Showing posts with label आपुला संवाद आपणाशी. Show all posts
Showing posts with label आपुला संवाद आपणाशी. Show all posts

Saturday, March 28, 2015

मितवा......

कवितेच्या गावा जावे पण तितके सोपे नसते ते. मनातल्या भावनांना नेमक्या शब्दात गुंफत, मात्रेच्या गणितात बसवत कविता करणे खरेच खूप अवघड असते. त्यामानाने भारंभार लिहिणे सोपे. शब्दांची मर्यादा नाही, मात्रेची गणिते नाहीत, यमकांची जुळणी नाही. मनातले सारे नीटसे उतरले वाटेपर्यंत लिहित रहावे बरे हेच खरे… 

पण तरीही घालतातच कविता भुरळ मनाला. अनेकदा एखाद्या प्रसंगाचे चपखल वर्णन करण्यासाठी, एखादी प्रतिक्रिया म्हणून, एखादी उपमा देण्यासाठी मला अनेकदा कवितेच्या ओळीच आठवतात.पण स्वत: लिहायचे झाले तर मात्र सगळा आनंद आहे. विचार करून थकते मी लोकांना कशा असंख्य विषयांवर कविता लिहिता येतात ज्या मला जमणे शक्य नाही. पण तरीही कविता या लेखन प्रकारावर प्रेम आहे माझे आणि प्रेम ही जगातली एकमेव सुंदर भावना आहे यावरदेखील. प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तू मला असे म्हणणाऱ्या नायिका बघत मोठ्या झाल्याचा परिणाम असेल कदाचित. 

प्रत्येक स्त्रीच्या मनात तिचा एक सखा असतो. नकळत्या वयापासून त्याची अनेक रूपे मनात उमलत असतात. काहीना तो गवसतो काहींचे आयुष्य सरते मनातल्या त्याला शोधण्यात. कॅलिडोस्कोपच्या नवनव्या रचनांनी भुरळ घालावी तशी साकार होत राहणारी त्याची रूपे, त्याचे भास. कधी तो माझा मित्र, कधी सहचर, कधी वेगवेगळी नाती  उभी करणारा, तर कधी चक्क देव बनून साकारणारा. असा मितवा जो माझ्या मनात वसतो, सदैव माझ्या सोबत असतो, अखंडपणे माझा त्याच्याशी संवाद चालतो. कधी प्रेमाचा संवाद तर कधी नुसताच वाद, रुसणे, फुगणे, समजूत घालणे म्हणजे जणू  मनाचा चाले मनाशी संवाद! असे हे सुंदर मनातले जग त्याचे आणि माझे माझ्या मनातले!!!

माझ्या मनातला माझा रावा 
त्याचा मनातच घेते ठावा 
मनातच त्याचा वाजे पावा 
मनातल्या मनातच त्याला  
राधेने निरोप कसा धाडावा

अशी अवस्था करणारा तो मितवा. मनीचे गूज त्याला तरी कवितांमधून सांगावे, तसा प्रयत्न तरी करावा. मनालाच मन वाचून दाखवावे तसे जणू. त्यामुळे चुकलेमाकले आपले आपल्याशी असेही. तर अशा या काही ओळी माझ्या मनातल्या राव्याला, माझ्या मितवासाठी, माझ्या सखयासाठी.........चांगले वाईट याची पर्वा न करता त्याला कल्पून लिहिलेले. माहीत नाही किती काळ त्याच्यासाठी लिहिणे जमेल, माहीत नाही कधी शब्द दुरावतील… त्यामुळे जसे मनात साकारले ते हे असे……. अशाच काही कविता एक दोन भागात मिळून.

गोधडी प्रेमाची ........

जगणे जणू आपुले असे
गोधडीचे टाके जसे

एक टाका प्रेमाचा
वर्षाव आपुलकीचा

एक टाका मैत्रीचा
झरा अखंड हास्याचा

एक टाका हितगूजाचा
अव्यक्तातून व्यक्ताचा

एक टाका स्पर्शाचा
मोहरत हरखण्याचा

एक टाका नजरेचा
शब्देविण संवादाचा

एक टाका आठवणींचा
क्षण पुन्हा जगण्याचा

एक टाका विरहाचा
भरून आलेल्या आभाळाचा

एक टाका अश्रुंचा
सयींसह बरसण्याचा

एक टाका तुझा, एक टाका माझा
समांतर राहूनही, एकरूप होण्याचा


२) नाते.........
नात्यांचे बंध
बांधलेली मने
उमलणारी नाती
प्रेमाची झुळूक लाभताच
कोमेजणारीही नातीच
अंतराची झळ लागताच
जाणिवेतील बंध
नेणिवेत जाताना
क्षितिजच बदलून
टाकणारे तुझे माझे
नाते..........
नात्यांचे बंध
बांधलेली मने
मन तुझे मन माझे.....


३) सहजच.............
सहज कधी काही बोललो
सहज एका वाटेवर चाललो
चालता पावलांसवे एके दिवशी
सहजच प्रेमाच्या गावाशी पोचलो
सहजपणे जुळले बंध,
सहजच जुळले धागे
आपुले एकाकीपण मग
सहजच कसे मग पडले मागे
सहज मग लागे आस
सहजच नकळे जडला ध्यास
जगावेगळ्या अद्वैताचे
सहजच मग होती भास
सहज असा सूर सदा जुळावा
सहजच प्रवास मिळूनी घडावा
आनंदाच्या या वाटेवरती
सहजच अंतरातला गळो दुरावा


Sunday, December 28, 2014

धर्म … तुम्ही, आम्ही.......................



एक लहानपणी वाचलेली गोष्ट होती, आठवतंय त्याप्रमाणे संत एकनाथांची. ते नदीवर स्नान करून येत असता एक निंदक त्यांच्या अंगावर थुंकतो, ते परत नदीवर जाऊन स्नान करून येतात, परत परत तेच घडते, कोणतीही वाईट प्रतिक्रिया न देत ते पुन्हा पुन्हा स्नान करून येत राहतात, शेवटी तो माणूस खजील होतो, क्षमा मागतो …. वगैरे वगैरे 
ते "संत" एकनाथ होते या विचाराने हि गोष्ट अशीच घडली असेल यावर सहज विश्वास बसतो. आज समाजात अनेक तथाकथित संत, महाराज, बाबा, बुवा, बापू आहेत, त्यांच्यापैकी एखाद्याच्या बाबतीत असे घडले तर ते असेच वागतील असे वाटते? 

आजही ज्ञानेश्वरी, गाथा,दासबोध या ग्रंथांचे महत्त्व शेकडो वर्षानंतरही असाधारण असे आहे,असे कोणते संत साहित्य आज निर्माण होते आहे, ज्याने आजच्या समाजाचे प्रबोधन तर होतेच आहे  पण अजून सात आठशे वर्षानंतरही त्यांचे महत्त्व टिकून राहील? समाज प्रबोधनाची गरज काय फक्त त्याच काळात होती? आज नाहीये ? वाढलेल्या तणावांच्या, जागतिकीकरणाच्या. नाते संबंधांच्या ताणातून, वाढीव महत्त्वाकांक्षा यासाऱ्यामुळे ती कितीतरी पटीने जास्त आहे. मग त्यातून बाहेर पडण्यास तुम्हाला कोण मदत करते? कोणते संत, महात्त्मे, बापू बुवा? कि तुम्ही तुमचेच मार्ग शोधता, स्ट्रेस किलर्स  शोधता? कि या जीवनालाच शरण जाता? आसपास अनेक समाजोपयोगी चांगली कामे करणारी माणसे आसपास आढळतील. सर्वचजण धर्माचे लेबल लावून आपल्या समोर येतात. त्यांच्या कामापेक्षा त्यांचा धर्म श्रेष्ठ ठरतो? किंवा एखाद्या विशिष्ठ धर्माचे असण्याने अशी महान कार्ये त्यांच्या हातून घडतात? 

शिवाजी महाराजांनी पाठवलेला ऐवज गरज असतानाही नाकारणाऱ्या संत तुकारामांची गोष्ट अभिमानाने सांगताना, कोट्यावधींची माया गोळा करणाऱ्या बापू, महाराज यांना तोच नियम आपण का लावत नाही? साधे जगण्याची मूलतत्त्वेही अपवादानेच पाळणारी मंडळी आजच्या समाजाचे संत म्हणून कसे प्रतिनिधित्त्व करतात? अनेक बेकायदेशीर कृत्ये करणारी, व्यभिचार करणारी  हि तथाकथित संत मंडळी जर आपल्या समाजात आहेत, राजरोसपणे आपले धंदे चालू ठेऊन आहेत, अनेक बाबा अतिशय चीड आणणारी बाष्कळ बडबड आणि कृत्ये करताना आपण पाहतो तर मग तरीही आपल्या समाजाचे चित्रीकरण कसे कोणी करावे आणि आपल्या समोर ठेवावे अशी आपली कल्पना आहे? की सत्याला आपण कधी खुल्या मनाने सामोरे जाणारच नाही? अशी तमाम मंडळी कोणा  एका धर्माचे प्रतिनिधित्व करणारे नसतातच, तसे सर्वच धर्मात या प्रवृत्ती बोकाळलेल्या आहेतच. 

रेहमान एक से एक उत्तम रचना घडवतो तेंव्हा त्याच्या धर्माचे आहे म्हणून "कून फाया, किंवा ख्वाजा मेरे ख्वाजा" अतिशय उत्तम बनवतो आणि त्याच्या धर्माचे, देवाचे नसलेले "मनमोहना" हे मात्र  त्याच्या हातून उत्तम रचना घडत नाही असे घडते का? मग जर नक्की धर्म कुठे आड येतो? एखाद्या धर्मावर चित्रपटातून टीका केली म्हणून एखादा दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीवर आपण टीका करत असू तर त्याच्या धर्माचे नसतानाही मनमोहना सारखे उत्तम गाणे बनवणाऱ्या संगीतकाराचे विशेष कौतुक जाहीरपणे आपण करतो का? 

