचित याच गोष्टीचा अभाव स्वातंत्र्य चळवळीतही होता. स्वातंत्र्य मिळालं, पण पुढे हा देश कसा चालवणार आहोत, समाज कसा घडवणार आहोत, परराष्ट्र व्यवहार कसा असणार याबद्दल कदाचित सर्वसमावेशक असा विचार नव्हता झाला. ज्याची फळे आज आपण कदाचित भोगत आहोत. नाहीतर ६४ वर्षानंतरही आपण मूलभूत प्रश्ञांमधेच अडकून नसतो पडलो, शिक्षण, जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद आणि भ्रष्टाचार हे सारे प्रश्न आजही आपल्याला भेडसावत नसते राहीले. माझा काही अनुभव असं सांगतो की हे सारं तत्कालीक असतं. गतनूगतिकोलोके असे अनेक जण त्यात असतात, चळवळ खूप मोठी भासते अन् नंतर भक्कम असं काही प्रत्ययास येत नाही.

भ्रष्टाचार ही एका दिवसात किंवा एका सरकारच्या काळात लागलेली कीड नाही. गेले ६४ वर्षात हा वृक्ष पसरलाय. अती उच्च पातळी वरुन थेट तुमच्या आमच्या पर्यंत त्याचा फैलाव आहे. आपल्या सगळ्यांचा भ्रष्टाचाराला विरोध आहे; पण बरेचदा तो विरोध मला एकांगी वाटतो. भ्रष्टाचाराला विरोध करताना; आपणही आपलं काही नुकसान करून घेण्यास तयार आहोत का? म्हणजे एका सरकारी कार्यालयात काही काम आहे, जे नाही झाले तर माझ काही नुकसान होऊ शकतं आणि ते होण्यासाठी तेथील कर्मचारी लाच मागत आहे, तर नुकसान सोसून भ्रष्टाचाराला आपल्यापैकी कितीजण विरोध करतील? उदाहरण घ्या एका बांधकाम व्यावसायकचं भली मोठी रक्कम एका जमीनीच्या तुकड्यात गुंतवल्यानंतर बांधकामास लागणारी परवानगी मिळवण्यासाठी लागणारी लाच सरकारी कार्यालयात न देणे त्याला किती काळ परवडेल?

हळूहळू मी या मतापर्यंत येऊन पोचलीये की समाज म्हणून आपला ह्रास गेल्या ६४ वर्षात खूप वेगाने झाला आहे. विकास, इंडिया शाइनिंग हे सारे फार पोकळ शब्द आहेत, त्यातून लौकिक अर्थाने आपण काही  थोडंफार मिळवलंही असेल पण मूल्यं मात्र आपण गमावली आहेत. तक्रार घेऊन पोलीस चौकीत जा, छोट्या कामाकरिता सरकारी कार्यालयात जा, लाच न देता काम करून घेणे म्हणजे तो कपिलाषष्ठीचा योग असायला हवा. हे लाच मागणारे तुमच्या आमच्यापैकीच एक असतात. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी जिथे लाच मागितली जाते, वारस म्हणून नाव लावून घेण्यासाठी जिथे लाच मागितली जाते, ती समाजातील कीड आहे. ती ही आंदोलनं करून संपणार नाही. घराघरातून समाजाच्या सर्व स्तरातून मुल्य संस्कारांची गरज आहे. या आंदोलानातून ते घडतील असं मला वाटत नाही.  फक्त उपदेशातून समाजाची मूल्य बदलणार नाहीत; जोपर्यंत आपल्या सर्वांना मुल्य शिक्षणाची गरज पटणार नाही तोपर्यंत काही मोठे बदल दिसणार नाहीत. मग या मूल्य शिक्षणाची सुरूवात माझयापासून, माझया घरापासूनच व्हायला नको का? पण ते हक्क मी तेन्व्हाच गमावले आहेत जेंव्हा मुलाचा जन्मतारखेचा दाखला मी लाच देऊन मिळवलाय, लाखभर रुपये जादा देऊन मी त्याला शाळेत घातलाय, मॅनेज्मेंट कोटयातून का होईना मी त्याला इंजिनियर वा डॉक्टर करायची स्वप्ने पाहतोय; आणि ही सारी माझी गुंतवणूक तो दाम दुपटीने तो वसूल करेल या आशेवर.

