Friday, September 28, 2012

गाय जशी हंबरते तसेच व्याकूळ व्हावे, बुडता बुडता सांजप्रवाही, अलगद भरुनी यावे.....

असं कधी झालंय का तुमच्याबरोबर ? की एखादी व्यक्ती, जिची आणि आपली प्रत्यक्ष ओळख नाही, आपले लौकिक अर्थाने काही नाते नाही, जिला आपण ओझरते देखील भेटलो नाही, आता ती व्यक्ती या जगात नाही, अशा व्यक्तीची तुम्हाला आठवण येते आणि डोळे वाहू लागतात. असं घडत होतं मध्यंतरी काही दिवस माझ्याबरोबर. रात्री गादीला पाठ टेकवली, आणि शांत विचार सुरु झाले की त्यांची आठवण.................. अनेक त्यांच्या तोंडाची वाक्ये जशीच्या तशी आठवत. तोच चेहरा भरल्या डोळ्यासमोर तरळत राही. तोच तो गोल चष्मा, कपाळावर थोडे वर लावलेले कुंकू, नीटनेटकी साधीशीच साडी, ओठांच्या या टोका पासून त्या टोकापर्यंतचे हसू. असे वाटे की आत्ता गप्पा मारायला सुरु करतील, मधेच अनेक कविता, संत साहित्याचा दाखला देत आपले म्हणणे पटवून देतील. कधी बा.भ., कधी आरती प्रभू, कधी मर्ढेकर तर कधी जी.ए. त्यांच्या बोलण्यातून डोकावतील. मनातलं सारं खरंखुरं बोलून मोकळे होणे हेच पटेल, अनेकदा ते बोलणे कडवट, दुसऱ्यांवर टीका केल्यासारखे पण वाटेल, पण ते खरे असेल.



काल घरात दिवाळीत कुठेतरी ४ दिवस फिरून येवू अशी चर्चा चालू होती. खरतर मनापासून मी या गोष्टींसाठी तयार नसते. मुळातच फार हिंडण्या फिरण्याची मला आवड नाही आणि जायचंच तर त्या साऱ्या प्रवासात घरापेक्षा चांगल्या गोष्टी आणि कमालीची शांतता मिळणार असेल तरच जायची माझी तयारी असते. नाहीतर घरच्यांसोबत चार सुट्टीचे दिवस घरीच मी आनंदाने घालवू शकते. तशीही माझ्या घराइतकी चांगली जागा या जगात दुसरी कुठेही नाही यावर मी ठाम आहे. त्यामुळे अनेकदा चर्चेची सुरुवातच मुळी माझ्या नकाराने होते. पण फक्त "तारकर्ली जवळ "धामापूर" आहे या एका गोष्टी साठी मी तयार झालीये. खूप मनापासून वाटतंय की जिथे त्यांचे बालपण गेले त्या धामापूरच्या तळ्याकाठी काही शांततेचे क्षण अनुभवावेत. काही दोघींमधील नात्याचा धागा सापडतो का ते पाहावे. अगदी कळत्या वयापासून खरतर कोणाचे अनुकरण करावे असे वाटले नाही पण या मात्र अपवाद ठरल्या. माझ्यात अनेकदा मी त्यांना पाहते. गुण आणि दोष यांच्या सीमारेषेवर आढळणाऱ्या काही गोष्टी आमच्यात समान असतीलही. पण कधी कधी ना त्या माझे मनच सारे व्यापून टाकतात. तशा काही ना काही समान गोष्टी अनेक माणसांमध्ये असतातच ना मग कुठे आपण तेंव्हा प्रत्येकवेळी हे धागे शोधतो का? मग यांच्याच बाबत असे का?


त्या गेल्या तेंव्हा काहीकेल्या मनाची अस्वस्थता जात नव्हती. मग पुन्हा एकदा त्यांची जमेल ती पुस्तके पुन्हा पुन्हा वाचतच गेले. आमच्या काय नक्की नाते आहे हे तपासत राहिले. काही ठोस म्हणावे असे सापडले नाही, पण त्यांच्याशी जुळलेली मनाची नाळ मात्र तुटायचं नाही म्हणत राहिली. त्यामुळे आज लौकिकार्थाने नाहीत पण त्या माझ्याशी जोडलेल्याच आहेत.


मी त्यांच्या इतकी करारी आणि प्रज्ञावंत नाही, आग्रही नाही, नीट नेटकी नाही. अनेक वेळी माझी स्मरणशक्ती दगा देते, आणि काही वेळा काही गोष्टी विसरू म्हणता विसरू देत नाही. त्यांच्या इतकी प्रत्येक गोष्टीसाठी मी आग्रही राहत नाही आणि काही गोष्टींचा हेका मात्र मी सोडत नाही. स्वत:च्या अनुभवातून त्यांच्यासारखेच शिकत आले मी. त्या मुळे त्यातून शिकलेल्या गोष्टी मात्र आनंदाने मी जपते आणि स्वत:बाबत तरी याच गोष्टींसाठी खूप आग्रही आहते. थोडे थोडे करून जमवलेल्या माझ्या विश्वातील प्रत्येक माणसावर, प्रत्येक वस्तू वर नको इतका माझा जीव आहे, पण जेंव्हा वेळ येईल तेंव्हा एकाही गोष्टीत माझा जीव गुंतणार नाही हे मला माहित आहे. या समाजाचे आपण देणे लागतो ते कसे द्यावे याचे कोडे त्यांचे त्यांना सुटले होते. या बाबतीत किती नशीबवान होत्या त्या! आणि त्यांच्याच कल्पनेतून अनेक मोठी समाजोपयोगी कामे त्यांच्या नावाचा मोठा उदो उदो न करताही उभी राहिली आणि आजतोपर्यंत चालू ही आहेत. घर, आपली माणसे आणि त्यांची पुढील आर्थिक सोय आणि ती कधी पर्यंतची करायची, गरजा कुठे सीमित करायच्या याची उत्तरे अजूनतरी मला सर्वार्थाने सापडली नाहीत, त्यामुळेच समाजाचे देणे मी नक्की कोणत्या तऱ्हेने फेडणार आहे या प्रश्नाला आजतरी उत्तर नाही. एखाद दोन संस्थाना दरवर्षी थोडी आर्थिक मदत पाठवली की आपले काम झाले ही चुकीची कल्पना मनात नसल्याने, ती पाठवूनही मनाची अस्वस्थता काही कमी होत नाही. तिचे तुटपुंजेपण मनाला सतावत राहते.

ही एकच नाही तर अशा अनेक प्रकारे अस्वस्थता मला घेरून टाकते. आजूबाजूच्या अनेक घटना त्यास कारणीभूत असतात. सगळ्याच थेट माझ्याशी संबंधित नसतातही तरीही. असंच काहीसं त्यांच्या बाबतीत पण झालं असेल का? कशी त्यांनी त्यावर मात केली असेल? सुख-दु:ख सारेच परस्वाधीन, ही अवस्था तर आजही तशीच कायम आहे, मग गुंते सोडवले कसे? असे विचार मनात काहूर माजवत असताना भरून येणारे डोळे हे काही यावरचे उत्तर नाही असू शकत. आहे मनोहर तरी..... म्हणतच ह्या साऱ्याला सामोरे जावे का?  


















(छायाचित्रे- आंतरजाल आणि शीर्षक-कवी ग्रेस यांच्या कवितेतून साभार.)