लगेच कोणीतरी बाह्या सरसावून असे म्हणायची गरज नाही की "फक्त एकाच धर्माला का टार्गेट केलं गेलंय?" सोपं उत्तर म्हणजे आपण बहुसंख्यांक असणाऱ्या आपल्या देशात, आपलेच देव, संत, महात्त्मे जास्त संख्येने असणे आणि मग त्यावर टीका होणे हे स्वाभाविकच. दुसऱ्या एखाद्या दुसऱ्या धर्मबहुल देशात, प्रांतात त्यावर कोणी टीका केली असती, असे बोचरे चिमटे चित्रपटाच्या माध्यमातून काढले असते. आता तसं केल्यानंतर काय परिणाम झाले असते हे कोणत्या देशात, कोणत्या धर्मावर टीका होतीये, तो धर्म, तो समाज किती सहिष्णू आहे यावर ठरेल.म्हणजे कदाचित सोशल मिडीयावर चर्चे इतके त्या विरोधाचे स्वरूप मर्यादित राहिले हि नसते, अगदी तडीपार होण्याची वेळ तो तसा चित्रपट बनवणाऱ्यावर येऊ शकते, चित्रपटावर बंदी येऊ शकते, अगदी त्या कलाकार, निर्मात्याच्या हत्येचा फतवाही निघू शकतो. म्हणूनच मला हे हि मान्य आहे कि हे सारे इथे घडू शकणार नाही, हा धर्म इतका सहिष्णू आहे कि त्या धर्मात राहूनच मी त्यावर सरेआम टीका करू शकते. पण मग माझ्यावर अशी टीका करण्याची वेळ येतेच का? 

धर्म, देव, जात, पोटजात या साऱ्या गोष्टी ना माणसाची मुलभूत गरज आहेत. त्याच्या अस्तित्त्वाशी निगडीत अशा. या कि त्या धर्माची आहे मी? धर्माच्या कोणत्या जातीचा, पोटजातीचा  भाग आहे … या अनेक गोष्टी व्यक्तीचे आजचे अस्तित्त्व, समाज, विचारप्रक्रिया ह्या गोष्टींच्या मुळाशी काही प्रमाणात असतात. देव, धर्म, धार्मिक आचार विचार या साऱ्या गोष्टी खरंतर किती वैयक्तिक असाव्यात…. कोणता धर्माचे आहात, त्याच्या मुल्यांवर किती विश्वास ठेवता, आस्तिक आहात कि नास्तिक? नास्तिक कसे खरे खुरे कि सोयीने? आस्तिक असाल तर कशा प्रकारे, मुर्तीस्वरूप देवावर श्रद्धा असणारे,  कर्मकांड मानणारे कि एका अनादी अनंत अशा विश्व चालवणाऱ्या शक्तीवर विश्वास ठेवणारे, हर इच्छेसाठी देवाला माणसासारखे समजून देवाण घेवाणीचे व्यवहार करू पाहणारे, की प्रत्येक चांगली, योग्य गोष्ट माझ्या हातून घडण्यासाठी बळ दे, चांगल्या दिवसात माझे पाय जमिनीवर ठेव, वाईट दिवसांना सामोरे जाण्यास मनाला शक्ती मागणारे. अशा असंख्य छटा या संकल्पना सोबत घेऊन येतात. म्हणूनच या संकल्पना प्रत्येक व्यक्ती नुसार वेगळ्या असताना त्या सर्वात जास्त वैयक्तिक होऊन जात नाहीत का? 

पण जर धर्म हि माणसाची इतकी मुलभूत आणि वैयक्तिक गरज असेल तर मग मला त्यास घराबाहेर का न्यावे लागावे आणि प्रदर्शन करावे असे वाटावे? का मला कोणी घराबाहेर, शाळेत, महाविद्यालयात, नोकरीच्या ठिकाणी माझा धर्म , माझी जात विचारावी? एक माणूस असणे आणि जी गोष्ट करायची आहे ती करण्यासाठी सक्षम असणे इतकेच बास नाही का? म्हणजे शाळेत जायचय तर योग्य वय, शिक्षण घेण्यासाठी सक्षमता पुरे झाल्या कि या गोष्टी, नोकरी करायची आहे तर गरज आहे ते शिक्षण आणि तो अनुभव माझ्या गाठीला असणं पुरेसे नसावे का? 

या अमुक एक धर्माचे आहोत आणि त्यातीलही अमुक एका देवाला पुजतो ते रस्त्यावर येऊन कोणाला का सांगावे वाटते? म्हणजे का रस्त्यावर कोणत्या देव धर्माशी संबधित कृत्ये रस्त्यावर उतरून प्रदर्शन करत करावीत? ना ताबूत निघावेत, ना गणपतींना रस्त्यावरून वाजत गाजत न्यावे, ना कान्हा ने रस्ते अडवून दही हंडी फोडावी. घराच्या, समाज केंद्रांच्या आत जे काय धर्मिकपण जपायचे असेल ते जपावे ना? 

याच युगाचा एक महान क्रिकेट पटू माझ्या मनातून तेंव्हा उतरला जेंव्हा त्याने एका आपण एका बाबांचे भक्त आहोत हे समाजापुढे येऊ दिले. मला नाही वाटत प्रसार माध्यमांपुढे हि मंडळी इतकी हतबल असतात कि त्यांना या गोष्टी रोखता येत नाहीत. सारी कारकीर्द तोलून मापून वागण्या बोलण्या बद्दल प्रसिद्ध हा माणूस. त्याची श्रद्धा त्याने कोठे कशी ठेवावी हे वैयक्तिक आहे, होते. ते त्याने तसेच ठेवले असते तर जास्त चांगले झाले असते. 

माझ्या या पूर्वीच्या नोकरी मध्ये माझा एक सहकारी होता, जो दुसऱ्या धर्माचा, दुसऱ्या शहरात काम करणारा होता. सर्वात जास्त काळ मी त्याच्यासोबत काम केलं  होते  आणि त्या कालावधीत कधीही आमचे भिन्न धर्म आमच्या कामाच्या आड आले नाहीत, ते कधीही आमच्या चर्चेचा विषय नव्हते.  काम करतानाची आमच्यातील chemistry हि सर्वात चांगली आणि महत्त्वाची गोष्ट होती. माझ्या तिथल्या शेवटच्या दिवशी मला निघायला एक अर्धा तास असताना, त्याचा फोन येणे जे मी स्वाभाविकपणे अपेक्षिले होते आणि त्याप्रमाणे तसा त्याने केल्यावर, अपेक्षित होते ते सारे काही (कामात एकेमकांना किती पूरक होतो, कशी उणीव भासेल, पुढील वाटचालीसाठी एकमेकांना शुभेच्छा इ.)आम्ही दोघे बोलल्यानंतर अचानक त्याने, " अनघा, आयुष्यात एकदा तरी XXX (त्याच्या धर्माचा पवित्र ग्रंथ) हे वाच, तुला नवीन दृष्टी मिळेल जगण्याकडे पाहण्याची" वगैरे सांगितले. माझ्या सहिष्णू स्वभावाने मी फार शार्प प्रतिक्रिया न देता ते संभाषण  थांबवू शकले, आजही आम्ही अधून मधून बोलतो, दोन चांगल्या व्यक्ती म्हणून, पण धर्माचे असे प्रदर्शन पुन्हा एकदा रुचले नाही ते नाहीच.

अजून एक टीम होती माझी ज्यात दोन जण इतर पण एकाच धर्माचे  होते. आणि बाकी सारी टीम माझ्यासारखी. त्यामुळे वेगवेगळे, सण, पूजा त्याचा प्रसाद ऑफिसला नेणे हे ओघानेच. त्यातला एक जण असा प्रसाद म्हणून नेलेला कोणताही पदार्थ खात नसे, आणि दुसरा मात्र आठवणीने तो ऑफिसला आण असे सांगत असे. एक दिवस बोलताना मी याला विचारले, त्याला माझ्या देवाचा प्रसाद चालत नाही, तुला कसा चालतो रे? त्याचा उत्तर होते, "तुझ्यासाठी तो प्रसाद आहे, माझ्यासाठी तो फक्त शिरा किंवा पेढे बर्फी आहे, ते मला मनापासून आवडते आणि मी ते खातो. मी आणतो तो केक तूही असंच आवडतो म्हणून खातेस ना, यात कुठे आला आपला देव आणि धर्म?"  या उत्तरावर मी एक सेकंद चमकले, पण मान्य केलं हे म्हणणं मी अगदी खुल्या दिलाने. 

आज इतकं सारं मन:पटलावर येण्याचं कारण म्हणजे तो चित्रपट ज्याच्यावर एकाच धर्माला टार्गेट केलंय अशी टीका करत असंख्य लोक अधिकाधिक प्रसिद्धी देत आहेत. एखादी चुकीची गोष्ट खरतर अनेक वेळा दुर्लक्षून किंवा अनुल्लेखाने जास्त चांगली मारता येते. जो पर्यंत खरंच गरज पडत नाही तोवर कलाकृतीकडे कलाकृती म्हणून आणि रचना घडवणाऱ्याची अभिव्यक्ती म्हणून पाहावे आणि सोडून द्यावे. बघा पटलं तर …………  साऱ्या श्रद्धा, विश्वास माझ्या चार भिंतींच्या आत ठेऊन एक माणूस म्हणून समाजात राहणे मला मनापासून आवडेल, आणि तुम्हाला?

Sunday, December 14, 2014

फिर आपके नसीबमें ये बात हो ना हो …

रात्रीची वेळ. घरपरतीची वेळ अनेकांची कधीच होऊन गेलेली. आपापल्या घरट्यांत पक्षीच नव्हे, तर माणसेही जाऊन विसावलेली. आपल्या माणसांत रमलेली, हास्यविनोदात, जेवण, मनोरंजन यात रंगून गेलेली. अशावेळी आँफीसमधून बाहेर पडणारी मी. अनेकदा गाडीत एकटी. मुळात ही वेळच हळवी, कातर! मुसमुसायला, डोळ्यांच्या कडांना ओलसर व्हायला काहीही कारण यावेळी पुरतं. म्हणजे असंच घडतं असंही नाही आनंदाचे क्षणही असतात, आनंद मनात मावेना अशी अवस्थाही अशीच, किती सांगू मी सांगू माझे मलाच अशी. कधी काय घडेल काही सांगता येऊ नये अशी. दिवसभरातली एखादी कडवट घटना आठवावी, कोणाच्या आठवणीने उदास वाटावे, कधी कोणा दुसरयाच्या दु:खाने,   दुःखद प्रसंगाने आपल्यालाच घेरून टाकावे, कधी विनाकारण उदासीने मनावर राज्य करावे तर कधी अगदी काही नाही तर एखाद्या गाण्यानेच अस्वस्थ करावे.  

