Wednesday, May 29, 2013

स्वच्छतेचे धडे … कोण शिकणार कोण शिकवणार?


फ्रेशरूम मधील डस्टबीन जे नेहमी  पायाने उघडले जाते, त्याच्यात बिघाड आहे, आता ते पायाने उघडत नाही, तर तुम्ही त्यात वापरलेले  टिश्यू पेपर कसे टाकाल?  उत्तरे - 
-हाताने डस्ट बीन चे झाकण हाताने उघडून 
-डस्टबीन च्या बाहेर कुठेही 
-आता डस्टबीन उघडतच नाही पायाने, तर टाकून देऊ  वाशबेसिन मध्ये 
-फ्रेश रूम स्वछ ठेवणे ही आपली जबाबदारी नाही, त्यामुळे काहीही करा 

हा न एका अभ्यासक्रमातला प्रश्न असायला हवा, आणि हा एकच प्रश्न नाही तर यासारखे असे अनेक …. आणि बालभारती किंवा सामान्य विज्ञान हे विषय शिकावायच्याही आधी हा विषय सर्व लहान मुला मुलींकडून घोटून घ्यावयास हवा. वर वर्णन केलेले उदाहरण गेले काही दिवस मी रोज पाहते आहे. शेवटी परवा एका मुलीला जी असेच टिश्यू पेपर जमिनीवर टाकून चालली होती तिला मी टोकले, पण मला माहित आहे असे वागणारी ती एकटी नाही. आसपास नुसते साक्षर भरलेत, सुशिक्षित कमीच. 

पाण्याचा वाहता नळ व्यवस्थित बंद करण्याचे कष्ट न घेणे, वाटेल तसे आणि वाटेल तितके टिश्यू पेपर वापरणे, अनेकींच्या पर्स मध्ये रुमाल वगैरे काहीच नसावे? बेसिन जवळ उभे राहून, केस सारखे करतांना, गळलेले केस तसेच सोडून जावे …. अशा एक न दोन अनेक गोष्टी. एका वाक्यात सांगायचे झाले तर "Toilet Etiquettes" शिकवलेलेच नाहीत यांना कोणी. बर पूर्वी कोणी शिकवले नाहीत तर आता समाजात वावरताना काही बघून, समजून घेवून काही चार चांगल्या गोष्टी शिकाल की नाही? अनेकदा मला या लोकांना एक प्रश्न विचारावा वाटतो "तुम्ही तुमच्या घरी असेच वागता का?" या प्रश्नांचे उत्तर जर हो असे असेल तर मग मात्र कठीण आहे. मग मात्र वयाच्या ३/४ वर्षीच एका अशा सक्तीच्या अभ्यासक्रमाची गरज आहे, जो पूर्ण केल्याखेरीज कोणत्याही शाळेत प्रवेश मिळणार नाही. 

मध्ये एक दिवस रात्री उशिरापर्यंत ऑफिस मधे होते, फ्रेश रूम मध्ये शिरले आणि तशीच उलट्या पावली परत फिरले कारण कोणाच्या तरी उलटी ने भरलेले वाशबेसीन तसेच होते. एवढेच नव्हे तर त्याचा दर्प तेथे भरून राहिला होता, अजून २ सेकंदभर तेथे असते तर मलाच मळ्मळायला लागले असते. हे लिहिताना सुद्धा मला इतकी किळस वाटते आहे, तर जिला कोणाला हे साफ करावे लागले तिचे काय? ते बेसिन तसेच सोडून जाताना त्या मुलीला/स्त्रीला काहीच कसे वाटले नाही? पण हे कोणी लक्षातच घेत नाही. 

अशा ठिकाणी स्वच्छतेसाठी अनेक स्त्रिया काम करत असतात, पण त्याही माणूसच आहेत ना? का नाही आपण माणसांना माणसांप्रमाणे योग्य त्या मानाने वागवू शकत? का असे सर्वत्र पडलेले टिश्यू, केस त्या स्त्रियांनी गोळा करून डस्टबीन मध्ये टाकायचे? का अशा रितीने खराब केलेले बेसिन कोणी दुसरीने स्वछ करायचे? मला बाकी इंडस्ट्री जसे की मन्युफ़्रक्चरिङ्ग किंवा बँकिंग या बद्दल फार माहित नाही, पण माझ्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्या जणी किमान कॉम्प्युटर ग्राज्युएट किंवा  इंजिनीअर असतात ना? मग तरीही असे ? पुस्तकी शिक्षण आपल्याला योग्य तऱ्हेने जर जगायला शिकवणार नसेल तर मग काय उपयोग? अनेकदा आपण समाजाच्या निम्न स्तरातील अस्वच्छता या बद्दल तावातावाने बोलतो, अशा लोकांमुळे आपले शहर किती बकाल होत चालले आहे यावर बऱ्याचदा आपले एकमत असते, पण आपल्यातल्याच या लोकांचे काय करायचे?

