Wednesday, October 17, 2012

पुन्हा एकदा मला

पुन्हा एकदा मला दिवाळीत किल्ला बनवायचाय

माखल्या हातांनी स्वयंपाक घरात जावून डोकवायचंय

पेरलेले धान्य कधी उगवतं याची वाट पहायचीय

तिथे पहारा देत शिवाजीसह मावळ्यांचे रक्षण करायचय


पुन्हा एकदा भल्या पहाटे उठून पर्वती सर करायचीय

थकून भागून परत येताच फराळाचे ताट फस्त करायचेय

भरल्यापोटी चांदोबा किशोरच्या साथीने परीराज्यात जायचेय

गोष्टी सांगणाऱ्या वेताळाला एकदातरी पकडून ठेवायचंय


पुन्हा एकदा मला आजोळी जायचंय

बस मधून उतरतानाच मामा दिसतो का ते पहायचय

पहाटे चुलीपाशी बसून आजीशी गप्पा मारायच्यात

रात्री जागून अंधारात घाबरले तरी भुतांच्या गप्पा ऐकायच्यात


पुन्हा एकदा मला दफ्तर घेऊन शाळेत जायचय

न येणारी समीकरणे आता सोडवता येतात का पहायचय

चित्रकलेच्या तासाला सुबक चित्रे काढायची आहेत

डब्यातला खाऊ खाण्यासाठी मधल्या सुट्टीची वाट पहायची आहे


येईल का जाता आता बालपणात पुन्हा?

येईल का होता अल्लड आता मला पुन्हा?

येईल का दारी भोलानाथ आता पुन्हा?

मिळेल का सुट्टी तळे साचून आता पुन्हा?

Tuesday, October 16, 2012

ऐलोमा पैलोमा गणेश देवा.

परवा गाडीत माझी आई, आणि माझा अडीच वर्षाचा भाचा होता. बरोबरचे भरपूर समान बाजूच्या सीटवर ठेवून त्या दोघांना मागे बसू दिले. थोड्या वेळाने गडी गाऊ लागला. आधी शाळेत शिकवलेल्या "पोएम्स" झाल्या. मग गाडी घसरली "शिवाजी अमुचा राणा" वर . हे ऐकून मी चकित. पूर्ण गाणे त्याला म्हणता येत होते. मधेच अडले तर शेजारी आजी होतीच. त्याला विचारले "कोणी शिकवले तुला हे?"

"माज्या आईला येतं हे गाणं, तिला खूप खूप गाणी येतात."

"हुशारच आहे तुझी आई. अजून काय शिकवले तुझ्या आईने?"

"जिलेबीचे गाणे, कारल्याचे गाणे, लाडूचे गाणे आणि शिवाजीचे" (आम्ही सारे खवय्ये! गाणी पण सारी खाण्याच्या पदार्थांचीच?)

"पण तुला तर गुमामाम (गुलाबजाम) आणि सिंघम आवडतात ना? मग तुला आईने गाणे जिलबीचे आणि शिवाजीचे का शिकवले?"

"तिला तेच येत मणून"

नातवाच्या तोंडी ही गाणी ऐकून आजीपण खुश. या संवादाने माझ्या आठवणी ताज्या झाल्या. पितृ पंधरवडा संपत येतो तसे नवरात्राचे वेध लागतात. कसे ते ९/१० दिवस संपतात काही कळत नाही. तसे ते लहानपणी पण लागत. तेंव्हा कारण मात्र वेगळे असे. कारण नवरात्रीचे अप्रूप बाकी इतर कारणांसाठी नव्हे तर त्यातल्या "भोंडल्या" साठी असे. तेंव्हा "गरबा" नामक प्रकार बोकाळला नव्हता इतका. अगदीच तुरळक शक्यतो गुजराथी लोकानी आयोजित केलेला एखादा पारंपारिक गरबा असे. त्याचे फार कौतुक काही वाटत नसे. पण भोंडला महत्वाचा. भल्या मोठ्या अंगणात रोज एक किंवा दोघींचा भोंडला. सगळ्या मैत्रिणी, मैत्रिणींच्या मैत्रिणी जमा होत असत. आमंत्रणाची तशी गरज नसे. आणि आताच्या आयांसारख्या तेंव्हाच्या आयाही नव्हत्या. म्हणजे तेंव्हा शिस्त नव्हती का तर कदाचित आतापेक्षा थोडी जास्तच होती, आई-बाप मुलांचे फाजील लाड अजिबात करत नसत. आमच्याकडे तर म्हंटलेच जायचे "खायचे प्यायचे लाड, नसते लाड नाहीत". सहामाही परीक्षा तेंव्हाही असतंच पण त्या कधी या भोंडल्याच्या आड आल्या नाहीत. तेंव्हा या भोंडल्याला जायला आम्हाला पूर्ण परवानगी असे, अर्थात सातच्या आत घरात हा नियम पाळूनच.