एखादे गाणे पुर्वी असंख्य वेळा ऐकले असावे, तेंव्हा न रूतलेला काटा नेमका आत्ता, अशावेळीच रूतावा आणि मन घायाळ होऊन जावे. यापूर्वी न जाणवलेले कंगोरे आता जाणवू लागावेत, न उमजलेले अर्थ समोर यावेत, असंख्य वेळा ऐकलेल्या त्याच त्या शब्दातून नवाच विचार गवसावा. किती वेळा ऐकलं असेल हे गाणं, अगदी नकळत्या वयापासून, शब्दांचे अर्थ कळू लागल्यापासून एकच अर्थ जो सर्व सामान्यपणे घेतला जाऊ शकतो … तोच मी ही घेतला होता आजवर याचा. बरं, हे घडतं तेंव्हा सांगणारी मीच, ऐकणारीही  मीच, आपुला संवाद हा आपणाशी. तशी ही अवस्था ही नेहमीच! कालही असंच थोडं झालं. आधी या गाण्याने दिवसभर घेरून टाकलं, उदास केलं. आपण आपल्या जीवलगांसह नसू या विचाराने डोळे भरून वाहू दिले. काही वेळा असे आपले मनाने घट्ट असणेही कमी येत नाही. थोडे स्वत:ला शांत होऊ दिल्यावर हा मनात डोकावलेला विचार…. "का, मीच कोणाला हे सांगावं"

फिर आपके नसीबमें ये बात हो ना हो …
शायद फिर इस जनममें मुलाकात हो न हो ……. 

का नाही मी हे स्वत:लाच सांगावे आणि का नाही ते मनात ठेऊन त्याप्रमाणे वागावे? कधी काही प्रसंगातून जात असताना आपण आपल्यालाच हा प्रश्न विचारतो का?  "के फिर अपने नसीबमें ये बात हो न हो …. ", तो विचार मनात ठेवुन त्या व्यक्तीचा, त्या क्षणांचा आदर करतो? काळाचे आभार मानतो? आनंददायी, आयुष्यातील महत्त्वाचे धडे देणारे, जगणे समृद्ध करणारे असे असंख्य क्षण....... का नाही त्यांच्या ऋणात राहू?

शेवटच्या काही दिवसात मी मोठी व्हायची स्वप्ने बघणारे माझे बाबा ती जेंव्हा बोलून दाखवत होते त्या क्षणी हे सत्य उमजायला हवे होते की हे सारे पुन्हा नशिबात असेल नसेल. स्वप्न बघणारे बाबा असण्याचे सुख देणाऱ्या काळाचे मी आभार मानू  शकते पण हे त्यांच्या पर्यंत ना तेंव्हा पोचवले आणि ना आता पोचवू शकते. 
यथा काष्ठम च काष्ठम …. या उक्ती नुसार अनेक व्यक्ती कारणांनी भेटतात, त्या छोट्याशा काळात तुम्हाला समृद्ध करतात आणि ते कारण संपल्यावर स्वाभाविकपणे दुरावतात देखील. तेंव्हा कधी हे मनात येतं? "बाळे, अजूनही ओठ पिळले तर दूध निघेल इतकी लहान आहेस, म्हणून तुझी काळजी वाटते" असं मला सांगत ज्यांनी माया लावली ते  मुकुंद कासट, शब्दातून व्यक्त न होत माया लावणारे मुकुंद रानडेआबा आणि सुधा आत्या, आरती काकू अशा अनेकांसोबत असताना मनात हे यायला हवे होते. जेंव्हा एकदा साक्षात समोर, मोजून काही पावलांवर जोत्स्नाबाईंच्या तोंडून "क्षण आला भाग्याचा" ऐकले होते तेंव्हा  हे मनात यायला हवे होते. तेंव्हा त्या त्या व्यक्तींपर्यंत त्यांनी काय दिले मला हे मी पोचवायला हवं होतं. असे एक न दोन अनेक क्षण, अनेक व्यक्ती, अनेक घटना. 

अनेकदा अनेक भावना, परिस्थिती कायम राहील ही आपली समजूत इतकी ठाम असते की त्यापलीकडे आपण काही पाहायला तयारच नसतो. मग आपण आपल्या माणसांना, इतर साथ सोबत असणाऱ्यांना, परिस्थितीला, काळाला इतकं गृहीत धरतो की मग आपल्याला हे विचार शिवतच नाहीत. असे अनेक मैत्रीचे धागे, असे अनेक मायेचे हात, मदतीचे हात, पाठीवरची कौतुकाची थाप…. प्रत्येक क्षणी मनात कुठेतरी डोकावायला हवा माझ्या हा विचार …न जाणो हे सारे पुन्हा नशिबात असेल नसेल. 
आता मागे वळून पाहताना मला तेंव्हा हा विचार मनात येऊन तो मनात ठेऊन त्या त्या क्षणांना दिलेले प्रतिसाद अधिक समर्पक ठरले असते. आता अर्ध्याहून अधिक डाव संपला असताना का होईना हे मनास उमजलय हे काय कमी आहे. कारण "हमको मिली है आज ये घड़िया नसीबसे" हे ही तितकंच खरं!

Tuesday, April 22, 2014

रंगूनी रंगात सारया रंग माझा ......……

कितीतरी दिवसांनी आजकाल  थोडा निवांत वेळ असतो माझ्याकडे! अर्थात हे फार काळ टिकणार नाहीच म्हणा. निवांत वेळ आहे या  कल्पनेनेच कसेनुसे वाटू  लागेल आणि कशातरी मी  स्वत:लाच गुंतवून घेईन . तसंही नव्याने करायच्या, नव्याने शिकायच्या गोष्टींची यादी मुळातच इतकी मोठी आहे आणि सातत्याने त्यात भर पडतच राहते. या वर्षी, घर आणि ऑफिस या व्यतिरिक्त  ज्योतिष शिकायला सिरीअसली सुरुवात करायची आहे, अर्थशास्त्र पुन्हा नव्याने शिकायचे आहे, म्हणजे खरंतर अर्थशास्त्रात मास्टर्स करायला यावर्षी admission घ्यायची आहे, एकदा ते केले की रिकामा किंवा निवांत वेळ हा उरणारच नाही. तरी पण याच वर्षी  ओरिगामीची सुरुवात तर केली आहे त्यातले सातत्य टिकवून ठेवायचे आहे, टेरेस आणि खाली असलेली बाग या वर्षी अजून चांगल्या प्रकारे फुलवायची आहे,  संस्कृत स्तोत्रे विष्णू-सह्स्रानामापर्यंत शिकून मधेच सोडून दिली होती आता रुद्र आणि सप्तशती एकदा शिकायची आहे. परवाच,  एके दिवशी दुपारी ऑफिसमधून लवकर घरी  गेले, माझ्या दोन मैत्रिणी जिन्यात भेटल्या, आता इथे कशा असे त्यांना विचारले तर म्हणे " तुझ्या चुलत सासूबाई सध्या गीता शिकवत आहेत, तो क्लास आताच संपला आता घरी चाललोय" ह्याला म्हणतात दिव्याखाली अंधार! पण असो. 

सदा सर्वकाळ सगळ्याच वेड लावणाऱ्या गोष्टी तुमच्या  बरोबर राहतात  असंही नाही, काही काही सोबत करतात, काही चुकारपणे मधेच रस्त्यात तुमचा हात सोडून देतात. पण हरकत नाही, त्या काळापुरत्या तरी त्या आनंददायी असतात हे  नक्की! त्या थोड्याशा सोबतीने देखील त्या  तुम्हाला अधिकाधिक समृद्ध करत असतात. प्रत्येक वेळी त्याच माझा हात सोडतात असेही  नाही, तर माझ्यातही एक लहान मूल दडलेले आहेच ना, त्यामुळे ते ही दरवेळी नवीन खेळाच्या शोधात असतेच, कुतूहल संपले की दिला नाद सोडून असेही  वागत असते. पण  मग अशावेळी माझ्यातल्या त्या लहान मुलाला, माझ्यातली जी एक आई आहे न ती कधी त्या गोष्टींकडे पुन्हा पुन्हा वळवू पाहते किंवा त्याचे  ते "मूलपण" समजून घेत "असे चालायचेच" म्हणत सोडून देते. मूळातच फार आखीव  रेखीव आयुष्याच्या कल्पनांशी मी स्वत:ला बांधून ठेवले नाहीये ते एका परिने  बरेच आहे. घर आणि करिअर ही एकच  मध्यवर्ती आयुष्य रेखा ठरवून, त्या सभोती मग आपल्या आवडी, इच्छा, आकांक्षा यांची हवी तशी सजावट करावी. पण जर घर किंवा करिअरच धोक्यात येणार असेल तर मात्र ती माझी सर्वात मोठी हार असेल, म्हणूनच या जीवन रेखेस  डिस्टर्ब न करताही स्वत: मुक्त आयुष्य कसे जगायचे हे चुकत माकत शिकण्याचा हा प्रयत्न! 

तर या निवांत वेळाचं मी काय करतीये?  सध्या तर फक्त पुस्तके आणि मी!  एक पुस्तक उशाशी ठेवलेले असते, एक सोफ्यावर, आलटून पालटून मी दोन्ही वाचतीये. दुसरीकडे  मला कविताही आवडतात मात्र त्या  वृत्त, मात्रा, छंद यांचे साज लेलेल्याच! आणि कदाचित  म्हणूनच शांताबाई, इंदिरा संत, रॉय  किणीकर, महानोर, आरती प्रभू किंवा बोरकर यांच्या कविता जास्त भावतात. नव्या कवींमध्ये  संदीप खरे किंवा वैभव जोशी जे लिहितात ते आवडते. दुसरे म्हणजे न कवितेचे स्वत:चे एक प्रसन्न व्यक्तीमत्त्व  असायला हवे, अगदी दु:खाची, विरहाची, वेदनेची कविता वाचताना, ऐकताना ते दु:ख, ती वेदना आपल्या पर्यंत पोहचली पाहिजे जरूर पण तिने आपला ताबा घ्यायचा नाही, ते दु:ख, वेदनेचे मळभ आपल्या मनावर सोडून जायचे नाही, आणि अशाच कविता फक्त मला गुंतवून ठेऊ शकतात. आजकाल कवितांनी थोडे वेड लावलेच आहे तर पुरतेच त्यात रंगून जावे म्हणत परवा "उत्तररात्र" वाचून काढली. त्यातूनच रोज एक मला आवडलेली कविता किंवा  ओळी  स्वत:च्याच ब्लॉगवर पोस्ट करायची कल्पना सुचली आणि ताबडतोब ती मी अमलात पण आणली. अनेकदा कवितेची सुरुवात आठवत असते किंवा काही ओळी, पण संपूर्ण कविताकाही आठवत नसते किंवा तोंडपाठही नसते. पण मग होते काय की किमान ब्लॉगवर ठेवण्यासाठी तरी मी त्या कवितेचा  थोडा शोध घेते, मला हव्या असतात त्यातल्या चार ओळीच पण  त्यामुळे पुन्हा एकदा ती कविता मात्र पूर्ण वाचून होते. 