सगळ्यांना माहीत असतं ना कायदा नावाची एक गोष्ट आहे ते....तरीही गुन्हे घडतातच, कारण आपला बेकायदेशीर गोष्टींवरचा विश्वास खूप दृढ होत चाललाय. भक्कम कायदा सुव्यवस्था निर्माण करणं हा उपाय होईल, आंदोलनं करून काय होईल? तत्कलीक मागण्या मान्य करून घेणे हा जर त्यामागचा हेतू असेल तर ती एक फार्स ठरतील, आणि मूलभूत व्यवस्थेत बदल घडवून आणणे हा हेतू असेल तर सर्वस्तरीय, सर्व विचारधारांची गुंफण असणारे, दूरगामी परिणाम करणारे कार्य हाती घेण्याची गरज आहे.

Thursday, August 18, 2011

गुलज़ार- Celebrating his 75th Birthday today!

Gulzar.....the legend celebrating his 75 birthday today. I always wonder how a versatile person can be....! He is a poet, a lyricist, a director. He is comfortable in making strokes on a larger canvas where its Anand, Machis, Gharonda, Ijjajat, masoom, and other side bunty bubbli, sathiya, 7 khoon maaf. One side songs from Aandhi, guddi, Parichay, bandini, lekin and other side total filmy like Raavan, Omkara, veer, kaminey....


He is great. Essence of life in few and simple words. Sharing one of my favorite from the great poet. 



ek puraanaa mausam lauTaa yaad bharii puravaa_ii bhii
aisaa to kam hii hotaa hai vo bhii ho tanahaa_ii bhii

yaado.n kii bauchhaaro.n se jab palake.n bhiigane lagatii hai.n
kitanii sau.Ndhii lagatii hai tab maa.Njhii kii rusavaa_ii bhii

do do shaqle.n dikhatii hai.n is bahake se aa_iine me.n
mere saath chalaa aayaa hai aap kaa il saudaa_ii bhii

Khaamoshii kaa haasil bhii ik lambii sii Khaamoshii hai
un kii baat sunii bhii hamane apanii baat sunaa_ii bhii

Thursday, August 11, 2011

Poet Borkar Speaking

बोरकरांजवळ कवितेची एक मस्ती होती....अवधूती मस्ती...त्यांच्या चिरतारुण्याचा रहस्य त्यांच्या या मस्तीत होतंगोव्याच्या लॅटिन संस्कृतीचा मन्मुक्त संस्कार त्यांच्यावर होता हे तर खरच....पण त्यांच्या तरुणपणाला फुलवणारी पहिली घटनाच मोठी गोड आणि आठवणींनी हृदयात कळ उठवणारी होती.
शाळेत शिकत असताना एकदा जिन्यावरून खाली येणार्या बोरकरांचे डोळे एका मुलीने झाकले आणि त्यांचा गालावर ओठ टेकवून ती पळून गेली....:) बोरकर मात्र त्या क्षणी जे झिणझिणलेते आयुष्याचा अखेरपर्यंत झिणझिणतच राहीलेस्त्री ही त्यांच्यासाठी नेहमीच एक प्रेरक शक्ति बनून राहिली...एक विलक्षण गूढ आकर्षण बनून राहिली....

Tav nayananche dal halale ga
panavarachya davbindupari
tribhuvan he dalmalale ga || Dhru ||

Taare galale, vaare dhalale
diggaj pachananase valale
giri dhasalale sur kosalale
hrushi, muni, yogi chalale ga || 1 ||

Hrutuchakrache aas udale
abhalatun shabd nighale
aavar aavar apule bhaale
meen jali talamalale ga || 2 ||

Hrudayi majhya chakmak jhadali
najar tujhi dharanila bhidali
do hrudayachi kimaya ghadali
punarapi jag saavarale ga || 3 ||

Saturday, August 6, 2011

मैत्री म्हणजे असतं तरी काय?..