भोंडल्याच्या आधीपासून आईच्या मागे "सांग ना आपल्याकडे तू काय बनवणार?" ही भूणभूण सुरु असे. संध्याकाळी शाळेतून परत आल्यावर मग भोंडला असे. पाटावर हत्ती रेखाटण्यासाठी कोणालातरी पकडावे लागे.(इतकी ग्रेट चित्रकला होती माझी :) ) मग हत्ती काढून झाला की खाली टीपके काढायचे, जितके टीपके तितकी गाणी म्हणायची. जिचा भोंडला आहे, तिने पटावरच्या हत्तीची पूजा करायची मग त्या हत्ती भोवती फेर धरला की भोंडल्याची अशी खास गाणी गात तो सुरु. ऐलोमा पैलोमा ने सुरुवात होवून मग शिवाजीचे,कारल्याचे, कोथिम्बीरीचे, जिलेबीचे, एक लिंबू झेलू बाई अशी गाणी सुरूच राहत. तशी सगळ्या मुली आणि त्यांच्या आयांना ही सारी गाणी येतंच असत. कोणी कोणाला शिकवलेली नसत, जशा लहानपणी गणपतीत कशा ना सगळ्या आरत्या कोणी न शिकवताच पाठ होत तशी. जवळपास तासभर हा गाण्यांचा कार्यक्रम चाले. एकदा का "आड बाई आडोणी" वर गाडी पोहचली की शेवट. मग बाकी मुलीनी खिरापत ओळखायची. अनेकदा एक मुख्य खिरापत आणि सोबत अनेक छोटे छोटे पदार्थ असत. जसे की इडली-चटणी सोबत, घरी तळलेले वेफर्स, साबुदाण्याच्या पापड्या, कोणती तरी वडी किंवा लाडू,......अगदी काकडीचे काप, श्रीखंडाच्या गोळ्या इतक्या साध्या गोष्टींपर्यंत. जिचा भोंडला आहे तिचीच नव्हे तर शेजारच्या काकू, मावशी पण तिच्या भोंडल्यासाठी काहीतरी खिरापत बनवून देत असत. काय दिले ते महत्त्वाचे नसे तर त्यामागचे प्रेम. कोणालाच ओळखता येणार नाही अशी खिरापत आपल्या आईने बनवावी अशी फार इच्छा असे. शिरा, वाटलीडाळ, ढोकळा, आप्पे, घरी केलेला कुकर मधला केक, साटोरी, भाजणीचे वडे असे अनेक पदार्थ असत. एकदा का सर्व खिरापती आलेल्या मुलीनी ओळखल्या की मग सगळ्यांना अंगणात सतरंजीवर बसायला सांगून घरातून खिरापतीच्या प्लेटस आणायच्या, हसत खिदळत त्या फस्त करायच्या. असे सर्व होईतोवर सात साडेसात होत, दुसऱ्या दिवशी कोणाकडे ते पक्के करून सगळ्या पसार होत, पुन्हा दुसऱ्यादिवशी न चुकता भेटण्यासाठी.