हे ही वेड टिकेल वा मागे पडेल, पण त्यातून मला जो आनंद गवसेल त्याची तुलना दुसऱ्या कशाशीच नाही ना होऊ शकणार! म्हणूनच "रंगुनी रंगात साऱ्या" म्हणत मी हे सारे आनंदाने करतीये. 

Friday, July 5, 2013

अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे !

काही गाणी आपण अनेकदा ऐकत असतो, पहात असतो किंवा कधीतरी आधी ते कवितेच्या रूपात वाचलेले असते. प्रत्येक वेळी ते मनाला जाऊन भिडतेच असे नाही. प्रत्येक गोष्ट मनात जाऊन घट्ट रुजण्याचे सुद्धा काही खास क्षण असतात. शब्द प्रधान गाणी ऐकतच मोठी झालेली मी. पण त्या त्या वयात, ती गाणी भावप्रधान होत गेली, आपलीशी झाली. "त्या तिथे पलीकडे तिकडे, माझिया प्रियेचे झोपडे", "हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता" किंवा "ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा" म्हणत हरवून जाण्याच्या वयातच ती गाणी खऱ्या अर्थाने माझ्यापर्यंत पोहचली होती.


पूर्वी एकदा आजारी असताना अचनाक "एक वार पंखावरूनी" हेच गाणे अचानक ओठी आले, मनात त्या क्षणी आलेले विचार आईला सांगू नाही शकले, तिला "आई, मला झोपायचं आहे, थोपटतेस का थोडा वेळ? असे म्हणून त्या गाण्याची, त्या भावाची घेतलेली अनुभूती शब्दात नाही सांगता येणार.


एक कविता होती पाचवीच्या बालभारतीच्या पुस्तकात,

घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात

मग तेंव्हा ती अनेकदा वाचली असेल, पाठ केली असेल, त्याच्या वरची प्रश्नोत्तरे लिहिली असतील, त्यात पैकी च्या पैकी मार्क्स मिळवले असतील, पण खरच ती कविता तेंव्हा कळली होती का? खरं तर नाहीच …… ते वय नव्हतंही खरं यातल्या गाभ्यापर्यंत पोहचण्याचे. मग कधी पोहचली ती माझ्यापर्यंत? खरं तर लग्न होऊन बरेच दिवस झाले होते, बऱ्यापैकी मी माझ्या खरी रुळले होते. तशी हळवी मी फार एका घरातून दुसऱ्या घरात रुजताना झालेही नव्हते. पण एक दिवस घरी मी एकटीच, एकीकडे गाणी ऐकत, स्वैपाक करत, संध्याकाळची कातर वेळ. ही वेळ पण ना… …. अशी असते की कोणत्याही लहानसहान गोष्टींनी डोळे नकळत भरून यावेत. आणि हे गाणे सुरु झाले. अन असे मनाला जाऊन भिडले. आपली मायेची माणसे, घर दार, सोडून आलेल्या तिला, तिथल्या प्रत्येक गोष्टीत तिचा जीव गुंतलाय, घरातील माणसांचीच नव्हे तर दारचा प्राजक्त, गोठ्यातील कपिला तिची नंदा… साऱ्या साऱ्यांची आठवण मन व्याकूळ करतीये. म्हणजे इथे या सासर घरी ती काही दु:खात नाहीये पण अजून हे सारे तितकेसे आपलेसे झालेले नाहीये. मायेचा, हक्काचा वावर असण्याचे अजून तरी ते घर हेच एक ठिकाण आहे. त्यामुळे वाऱ्याला जा म्हणताना ती स्वत:च अनेकदा तिथे जाऊन पोहचते आहे. परकरी पोर होऊन प्राजक्त वेचते, गुरावासरात रमते आहे, इथे बसून पुन्हा पुन्हा आईची माया आठवते आहे. त्यामुळे ह्या साऱ्या आठवणी आणि फिरून फिरून भरून येणारे डोळे हे चालूच आहे.

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !


लहानपणी सहकुटुंब एखादा चित्रपट ( बहुदा मराठीच ) पाहण्याचा एखादा कार्यक्रम असे, तसाच जाऊन पाहिलेला एक होता तो म्हणजे "अष्टविनायक" . ज्या कोणाला पंडित वसंतराव देशपांडे यांना त्यातील गाण्यांसाठीच नव्हे तर यातील वडील म्हणून चित्रपटात घेण्याचे सुचले असेल…. त्यांच्या स्वरस्पर्षाने गाण्यांचे सोने झले. त्यातील गणपतीची गाणी तर दर वर्षी ऐकतच होते. "दाटून कंठ येतो……. " हे मात्र खऱ्या अर्थाने उमजायला आईपण अनुभवावं लागलं. आईपणाची चाहूल लागली असताना ऐकलेल्या या गाण्याने आयुष्यात कधी नव्हे ते इतके हळवे बनवले की इतके लग्न करून सासरी जातानाही नव्हते. हे गाणे ऐकता ऐकताच एकीकडे आपल्या बाबांची आठवण तर दुसरीकडे आपल्या घरी ही एक  परी यावी हा विचार पक्का झाला. मी तिला फक्त जन्म देऊन, मी आई होणार असले तरी आई म्हणून मला ती घडवणार आहे. तिच्या बोटाला धरून अक्षरे गिरवताना ती शिकेलच पण शिकवण्याची कला मीही शिकेन, नाही तर त्यात रमेनही.


हातात बाळपोथी ओठांत बाळ भाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनी मी त्या गोड आठवाने 

बोलात बोबडीच्या संगीत जगवायचे, लय, ताल सूर यांची जाणीव करून द्यायची, लय ताल सूर हे फक्त गाण्याचेच नाहीत तर आयुष्यातही जमवून आणावे लागतात, याची ती जाणीव. आणि हे सारे करून कृथार्थ मनाने तिला परक्याच्या हाती सोपवायची.


बोलांत बोबडीच्या संगीत जागवीले
लयतालसूरलेणे सहजीच लेववीले
एकेक सूर यावा नाहून अमृताने
अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे 


घेऊ कसा निरोप .... तुटतात आत धागे
हा देह दूर जाता मन राहणार मागे 
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्यापरी अता मी येथे फिरून येणे

हे गाणे ऐकतानाच आपला स्वत:चाच पुढचा काळ असा डोळ्यासमोरून तरळून गेला, एका गाण्याने आईपणाच्या संकल्पना इतक्या स्पष्ट नजरेसमोर साकारल्या की आजही मी त्यान्चाच आधार घेत आईपण पेलतीये. एका गाण्यातून लेकीला घडवून, मोठी, शहाणी करून, तिला चांगल्या घरी, सुयोग्य साथीदाराच्या हाती देताना, निरोपाचे हे कोमल क्षण वेचणाऱ्या शांताबाई, हे क्षण आपल्या गळ्यातून, आपल्या अभिनयातून इतक्या प्रभावीपणे पोहचविणारे वसंतराव यांना सलाम!
आता आयुष्याचा पूर्वार्ध संपत आलाय, एकीकडे उत्तरार्ध त्याच उत्साहाने, आनंदाने कसा जाईल याचे विचार मनात डोकावत असतानाच, मधूनच भैरवी का बरे आठवते? नुसतीच आठवत नाही तर व्याकूळ करते .

जन्म-मरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार

का या ओळी किंवा "संधीप्रकाशात अजून जो सोने" या बा. भ. बोरकरांच्या ओळींतले निरोपाचे क्षण उदास करतात?

Saturday, February 9, 2013

एक धडा.............


दिवसाकाठी अनेक गोष्टी घडत असतात, त्या अनुभवतानाच या शब्दबद्ध कशा रीतीने करायच्या याचाही मनात विचार सुरू असतो. त्याप्रमाणे अनेकदा रात्री घरी आल्यावर मी लॅपटॉप उघडून बसते देखील, पण त्याच वेळी मनात लिहावे-नलिहावे याचे द्वंद्व सुरू असते. सद्ध्या तरी रोज "न लिहावे" याच बाजूने निकाल लागतोय. काय म्हणावे यास...आपल्याच कोषात जाणे? किती दिवस चालणार हे असे? डिसेंबर मधे मी एक गोष्ट लिहायचा प्रयत्न केला, त्याचे पुढचे २ भागही एका दमात तेंव्हा लिहिले गेले होते, पण  ते पोस्ट करण्याची इच्छाच जणू मरून गेली. अनेक दिवसांत मी माझ्या स्वत:च्या "मी....माझे....मला" कडे बघितलेदेखील नाहीये. माझ्या बाकी सार्‍या ब्लॉग मित्र मैत्रीणींच्या ब्लॉगवर मी अधून मधून डोकवते देखील ... पण लिहीत मात्र नाहीये.

तशा मी रोजच्या रुटीनच्या बाकी सगळ्या गोष्टी करते, घराकडे लक्ष देते, नवरा लेकीशी गप्पा होतात, ऑफीसला जाते, जिमला जाते, चांगली गाणी ऐकते, गप्पा मारते, सभोवताली घडणार्‍या गोष्टींवर बोलते ही, मान्य की चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींचं प्रमाण जास्त असते. रात्री घरी येऊन ठराविक कार्यक्रम टी.व्ही. वर पाहते, स्वत:बरोबर अनेक कडवट घटना नेहमीप्रमाणेच "जाऊ दे ना" म्हणत मागे टाकते. पण लिहीत मात्र नाहीये.

