Showing posts with label १००वी पोस्ट. Show all posts
Showing posts with label १००वी पोस्ट. Show all posts

Tuesday, November 20, 2012

शतकानिमित्त संवाद.....


हे मात्र अगदी ठरवूनच होते. १००वी पोस्ट कशी असावी याचा विचार साधारण ९६/९७ वी पोस्ट ब्लॉगवर टाकतानाच सुरु झाला होता. आवडीच्या विषयावरच असावी हे नक्की झालं होतं. लिहिताना आवडीचा विषय म्हणजे खादाडी. तसंही "इस बात पे सेलिब्रेशन तो बनता है" :) पण झालं काय की मधल्या २/३ पोस्ट साठी काही लिहिणेच होईना. हे म्हणजे कसं की "९६ वर असताना १०० वी रन कशी घ्यायची हे नक्की करायचे, पण मधल्या ३ धावा घेतानाच इतके चाचपडत खेळायचे की कधीही आउट होईल" असे झाले.

तसा मी ब्लॉग सुरु केला तो २००९ मध्ये. काय आणि कसं लिहायच याचा फारसा अंदाज आणि आराखडा नव्हताच. नंतर मी माझ्या कामात आणि अभ्यासात इतकी व्यस्त होऊन गेले की या गोष्टी जवळपास विसरूनच गेले. त्यामुळे आरंभशूरपणा या गटात हा ब्लॉगही लगेचच सामील झाला. याचे दुसरे कारण म्हणजे इन्फी बीबी आणि इन्फी ब्लॉग ज्यामुळे व्यक्त होण्यासाठी इतर कशाची गरजच नाही उरली.

त्यामुळे खऱ्या अर्थाने मी या ब्लॉगवर कधी लिहू लागले तर ते २०११च्या एप्रिल-मे महिन्यात. तो कोण वाचतय, नाही वाचत आहे, याकडे सुरुवातीला फारसे माझे लक्षही नव्हते. फेसबुकवर पण मी त्याचसुमारास अवतरले त्यामुळे तशा दोन्ही गोष्टी अपरिचितच...... मग परिचय होण्याचा सुरुवातीच्या काळात असतो तसा बुजरेपणा आणि एक प्रकारचे अवघडलेपण तेंव्हाही होतेच. नावाप्रमाणेच हा ब्लॉग माझे मला असाच होता. थोडा लोकांपासून अलिप्त असा. अनेक दिवस काही न लिहिता जात, ज्याचे फार काही वाटतही नसे. नंतर कधीतरी मराठी-ब्लॉग विश्वावर हा जोडला आणि खऱ्या अर्थाने ह्या जगाशी माझी ओळख झाली. तत्पूर्वी काही ब्लॉगर मित्र मैत्रिणी होत्या जसे की श्रीयुत धोंडोपंतांचा ब्लॉग त्यांचाच दुसरा सांजवेळ, अजून एक मित्र आनंदचा ब्लॉग आणि अजून काही निवडक.

मुळात मी आळशी जमातीतली. नेटाने एखादी गोष्ट करण्यासाठी तितकंच मोठं कारण हवे. यावेळी ते कारण माझे मीच होते त्यामुळे हा प्रवास किती चालू राहील याबद्दल साशंक होते. तरीही मी खऱ्या अर्थाने लिहिती झाले. कोणी वाचतंय किंवा नाही, हे न पाहता व्यक्त होण्यातला आनंद घेवू लागले. खरतर हे अशा प्रकारे व्यक्त होणे याला मर्यादा आहेत, याची जाणीव असूनही हा प्रवास १००व्या पोस्ट पर्यंत चालू राहिला. याचे श्रेय आपणा सर्वाना. सहज,उस्फूर्त असे जेवढे लिहिणे जमेल तेवढेच लिहायला आजतरी मला आवडते आहे. त्यामुळे ठरवून काही लिहिणे थोडे अवघडच जाते. मग  ती कविता असो, किंवा इतर लिखाण असो अगदी कोणावर टीका असो, नाहीतर आठवणीना उजाळा. याच ब्लॉगने काही नवीन मित्र-मंडळही मिळवून दिले. त्यांच्या या ब्लॉगवर किंवा मेल, फेसबुकवर मिळणाऱ्या प्रतिक्रिया मला लिहिते ठेवत गेल्या, आणि मी लिहित गेले. या साऱ्यांचे मन:पूर्वक आभार!

१०० व्या पोस्टनंतर आता असे वाटते की स्वत:च्या जगापलीकडे जाऊन आता लिहिता आले पाहिजे. म्हणजे अट्टाहास नाही पण तरी देखील. नाव जरी मी....माझे.....मला असले तरी त्यापलीकडचे पण एक विशाल असे जग जे आहे त्याला या ब्लॉगवर माझ्या नजरेतून वाचता यायला हवे. "मी"ला वगळून लिहिता यायला हवे. खादाडीवर लिहायला हवे. पण सध्यातरी रेसिपी शेअर करणे हा हेतू नाहीये. त्याकरिता अनेक उत्तम असे ब्लॉग्स, उत्तम अशी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. मी त्यापेक्षा वेगळं काय लिहू शकते? सर्वसाधारण नाही तरीदेखील किमान "अनघास्पेशल" अशातरी रेसिपी या ब्लॉग वरून शेअर व्हायला हव्यात, स्वयंपाक या कलेविषयी लिहायला हवे, विविध प्रदेशातील खाद्य परंपरा, त्यांची वैशिष्ट्ये या बद्दल लिहायला नक्कीच आवडेल. मुळातच भारतीय खाद्य परंपरा मला खूप भावते कारण त्यामागे केलेला विचार, त्यातील वैविध्य मला मोहून टाकते. पण अजून अंदाज येत नाहीये की हे लिहिणे कसे आणि किती दूरपर्यंत पेलवेल?

तरीही हा ब्लॉग माझ्यासाठी एक सेतू बनला "virtual" जगाशी जोडले जाण्याचा. जितके आनंददायी आहे स्वत:कडून सशक्त असे काही लिखाण घडणे, तितकेच आनंददायी आहे ते इतरांचे असेच ब्लॉग वाचणे. अनेकजण इतके सुंदर आणि सकस लिहितात की, त्यांच्या नवीन लिखाणाची मी वाट बघत असते. वेळ मिळेल तसे वाचूनही काढते. दिवसातून एकदातरी, त्यांच्यापैकी कोणी काही नविन लिहिले कि नाही ते पाहते. धोंडोपंत, महेंद्रकाका, वटवट सत्यवान हेरंब, तन्वीचा सहजच, अनघाचा ब्लॉग, जागेची टंचाई असण्याच्या काळात शब्दांना अब्द अब्द जागा करून देण्याऱ्या साविताताई, अपर्णाची माझिया मना म्हणत घातलेली साद, आनंदचा White lily, संवादिनी, अजूनही फळ्यावर लिहिणारे विसुभाऊ (गुरुजी होते का हे पूर्वी?), भानस, चकली प्रमाणेच मस्त असा वैदेहीचा ब्लॉग असे अनेक. यांच्यापैकी अनेकांशी माझा प्रत्यक्ष परिचय नाही. पण अनेक वर्षांचा परिचय असावा अशी ओळख त्यांच्या ब्लॉगमुळे वाटते. मी मागे म्हंटल्या प्रमाणे "संवाद संपला की नाती संपतात, म्हणूनच मला जपायचा आहे हा सेतू, हे नातं. संवाद संपला की सारे जगणेच रुक्ष कोरडे होवून जाते. म्हणूनच "आपुला हा संवाद आपणाशी" असाच चालू राहो."