Sunday, September 23, 2012

गजरा महिरप आणि कमळाचे फुल

 मणी, मोती यांच्याशी तशी  फारशी माझी कधी जवळीक नव्हती. दागिन्याची विशेष आवड नसल्याने ती वेळ कधी आली नाही. लहानपणी दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हा बहिणींना कशात तरी गुंतवून ठेवावे लागे, नाहीतर सतत "कंटाळा आला" हा एकच घोषा ऐकावा लागे. त्याचाच एक भाग म्हणून एक वर्ष आई तुळशी बागेतून थोडे मणी घेवून आली. लागोपाठ इतर मुलींच्या घरी पण ते आणले गेले. सर्व मुलीनी मण्यांच्या कला कुसरीच्या वस्तू बनवण्याची टूम निघाली. कित्येक प्रयत्नानंतरही मी ते करू नाही शकले, कधी दोराच अडकून पडायचा, कधी मोतीच मोजायला चुकायचे ....शेवटी कंटाळून तो नाद मी सोडून दिला. आणलेल्या मोत्यांची आई ने एक वस्तू बनवली. या अनुभवातून ती पण एक शिकली की कला कुसरीच्या वस्तूंचे आणि आपल्या लेकीचे काही जमणार नाही. हिला आपली सुट्टीत पुणे मराठी ग्रंथालयाची वर्गणी भरून द्यावी, तिने पुस्तके वाचावीत आणि सुट्टी सार्थकी लावावी हे बरे! शाळेत सुद्धा "चित्रकला, शिवण, लोकरीचे काम, किंवा भरत-काम करावे लागणे म्हणजे माझ्यावर संकट ओढावे. अनेक गोष्टी माझ्या साठी आई, शेजारच्या काकू यांनी पूर्ण केल्या आहेत.




पुढे कॉलेजला सुद्धा आसपासच्या मुली काहीतरी बनवत असत, मी त्यात लुडबुड करायचा प्रयत्न केला तर शेजारच्या एक काकू आणि माझी बहिण लगेच मला म्हणत " जा तू आपली दलाल स्ट्रीट, कॅपिटल मार्केट वाच" ही कामे तुझी नव्हेत. मला पण ते पटे. मी दरवेळी इतरांना असे नेहमी सांगत असे, की तुमच्या अर्थार्जनाच्या गोष्टी खेरीज एखादी तरी कला तुमच्या कडे असायला हवी, जी थोडा रिकामा वेळ मिळाल्यावर तुमच्या सोबत असेल. पण अशी कोणती कला माझ्याकडे आहे हा प्रश्न मला स्वतःलाच पडणे थांबत नव्हते.  

काही वर्षांपूर्वी संस्कृती लहान असताना मी जेंव्हा घरी होते, तेंव्हा मला माझ्या चुलत सासू-बाईनी एक मोत्यांची महिरप दिली. खूप सुरेख दिसत होती ती. घरीच होते म्हणून स्वत: जावून थोडे मोती घेवून आले. थोडे प्रयत्न करून तशीच दुसरी बनवता आली. मग एका पाठोपाठ बनवत गेले. त्या वर्षी दिवाळीत बहिण, नणंद, जावू प्रत्येकीला या अशा बनवलेल्या महिरपीच भेट म्हणून दिल्या. पण ते तेवढ्या पुरतेच ....नंतर काहीच दिवसात मी पुन्हा नोकरी करू लागले आणि या साऱ्या गोष्टी एका पेटीत बंद होवून माळ्यावर जावून बसल्या. काही महिन्यांपूर्वी अशाच एक दोन नाजूक मोत्यांनी बनवलेल्या गोष्टी माझ्या नजरेस पडल्या आणि वाटले कदाचित आपण हे करू शकू. माळ्यावरून मोती शोधून काढले आणि ती फुले करून पहिली, आणि पहिल्याच प्रयत्नात ती जमली देखील. तेंव्हा लक्षात आले, जरी लहानपणी नाही, तरी आता आपल्याला ह्या गोष्टी कोणीही न शिकवता देखील जमू शकतात. मग त्यात थोडे प्रयोग करून पहिले. एका मैत्रीणीला दाखवले. तिने लगेच तिच्या साठी  या गोष्टी बनवायला सांगितल्या. गणपती आठवड्यावर आलेले. ती म्हणे मला हे गणपतीसाठी करून दे. वाढता वाढता एक ऑर्डरच झाली. गणपतीच्या आधी १०/१२ दिवस मी रात्री जागून, पहाटे लवकर उठून फक्त हेच काम करत होते. ती ऑर्डर लहान की मोठी हा मुद्दा गौण आहे. त्यातले पैसे महत्वाचे नाहीत, एखादी वस्तू सहज स्वत:ला बनवता येणं ही मला त्यातली फार मोठी गोष्ट वाटली. २/३ घरांमधले गणपती-गौरी या माझ्या कलाकारीने सजले, नैवेद्याची ताटे महिरपिंनी नटली असतील. हा विचार खूप सुखावणारा आहे. 



Saturday, September 22, 2012

तू सुखकर्ता .....

कामावरून यावे, संध्याकाळी जवळच्या सार्वजनिक गणेश-उत्सवाच्या तयारीच्या बैठकांना उपस्थित राहावे. एकीकडे मनात घरच्या गणपतीला यंदा कोणती सजावट करावी याची आखणी करावी. मग बच्चे कंपनीला हाताशी धरून थर्माकोलची एक सुंदरशी सजावट करावी. मोठ्या उत्साहाने गणपतीची प्राण-प्रतिष्ठा सकाळी सकाळी करून मग पुन्हा मंडळाचा गणपती आणायला जावे. दाहीदिवस तिथे आपला सक्रीय सहभाग असावा, नाना स्पर्धा, करमणुकीचे कार्यक्रम याचे बेत पार पडावेत. असे माझे बाबा! आज मागे वळून पाहते तेंव्हा विचार येतो कसं जमत असेल हे त्यांना तेंव्हा. त्यांच्यात अती उत्साह होता की माझ्यातच उत्साहाचा थोडा अभाव आहे?

साधारण राखी पौर्णिमेनंतरच आमच्या घरादाराला गणपतीचे वेध लागत. कारण बाबा संध्याकाळी त्या संबंधीच्या मंडळाच्या बैठकांना जात असत. जिथून गणेश मूर्ती आणत असू तिथे मूर्ती आल्या आल्या आम्ही तो बुक करून येत असू आणि आम्हा सर्वांमध्येच प्रचंड उत्साह संचारत असे. आईची स्वयंपाकघरात तयारी सुरु होई. घराची विशेष साफ-सफाई, गणपतीसाठी जे काही होते त्या फर्निचरची हलवाहलवी होई एका सुट्टीच्या दिवशी. बाबा एकीकडे मंडळाच्या कार्यक्रमाची तयारी आणि घरच्या गणपतीची सजावट यात अगदी गढून जात. आम्हा भावंडांची त्यात लुडबुड असेच. वाड्यात सर्वात सुंदर सजावट आमच्या घरी असे. हरतालिकेच्या आदल्या दिवशी एकीकडे जोरदार तयारी आणि दुसरीकडे स्वयंपाक घरात मस्त मेनू शिजत असे, ज्यात मटार भात टोमाटोचे सार, शिरा असा बेत असे. आज पर्यंत मला तो का असे याचे कारण कळले नाही. दुसऱ्या दिवशी हरतालिकेची पूजा जी एकत्रितरित्या वाड्यातील सर्व बायका आणि मुली करत असत. त्यासाठी सकाळीच फुले आणि पत्री गोळा करून आणायचा भारी सोस असे. एकदा पूजा पार पडली की दुसऱ्या दिवशीचे वेध लागलेले असत. त्यातच कोण किती कडक उपास करते याची चर्चा असे आणि आया अगं, कडक नको, खाऊन उपास करा म्हणत आमच्या मागे लागत. उपास आणि दुप्पट खाणे हा प्रकार या दिवशी पण असे. खिचडी, वराई-दाण्याची आमटी, भरली केळी, रताळ्याचा कीस, खजूर, भोपळ्याचे भरीत असे नाना प्रकार त्या दिवशी बनत. रात्री उशिरापर्यंत बाबांची मखर बनवण्याची लगबग सुरु राही. ते बनल्यावरच ते झोपत. दुसऱ्या दिवशी भल्या पाहते सर्व उठत. जवळपास सकाळी ८ वाजता गणपतीची प्राण-प्रतिष्ठा होत असे, आणि ती झाली की बाबा लगेच मंडळाच्या गणपती बसवायला जात आणि आई स्वयंपाक घरात. यथासांग मोदकाचे जेवण पार पडले की जी सुस्ती येई. नित्य नियमाने आम्ही बच्चे कंपनी घरच्या गणपतीची, वाड्यातल्या गणपतीची आणि मंडळाच्या गणपतीची आरती करून येत असू. त्यातच एकी कडे गणेश उत्सवाच्या कार्यक्रमांची तयारी करत असू. बाबा कार्यकारणीवर असत, त्यामुळे आम्ही त्यात भाग घेणे ओघाने येतच असे. छान छान फ्रॉक किंवा कधी साडी, हाताला आणि पायाला लावलेला अल्ता, कधी नव्हे ते रंगवलेले ओठ फार मजा वाटे या साऱ्यात. दुसरी मजा वाटे नंतर या साऱ्याचे फोटो शाळेत नेवून दाखवून भाव खाण्यात. 