आज मी एक धडा शिकले. तो मात्र मी लिहिलाच पाहिजे. आपण नेहमी म्हणतो "गोष्टी वेळच्या वेळी कराव्यात" ....याच बाबतीतला एक धडा मी आज शिकलीय... आणि सकाळपासून तो माझ्या मनात घर करून आहे. आज मी गेले होते सकाळी एका गाण्याच्या वर्गाच्या एका कार्यक्रमाला. माझी लेक या क्लासला जाते. गेले काही दिवस त्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती.

कॉलेजला असताना माझ्या एका मैत्रीणीची बहीण होती, जी तेंव्हा संगीत घेऊन बी.ए. करत होती. अधूनमधून आम्ही भेटत असू, तिचं गाणं ही कधीतरी ऐकत असू. नंतर ती गाण्याचे कार्यक्रम करू लागली. अशाच कार्यक्रमांचे निवेदन उत्तम रीतीने करणार्‍या एका उमद्या तरुणाशी ओळख आणि नंतर प्रेमविवाह ही झाला. मधली काही वर्षे मी इथे नव्हते, काही वर्षांनी जेंव्हा परत आले, तेंव्हा या जोडीचे या शहरात चांगलेच नाव झालेले होते, एक दोन वेळा आमची भेट झाली देखील. संस्कृती लहान असताना जेंव्हा तिला गाणे शिकवायचा विचार आला तेंव्हा हिचेच नाव समोर आले, आणि त्याप्रमाणे संस्कृती तिच्याकडे गाणे शिकू लागली. त्या निमित्ताने आम्ही अधून मधून भेटू लागलो. पण पुन्हा काही कारणानी संस्कृतीचे गाणे थांबले, आणि आमच्या भेटीही.

सात आठ वर्षे मधे अशीच गेली. अजून एका मैत्रीणीच्या बोलण्यातून हिची खुशाली कळे. गेल्यावर्षी एप्रिलमधे एकदा दुपारी मैत्रीणीचा फोन आला "अनघा, "XXX"च्या मिस्टारांचा अपघात झालाय, आय.सी.यू.मधे आहेत ते" हे ऐकून थोडे सुन्न व्हायला झाले. नंतर थोड्याच वेळात भावाचा फोन आला, हीच बातमी सांगणारा. नंतरचे ३/४ दिवस या बद्दल मैत्रीण आणि भावाकडून त्यांच्या खालावत जाणार्‍या तब्येती बाबत. एक दिवस त्यांच्या जाण्याची बातमी आलीच. मैत्रीण आणि माझा भाऊ तिथेच होते. माझा आणि तिचा भाऊ हे गेली अनेक वर्ष चांगले मित्र आहेत. एकदा मनात विचार आला होता, तिला भेटायला जाण्याचा. पण का कोण जाणे तो मी टाळला, बरेच वर्ष काही संपर्क नसताना अशा प्रसंगी जाऊन काय बोलायचे. कोणाच्या शब्दांनी हलके व्हावे इतके लहानसे दु:ख नव्हते तिचे. चाळिशीत जोडीदार अचानक सोडून जातो, मागे त्याचे आई वडील, आपण आणि आपला मुलगा ठेवून ....तेंव्हा ते दु:ख काय असते हे मी माझ्या लहानपणी अनुभवलय. त्या नंतर काही दिवसांनी तिने गाण्याचे वर्ग पुन्हा सुरू केलेले पण मैत्रीणी कडून कळले. वाटले "बरे झाले, आता सावरेल थोडी." नंतर एकदा संस्कृतीने पुन्हा गाण्याचा विषय काढला आणि मी तिला फोन केला. तिच्याशी बोलले. दर्शनी तरी आता गाडी सावरलीये असे वाटून गेले. मध्यंतरी एकदा संस्कृतीला  मी मला गाणे शिकायचेय असे सांगितले, तिने तिच्या या ताईला सांगितले, निरोप आला "आईला म्हणावे, ये शनिवारी" मी म्हणाले "एवढे एक सर्टीफिकेशन आणि त्याची परीक्षा झाली की मग जायला लागेन"

आज सकाळी कार्यक्रमाच्या जागी पोहचले. आत शिरताच ती पुढे आली, आम्ही बोलू लागलो, आणि नकळत मला भरून येऊ लागले. स्वत:ला बर्‍यापैकी सावरत मी तिच्याशी बोलले. नंतर खुर्चीत जाऊन बसले आणि मग मात्र मी स्वत:ला थांबवू शकले नाही. तिच्या जोडीदाराच्या जाण्यानंतर तिने आयोजित केलेला हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. त्याना श्रद्धांजली वाहिली गेली. कार्यक्रमाला सुरूवात झाली, आणि निवेदन करणार होता तिचा ११/१२ वर्षांचा सुपुत्र. थोडाफार त्यांच्याच स्टाईलने त्याने काहीकाळ निवेदनाची धूरा छानपैकी सांभाळली. पण माझे मात्र डोळे सुरुवातीचा थोडावेळ भरून वहात राहीले.

एकीकडे ती ज्या पद्धतीने या प्रसंगातून धीराने बाहेर येते आहे, स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाला सावरते आहे, संभाळते आहे, लेकाला त्याच्या बाबांच्या मार्गावरून पुढे नेते आहे, कदाचित त्याच्या बाबांचेपण हेच स्वप्न असेल, हे बघून मला तिचे खूप कौतुक वाटत राहीले. त्या बरोबरच एकटीने हे सारे करण्याची वेळ नियतीने तिच्यावर आणली याचे वाईटही.
आणि धडा हा की "गोष्टी वेळच्या वेळी कराव्यात". त्या क्षणी तिला सावरण्यास अनेक हात तिच्यापाशी होते, माझ्या तिला भेटायला जाण्याने तिला काही फरक पडला असता, नसता, माहीत नाही. मला मात्र नक्कीच पडला असता. माझ्या भावनांचा योग्यवेळी निचरा झाला असता, आमच्या ओळखीतून जे बंध निर्माण झाले होते त्यासाठी तरी मी तिला भेटायला जायला हवे होते. ती तिची नाही तरी गरज माझी होती. ती जर मी वेळीच ओळखली असती असे अवेळीच डोळे भरून येण्याची वेळ माझ्यावर आली नसती.

Friday, August 31, 2012

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी.......

एक भली मोठी गुहा आहे. आत शिरायला मात्र एक लहानशी वाट आहे. गुहा म्हंटलं की अंधार आलाच. इथे मात्र भरपूर मशाली पेटवून ठेवल्या असल्यामुळे भरपूर प्रकाश आहे. मी आत शिरते. भीती वाटत कशी नाही मला हा प्रश्न माझ्या डोक्यात आहे. पण मी आत जात आहे. गुहेच्या मध्यभागी खूप माणसे आहेत. उलटी टांगून ठेवलेली. ती जिवंत आहेत का हा अजून एक प्रश्न मला पडलाय. जिवंत किंवा मृत असल्याचे कोणतेच लक्षण दिसत नाहीये. पण त्याचेही मला विशेष काही वाटत नाही. मी थोडा वेळ तिथे थांबते मग बाहेर पडते. मग एक तीन काठ्यांच्या मध्यभागी पेटवलेली शेकोटी दिसते. सर्वत्र लाल रंगाचा प्रकाश आहे.

हे स्वप्न अगदी आता आतापर्यंत पडणारे. म्हणजे ते या पुढे पडणारच नाही असे काही मी सांगू शकत नाही कारण दर वेळी तापाने फणफणले की आख्खी रात्र हेच स्वप्न मला पडत राहते. अगदी आठवतंय तेंव्हापासून आतापर्यंत प्रत्येक वेळी. लहानपणी तर एक वेडी कल्पना माझ्या मनात होती. कदाचित हे स्वप्न अजून विस्ताराने कधी तरी पडेल मला. त्याचा अर्थ कळेल. हे अर्धवट स्वप्न वाटे त्यावेळी, आणि जर पूर्ण एपिसोड स्वप्नात दिसला तर बरे होईल असेही वाटे. त्यामुळे अनेकदा, "मला ताप यावा" अशी माझी इच्छा असे. तापाने फणफणलेली मी आणि त्या स्वप्नात असणारी शेकोटी, तो लाल रंगाचा भगभगीत प्रकाश, त्या मशाली, काय संबंध आहे साऱ्याचा एकमेकांशी माहित नाही. इतक्या लहानपणीपासून हे स्वप्न पहातीये मी, त्यामुळे कधी याच्या अर्थाचा विचारच मनात आला नाही. ताप आला की हे स्वप्न पडणारच हे इतके पक्के आहे. पण दरवेळी सकाळी जाग आल्यावर मनात उरतो तो फक्त लालभडक प्रकाश.


पाऊस पडत नाहीये, पण पडून गेल्यासारखं वातावरण आहे. मी एक्स्प्रेस वे वर गाडी चालवतीये. बरोबर अजून कोणी गाडीत नाहीये. नेहमी चालवते तोच (जरा जास्तच ) स्पीडही आहे गाडीचा. आजूबाजूला हिरवेगार डोंगर, मन प्रसन्न. गुंगून गेलीये हे दृश्य डोळ्यात साठवून घेण्यात. स्पीड वाढतोच आहे, आणि रस्त्यावरचं माझं लक्ष कमी होत गेलंय. शॉट१ कट.......तोच रोड, तीच मी, तीच गाडी, तसाच स्पीड. माझे लक्ष रोडवरच आहे. हळूहळू डोळ्यावर झापड येतीये माझ्या, या मला बघणारी अजून एक मी आहे. ती घाबरते. अक्सिडेंट होणार आता माझा या कल्पनेने. पण असं काही होत नाही. एका सरळ रेषेत मिटलेल्या डोळ्यांनी मी गाडी चालवते आहे. ( बाकी लोकांचे नशीब अगदीच जोरावर आहे म्हणायचे). एक मी गाडी चालवतीये आणि एक मी त्या मला बघते आहे. शॉट २ कट. वर्षानुवर्षे म्हणजे जवळपास १० वर्षे अधून मधून मी हे एक स्वप्न पाहतेच. या स्वप्नाचा अर्थ लावू जावे तर वाटते, कुठे तरी मला जागे, सजग, सतर्क ठेवणारे हे स्वप्न आहे. किमान तशी गरज आहे हे जाणवून देणारे. पण स्वप्नातून जागे झाल्यावर मनात उरतो तो आजूबाजूचा हिरवेगार परिसर, रस्त्याचा एक राखाडी, काळा रंग.