संस्कृती जेव्हा लहान होती तेंव्हा हौसेने २/३ वर्षे मी तिचा हा भोंडला केला पण होता. पण आता ती मजा येत नव्हती, न तिला न मला. सर्वात मोठे कारण म्हणजे, तोच शाळेच्या परीक्षा असण्याचा काळ असतो. आणि आता स्पर्धेच्या युगात आई वडीलांना लहान मुलींच्या छोट्या छोट्या परीक्षांचाही खूप मोठा बाऊ वाटतो आणि मग या काळात या गोष्टींमध्ये २/३ तास त्यांना भोंडल्या सारख्या गोष्टींमध्ये घालवू देणे आता कदाचित कोणालाच शक्य नाही. करमणुकीची जेव्हा असंख्य साधने उपलब्ध आहेत तेंव्हा इतके कष्ट घेताय कोण मुलीना २/३ तास रमवण्यासाठी? दुसरा भाग असा ही असेल की नित्य नवीन चवी चाखणाऱ्या या पुढच्या पिढीला, भोंडला त्यातल्या खिरापती याचे विशेष अप्रूप उरले नसावे. मग जेमतेम २/३ लहान मुली, आणि त्यांच्या आया, संस्कृती आणि मी. काय मजा वाटणार?






पण पूर्वीच्या संदर्भात पहिले तर या एका गोष्टीतून अनेक गोष्टी साध्य होत असाव्यात. जसे कि मुलींसाठी एक करमणूक, त्यातली जास्तीत जास्त गाणी ही सासर-माहेर या गोष्टींवर बेतलेली आहेत. कदाचित अशा गाण्यांमधून त्यांची मानसिक तयारी करून घेणे हा एक उद्देश पण असेल. त्यातली काही गाणी तर इतकी मजेशीर आहेत जसं की वेड्याचं गाणं भोन्डल्यात कधी एकदा हे गाणे म्हणतोय आणि त्यातल्या प्रत्येक ओळीवर कधी खिदळतोय असे लहानपणी आम्हाला झालेले असे. ... कारल्याच्या वेलाच गाणं घ्या वेल लावण्यापासून त्याला कारली लागेपर्यंत, आणि ती लागल्यावर त्याची भाजी करून वर आपलं उष्टं काढून मग मुलीची वेणी-फणी करून मग तिला माहेरी धाडणार. म्हणजे इतकी वाट बघावी लागणार तेंव्हा कुठे माहेरी जायला मिळणार. मनात आलं आणि आणि लगेच गेली
असे घडत नाही. शेजारीच माहेर असणाऱ्या मला कदाचित त्याची एवढी किंमत वाटणार नाही, किंवा ऑफिसमधून परस्पर संध्याकाळी आईकडे जाऊन येणाऱ्या मुलींना पण नाही याचे फार अप्रूप वाटणार, पण माझ्या परदेशात असणाऱ्या मैत्रिणींना आजही हे भावेल, कदाचित अगदी सासरच्या लोकांनी जाऊ देण्याचा किंवा न देण्याचा  संदर्भ नसेल तरीही...

अगदी या भोंडल्याची सुरुवात ज्या गाण्याने होते हे गाणेच इतके मोहक आहे. त्यातल्या अनेक शब्दांचा अर्थ मला आजही कळला नाहीये तरी एवढं नक्की ही एक प्रार्थना, एक साकडंच आहे. माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा....अनेकदा वाटून जातं मला कि हा खेळ म्हणजे भातुकलीचा नव्हे तर खऱ्याखुऱ्या संसाराचा आहे. आयुष्याचे रंग त्यात ठळक दिसतात, त्यात आयुष्याचे मागणे मागितलेय,त्यात येता जाता पडणाऱ्या पावसाचे वर्णन आहेत, परतीचा पाऊस कसे कणसात धान्य धरायला मदत करतो याचे वर्णन आहे एवढेच नव्हे तर अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे असे ही वर्णन आहे. कदाचित सातव्या आठव्या वर्षी लग्न झालेल्या मुलींचाही १६ वर्षापर्यंत भोंडला करत असतील त्याकाळी. त्याकाळच्या अनेक गोष्टी ज्या अशा आखीव असत त्याचे आजही कुतूहल वाटल्याशिवाय राहत नाही.