एक स्त्री म्हणून मी या गोष्टी वारंवार पहाते, म्हणून त्याच सांगू शकते, पण याचा अर्थ बाकी सर्वत्र सर्व ठीक आहे असे नाही … कारण तसे असते तर अनेक वर्षांपूर्वी Infosys च्या एका induction मध्ये तेंव्हाचा FLM राहुल देव ला, नवीन joinees ना "don't spit out chewing gums in urinals, as it gets sticked there and a person cleaning it, needs to remove it with his hands, please try to respect those people who keep this World class campus beautiful"  असे सांगावे लागले होते यातच सर्व काही आले नाही?

Monday, May 20, 2013

छोटी छोटीसी बात …

खरंतर यापूर्वीच कधीतरी भाज्या आणि त्या आणायला मी किती आवडीने जाते हे लिहून झालंय …… पण तरीही काहीतरी उरतेच. अनेकांना मंडईत जाणे म्हणजे आपल्याच डोक्याची मंडई झाल्यासारखे वाटते.
माझी एक मैत्रीण तिथे शिरताच जी शिंकायला सुरुवात करते ती थेट बाहेर पडेपर्यंत…. त्यामुळे कधी एकदा भाजी घेते आणि इथून बाहेर पडते असे तिला होवून जाते. माझ्या नवरयाला भाजी मंडई म्हणजे तिथे पडलेली घाण, कचरा एवढेच नजरेसमोर येत असावे, त्यामुळे तो शक्य तेवढी टाळाटाळ करत असतो. परवा माझ्या एका नवीन लग्न झालेल्या मित्राला, बायकोने भाजी आणायला पाठवले, हा बाबा घेऊन आला "पालक, शेपू, मेथी, राजगिरा, अळू ,मुळा ……. अशा सगळ्या पालेभाज्या, त्या पण २/२ गड्ड्या प्रत्येकी" बिचारी पुन्हा कधी त्याला भाजी घेऊन ये म्हणणार नाही कदाचित!

पण माझे असे नाही, माझ्यासाठी तो एक आनंदाचा भाग आहे. भाजी आणायला जायचे म्हणजे, माझ्या डोळ्यासमोर येतात त्या ताज्या हिरव्यागार भाज्या फक्त, तळात कोबीची पाने किंवा केळीची पाने टोपलीत छानशा रचून ठेवलेल्या भाज्या, हिरव्या रांगोळीत रंग भरावेत तशी मधेच कोठे लिंबाचा, मधेच लाल भोपळा तर कुठे टोमाटो, तर कुठे लाल सिमला मिरची. भरताची कधी पंढरी वांगी तर कधी जांभळी वांगी, मुळा हि रंगांची उधळण अजूनच वाढवतात. हिरव्यात तरी किती छटा असाव्यात …… मटारचा हिरवा वेगळा, वाल पापडीचा अजून वेगळा, तर भेंडी काळ्या रंगाला जवळ करणारा, गवार, पडवळ यांचा वेगळाच! तेथे जाणवणारा प्रत्येक भाजीचा आपला एक दरवळ. लिम्बांपाशी वेगळा ताजा असा, आले, लसूण, मिरच्या यांजवळ एक तिखटसा, पालेभाज्यांजवळ एक वेगळाच असा मातीच्या जवळचा……

अनेक वर्षे अशा रितीने तिथे जाऊन अनेक भाजीवाल्या माझ्या चांगल्याच ओळखीच्या झालेल्या आहेत. "ताई, आज ही भाजी घेवून जाच किंवा आज ही नेऊ नका" असं त्यांनी सांगण्या इतक्या. अशीच एकजण होती. अगदी बोलघेवडी अशी. मंडईत शिरल्या शिरल्या पहिल्या २/३ गाळ्यातच ती भाजी घेऊन बसत असे. आपण समोर गेलो की आधी एक मोठ्ठं हसू. आणि मग आमच्यात संवादरुपी लटकी चकमक घडे.