एक सुंदरशी बाग आहे. खरतर वाडी आहे. कारण दुतर्फा पोफळीची झाडे आहेत. अशा वाड्या कोकणात कुठेही दिसतातच. रस्ता, मध्ये वाडी आणि पलीकडे थेट समुद्र किनाराच. परिसर खूप सुखावणारा आहे. इथे मला मी कुठेच दिसत नाहीये. पण मी हे सारे पहात आहे. एक मस्त पैकी सैर होते या परिसराची. दरवेळी या स्वप्नातल्या बागेत कोणत्या तरी फळांचे ढीग रचलेले असतात. कधी केळ्यांचे घड, कधी नारळाने लगडलेले झाड, कधी आंब्याने भरून ठेवलेली मोठी टोपली. या स्वप्नातून जागे झाल्यानंतर ही मन प्रसन्न असते. त्या त्या फळाच्या रंगाचे एक अवकाश सोबत घेवून. अगदी पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा................

Monday, June 18, 2012

मनातलं आकाश

आकाशाचं आणि आपलं नातं तसं जुनंच. अगदी लहान असतो तेंव्हा एक एक छंद असतात. वाड्याच्या मोठ्या अंगणात या टोकापासून त्या टोकापर्यंत पळत जायचे आणि चंद्र पण आपल्याबरोबर पळतो का ते पहायचे. अर्थात प्रत्येक वेळी तो तसा पळतो असेच वाटते . मग खूप राग येतो आणि मी ओरडायची त्याच्यावर, "तू पळू नको माझ्याबरोबर, एका जागी बसून राहा." पण ऐकायचा नाही तो माझे काही. जवळपास ५/६ वर्षाची होईपर्यंत हा खेळ चालू असे.

त्याच सुमारास माझी पणजी गेली. मला तिची खूप आठवण येत असे. देवाकडे गेलेली माणसे आपल्याला देवळात का दिसत नाही असा कायम मला प्रश्न पडे. मग कोणीतरी मला सांगितले की देवाकडे म्हणजे आकाशात जातात माणसे. मग मी माझी समजूत करून घेतली की चांदण्या म्हणजे ती माणसे असतात. मग या कल्पनेचा अजून विस्तार होऊ लागला जसे की ती माणसे आपल्याकडे पाहतात. काळे ढग म्हणजे राक्षस असतात, पांढरे ढग म्हणजे देवाचे सैन्य असते. या दोन ढगांमध्ये युद्ध होते. मग मी खूप वेळ अशी ढगांची हालचाल बघत बसे. सुट्टीत आजी कडे जात असू, तेंव्हा अंगणात पडल्या पडल्या रात्री आजोबा नाहीतर मामा आम्हा सर्व भावंडाना " तो बघ सप्तर्षी" " ते मृग" असे दाखवत असे.

नंतर कधीतरी कोणीतरी मला सांगितले, की आकाशातून पडणारा तारा पहिला की आपलं जवळचं माणूस आपल्याला दुरावतं. अगदी लहान नव्हते तेंव्हा, तरी विश्वास ठेवला होता त्यावर मी. (जसा पापणीचा एखादा केस गालावर पडला, तर मुठीवर ठेवून काहीतरी मागण्याचा प्रकार मी अजून ही कधी कधी करते). असंच एकदा कधीतरी माझं माझ्या आईशी भांडण झालं होतं. कोणाशी भांडण झालं की मग मी त्या व्यक्तीबरोबर बोलणं बंद करते पुढचे काही दिवसतरी, किमान माझा राग शांत होईपर्यंत. तर असा आमच्या दोघींमधील अबोला चालू होता. रात्री जेवणानंतर, मी, माझी बहिण आणि शेजारच्या काकू फिरायला गेलो होतो. चालता चालता लक्ष आकाशाकडे गेलं, आणि एक तारा निखळताना दिसला. मी मनातून हादरले. त्या दोघीना म्हटलं चला बास फिरणं, आपण परत जावूया. आपण आईशी बोलत नाही आहोत, आणि तारा पडताना पहिला या दोन्ही गोष्टी एकत्र करून मी इतकी अस्वस्थ झाले, घरी पोहचले, तोपर्यंत रडूच फुटले. आई झोपली होती. तिला उठवून, म्हटलं "आई सॉरी, मी तुझ्याशी पुन्हा कधी भांडणार नाही". तिला काही कळले नाही मनात काय आधी घालमेल झाली होती ती. मग कॉलेजचे दिवस आले आणि हिंदी सिनेमांचेपण! मग त्यांनी ज्ञानात भर घातली " किसी टूटते हुए तारे को देखो, और कोई मन्नत मांगो, तो वो पुरी हो जाती है" शाहरुख खानच्या तोंडचा डायलॉग. हाहाहा...... आता नक्की काय खरं होतं यातलं? त्याचवेळी कधीतरी आकाशात काळे ढग जमा झालेले आवडायला लागतात, आणि मन "काली घटा छाए मोरा, जिया घबराए" असं म्हणत येणाऱ्या कोणाची वाट पाहू लागते.
दिवस सरतात, आपण बदलतो, कधीकधी मग ढग मनात दाटू लागतात, आणि डोळ्यांमधून बरसात सुरु होते. आकाश तेवढंच जवळचं वाटत राहते पण मग एक आकाश मनालाच व्यापून उरते. खऱ्या आकाशाकडे लक्ष जाणे कमी होतं. मनातल्या आकाशातच कधी पौर्णिमा असते, कधी आवसेची रात्र उतरते. कधी निरभ्र स्वच्छ आभाळ तर कधी गच्च दाटून आलेले ढग. अशातच कधी पौर्णिमेचा चंद्र खिडकीमागच्या आंब्याच्या झाडातून खोलीत उतरू पाहतो. हलकेच मला जागं करून जातो, गवसलेले काही पुन्हा मिळवल्याचा आनंद देवून जाण्यासाठी.


"तुका आकाशाएवढा" तर पाहिलेला नसतो, पण आकाशा एवढी मोठी माणसे आसपास आहेत हे जाणवू लागते. अनेक गोष्टींमधील अथांगता जाणवू लागते. जाणीवा बदलतात, त्या व्यापक होतात. परवा माझ्या ऑफिसमधील एका सिनियर व्यक्तीशी बोलत होते. ते म्हणाले " आपल्यासारख्या जाणीवा असलेली व्यक्ती भेटली, की बरे वाटते, आणि आयुष्यात काहीतरी उणीव असल्याशिवाय जाणीवा तितक्या खोल असत नाहीत." सोप्या सरळ शब्दात किती अर्थ व्यापलाय ना?






Saturday, June 9, 2012

मागे वळून पाहताना .......


परवा एका मित्राशी फोनवर बोलताना तो म्हणाला " बरेच दिवस काही लिहिलं नाहीयेस, एकपण नवीन पोस्ट नाही ब्लॉगवर तुझी". आणि एकदम चमकून मी विचारलं, "तू इतक्या नियमित माझा ब्लॉग वाचतोस?" माझ्या लक्षातच आलं नव्हतं की असे किती जण आपला ब्लॉग वाचत असतील, जरी त्यांनी काही प्रतिक्रिया नाही दिल्या तरी. तसा हा ब्लॉग मी सुरु करून बरीच वर्षे झाली आहेत पण खऱ्या अर्थाने मी मनातलं यावर उतरवायला सुरुवात केली ती मागच्यावर्षी. जूनच्या दुसऱ्या शनिवारी झालेल्या एका परीक्षेनंतरचा निवांत वीकेंड....आणि मी लिहिती झाले. अनेकदा मी म्हणते तसे हे शब्दांचे खेळ. छोट्याशा मनोगताला भलीमोठी शब्दांची आरास. उद्या जूनचा दुसरा शनिवार, माझ्या टीममधील एकीची उद्या तीच परीक्षा आहे, तिला शुभेच्छा दिल्या आणि मला आठवले की खऱ्या अर्थाने येत्या रविवारी आपला ब्लॉग ही एक वर्षाचा होईल.
या एक वर्षात, या ब्लॉगने मला व्यक्त व्हायला मदत केली. मी नेहमी म्हणते की आजूबाजूला अनेक जण, अनेक नातेवाईक, मित्र मंडळी जरी असली तरी प्रत्येक वेळी ते सर्व "माझिया जातीचा" या सदरात मोडतातच असे नाही, त्यामुळे तो शोध तसा कायमच असतो. पण हा ब्लॉग माझी मनातलं काही सहज मांडायची गरज पूर्ण करतो. तशा अर्थाने ही माझी डायरीच.......कोणालाही वाचायची परवानगी असलेली. त्यामुळे सुरुवातीला तो कोणी वाचतो की नाही याची मी फारशी दखल घेत नसे. पण नंतर लक्षात आले की माझ्या ओळखीतले अनेक जण तो वाचतात. प्रतिक्रिया पण देतात. कधी प्रत्यक्ष भेटीत, किंवा फोनवर आवर्जून तसं सांगतात ही.  अशा प्रतिक्रिया तुमचा उत्साह वाढवतात हे मात्र खरं. असा हा,  माझे, मला" असलेल्या ब्लॉगने संवादाचा ही सेतू बांधायला सुरुवात केली. 
संवाद संपला की नाती संपतात, म्हणूनच मला जापायचा आहे हा सेतू, हे नातं. संवाद संपला की सारे जगणेच रुक्ष कोरडे होवून जाते. म्हणूनच "आपुला हा संवाद आपणाशी" असाच चालू राहो.

Saturday, May 19, 2012

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा.......