ते दागिन्यांचे गाणे. म्हणजे त्यातूनही मोठी शिकवण आहे. कोणीही दिलेल्या दागीन्यापेक्षा नवऱ्याने दिलेला दागिना सर्वात महत्वाचा. आजच्या संदर्भात असे म्हणू हवे तर नवऱ्याने किंवा स्वत: घेतलेला. पण रुसून माहेरी आलेल्या मुलीने सासू, सासरे, नणंद, जाऊ हे सारे तिला परत न्यायला आले तर काय करावे की सगळे दरवाजे लावून घ्यावेत, त्यांनी दिलेले दागिने पण न घेता (अरे रे :(  सोनं किती महागलंय, असं नाही करायचं......)  झिपऱ्या कुत्र्याला सोडून द्यावे? संस्कार म्हणून पटत नाहीत पण कदाचित गमतीचा भाग असेल तो,  पण स्व-कमाईच्या वस्तूंची बात काही और असते हे लहानपणापासून याच गाण्याने ठसवलं.

पण एकंदरीतच ज्याकाळात ही गाणी बनली त्याकाळचे किमान मुली, स्त्रिया यांचे जगणे यातून प्रगट होत राहते. म्हणजे पहा एखाद्या लहानवयात लग्न लागलेली मुलगी, आपल्या वेडसर नवऱ्याचे वर्णन कसे करेल? "अस्से कसे झाले, माझ्या नशिबी आले?" असेच ना? माहेर सासर यामध्ये मुलीना वाटणारा फरक कसा जसा च्या तसा त्या गाण्यांमधून उतरतो. सासरची प्रत्येक गोष्ट कशी वाईट, माहेरची कशी चांगली, ते अंगण असो, तिथला वैद्य असो. मुलीना वाटणारी माहेरची कमालीची ओढ प्रत्यक गाण्यात दिसतेच. त्यातूनच हे शिकवले जात असेल कि "बाई ग असं असून देखील तुला तिथेच राहायचे आहे, तिथेच एकरूप होवून जायचे आहे. निसर्गाशी जवळीक अनेकदा गाण्यांमधून दर्शवतेच. म्हणजे कोथिम्बिरीच्याच गाण्याचं पहा कि आता मिळत असलेली म्हणजे अश्विन महिन्यापर्यंत असणारी कोथिंबीर हळुहळू मार्केट मधून गायब होईल, मग परत कधी मिळू लागेल तर चैत्रात. आजकाल १२ महिने सर्व भाज्या फळे मिळणाऱ्या आम्हाला नाही यात काही विशेष वाटणार. पण त्या काळी ते महत्त्वाचे असेल ना? 

कोणतही यातलं गाणं घ्या, काहीतरी शिकवण आहेच त्यात. जिलबी बिघडली हे त्याचे उत्तम उदाहरण. अनेक वर्षे "जिलबी बिघडली" हे माझ्या तोंडी वाक्य येतंच हमखास, जेंव्हा माझा एखादा पदार्थ हातून बिघडतो तेंव्हा. हीच शिकवण घेवून पुढे गेलेल्या मला मग त्या बिघडलेल्यातून काहीतरी घडवताही येतेच. यात याहीपेक्षा काही महत्त्वाचे काय तर काहीतरी बिघडत असतानाही सगळं कसं निभाऊन न्यायचे याचे शिक्षण. आजच्या आपल्या जगात या गोष्टी आता बदलून गेल्या आहेत, म्हणून त्या मागे पडल्या. इतकीच शिकवण पुरणार नाही, पण म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. या गोष्टीना करमणुकीचे साधन म्हणून विशेष आता महत्त्व नाही, पण त्या काळी या गोष्टीतून सणवार म्हणून, प्रथा म्हणून केल्या गेलेल्या या भोंडल्या मधून करमणूक, शिक्षण अशा कितीतरी गोष्टी साध्य होत असतील नाही? तर अशी ही विस्मृतीत गेलेली गोष्ट. माझ्या लहानपणी तरी आम्हा मुलींच्या दृष्टीने भोंडला ही अतिशय आवडती गोष्ट होती. याची आठवण झाल्याबरोबर मी जवळपास सगळी गाणी म्हणून पहिली. अजूनही सगळी पाठ होती. भोंडला करून नाही तर निदान त्या काळात एक फेरफटका मारून येवून् मला ते क्षण पुन्हा एकदा जगता आले हे काय कमी आहे?