मी: कोबी कसा दिला ताई?
ती: ४० रुपये किलो.
मी: आणि वांगी? गवार
ती: तीस रुपये किलो, गवार  ६०
मी: लोकांनी काय भाज्या खाऊच नयेत का? इतक्या महाग भाज्या असतील तर?
ती: महाग कुठे देते? चांगलं खावं, प्यावं, सारखा पैशाचा विचार करू नये.
मी: अर्धा किलो कोबी, दीड पाव वांगी द्या.
ती: आणि काकडी गाजर नको? बर ताई एक बोलायचं आहे तुमच्याशी.....
मी: काय?
ती: मोठ्या मुलाचं कॉलेज नुकतंच संपलय, तुमच्या ऑफिसमध्ये नोकरीला लाऊन घ्या न.....

एकीकडे हे बोलत तिने आपल्या मनानेच माझी भाजीची पिशवी तयार केलेली असते.

मी: काय शिकलाय? काय आवडतं त्याला? हा माझा फोन नंबर त्याला फोन करायला सांगा, मी बघते.
ती: साहेब येत नाहीत आजकाल?
मी: माझी मीच येते गाडी घेऊन.
ती: तुम्ही गाडी घेतली नवीन?
मी: नाही, जुनीच आहे, शनिवार, रविवार साहेब माझ्यासाठी ठेवतात गाडी.

नंतर काही दिवसांनी मंडईतल्या सगळ्या भाजी वाल्यांचे गाळे बदलले गेले. ही अगदी लांब गेली. पण गाडी पार्क करून आत शिरण्याचा माझा रस्ता तोच राहिला. तिच्या गाळ्यापाशी पोहचेपर्यंत माझी जवळपास सगळी भाजी घेऊन होत असे. तिच्याशी थोडे बोलून जावे म्हणून थांबले तर....

ती:  या! सगळी मंडई पिशव्या भरून भरून घेऊन यायचे, इथे काही घ्यायचे नाही! शोभतं का ताई तुम्हाला हे?
मी:  जागा तुम्ही बदलली आणि नावं मला ठेवा. एखादी भाजी इथून घ्यायची म्हणून आधी नाही घेतली, आणि तुझ्याकडे पण नसली तर, मला त्रास ना पुन्हा मागे जाऊन आणण्याचा?
ती:  तरी मटार न्याच आता, स्वस्त दिला ६० रुपये किलो. किती देऊ, २ किलो करू का?
मी:  नको, आता खूप भाजी घेऊन झालीये, एवढ्या भाजीचे निवडणे होणार नाही आज मला.. दोन         दिवसाच्या सुट्टीत किती कामे संपवायची मी?
ती:  मी निवडून ठेवू का? संध्याकाळी येऊन घेवून जाल का?
मी:  असं करा ना उसळच करून पाठवा घरी!
तोपर्यंत किलोभर मटार बाईने पिशवीत भरलेला असतो वर काकडी, टोमाटो.
मी: येवढे नको.
ती: खाता का नुसतंच त्याकडे बघून पोट भरता? मी पैसे मागितले का?
मी: अहो ताई, प्रश्न पैशांचा नाही, घरी इन मीन अडीच माणसे एवढी जास्त भाजी संपत नाही, इथे रुपया दोन रुपयांसाठी घासाघीस करायची आणि नंतर वाया घालवायची हे पटत नाही म्हणून.
ती: जिवाला खा जरा! एवढं काम करून पैसे मिळवता आणि खात का नाही? बघा आजकाल चेहरा कसा उतरून गेलाय तुमचा.
मी: हो गं बाई, तुझ्याकडची भाजी येत नाही न माझ्या घरी, त्यामुळे काही अंगीच लागत नाही बघ!

असाच अजून एक भाजीवाला आहे. दिवसा सरकारी नोकरी करतो. शेती करतो आणि संध्याकाळी भाजी मंडईत असतो. तो विकतो त्यापैकी बऱ्याच भाज्या त्याच्या घरच्या असतात. त्यामूळे कोथिंबीर घेतली की न्या घरचा आहे म्हणत पुदिना, कढीपत्ता पिशवीत जाऊन बसतोच. तिथेही, "साहेब नाही आले बरेच दिवसात, आजकाल धाकट्या ताईपण येत नाहीत तुमच्या संग" ही चौकशी होतेच. एकदा नवीन गाडी घेऊन भाजी आणायला गेले तर दोघांनीही विचारले "ताई पेढे नाही आणलेत?" आणायला पाहीजे होते असे प्रकर्षाने वाटून गेले…

चार शब्द प्रेमाने बोलायला कोणालाच पैसे पडत नाहीत. पण कधी कधी हेच लोकांना कळत नाही. आणि मग लोकं आयुष्यातले लहानसे आनंदाचे ठेवे हरवून बसतात.