कुमार गंधर्वांचा गाणं ऐकणं ही एक आनंददायी गोष्ट. अनेकदा त्यांनी लावलेला "सा" अंगावर काटा आणतो, रोमांचित करतो. एखादी पावसाळी संध्याकाळ. त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम, अगदी कमी उपस्थिती, पण तुमच्या सुदैवाने ते मात्र कार्यक्रम स्थळी वेळेवर पोहचले आहेत. त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे कितीही कमी लोक असले तरी  ते गाणं सुरु करणारच. बाहेर कोसळणारा वरुण आणि आत ही बरसात. अगदी स्वरात चिंब भिजवून टाकणारी. आपोआप डोळे मिटून घेता यावेत, आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचा भान निघून जावं. कानापर्यंत पोहोचणारा प्रत्येक सूर, कानात, मनात साठवता यावा. आता कुमार गंधर्व नाहीत, त्यांना प्रत्यक्ष समोर बसून गाताना ऐकण्या इतकी मी नशीबवान नव्हते. तरीही......


छानशी सुट्टी असावी. सर्व सुट्टी स्पेशल कामे बाजूला सारून हाती असलेला वेळ मनासारखा घालवता येण्याची मुभा असावी. घरात नि:शब्द शांतता  असावी. बाहेर ही कुंद अशी हवा असावी. कधी कधी अशी हवा मला खूप आल्हाददायक वाटते. दुपारी मनाजोगे जेवण, नंतर एक छानशी डुलकी व्हावी. उठल्यानंतर, फ्रेश होवून टि.व्ही. समोर जावून बसावे. सगळे पडदे सारून सुंदरसा सिनेमा पाहण्याकरिता मनाजोगी वातावरण निर्मिती व्हावी.   आणि एखादा आवडता, सिनेमा शांतपणे बघता यावा. कोणत्याही जाहिरातीशिवाय, कोणतही व्यत्यय न येता. कोणताही फोन, मोबाईल, घराची बेल  काही काही वाजू नये या वेळी. एखादी  हिंदी किंवा इंग्लिश सांगीतिक प्रेमकहाणी. रोमन हॉलिडे किंवा चोरी चोरी सारखे, राजकपूर किंवा देव आनंद चा एखादा हळूवार. हाणामारी, गुन्हेगारी, किंवा आर्ट फिल्म्सच्या नावाखाली दाखवले  जाणारे नको इतके वास्तव यातली कोणतीच गोष्ट मला आवडत नाही. हळू हळू मी सोफ्यावरून खाली जमिनीवर उतरते, आणि माझ्या सोबत सोफ्यावरचे लोड, तक्के ही. मधेच काही क्षण थांबून एखादा कप कॉफी बनवून घेवून तिचा आस्वाद घेत पुन्हा सुरुवात. हळू हळू मग संध्याकाळ होवू लागते, घरात साठवलेला हलकासा अंधार थोडा गडद होवू लागतो. त्या नायिकेच्या जागी मी आता स्वत:ला पाहू लागते. एक हलकीशी धुंदी मनावर पसरलेली असते. खरतर खूप खास नाही यात तरीही....माझ्यासाठी असं सर्व घडणं हाच एक कपिला-षष्ठी चा योग येण्याजोगी गोष्ट आहे.

Friday, April 27, 2012

मला कधी कधी गम्मत वाटते हिंदू धर्माची, एखादा धर्म इतका सहिष्णू, इतका सर्वसमावेशक, इतका उदार मतवादी कसा असू शकतो. हा एकमेव जगातला धर्म असेल की या धर्माचे असून, त्याचे पालन करणे तुमच्यावर बंधनकारक नाही, देवाचे अस्तित्व तुम्ही नाकारू शकता, रूढी, परंपरांचे पालन न करताही तुम्ही जगू शकता, इतकेच नव्हे तर उघड उघड त्याला नावे ही ठेवू शकता आणि कागदोपत्री तरीही त्याचे नाव लावता....काय म्हणावं यास?

Thursday, March 8, 2012

Status update

व्यक्त होणं तशी प्रत्येकाची गरज. कधी एखाद्या खास व्यक्तीपाशीच वा कधी फक्त आपल्या मनातलं बोलता येणं. कोणी ते ऐकताय, वाचतंय, प्रतिसाद देतंय याच्याशी फारसं देणं-घेणं नसलेलं. हे असं व्यक्त होणं खूप तात्कालिक असतं, जरुरी नाही काही दीर्घकालीन असं काही त्यातून गवसेल. पण किमान स्वत:च्याच विचाराकृतींचे विविधरंगी आकृतीबंध पुढे जावून जे कदाचित हास्यास्पद वाटतील, कदाचित मोहक वाटतील. पण ती काळाची गरज असते.




जोपर्यंत मी एका सर्वोत्तम IT कंपनीचा भाग होते तोपर्यंत तेथील BB किंवा blog माझी ही दुसऱ्या प्रकारची गरज तरी पूर्ण करत असे.. जेंव्हा बदलाची चाहूल लागली तेंव्हा मी फेसबुक चा विचार सूरू केला. तोपर्यंत मला कधी त्याची गरज वाटलीच नव्हती. आता ६ महिन्यांपेक्षा जास्त दिवस झालेत पण काहीतरी मिसिंग आहे. सावरीची वाळकी शेंग उघडली जावी आणि त्यातला कापूस (लहान मुलांच्या भाषेत "म्हाताऱ्या") हवेत भिरभिरत राहावा तसं काहीतरी दिवसरात्र डोक्यात भिरभिरत असतं. पण कित्येक दिवस झालेत, त्यांची एकसंध गुंफण मी करू नाही शकलेली. ही देखील एक प्रकारे घूसमटच. अनेकदा असं वाटून जातं की ही डोक्यातली सारी चक्रे थांबवीत. एका शांत झोपेतून फ्रेश जाग यावी आणि सारे विचार, ताण हलके होवून जावेत. पण असं घडत नाही. आजकाल जेंव्हा जेंव्हा मी फेसबुक ला लॉग-इन होते तेंव्हा बऱ्याचदा इथल्या चर्चा, status updates माझ्या अस्वस्थतेत भर घालतात. खरंतर या अवस्थेस माझी मीच कारणीभूत असेन, तरीहि असं वाटतंय की थोडे दिवस यापासून दूर राहून पाहावं. स्वत:च स्वत:शी संवाद साधावा. थोडे म्हणजे किती माहित नाही. असं नाही घडलं तर काय माहित नाही. असं ठरवून आखीव रेखीव असं आयुष्य थोडंच असतं?

Saturday, January 21, 2012

माझिया जातीचा मज कोणी भेटो..........

सध्या अनेक मराठी पुस्तकं वाचतीये...म्हणजे सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी एक, घरी आल्यावर एक, वीकेंड चा तिसरंच...मजा वाटत आहे. सर्वात वेड लावलंय ते "सुनीताबाई देशपांड्यांच्या - प्रिय जी. ए." या पुस्तकाने. "माझिया जातीचा मज कोणी भेटो" ही प्रत्येक माणसाला निरंतर वाटणारी ओढ असते. जी. ए. आणि सुनीताबाई मधील हा पत्र-संवाद ही काहीसा असाच. हा एकतर्फी संवाद इतका वेड लावतो तर दुतर्फी पत्रोत्तर वाचणे म्हणजे तर जणू एका सुंदर नात्याचे मूक साक्षीदार होण्याचे भाग्यच .... 


खरंतर यापूर्वी पण त्यांनी मला भारावून टाकलं होतं, जेंव्हा "मी आहे मनोहर तरी" वाचलं होतं. तेंव्हा कॉलेजमध्ये होते मी आणि ते पुस्तकं नुकतंच प्रकाशित झालं होतं , आणि त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, तेंव्हा मी कॉलेज च्या एका वार्षिक अंकात " आत्मवृत्तावर अशी झोड उठवणं कसं चुकीचं आहे" हे ठसवणारा लेख लिहिला होता. 

आत्ता पर्यंत अनेक व्यक्ती "बाप माणूस" वाटल्या, अनेक खूप आवडल्या पण कोणाचं अनुकरण करावं असा कधी वाटलं नव्हतं, ही पहिली व्यक्ती जिच्या पाऊल खुणा धुंडाळत आपण चालावं असं वाटून गेलं.

Thursday, January 12, 2012

याचसाठी केला होता अट्टाहास.

एखादी महफिल असते. कधी कान इतके तृप्त होतात, वाटतं बस हेच ते, याचसाठी केला होता अट्टाहास. तर कधी सूर लागतात कधी लागत नाहीत, कधी तानपुरे जुळतात कधी जुळत नाहीत, कधी कधी सर्वोत्तम गायकाला मनाजोगी साथ मिळत नाही, कधी सर्व काही उत्तम जमून येते तरीही रसहीन होते महफिल. तरीही रसिक सवाई गंधर्वला जाणे सोडत नाहीत. एखाद दिवशी एखाद्या महान गायकाचं गाणं रंगलं नाही म्हणून त्याला ऐकणं कोणी सोडत नाही. त्याचं महत्त्व काही कमी होत नाही.
आयुष्य म्हणजे वर्ल्ड कप फायनल नसते की आज नाही जिंकलो तर संपले सारे. जिंकणे हरणे काही क्षणांची बात.
आयुष्य म्हणजे अशीच रोज नव्याने जमणारी मैफील असते. सतत कलाकार बदलत असतात प्रत्येकाची तऱ्हा निराळी, हर एकजण आपल्या गळ्यातून काय हरकती काढेल माहीत नाही. कोणी मनात मावणार नाही इतका आनंद देवून जाईल तर कोणी निराशा करेल. दर दिवशीचे वेगवेगळे राग निराळे, आपण कधी कलाकार तर कधी रसिकजन. मैफिलीला रोज उपस्थिती लावणे हे आपले काम.

Friday, December 16, 2011

किती दिवस झालेत..........


खरतर गंमत असते, छानशा हवेत घराबाहेर पडावे कोणत्याच कारणाशिवाय. वाट फुटेल तसं चालत राहावं, कंटाळा आला की परतीची वाट धरावी. वाटेत एखादं देऊळ असावं, डोळे भरून मूर्तीकडे पाहावं, शांतपणे तिथे २ क्षण विसावा घ्यावा, किती दिवस झालेत पर्वतीवर नाही गेले, अनेकदा सारसबागेसमोरून जाते पण थांबून गणपतीचं दर्शन घ्यावं हे राहूनच जाताय.
किती दिवस झालेत, लक्ष्मी रोड किंवा एम जी रोड वरुन विंडो शॉपिंग करत भटकले नाही. कितीतरी दिवस झालेत घरी टेरेस मधे निवांत बसून चहा चा आस्वाद नाही घेतलाय, अनेकविध पदार्थांची चव या ना त्या कारणानी चाखत असते पण कितीतरी दिवस झालेत, तव्यावरची गरम पोळी आणि शिकरण मात्र विसरले आहे
किती तरी दिवस झाले काही कारण नसताना, मामा, आत्या, काका-काकू यांच्याकडे गेले नाही. की उगाचच कोणा मित्र-मैत्रीणीला फोन नाही केला. अनेकदा जी-टॉक किंवा एफ-बी वर अनेक जण ऑनलाइन दिसतात, पण गप्पा तिथेही होत नाहीत. माणसं आपल्या माणसांपासून तुटत जातात की स्वत:पासूनच?