Wednesday, October 10, 2012

सांग सखया.........

चालताना तू थोडा थबकलास

नुसताच थबकलास का

दूरवर सोबत करण्याचा

विचार तुझा बदललास?


हाक मारताना तू अडखळलास

नुसताच अडखळलास की

ओठात माझेच नाव असण्याचा

तुझा रिवाज तू बदललास?


बोलताना तू जरासा थांबलास

नुसताच थांबलास की

माझ्यापाशीच मन मोकळे करण्याचा

तुझा हक्कच तू विसरलास?


निरोपाच्या क्षणी तू आवंढा गिळलास

नुसताच आवंढा गिळलास की

आयुष्यातून मला वजा करताना

स्वत:लाच भागून मोकळा झालास?


खरं सांग, सारे काही विसरलास? सारे काही संपले?

खरच संपलय कि

आजही प्रीतीचे नाव घेता

तुझे जग सारे माझ्याशीच येऊन थांबलंय

Saturday, October 6, 2012

क्षणभर विश्रांती ...

१५ दिवसांपूर्वी मी हातात "हिंदू - जगण्याची एकसमृद्ध अडगळ " वाचायला  घेतली. मुळात हे पुस्तक माझ्याकडे कसे आले हीच एक स्टोरी आहे. इतकी वर्षे पुस्तके कधी "buy " कधी "borrow " करत वाचली जात होती. मागच्या वर्षी ठरवले की आता फक्त "buy". नवऱ्याला म्हटलं की एखादा दागिना किंवा भारी साडी कमी घेतली गेली तरी चालेल...पण घरात माझी अशी स्वत:ची लायब्ररी असायला हवी. त्याची हरकत असायचं पण कारण नव्हते. त्या पूर्वी पण पुस्तके अनेकदा विकत घेतली जात असत, पण त्यामागे हा विचार नसे. मग गेल्या दिवाळीत अनेक पुस्तके माझ्या घरी दाखल झाली. जेव्हा ती घ्यायला अक्षरधारा मध्ये गेलो, तेंव्हा आम्ही दोघे ही आपापल्या आवडीची पुस्तके बघत होतो मी एक मोठा गठ्ठा घेवून बिलासाठी घेवून आले तेंव्हा नवरा हे पुस्तक घेवून आला. तरी मी त्याला विचारले " तू वाचणार आहेस का हे?" तर म्हणे "हो" मग मनात विचार आला कधी नव्हे तो बाबा स्वत: पुस्तक वाचेन म्हणतो तर असू देत. जेमतेम ५/१० पाने वाचून ते ठेवून दिले ते आजतोवर त्यास हात लावला नाही. वर्षभरात माझी बाकीची सर्व पुस्तके वाचून झाली. एकसलग वाचले तर दिवसाला किमान ३०० पाने वाचतेच.(घरात बाकी कामे मग कोण करतं, हा प्रश्न कोणी प्लीज विचारू नये), यातली अनेक पुस्तके मी पूर्वीच वाचलेली असल्याने, पुन:प्रत्ययाचा आनंद घेत मी ती वाचली. काही नव्यानेच वाचली. गेल्या महिन्यात काही ना काही कारणाने माझे अक्षरधारा, किंवा अप्पा बळवंत चौकात जाणे होत नाहीये. त्यामुळे वाचण्यासाठी हे एकच पुस्तक आता शिल्लक राहिले होते. वाचायला घेतले, १००/१२० पाने वाचून झालीत, पण रोज घर, ऑफिस, घर  आणि नंतर वेळ मिळेल त्यात फेसबुक, ब्लॉग यात माझा इतका वेळ खर्ची पडतोय की हे पुस्तक नुसतेच डोक्याशी पडून आहे. तर आता हे पुस्तक पूर्ण वाचून झाले की मगच फेसबुक, ब्लॉग. मधेच एकदा "English Vinglish" पण बघायचा आहेच :)