प्रत्येक दिवशी घरी दारी काही ना काही कार्यक्रम असेच. ऋषी पंचमीचे खास जेवण, मग गौरी आणण्याची लगबग, गौरी जेवण आणि मग गौरी आणि गणपतीचे एकत्र विसर्जन. हे ५ दिवस कधी घराला कुलूप लागत नसे. एकदा गौरी गणपतीचे आंब्याची डाळ आणि खिरापत या सोबत विसर्जन केले, की मग त्यादिवशी रात्री पासून आम्ही पाची जण गणपती पहावयास बाहेर पडत असू. आठ च्या सुमारास जेवून बाहेर पडायचे, आणि रात्री १२ पर्यंत घरी परत. पायी पायी फिरत २/३ दिवसात सारे पुण्यातले गणपती पाहून होत. त्या काळातही त्या दिवसात रस्त्यावर अनेक लहान मुलांसाठी खास अशा वस्तूंची रेलचेल असे. आम्ही हट्टही करत असू. काही वस्तू, खेळणी मिळतही. पण तो काळ, मनातला अमाप  उत्साह  आणि खिशातल्या तुटपुंज्या नोटा यांचे व्यस्त प्रमाण असण्याचा होता. वाड्यात एवढ्या उत्साहाने दरवर्षी गणपती बघणारे आम्ही एकमेव घर होतो. विसर्जनाच्या दिवशी आमच्या घरी अनेक वर्षे संध्याकाळी मोठ्या प्रमाणात भेळ बनत असे. बाबा तर मंडळाच्या गणपती सोबत असत. पण लक्ष्मी रोड पासून घर दोन मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे, अनेक नातेवाईक त्या दिवशी आमच्या कडे दुपार पासूनच येवू लागत. दुपारी ३ च्या सुमारास पहिला मानाचा गणपती शगुन चौकात पोहचत असे, तर तिथे जावून आधी पासूनच जागा पकडावी लागे. संध्याकाळ पर्यंत गणपती बघायचे, घरी यायचे, भेळ खायची, पुन्हा जायचे रात्री १०/११ पर्यंत रोषणाई चे गणपती पाहून मग मात्र डोळे मिटू लागत. घरी जाऊन झोपत असू. पहाटे कोणी तरी येवून उठवे की "चला मंडई आणि दगडूशेठ चे गणपती येत आहेत." त्यांची रोषणाई आणि त्यांच्या समोरील  वाद्य पथके पाहणे फार मौजेचे वाटे त्या काळी. एकदा गणपती विसर्जन झाले की लक्षी रोड कसा सुना सुना वाटू लागे.

हे सारे करत असता आम्ही कधी शाळेला कधी दांडी मारली नाही, आमच्या मागे कधी कोणी अभ्यास करा म्हणून लागले नाही. कार्यक्रम, स्पर्धा यात भाग घेण्यापासून आम्हाला कधी कोणी अडवले नाही, रात्री १२ पर्यंत पायपीट करूनही दुसऱ्या दिवशी सर्व गोष्टी करण्यासाठी तेवढाच उत्साह असे. कमावता माणूस एक आणि खाणारी तोंडे ५, दर महिन्याचा खर्च भागवताना नाकीनाऊ येत असण्याच्या काळात माझ्या आई बाबांकडे एवढा अमाप उत्साह कुठून बरे येत असेल? मला राहून राहून त्या मागचे गमक कधी कळले नाहीये. 

आता  मी काय करते? तोच वारसा मी पुढे चालवते आहे का?  घरच्या गणपती साठी तेवढाच जोरदार उत्साह असतो. कोकणस्थ असून हे दोन दिवस सारा कारभार देशस्थी असतो. कारण घरी दुपारी जेवायला बहिण, नणंद, दीर आपापल्या कुटुंबासमवेत असतात. अशारितीने आम्ही १६/१७ जण असतो. उकडीच्या मोदकांचा बेत असतो. सजावट नेहमी फुलांचीच असते, त्याच सोबत हार घरीच बनतात. दुपारी जेवण अटपतानाच ३ वाजतात. साधारण सकाळी ११.३० ते २ मी फक्त मोदकच बनवत असते. जेवणे पार पडून सर्व जण थोडे पडतात, आणि मला संध्याकाळच्या आरतीचे वेध लागतात. ज्यास एक तिखट आणि एक गोड असे दोन  ताजे नैवेद्य असतात आणि आरतीला साधारण ५० जण असतात. या साऱ्या गोष्टींची कोरडी तयारी किमान आधीचे ३/४ वीकेंड्स आणि गणपतीच्या आधीचे २ दिवस सुट्टी घेवून चालू असते. पण बास इतकेच.एकदा दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले की भरले घर सुद्धा सुने सुने वाटू लागते.  कॉलनीत कुठे अन कसा गणपती बसतो ह्याचा सुद्धा मला पत्ता नसतो. गेल्या कित्येक वर्षात मी जावून गणपती पहिले नाहीत. नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींकडे श्रींच्या दर्शनाला मी जर या दीड दिवसा नंतर एखादा वीकेंड आला, तरच जाऊ शकते. गौरी आणते, पण तिची सवाष्ण नवरात्रातल्या सवाष्णी सोबत बोलावते. कारण तेंव्हा खात्रीने एक वीकेंड मिळतोच. आज काल सार्वजनिक गणेश उत्सवात काही गाण्याचे कार्यक्रम, इतर स्थानिक लोकांचे विविध गुण दर्शनाचे  कार्यक्रम, काही स्पर्धा होतात की नाही ते मला माहित देखील नाही. कॉलनीतल्या गणपती पुढे स्पीकर लावून संध्याकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत गाणी (भक्ती गीतेच, किंवा गायत्री/गणेश मंत्र) चालू असतो, त्यामुळे या दिवसात घरून काम करण्याचा मी विचार सुद्धा करू नाही शकत. पुण्यातालीच काय पण चिंचवड मधील विसर्जन मिरवणूक कशी असते ते देखील मी गेल्या काही वर्षात पाहिलेली नाही. थोडक्यात काय? तशी आज आताही सारी गणिते व्यस्तच आहेत कारण पैसा आहे पण वेळ आणि तेवढा उत्साह मात्र कुठून उसना मिळत नाहीये.



Thursday, September 6, 2012

फिरून फिरून भोपळे चौकात ........