मैत्री म्हणजे असतं तरी काय?.......
मैत्री म्हणजे निरभ्र आभाळ, मैत्री म्हणजे अथांग समुद्र, मैत्री म्हणजे श्रावणसर, मैत्री म्हणजे टिपूर चांदणं, मैत्री म्हणजे परिजातकाचा सडा, मोगर्‍याचा दरवळ, मनी उमटणारी लकेर,
एकमेकांच्या साथीने समृद्ध होत जाणं हीच तर मैत्री ! आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट. सोबत नसताही आपण सोबतच असतो, अनेकदा शब्दांविनाही मनं ओळखता येतात, कोणीतरी आपलं ही भावना मैत्रीतूनच येते, आणि ती खूप सुखावणारी असते.

Friday, July 29, 2011

शिक्षणाच्या नावाने......

आपण नेहमी असं ऐकतो "आजकालच्या शिक्षणाचा दर्जा खूप घसरला आहे." खरं तर शिक्षकांचा दर्जा कमी झालाआहेकारणं काहीही असोतपण ते खरं आहेआजकाल माझया कुटुंबात शाळेत जाणारी वेगवेगळ्या वयाची काहीमुलं आहेतत्यांचे अनेक किस्से कायमच करमणूक करतात.
माझी भाची नेहावय वर्ष १०वडील शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधे कॅप्टनत्यामुळे आख्खं जग फिरून झालेआहेशाळेत बाई भूगोलाच्या तासाला शहरांच्या नावाच्या भेंड्या हा खेळ घेत होत्याहिच्यावर  पासून शहरसांगायची वेळ आलीतिने सांगितले " रॉटरडॅम". बाई म्हणाल्या "शहराचे नाव सांग नेहाधरणाचे नको". चिडूनघरी आली आणि हे ऐकून आम्ही खूप हसलो.
शशांकने शाळेत एकदा विचारले "ट्यूब ला मराठीत काय म्हणतात?" सर म्हणाले ट्यूब म्हणजे मलमहा घरीयेऊन म्हणतो भिंतीवरच्या ट्यूबमधे कोणते मलम आहेखूप वेळाने माझी ट्यूब पेटली हा घोटाळा लक्षात यायला.
संस्कृतीला संस्कृत शिकवायला नवीन बाई आल्या आणि म्हणाल्या " काव्य शास्त्र विनोद मधील उतारा म्हनहीघरी येऊन विचारते "ह्या उत्तम संस्कृत संस्कृतीला कसं शिकवतील?" या प्रश्नाचं काही उत्तर मझयाकडे नाही.
पुत्यांच्या चितळे मास्तरांचं वर्णन करता थकत नाहीत आणि आजकाल मुलांना मागच्या वर्षीच्या शिक्षकांचंनाव आठवत नाहीकाय करावंआजही कित्येक लोकं आपली शिक्षण पद्धती खूप उजवी मानतातमाझया एकमित्र यूएसहून परत आला का तर त्याला त्याच्या मुलाला भारतात शिकवायचं आहे.
आपण त्यात काही बदल करत नाहीआणि आपलं महान सरकार दर दिवशी नवीन प्रयोग करतं आपल्या मुलांवर.आज काय परीक्षा नाहीतमग काय तर फक्त मूल्य मापनगुणवत्ता यादी नाहीतर कधी बेस्ट ऑफ फाइवमगमार्कांचा पाऊस !
पण यात नवल ते कायआपल्यापैकी प्रत्येकालाच डॉक्टरइंजिनियरवकील व्हायचं असतंकोणालाच शिक्षकव्हायचं नाहीमग ज्याना काहीच दुसरं करता येत नाहीते जाऊन बी-एडडी-एड करतातपैसे देऊन शिक्षण सेवकबनतातमग पुन्हा तेच रडगाणेशिक्षणाचा दर्जा खालवलाय म्हणजे नक्की काय बदल झालायपायथागोरसचासिद्धांत बदललाय काकी + होतात आजकालनाही ना...... म्हणजे शिक्षकांचा दर्जा खालवलाय. .या सगळ्याला आपण जबाबदार आहोतकधी कधी वाटतं सारं सोडून एखादी शाळाजॉइन करावीथोड्या मुलांचं तरी भलं होईल.