Thursday, October 4, 2012

६५ वी कला

वर्तमानपत्रात आजकाल अनेकदा पहिले पानभर जाहिरात असते, अशी दिसली की प्रचंड राग येतो. पण मला जाहिराती आवडतात, कोणतेही माध्यम असो. वृत्तपत्रीय जाहिराती पाहताना तर मी उजव्या कोपऱ्यातील जाहिरात कंपनीचे नावही आवर्जून पाहते. हळूहळू असे होऊ लागले की आधी मी ते नाव कोणते आहे ते पाहू लागले आणि मग जाहिराती वाचू लागले. पुण्यात एक प्रथितयश बांधकाम व्यावसायिक आहेत. लहानपणापासून मी त्यांच्या प्रोजेक्ट्स च्या जाहिराती पहात आले. त्यापैकी कित्येक आजही मनात घर करून आहेत. मराठी माणसाची अचूक नस पकडणाऱ्या जाहिराती हे यांच्या यशाचे एक सूत्र होते, असे नेहमी वाटत आले. आणि त्यांच्या या यशाचा "सेतू" बांधणारी जाहिरात एजेन्सी फार महत्वाची होती. त्यांनी त्यांच्या एका प्रोजेक्ट च्या हस्तांतरणाची जाहिरात अशी केली होती " सासुरयास चालली शकुंतला, लाडकी शकुंतला......चालतो तिच्यासवे तिच्यात जीव गुंतला"..... अगदी याच भावना मनात ठेवून *** चं हस्तांतरण आज मी करत आहे" किंवा आज घर बुक करा आणि उद्या स्वत:च भूमिपूजनास बसा.....नक्कीच कुठेतरी आत जाऊन पोहचतात त्या जाहिराती. कदाचित माझ्या घरी पण हाच बिझिनेस आहे म्हणून या साऱ्या गोष्टी माझ्यापर्यंत खोलवर जाऊन पोहचतात. एखादी बिल्डींग बांधताना आणि नंतर तिचे हस्तांतरण करताना ना अगदी मुलीला सासरी पाठवतानाच्याच भावना मनात असतात. नंतर त्या कंपनीने जाहिरात एजेन्सी बदलली हे कोणी न सांगताच बदलेल्या जाहिरातींच्या स्वरूपावरूनच लक्षात आले. मग मात्र ते म्हणजे घराण्याचे नाव रोशन करणाऱ्या गायकाने कुठलीही गाणी गावीत तसे वाटू लागले.


गेल्या काही दिवसात काही नव्या जुन्या ads पहिल्या ऐकल्या आणि यावर लिहावे असे तीव्रतेने वाटू लागले. जसे बर्फी बघताना त्यातला मर्फी , त्यातल्या एका दृश्यात ऐकू येणारा जुन्या प्रेस्टीज च्या जाहिरातीचा आवाज. लगेचच नंतरच्या वीकेंड ला T -२० पाहताना बघितलेल्या काही ads . आजकाल जाहिरातींवर मी प्रचंड कमेंट्स करते. शंका येऊ लागली की आपले वय व्हायला लागले काय? ज्या त्या जाहिरातीवर कसे आपले काही वेगळेच म्हणणे आहे? कला आहे ना ती? हा ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीचा भाग आहे ना, मग?