"बरेच दिवसांनी आजारी पडले आणि २/३ दिवस सक्तीची विश्रांती मिळाली. अगदी चहा आणि जेवण सुद्धा रूम मध्ये येत होतं. पण खरंतर या विश्रांतीत काही मजा नसते."
"घ्या, आयतं मिळालं ते कुठेच गेलं! आणि म्हणे त्यात काही मजा नाही" 
"तसं नाही रे! आधीच तुम्ही तुमच्या आजाराने त्रस्त असता, आराम, आयतं चहा-पाणी यांचं जरासुद्धा कौतुक वाटू नये इतके. पण अशी सुट्टी इतर वेळी मिळत नाही ना!  माझ्या सर्व सुट्ट्या दरवर्षी जवळपास संपतात. कारणं काय असतात सुट्ट्यांची......लेकीचे आजारपण, सण समारंभ, जवळच्या नात्यातील एखादे कार्य किंवा एखादी ट्रीप यासाठी. यातला एकही दिवस खरंतर विश्रांती मिळत नाही, झालीच तर दगदगच होते. पण सुट्ट्या मात्र अशाच संपून जातात. अरे, फेसबुक वर जेंव्हा हे अपडेट टाकलं तर काय मजेशीर कमेंट्स होत्या, पण एकानेही "लवकर बरी हो" म्हटलं नाही. कोणालाच कसं वाटत नाही मी पण आजारी पडू शकते म्हणून?"
"अहो कीर्तनकार! ह्याला म्हणतात नमनाला घडाभर तेल... अगं बाई, तू आजारपणाबद्दल बोलत  होतीस ना, मग? कुठून कुठे पोहोचलीस?"
"हो खरंच! असं होतं कधीकधी, कुठून कुठे पोहोचतो ना बोलता बोलता आपण"
"आपण नव्हे आssपण! आणि "भरकटतो" असं म्हणायचय का तुला? (दोन "आपण" मधील फरक लक्षात येतोय ना?)
"हो हो तेच ते शाब्दिक फाटे फोडू नकोस रे!  तर त्या ट्रिप्स. फक्त आपले आपण जावे, तर आपण इन मीन ३ माणसे, करून करून काय मजा करणार. त्यापेक्षा केसरी, सचिन ह्यांच्या बरोबर जावे. धमाल येते. पण इतकी पळापळ करवतात, आज इथे, उद्या इथे, आणि वर सारखं हे खा, ते खा. दमवून टाकतात नुसतं."
"याचा आणि आजारपणाचा काय संबंध?"
"नाही. तेच सांगत होते मी."
"दरवेळेस आपल्यातला कोणी आजारी पडलं, की जाते विचारपूस करायला, काही मदत करू का विचारत. तुला सांगते, आजकाल मला एक महान शोध लागलाय."
"न्यूटन नंतर तूच! आता तो कोणता?"
"हाच की "मी काही मदत करू का? हा या जगातला सर्वात मूर्ख प्रश्न आहे."
"मग झालंच की, "तुझ्या त्या पुस्तकाची पहिली कथा तुझीच, नाव काय तुझ्या त्या पुस्तकाचे? अरे हो "मूर्खांच्या नंदनवनात" (इतरांच्या माहितीसाठी- कोणा अतीच मूर्ख व्यक्तीशी गाठ पडली असता त्याचे वर्णन मी घरी "मूर्खांच्या नंदनवनात- व्यक्तीचित्र नं ** असे करते)
"मला हीच कमेंट अपेक्षित होती तुझ्याकडून, असू देत आहेच मी मूर्ख. आणि ते बरेच वर्षांपूर्वीच सिद्ध झालंय. मुद्दा तो नाहीये"
" मग कोणता आहे, "फिरून फिरून भोपळे चौकात"
"अरे, काय कमाल आहे!  माझ्या बरोबर राहून बघ किती बदल झालाय तुझ्यात, वाक्यावाक्याला म्हणी सुविचार यांची पाखरणी. यालाच  म्हणतात ना  "ढवळ्या शेजारी बांधला पवळा,......  असो"
"असं करत जाऊयात का आपण. दरवर्षी असा एक आठवडा विश्रांती आठवडा म्हणून जाहीर करत जाऊयात एक तुझा, एक माझा. लेकीला काय मनात येईल तेंव्हा विश्रांती मिळतेच.... म्हणजे अजून तरी. जेंव्हा माझा विश्रांती-आठवडा असेल तेंव्हा घराची सारी व्यवस्था तू पहायचीस, मला आयतं चहा, नाश्ता, जेवण मिळायला हवा, तो तू बनव, बाहेरून मागव मी काही म्हणणार नाही. मी किचन मध्ये पाय टाकणार नाही. जमेल तेवढी पुस्तके वाचून काढणार. जुने सिनेमे पाहणार, संगीत कानात साठवून ठेवणार,  फोनवर गप्पा मारणार.  घराबाहेर पडणार नाही. हवे तर एखाद्या मैत्रीणीला घरीच बोलावेन गप्पा मारायला.  कोणतेही काम या काळात " तू घरीच आहेस ना मग एवढे करून टाक" म्हणत माझ्या मागे गोड बोलून लावायचे नाही. मी करणार नाही. मित्रांना ह्या काळात कोणत्याही छोट्या-मोठ्या पार्टी साठी घरी बोलवायचे नाही, आणि घरी पार्टी आरेंज केली तर कसे पैसे वाचतील हे मला पटवायचा प्रयत्न ही  करायचा नाही"
"ह्याच साऱ्या अटी-शर्ती माझ्या "विश्रांती-सप्ताहालाही  लागू असतील नाही?"
"तशी तुला अशा विश्रांतीची खरंच गरज आहे का?" तुझ्या मनासारखी ती तू अधून मधून घेतच असतोस की, चहा, नाश्त्याच्या फर्माईशी तर नेहमीच सुरु असतात."
"नाही नाही, आपण कधी नव्हे ते आपल्याच शब्दात पकडल्या गेल्या आहात, आता जे ठरलंय तेच होईल. दरवर्षी एक "विश्रांती-सप्ताह" नक्की होणार. आत्ताच तुझा झालाय, माझा कधी ते विचार करून सांगतो."

Friday, August 31, 2012

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी.......

एक भली मोठी गुहा आहे. आत शिरायला मात्र एक लहानशी वाट आहे. गुहा म्हंटलं की अंधार आलाच. इथे मात्र भरपूर मशाली पेटवून ठेवल्या असल्यामुळे भरपूर प्रकाश आहे. मी आत शिरते. भीती वाटत कशी नाही मला हा प्रश्न माझ्या डोक्यात आहे. पण मी आत जात आहे. गुहेच्या मध्यभागी खूप माणसे आहेत. उलटी टांगून ठेवलेली. ती जिवंत आहेत का हा अजून एक प्रश्न मला पडलाय. जिवंत किंवा मृत असल्याचे कोणतेच लक्षण दिसत नाहीये. पण त्याचेही मला विशेष काही वाटत नाही. मी थोडा वेळ तिथे थांबते मग बाहेर पडते. मग एक तीन काठ्यांच्या मध्यभागी पेटवलेली शेकोटी दिसते. सर्वत्र लाल रंगाचा प्रकाश आहे.

हे स्वप्न अगदी आता आतापर्यंत पडणारे. म्हणजे ते या पुढे पडणारच नाही असे काही मी सांगू शकत नाही कारण दर वेळी तापाने फणफणले की आख्खी रात्र हेच स्वप्न मला पडत राहते. अगदी आठवतंय तेंव्हापासून आतापर्यंत प्रत्येक वेळी. लहानपणी तर एक वेडी कल्पना माझ्या मनात होती. कदाचित हे स्वप्न अजून विस्ताराने कधी तरी पडेल मला. त्याचा अर्थ कळेल. हे अर्धवट स्वप्न वाटे त्यावेळी, आणि जर पूर्ण एपिसोड स्वप्नात दिसला तर बरे होईल असेही वाटे. त्यामुळे अनेकदा, "मला ताप यावा" अशी माझी इच्छा असे. तापाने फणफणलेली मी आणि त्या स्वप्नात असणारी शेकोटी, तो लाल रंगाचा भगभगीत प्रकाश, त्या मशाली, काय संबंध आहे साऱ्याचा एकमेकांशी माहित नाही. इतक्या लहानपणीपासून हे स्वप्न पहातीये मी, त्यामुळे कधी याच्या अर्थाचा विचारच मनात आला नाही. ताप आला की हे स्वप्न पडणारच हे इतके पक्के आहे. पण दरवेळी सकाळी जाग आल्यावर मनात उरतो तो फक्त लालभडक प्रकाश.