Saturday, December 10, 2011

Change is the only Constant...........

असं म्हणतात " Change is the only Constant " खरच आयुष्याचा अगदी अविभाज्य घटक. कधी खूप हवाहवासा तरी कधी नकोसा, आपल्यावर लादलेला. बरेच दिवस मनात होतं सद्ध्या ज्या बदलातून मी जात आहे त्याबद्दल काही लिहावं. खरतर लग्न आणि आईपण ही दोन आयुष्यातील स्थित्यंतरे अनुभवल्या नंतर कोणताच बदल कठीण वाटू नये. पण तसं घडत नाही. तसे बदल हे रोजचेच....बरेच दिवस घराकडे धड लक्ष नाही दिले आहे, कुंडी मधलं रोपटं किती मस्त वाढलं आहे, बरेच दिवसात मैत्रीणी बरोबर मनसोक्त गप्पा झाल्या नाहीत, आमचं पिल्लू आता बरच मोठं आणि शहाणं झालय,....एका रात्रीत घडत नाहीत हे बदल, दर दिवशी हर क्षणी जग बदलत आहे, आपल्याला ते काहीसं उशिरा जाणवतं बस इतकच.


मला आठवतो सर्वात मला आठवणारा नकोसा बदल म्हणजे मी दहावीत असताना आम्ही घर बदलले ते. नवीन घरात शिफ्ट झालो, घर लावून झाले, या घराला मागे पुढे आंगण होते, जून महिना, ढग भरून आलेले, आणि कातर वेळी मी उदास अशी अंगणात बसून, विचार करत "का इथे? मला पुन्हा जुन्याच घरी जायचं आहे" पळून जावं पुन्हा त्या जुन्या घरी. पण ते घर तर पाडलं होतं, त्याजागी एक शॉपिंग कॉंप्लेक्स उभा राहण्यासाठी. त्या वेळी शेजारच्या बंगल्यातून आर्त सूर आले "जीवलगा.........राहीले रे दूर घर माझे......." डोळे भरून आले.(ते आत्ता या क्षणी पण आलेत). तेंव्हापासून आजतोपर्यंत मी माझया घराशी इतकी अटॅच आहे की एखादा दिवस सुद्धा मला माझया घरी न राहण्याची कल्पना रुचत नाही. रात्री कितीही उशीर होवो, मला माझयाच घरी परत जायचं असतं.


दूसरा मोठा बदल म्हणजे काही वर्ष निभावलेल्या होम-मेकर च्या रोल मधून स्वत:ला बाहेर काढण्याचा केलेला खटाटोप. जरी हा ही बदल स्व-इच्छेने होता, तरी सोपा नक्कीच नव्हता. ए कंप्लीट मेक-ओव्हर. अनेक महिने मी मलाच तयार करत होते, आणि पुढची अनेक वर्षे गेली ....माझे आज मी आहे त्यात स्थित्यंतर घडून यायला.


गेल्या काही वर्षात जेंव्हा जेंव्हा मी नोकरीत बदल केला तेंव्हा तेंव्हा पहिल्या दिवशी नवीन ऑफीस मधून पळून जावं, पुन्हा त्याच जुन्या ऑफीस मधे, आपल्या माणसात. माझे प्रत्येक ऑफीस हे माझे दूसरे घरच होते. तिथल्या प्रत्येक गोष्टीशी मी इतकी  जोडलेली असते की दूर जायची वेळ आली की एक इतकी अस्वस्थता मला घेरून टाकते. जसजसा तो दिवस जवळ येतो तसा नवीन काहीतरी मिळवल्याचा आनंद मावळू लागतो, आणि काहीतरी गमावतो आहोत ही भावना प्रबळ होऊ लागते.


बर पण हे बदल काही कोणी लादलेले नसतात माझयावर. माझे मीच प्रयत्नपूर्वक ते घडवलेले असतात, तरी नाळ अशी तुटता तुटत नाही. यावेळी पण असंच घडलं होतं, मी स्वत:ला खरतर खूप फ्लेक्सिबल समजते, कुठे ही कोणाशीही मी अड्जस्ट करू शकते, असा एक विश्वास जवळ बाळगते. पण तरीही अवघड असतो तो ट्रॅन्ज़िशन चा काळ. जेंव्हा तुमची अवस्था "घर का ना घाट का" अशी असते. आसपासचा कोणताच माणूस आपला वाटत नाही, आजूबाजूच्या कोणत्याच घटनांशी आपला काही संबंध आहे असे वाटत नाही, मन जून्याच गोष्टींमागे धाव घेत राहतं.

पण ते ही दिवस सरतात, एखादी घटना, एखादी व्यक्ती, एखादी अवघड टास्क, तुमची नाळ नव्याशी जोडते, हळू हळू सूर जुळत जातात, एखादा विसंवादी इथेही असतोच. पण तसा तो सर्वत्र च असतोच हे मनोमन आपल्याला माहीत असते. इतके रुळून जाता तुम्ही त्या ठिकाणी, की काही काळानंतर सार्‍या गोष्टी अतिपरिचित, रूक्ष, त्याच त्या वाटू लागतात .....आणि मग सुरू होतो प्रवास पुन्हा एका बदलाच्या दिशेने.....

Monday, October 24, 2011

कळतं पण वळत नाही........

आज सकाळी उठून चहाचा मग घेऊन नेहमीप्रमाणे टेरेसमधे गेले, इतकी मस्त थंडी पडली होती.....अजून दिवाळी सुरू नाही झाली त्यामुळे हवाही प्रदूषीत नव्हती. मनात विचार आला, आता सकाळी चालायला जायला सुरूवात करायला हवी. पावसाळा संपला...आता न जाण्यासाठी काही कारण नाही.



....नाही नाही......कारणं अशी संपत नाहीत...खूप थंडी आहे, उन्हाळा आहे, काल रात्री खूप उशिरा घरी आले, काम खूप आहे, अभ्यास करायचा आहे, पाहुणे आहेत....न संपणारी कारणे. कशा ना काही गोष्टी आपण मनापासून टाळतो? आजकाल रोज दिवसभरात अनेकदा माझया मनात येतं.....उद्यापासून जिम, चालणे, योगा काहीतरी सुरू करेन....पण तो उद्या काही उजाडत नाही. काही तरी कारण सापडताच न जाण्यासाठी.


१ तारखेपासून, सोमवारपासून, नवीन वर्षाचा असे अनेक संकल्प करून झाले, गेल्या वर्षी या तीन्ही गोष्टी एकाच दिवशी जुळून आल्या पण माझा संकल्प जिथल्या तिथेच.अशी न आवडणार्या कामांची माझी एक मोठी लिस्ट आहे. जसं की जेवणानंतर टेबलाची आवाराआवारी, बँकेत जाणे, वाढदिवसाच्या दिवशी येणार्‍या फोनवर बोलणे, तसा अधूनमधून त्यांचा क्रम बदलत राहतो, पण व्यायाम कायम आपले प्रथम स्थान टिकवून आहे. किती प्रयत्न करून झाले, किती जिम ना देणग्या देऊन झाल्या पण नाही ती आवड मी काही केल्या निर्माण नाही करू शकले. मग कधीतरी समर्थन बुद्धिजीवी असण्याचं. कळतं पण वळत नाही, याचं यापेक्षा उत्तम उदाहरण दूसरं मिळणार नाही.

Friday, March 25, 2011

Does it happen with all?

Does it happen with all?

It was the beginning of year 2007, I joined a project in IMS as my first one. It was a team of nearly 15 resources. It was like all goodies packed together. You name it and that quality was there in this team. The feeling prevailed as no other combination of a team can be as perfect as this.

Time has its own plans to overrule all yours. Slowly team started downsizing, still the group remained the same. Most of us changed their projects, few preferred to go back to their base locations. Still we were together, some actually, some virtuallyJ.  I changed not only the project, but the stream from operations to Risk management. For me this journey was certainly not an easy task, but everyone supported during. Whichever project/team we joined, there we could get only colleagues and not friends just because we never thought of any one else as our friends. 4 years not a small term in IT world, slowly this group started getting trimmed as well with few changing the organisation. Still the sprit of being together continued.

Every time when someone was about to leave, I used to think “Its part of life, noting to feel  sorry about” About 4 months back someone left the organisation, and only two of us remained. My feelings were still same. In last four months, we were so closed to each other, and I never imagined a life within the campus without her. We almost shared everything with each other. Whatever leisure time, we spent it together. It is almost one and the half month now, I know that march last week going to be her last week in this organisation.

For last few days, my deliverables are keeping me bit busy. Friday, I realized, I have to attend 3 full days training starting from Monday. At lunch time, I informed her, of course she was not happy to listen that. I paid no attention to it, I had full packed day till late evening in office. It was around 8 pm, I was on my way to home (this is the time I like the most, which gives me some avenues to get mind calm and think). All of a sudden, the whole journey of 4 years, I could see. I was full of tears. This is my lil friend will not be there from next week and I shall be all alone L. How should I let all of them know, how important is everyone for me.

Oh….GOD, why this????  I never thought of my life within the infy campus without all of them. But really what happens to such groups/ teams which are together for such a long time? Does any one feels the same? It’s very sad to imagine that you are alone, in a campus of at least 20k people. No one will call me for a cup of coffee, no one will wait for me for food even by adjusting own time as per my schedules, no one will ask to get something home cooked stuff, no one will admire whatever stuff I cook and bring, no one will ask me how I manage my home, office and studies, no one will get angry with me for not remembering b’days. It is such a sad moment. Although brain says life has to move on…heart is in no mood to accept…

Does it happen with all ?