६५ वी कला जिला म्हंटले जाते तिने आपले आयुष्य इतके व्यापले आहे, की वर्तमानपत्र, आकाशवाणी, FM , टी. व्ही., रस्त्यावरचे होर्डींग्स, बस, ट्रेन्स मधील जाहिराती, इतकेच काय फेसबूकावरील जाहिराती. कुठेतरी प्रत्येक जाहिरातीची मनात नोंद होतेच. मार्केट ड्रिव्हन इकॉनोमीचा तो अविभाज्य भाग आहे. सेकंदास लाखो रुपये मोजून तुमच्या आमच्या पर्यंत पोचणाऱ्या त्या साऱ्या खरंच तितका परिणाम आपल्यावर आणि पर्यायाने त्या कंपनीच्या नफ्यात वाढ होण्यावर करतात का? नाही म्हणजे तशी नफ्यात वाढ अनेक रीतीने दाखवता येते. ते तितके महत्त्वाचे नाही, पण आपले काय विकत घ्यायचे आणि काय नाही यावर त्या नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात परिणाम घडवतात.

लहानपणी माझा भाऊ जाहिराती चालू असे पर्यंतच टी.व्ही पहात असे, त्या संपल्याकी हा उठून जाई. आजही माझ्या माहितीत अनेक लहान मुले अशी आहेत की जाहिराती ती फार आवडीने पाहतात, जसे की "तुम्हारा साबून स्लो है क्या" किंवा गाडी पार्क करतानाची "लगा क्या?", आय. पी. एल च्या वेळच्या झू, झू च्या जाहिराती, टमी की सुनू या ममी की म्हणत केलेली नॉर सूपची किंवा पिअर्स ची मासूम पिअर्स म्हणत केलेली.
सगळ्यात लाडकी माझी जाहिरात म्हणजे "अमूल बटरची" ची. एखाद्या प्रोडक्टची दर आठवड्याला वेगळी जाहिरात बनते, आणि चालू घटनांचा आधार घेत ती तुमच्या चेहऱ्यावर एक हलकेच हसू आणते ते पण गेली कित्येक वर्षे. कमाल आहे. अनेक जिंगल्स माझ्या फोनची ट्यून बनून माझ्या सोबत असतात. जसं की एअर-टेल ची ज्यात "जाये बसो किन देस पियाजी" हे गाणे वापरले होते. अनेकदा त्या जिंगल्स मुळेच त्या जाहिराती आवडत्या होतात....जसे की जब घर की रौनक बढानी हो, अमूलची जरासी हसी प्यार जरासा,किंवा पूर्वी लागणारी बजाज ची "ज़ब मै छोटा बच्चा था बड़ी शरारत करता था", जुनी डेअरी मिल्क ची त्या मुलीची किंवा सिनेमा पहायला गेल्यावर लागणारी विको ची पूर्ण जाहिरात आठवते? काही जाहिराती जशी की धारा- जलेबी, हमारा बजाज, उस्ताद झाकीर हुसैन यांची वाह ताज, होर्लीक्सची ये है बढता बच्चा कपडा छोटा होता जाये, फ्रेश n juicy असणारी फ्रुटी, गोदरेज ची खुशियोन्के आंगन में पहला कदम........ही लिस्ट थांबतच नाही.

माझ्या मते चांगली जाहिरात(visual media) ती की जी एखाद्या आपण बघत असलेल्या कार्यक्रमाच्या मध्ये व्यत्यय वाटत नाही, बरोबर बसलेल्या कोणाबरोबरही ती बघताना अवघडलेपण येत नाही, हलकेच एक हसू तुमच्या चेहऱ्यावर येते, आणि सहजगत्या नंतर तुम्ही आधी पाहत असलेल्या कार्यक्रमात पोहचता. जर एकंदर जेवढा वेळ मी टी. व्ही. समोर असते त्यापैकी निम्मा वेळ जर जाहिराती बघितल्या जाणार असतील तर, मनोरंजनाचेच निकष त्याला ही लावायला नकोत का? खरंच ती वस्तू विकत घ्यायची की नाही घ्यायची हा नंतरचा विचार.
जो माझा प्रांत नाही, पण मला त्यांच्या जाहिराती मात्र आवडतात, अशा काही त्यांच्या जिंगल्स मुळे किंवा अशीच जाहिरात म्हणून आवडतात. जशी सध्या लागणारी segram ची लिफ्ट मधली "प्यार की राह में चलना सीख ,. इश्क की चाह में जलना सीख. हवासे भी कर बातें लेकिन,. राज चुप्पी का उलझना सीख" किंवा दुसऱ्या दिवशी काहीच न आठवणारा किंवा तसं दाखवणारा सुमीत राघवन. bacardi ची ad ही तशीच त्याच्या जिंगल मुळे आवडणारी. ज्यातल्या काही अजिबात आवडत नाहीत जशा धर्मेंद्र, त्याचा तो सनी यांच्या जाहिराती मात्र .......जाऊ दे अजून काही बोलूया नकोत. खरं तर ज्या गोष्टीना मी सपोर्ट करत नाही त्यांच्या बद्दल काही बोलतही नाही. या काही मात्र त्यास अपवाद.