पाऊस पडत नाहीये, पण पडून गेल्यासारखं वातावरण आहे. मी एक्स्प्रेस वे वर गाडी चालवतीये. बरोबर अजून कोणी गाडीत नाहीये. नेहमी चालवते तोच (जरा जास्तच ) स्पीडही आहे गाडीचा. आजूबाजूला हिरवेगार डोंगर, मन प्रसन्न. गुंगून गेलीये हे दृश्य डोळ्यात साठवून घेण्यात. स्पीड वाढतोच आहे, आणि रस्त्यावरचं माझं लक्ष कमी होत गेलंय. शॉट१ कट.......तोच रोड, तीच मी, तीच गाडी, तसाच स्पीड. माझे लक्ष रोडवरच आहे. हळूहळू डोळ्यावर झापड येतीये माझ्या, या मला बघणारी अजून एक मी आहे. ती घाबरते. अक्सिडेंट होणार आता माझा या कल्पनेने. पण असं काही होत नाही. एका सरळ रेषेत मिटलेल्या डोळ्यांनी मी गाडी चालवते आहे. ( बाकी लोकांचे नशीब अगदीच जोरावर आहे म्हणायचे). एक मी गाडी चालवतीये आणि एक मी त्या मला बघते आहे. शॉट २ कट. वर्षानुवर्षे म्हणजे जवळपास १० वर्षे अधून मधून मी हे एक स्वप्न पाहतेच. या स्वप्नाचा अर्थ लावू जावे तर वाटते, कुठे तरी मला जागे, सजग, सतर्क ठेवणारे हे स्वप्न आहे. किमान तशी गरज आहे हे जाणवून देणारे. पण स्वप्नातून जागे झाल्यावर मनात उरतो तो आजूबाजूचा हिरवेगार परिसर, रस्त्याचा एक राखाडी, काळा रंग.


एक सुंदरशी बाग आहे. खरतर वाडी आहे. कारण दुतर्फा पोफळीची झाडे आहेत. अशा वाड्या कोकणात कुठेही दिसतातच. रस्ता, मध्ये वाडी आणि पलीकडे थेट समुद्र किनाराच. परिसर खूप सुखावणारा आहे. इथे मला मी कुठेच दिसत नाहीये. पण मी हे सारे पहात आहे. एक मस्त पैकी सैर होते या परिसराची. दरवेळी या स्वप्नातल्या बागेत कोणत्या तरी फळांचे ढीग रचलेले असतात. कधी केळ्यांचे घड, कधी नारळाने लगडलेले झाड, कधी आंब्याने भरून ठेवलेली मोठी टोपली. या स्वप्नातून जागे झाल्यानंतर ही मन प्रसन्न असते. त्या त्या फळाच्या रंगाचे एक अवकाश सोबत घेवून. अगदी पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा................

Wednesday, August 29, 2012

खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही.....


आऊचा काऊ तो ह्याचा मावसभाऊ असतो
पण त्याच्याबद्दल याला काहीच माहित नसतं
सांगायला जावे तर ह्याचे लक्ष नाहीच
आणि तरी म्हणे आम्हा बायकांनाच काही कळत नाही

सकाळी तास न तास वाची पेपर
एवढे काय वाचतो तेच मला कळत नाही
गहू तेलाचे भाव मात्र याला कधी माहित नाहीत 
आणि म्हणे आम्हा बायकांना काहीच कळत नाही

पाठवावे याला कधी भाजीबाजारात
घेऊन यावा ह्याने ढीगभर शेपू अन कांद्याची पात
घरातल्यांच्या आवडी निवडी याला ठाऊक नाहीत
आणि म्हणे आम्हा बायकांना काहीच कळत नाही

रात्र रात्र जागून पाहतो टी.व्ही.
axn स्टार स्पोर्ट्स आणि स्टार मुव्ही
सारखी तीच हाणामारी बघून कंटाळा कसा येत नाही
आणि म्हणे आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

मित्रांशी तास न तास गप्पा मारी
वर बालवाडीतल्या मैत्रिणींची खुशाली विचारी
बायकोचा वाढदिवस मात्र याच्या लक्षात नाही
खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

Friday, August 24, 2012

घडलंय....बिघडलंय.....


"ह्याला निव्वळ माज म्हणतात" माझी एक कलीग खूप चिडून म्हणाली. 
"माज काय त्यात? तू खाऊन तर बघ." मी
"नाही खाणार, इथे लोकांना यावर्षी आंबे मिळत नाहीत, आणि तू आंब्याची कढी बनवून आणलीस, अजिबात खाणार नाही"
"अगं,  आता मला ही रेसिपी संजीव कपूरच्या पुस्तकात मिळाली, आणि घरात आंबे ही होते, मग म्हटलं पाहू बनवून, माज वगैरे म्हणत नाहीत हं याला"- मी

हा संवाद या उन्हाळ्यातल्या दुपारी जेवणाच्या टेबलवर घडला. पहिल्या घासाबरोबर लक्षात आले, या रेसिपीत काही मजा नाही म्हणून. पण बनवली होती मोठ्या उत्साहाने, खाणे भाग होते. मनातल्या मनात मी त्या पुस्तकातला "आंब्याच्या कढीचा" सुंदरसा फोटो आठवत कशीबशी संपवली ती. कलीगचा राग ही नवीन गोष्ट होती पण असे पदार्थ बिघडण्याची काही ही पहिली वेळ नव्हती.

लग्नानंतरचे  अगदी सुरुवातीचे दिवस, साबा आणि नवरा ऑफिसला जाऊ लागले होते, पण माझे सासरे मात्र घरी होते, त्यांची सुट्टी अजून शिल्लक होती. सकाळी नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागले. फ्रीज मधून सिमला मिरची ओट्यावर काढून ठेवली होती. ते सहज आत डोकावले. मिरच्यांकडे पाहून म्हणाले " नारळ किंवा पीठ पेरून सुकी भाजी करू नकोस, रसदार भाजी कर". अरे बापरे, झाली का पंचाईत, सिमला मिरचीची रसदार भाजी कशी करायची ते मला माहित नव्हतं. विचारून कोणी सांगेल असं कोणी शेजारी पण नव्हते, आणि माझी ओळखही नव्हती. त्यांच्या समोर आई, काकू, आत्या यांना फोन करून विचारायचे धाडसही नव्हते. मुंबई-पुणे STD करावा लागायचे दिवस होते ते. नारळाचे वाटण करून रसभाजी बनवावी असा विचार केला. पण चांगली होईल अशी खात्री वाटत नव्हती. चेहऱ्यावर माझ्या अनेक प्रश्न होते. पुन्हा काही कारणांनी ते आत डोकावले. वाशीत अगदीच छोटंसं घर होतं आमचं. त्यांना माझा चेहरा वाचता आला असावा. सहज बोलल्यासारखे म्हणाले " काही नाही चिंच-गुळ, गोडा मसाला आणि दाण्याचे कूट, मस्त होईल भाजी, कर तू आपण खाऊ" भीतभीत बनवली आणि मस्त झाली भाजी. जीव भांड्यात पडला.

मग काही दिवसातच मी ही नोकरी करू लागले. साबा अनेकदा सकाळी ६ लाच घर सोडत, आणि आम्ही बाकी तिचे ८ ते ९ च्या दरम्यान एका पाठोपाठ. आपोआपच सकाळी आम्हा तिघांचे डबे मला बनवावे लागत. चुकत माकत बनवलेले पदार्थ असायचे डब्यात. छान झालेल्या पदार्थाची ते घरी येऊन लगेच तारीफ करत, पण बिघडलेल्या एखाद्या भाजी बद्दल एक शब्द ही कधी त्यांनी त्या सुरुवातीच्या दिवसात काढला नाही. ते सरकारी ऑफिसर होते, अनेक वर्षांची ऑफिसमधील मित्र मंडळी त्यांच्या सोबत लंचला असत, कसे त्यांनी ते असे पदार्थ त्यांच्याबरोबर शेअर केले असतील ह्या विचाराने मला खूप अपराधी वाटत असे. 

मग मी हळू हळू या कलेची पुस्तके जमवत गेले. निरीक्षण वाढवत गेले. कोणाच्या घरी गेल्यावर, निरीक्षण करू लागले तिथल्या स्वयंपाक  घराचे  आणि त्या अन्नपूर्णेचे. चाखत असलेला पदार्थ कसा बनवला असेल याचा विचार करू लागले. थोडा स्वत;च्या मेंदूला ताण देत प्रयोग करू लागले. अशाच  प्रयोगातून पहिल्या दिवाळीत "पुलाव" इतका सुंदर झाला. आधी साधीच रूपरेखा त्या पदार्थाची तयार होती डोक्यात. जस जशी तयारी करत गेले, तसतश्या एक एक वाढीव गोष्टी सुचत गेल्या, जसा की पाण्या ऐवजी दूध त्यात थोडे केशर, कांदा, बटाटा, काजू तळून, फरसबी, गाजर, मटार उकळत्या पाण्यातून काढून, फ्लॉवर थोड्या हळदीच्या पाण्यातून शिजवून. इतर मसाल्याबरोबर कोथिंबीर आणि पुदिनाही घातला. त्यात घालायला पनीर आणून ठेवले होते. खावा ही होता घरात. दोन्ही किसून घेतले. त्यात थोडी हिरवी मिरची, आले, लसूण वाटून घातले, मीठ आणि थोडे कॉर्न-फ्लोर. लहान गोळे बनवून ते तळले. असे हे सोनेरी गोळे शेवटी तयार पुलाववर पसरले. अहाहा काय स्वाद होता त्यात!

पुस्तकेही या बाबतीत कधी कधी चकवतात. अनेकदा लिहिल्याबर हुकुम पदार्थ बनवला तर बिघडू शकतो, जसे की हलके सोनेरी गुलाबजाम तळून घ्या किंवा कांदा गुलाबी होई पर्यंत तळून घ्या - जर शब्दश: तसे केले तर कच्चेच राहतील. तर काही जसे लिहिले तसेच बनवावे लागतात, आपली अक्कल चालवून त्यात काही बदल केले तर हमखास बिघडतात. जसे  मी एकदा "आंब्याचे मूस" बनवताना चालवले होते. लग्नाच्या वाढदिवसासाठी आदल्या दिवशी सेट करायला ठेवलेले "मूस" त्या नंतर चार पाच दिवसांनी सुद्धा सेट झाले नव्हते. 

बिघडणार्या पदार्थांना कसे वाचवायचे याचे कोडे हळू हळू सुटत गेले. गोड पदार्थांसाठी घरात पिठीसाखर, दुध पावडर, किंवा काजू बदामची पावडर असे हाताशी असले, आणि त्यावर थोडी मेहनत करायची तयारी असली की मग झालं. बिघडू पाहणाऱ्या तिखट पदार्थांसाठी उकडलेला बटाटा, ब्रेंड, मैदा असे पदार्थ उपयोगी पडू लागले. कधी कधी बिघडत जाणाऱ्यावर केलेला प्रयोग, ओरिजिनलपेक्षा सरस ठरला, आणि नंतर दर वेळी तसाच बनू लागला. जसे की एक वर्षी गणपतीच्या नैवेद्यासाठी मोदक बनवत होते. काही केल्या ते घट्ट व्हायलाच तयार नाहीत. अर्धी वाटी काजू आणि पिस्त्याची पूड त्यात घातली. चांगले न लागायला काय झालंय? दुसऱ्या दिवशी, गणपतीच्या सकाळच्या  आरती नंतर प्रसाद वाटून झाल्यावर बहिण आणि जावेला "कसे झालेत" असे विचारले. "Don't tell me! ये आपने घरपे खुद बनाये है?" - इति माझी अमराठी जाऊ. "तू केलेत ना, मग उत्तमच असणार, काही लोकांनी काहीही बनवलं तरी ते by default चांगलेच बनते"- इति बहिण.

काळासोबत मी  वेगळा आणि उत्तम पदार्थ सहजगत्या बनवू लागले. या बाबतीत मी माझीच स्पर्धक झाले. हळू हळू कोणी मला एखाद्या पदार्थाची रेसिपी कशी विचारू लागले मलाच कळले नाही. मुळातच या विषयावर बोलायला आवडत असल्यामुळे मी ही शक्य तितक्या डीटेलमध्ये ती रेसिपी शेअर करते. हातचं काहीही राखून न ठेवता! माझ्या हाताची जी चव आहे ती दुसऱ्या कोणाच्या हाताला कशी येईल ? कदाचित माझ्यापेक्षा ही उत्तम बनवेल. तरी हरकत नाही. 

माझ्या किचनरुपी प्रयोगशाळेत असे प्रयोग गेली अनेक वर्षे कधी घडले, कधी बिघडले. पदार्थ घडले किंवा बिघडले असं म्हणण्यापेक्षा त्यांनी मला घडवलं. चांगला स्वयंपाक बनवता येण्यासाठी एक नजर दिली. बिघडलेल्या पदार्थांनी त्यातूनच काहीतरी नवीन घडवायची दिशा दाखवली, बिघडलेल्या पदार्थाने अश्रू गिळायला शिकवलं, जमून आलेल्याने कौतुकात सुखावून जायला शिकवलं.....

माझ्या घरी, नात्यात, मित्र मंडळीत असे काही जण आहेत की ज्यांना माझ्या हाताचे जेवण विशेष आवडत नाही, तर दुसऱ्या बाजूस खूप मनापासून दाद  देवून खाणारे ही काही कमी नाहीत. पुन्हा एकदा सणासुदीचे दिवस येऊ घातलेत, वेळ नाही म्हणत म्हणत मी काही प्रयोगांसाठी वेळ काढेनच. नवरा एक दोन सूचना करत पदार्थ छान झालाय म्हणेल, कन्यकेच्या चेहऱ्यावरूनच कळेल, दादा म्हणजे माझे सासरे "उत्तम झालाय " अशी दिलखुलास दाद देतील  तर साबा त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने "चांगला झालाय" असे दुसर्यांना कौतुकाने सांगतील. माझी एक लहानशी मैत्रीण जी मला "मॉम" म्हणते ती तिरकसपणे "वॉव, क्या खाना बनाती ही तेरे घर की रोटी बननेवाली ऑन्टी. मी लग्न झाले की तिला तुझ्या घरून घेवून जाणार" असे म्हणेल.  आजचे हे लिखाण त्या सर्वांसाठी!

Saturday, August 18, 2012

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे .......पण लक्षात कोण घेतो?