पण या जाहिराती फक्त पूर्वीच चांगल्या बनत असत असे काही नाही. आजही अनेक उत्तम जाहिराती बनतात जसे की रेड लेबल, डेअरी मिल्क, एअर टेल, आईडिया, एशिअन पेंट्स, रेमंड्स, टाटा nano ची एका लहान मुलीची. जशा ना एअर टेल च्या दोन्ही जाहिराती एक वर उल्लेख केलेली, किंवा दुसरी आर्मीतल्या मुलाची...वोडाफोन पपीची जो त्या मुलीला शाळेच्या बस मागे पळत तिने विसरलेली वस्तू नेऊन देतो, डेअरी मिल्क ची "करेलावाली" मात्र खासच. पूर्वी थोडेच दिवस एक अमिताभ करत असे ती डेअरी मिल्क ची "मिस पालनपुर" ची म्हशीची...ती पाहताच मी उद्गारले की " आता हिला पण सून करून घेणार का?" :D

समाजाचं बऱ्याचदा खरं प्रतिबिंब जाहिरातींमधून उतरतं, त्यामुळेच जर असे घडत असेल की या क्षेत्रातून काही अभिनव, मनमोकळे हसवणारे, किंवा दर्जेदार असे काही येत नसेल तर कदाचित एकंदरीत समाजाचीच अभिरुची बदलत चालली आहे. पण अनेकदा जाहिराती अशा का बनवलेल्या असतात असा प्रश्न सुटत नाही जसे की सध्या दिसणाऱ्या सगळ्या डीओ किंवा परफ्युम्सच्या ....मारा डीओ लागतील मुली/मुले मागे....अरे कोणीतरी जावून सांगा यांना "अरे बाबांनो, असे काही घडत नाही" कोणताही आणि कुठूनही आणलेला परफ्युम असो. तसं पहिला जावे तर तसा थोडा जमानाच "तमीझ" नसण्याचा आहे त्यामुळे सध्या T 20 मध्ये असणाऱ्या पेप्सीच्या जाहिराती, किंवा कोणत्या तरी एका फोन ची ज्यात ती मुलगी आपल्या बापाच्या वयाच्या माणसाला अंकल म्हणत चिडवते आणि हसते. किंवा जेवणाच्या टेबल वर स्वत: न जेवता, फक्त कॅडबरी खाणारी आणि ती बाकी कोणाला न देणारी मुलगी मला आवडली नाही. तशी सध्या एक कोका -कोलाची लिंटास ने बनवलेली "तापमान ४२ डिग्री वाली ...त्यातला सुरुवातीचा सगळा भाग छान वाटतो, अगदी "इस जमीन की सच्ची ख़ुशी है" पर्यंत पण अशा स्थितीत सचिनने येऊन स्वत: कोला पीत "खेलते रहो, खुश रहो" सांगणे हे पटत नाही. त्यापेक्षा नंतर फक्त "कोका-कोला" एवढेच आले असते तरी चाललं असतं ना? असो. पण चांगल्या वाईट गोष्टीनीच तर अनेक गोष्टी अर्थपूर्ण बनतात ना?