Technology चा प्रसार थोड्या धीम्या गतीने झाला असता तर किती बरं झालं असतं,  असे अनेकदा माझ्या मनात येते. या विचार रुजला एक दोन वर्षापूर्वी. तेंव्हा मी सकाळी लवकर ऑफिसला जात असे. इन्फिची बस घराजवळच काही अंतरावरून मी पकडत असे. रोज रस्त्यात एका दुकानाबाहेर एक स्त्री बसलेली दिसे. तशी टापटीप असे, जरा बरी साडी, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, पायात पैजण, चेहराही बरा नटवलेला आणि हातात कानाशी धरलेला मोबाईल. एक दिवस असा गेला नाही की मी तिला तिथे बसून फोनवर बोलताना पहिले नाही. अनेकदा मनात प्रश्न पडे ही बाई अशी का इथे बसून फोनवर बोलते? तिला जावून विचारावं असंही मनात अनेकदा आला. पण मीच इतकी घाईत असे. एक दिवस चुकून लवकर घराबाहेर पडले, आणि सावकाश चालत राहिले. दुरूनच ती दिसली. लांबवरून तिचे निरीक्षण मी सुरु केले. तिचा फोन कानाला लावून बोलणे चालूच होते. मग माझे लक्ष तिच्या बाजूला असलेल्या खराट्या कडे गेले. आणि लक्षात आले, ही कॉलनीत झाडू मारते. पहिला विचार आला " सारा वेळ  रोज इथे बसून बोलते, तर काम कधी करते? दुसरा की या कामात कमावते किती आणि गमावते किती फोनवर बोलण्यात?" त्याच वेळी माझी कंपनी  दरमहिन्याला ७५० रु. पर्यंतचे  माझे मोबाईल बिल भरत असे. ऑफिसचे आणि पर्सनल असे दोन्ही फोनचे माझे बिल 3०० पेक्षा जास्त कधी होत नसे. म्हणजे बघा एकीला परवडू शकते, पण ती या गोष्टींवर पैसा खर्च करत नाहीये, किंवा त्यासाठी तिच्याकडे वेळच नाहीय,  दुसरीची कदाचित खायची प्यायची चिंता मिटत नसेल, पण असे खर्च चालूच.  मला तिला खूप मनापासून असं सांगण्याची इच्छा होती " बाई, आजचा वेळ आणि पैसा असा वाया घालवू नको, पोटापुरत  कमवत जरी असलीस, तरी, गाठीशी थोडा वेळ असेल तर  थोडं  अजून  शिक काही, ज्याचा काही उपयोग होईल. कशाला इथे बसून अशा गप्पा मारत, मोबाईल कंपन्याची धन करतेस?"  पण धीर नाही झाला. न जाणो त्या न वापरत्या खराट्याचा वापर केलान असता!

मधे घरी येणाऱ्या केर-फरशी करणाऱ्या बाई सकाळी लवकर माझ्या वेळात घरी आल्या. काम माझ्याकडे असे होते की त्यांना ३००० रु हवे होते. त्या गेली जवळपास १० वर्षे माझ्याकडे काम करतात, त्यामुळे मी देणार नाही असा प्रश्न नव्हता. पण मी कारण विचारलेच. उत्तर आले " लेकाला नवा मोबाईल हवा आहे, रोज तो डोकं खातो माझं, आज तोच येणार होतात, पण मीच म्हटलं " तू नको येवू, मी विचारते ताईना" माझा पुढचा प्रश्न " काय करतो तो आता, आजकाल पेपर टाकायला येत नाही तो?" उत्तर " ते काम आवडत नाही त्यास, सकाळी फार लवकर उठावं लागतं ना, मग आता जातो एका दुकानात कामाला" 
"३००० चा मोबाईल हवाय त्याला ? एखादा साधा घेवून नाही का काम भागणार? तुम्ही सकाळी १० ते रात्री आठ घरोघरी जावून कामे करता ते काय अशा गोष्टींवर उडवण्यासाठी?"
"ताई, तो ५००० मागत होता, पण मी म्हटलं ३००० पेक्षा जास्त देणार नाही" 
त्यांना माझा फोन दाखवला आणि म्हटलं " हा ४५०० रु चा आहे, आणि गेली ४ वर्षे मी तो वापरतीये. "माहित होतं मला पुत्र प्रेमापोटी बाकी काही त्यांच्या डोक्यात शिरणार नव्हते ते. दिले पैसे. 

गेली दोनवर्षे  मी माझा असा फोन वापरतीये जो एकदा गाडी चालवताना मांडीवर ठेवला होता, मधेच तो खाली पडला, थांबल्यावर उचलू म्हणून मी लक्ष दिले नाही, तो जरा जास्तच पुढे पडला, आणि ब्रेक खाली आला. पण फोनला काही झाले नाही, एक चीर जाऊनही तो चालतो आहे, मी पण तो अजून तसाच वापरते आहे. कसं ना या गोष्टी इतक्या स्वस्त झाल्या नसत्या, आणि नको त्या वर्गाने त्यावर अनाठायी पैसे उडवले नसते. घरी धड खायला नसे ना का, की राहायला धड घर, पण घरात, टी. व्ही. केबल, हातात मोबाईल, चालवायला बाईक.....पण डोक्यात प्रकाश पडेल तर ? 

मी कॉलेज मधे असताना एक सौ. संध्या वर्तक नावाच्या प्रोफेसर उत्तम  इकॉनॉमिक्स, बँकिंग आणि फायनान्स शिकवायच्या, त्या " How rich become richer and poor poorer" हे स्पष्ट करून सांगताना नेहमी  एक उदाहरण द्यायच्या, तेंव्हा त्या म्हणायच्या " मध्यम वर्गात नेहमी एक प्रकारची इर्षा जागृत असते, दुसरयाचे अनुकरण, किंबहुना आपल्यापेक्षा वरच्या वर्गाचे अनुकरण करण्यात त्यास धन्यता वाटते. आपला शेजारी कोणती दुचाकी वापरतो, शेजारीण कशा साड्या, कसे दागिने वापरते या गोष्टींकडे त्याचे लक्ष असते.  त्यामुळे त्यांचे जास्तीत जास्त रेसोर्सेस अशा रीतीने खर्ची पडतात.  तोच एखादा उद्योजक असेल तर त्याला अशा गोष्टीनी काही फरक पडत नाही. त्याला सर्वात महत्वाचे असते ते योग्य प्रकारे पैसा आपल्या धंद्यात गुंतणे. पुढे त्या असे म्हणत,"उगीच नाही कंपन्या आपल्या उत्पादनांच्या जाहिराती "neighbor's envy, owner's pride " या शब्दात करत. हीच गोष्ट हेरलीये, बँकांनी, तुम्ही कार घ्यायला कर्ज मागा, तुमच्या घरी येवून देतील, पण एखाद्या उद्योगासाठी कर्ज मागायला जा, १०० खेटे मारायला लावतील." बघा हे १७ वर्षान पूर्वीचे उदाहरण आज ही लागू पडते, फक्त त्यातले वर्ग बदलले आहेत कदाचित. 

Saturday, August 11, 2012

जिन्दगीका सफ़र है ये कैसा सफ़र.......

पाय टाकायला जागा नाही इतकी गर्दी. गोतावळाच इतका त्यांचा. नातेवाईक म्हणू नका, ओळखी पाळखीचे, शिवाय क्लासमध्ये येणाऱ्या साऱ्याजणी. आज अचानक सारा खेळ संपतो. अनेकांना रडू आवरत नाहीये. घरचे, दारचे सर्वच जण यात आहेत. शांतपणे ती एका कोपऱ्यात उभे राहून सारे पहातीये. अगदी निर्विकार असा तिचा चेहरा. प्रयत्न करतीये ती, ओळखण्याचा, आसपासच्या कोणत्या मंडळींचे चेहरे खरे. आश्चर्य वाटतंय, अचानक माणसे अशी कशी वागू लागतात. आज आता इथे वागता-बोलता आहेत ते खरे की पूर्वीचे? अचानक दुखाचे महापूर कोठून आले? मागे उरलेल्या बद्दलची काळजी अचानक कशी व्यक्त होवू लागली? माणसे गेल्यानंतरचे हे प्रेम, नाही यातले थोडे तरी ती जिवंत असताना का उफाळून येत नाही? ईगो इतके कसे मोठे बनतात? इतर वेळी इतर लोकांसारखीच असणाय्रा तिला, या बाबतीत मात्र त्यांच्या सारखे वागता येत नाही.
पहाटेपासूनच, अगदी ती बातमी कानी आल्यापासून तिने बरीच आवश्यक अशी कामे उरकली आहेत. सर्व तयारी, साडी चोळी हार फुले इतकेच काय तर नंतर दिवा तेवता ठेवायला पणती, वात, विटा, कणिक, तेल इतपर्यंत. सारे फोनही लोकांना तिनेच केले. प्रत्येक फोनवर तीच माहिती सांगायची, लोकांचे तेच प्रश्न, हिची तीच उत्तरे. मुळात अनेकदा खात्री करून तिलाच ही बातमी खरी वाटत नव्हती, प्रत्येक फोन वर बोलताना तिलाच प्रश्न पडे, "हे सारे खरे आहे ना?" पण वेळ तर तिने निभावून नेली. हळू हळू सगे सोयरे सारे जमले. प्रत्येकजणच फार दु:खी दिसत होता. आता ती एकटी झाली. कोण होत्या त्या तिच्या ? सारे उरकले, मंडळी पांगली. अनेकांनी आपले दु:ख चांगल्या रीतीने जगाला दाखवून दिले. कुठे तरी घरात कुजबुज ही झाली " जरा म्हणून हिच्या डोळ्यात पाणी नाही, काहीच कसं वाटत नाही? " " किती कमाल आहे बाई". ती ही कानी पडली. यांच्या पैकी कोणी तिला पुस्तक वाचताना, किंवा एखादी टी. व्ही. सीरिअल पाहतानाही झरझर डोळे ओले केलेलं पाहिलं नाहीये का? एकंदरीतच लोकांना इतरांना "लेबले" लावायला फार आवडते.

माणूस गेलाय पण जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत त्याच्या आठवणी माझ्यासोबत आहेत. आता नवीन आठवणी निर्माण होणार नाहीत , पण जुन्याही माझ्या कोणी हिरावून घेऊ शकणार नाही.तिला आठवत राहिल्या त्या, त्यांच्याशी घडलेले संवाद. त्यांचे खालून वर फोन करणे, काहीतरी खाऊ न चुकता तिच्या घरी पोहचवणे. एखादी गोष्ट त्यांना सांगितली म्हणजे झालीच म्हणून समजा. असा तिचा अनेक वर्षांचा अनुभव. घर संसारात फार रमायचा स्वभाव नव्हता, पण उत्तम जनसंपर्क होता. तसं थोडा जगावेगळच व्यक्तीमत्व होत्या त्या. तिच्या डोळ्यासमोर अनेक असे क्षण उभे ठाकत होते. या आठवणी महत्वाच्या. त्या इतक्या सहज पुसल्या जाणार नव्हत्या. त्यांचे दिवस होतात न होतात तोपर्यंत जवळची माणसे आपल्या मूळ पदावर आली. पुन्हा हिला प्रश्न पडला की कोणती रूपे खरी. मृत्युच्या संवेदना इतक्या बोथट? इतके सहज आयुष्य पुन्हा पाहिल्यासारखे कसे होते?

मृत्यूचं दर्शन तसं तिला नवीन नाही. पहिला मृत्यू घरातला पहिला तेंव्हा अगदीच लहान होती, त्यामुळे फारशी जाणीव नव्हती. गमावली होती तिने पणजी. नंतर कित्येक दिवस आठवत राहिला तिचा मऊ हात ज्यावर डोकं ठेवून ती झोपी जात असे. नंतर काही वर्षांनी पणजोबा आजारी पडले कुठे तरी जाणीव आधीच झाली होती कदाचित त्यांच्या जाण्याची. त्यांच्या जायच्या एक दिवस आधी संध्यकाळी, ती दुधाचा कप धूत होती. नळाखाली तो धरून त्याकडे पाहत राहिली. मनात विचार येत होते " जगात असंच घडत असेल, जुनं पाणी वाहून जात असेल, नवे त्यात पडत असेल, मग नव्याला जागा हवी तर जुन्याला जायलाच हवे". तेंव्हा नुकताच काही दिवस आधी तिला आतेभाऊ झाला होता. आज मागे वळून पाहताना विचार येतो तिच्या मनात १० वर्षाच्या मुलीच्या मनात असे विचार येऊ शकतात का? की ते अकाली प्रौढत्व होते? दुसऱ्या दिवशी ते गेले. आदल्यादिवशीच्या विचारांनी कदाचित, धक्का बसला नाही त्यांच्या जाण्याचा.

मग अशी वेळ आली की मृत्यूचे दु:ख करायला वेळच नाही मिळाला. वयाच्या १५ व्या वर्षी अचानक तिचे बाबा गेले. थिजून गेली ती. काही दिवसांवर आलेली १० वीची परीक्षा. भान आले तेंव्हा मनात पाहिला प्रश्न आला "पुढे काय?" लोकांची सहानुभूती काही क्षण राहील, पण "पुढे काय?" आपली आपणच उत्तरे सापडत गेली मार्ग निघत गेले. दु:ख करायला फुरसतच नव्हती. तेंव्हा पासून अशीच दगड बनलीये ती. लहान सहन गोष्टींनी हळवी होणारी ती, मोठी संकटे मात्र झेलते. जगासारखे रडून तिला दु:ख व्यक्तच करता येत नाही आता. काही बोलणं या विषयीही नाही पसंत तिला. दु:ख मनात ठेवून "पुढे काय?" ची उत्तरे ती शोधू लागते. यावेळी ही तसंच काही घडलंय. आज जवळपास महिना होत आलाय, वरवर सारे ठीक दिसत असले तरी तिचे मन अजून थाऱ्यावर नाही. त्यांचे विचार अजून मनातून गेलेले नाहीत. रात्र रात्र झोपेशिवाय जातीये. वरकरणी सर्व, घर ऑफिस सुरळीत सुरु आहे, पण कुठेतरी काहीतरी अधुरं आहे. तिला माहीत आहे "काळ" हेच सर्व गोष्टींवर उत्तर आहे. तरीही.................

Wednesday, August 1, 2012

किसको ऐसी बात कहे..................


रात्रीचा एक वाजून गेलाय. मनाविरुद्धच मी ऑफिसच्या बाहेर पडलोय. गाडी सुरु करतो, त्याचबरोबर सूर कानी पडतात. " किसको ऐसी बात कहे" खरंच कोणाला सांगू ही अशी अवस्था! काचेवर वायपर सरसर फिरता आहेत आणि मनावर आठवणी. पावसाचे थेंब पुसले जातात पण या आठवणीचं काय करू? बाहेरचं फारसं धड दिसतही नाहीये. तसं मनातलं काही तरी कुठे उमगतंय? संध्याकाळ पासूनच मी थोडा अस्वस्थ आहे. तसा प्रत्येक पाऊस मला अस्वस्थच करतो, अजब अशी बैचैनी पसरत जाते. काही कळत नाही मग. आधी भूरभूर वाटणारा पाऊस आता नुसता कोसळतो आहे. ऑफिसमधून बाहेर पडण्याचीच इच्छा नव्हती. वाटतं की एखाद्या खोलीत कोंडून घ्यावं, काम करत राहावं, काही संपर्क नको जगाशी. अशा पावसात आजूबाजूला सगळेच लोक कसे इतके प्रफुल्लीत होतात हे आजकाल मला समजत नाही. 

"खरतर पाऊस मला पूर्वी कधी आवडलाच नाही. लहान होतो तेंव्हा बाकीची मित्र मंडळी मजेत भिजत, कागदी होड्या करून पाण्यात सोडत. पण मी, ....मी नाही हे काही केलं. पुढे कॉलेजमध्ये ही पहिली काही वर्षे मी कटाक्षाने या पावसापासून दूर राहिलो. शेवटच्या वर्षी, आपल्या ग्रुपची पावसात ट्रीपची टूम निघाली. मनापासून यायची इच्छा नव्हतीच, पण तू खूप उत्साही दिसलीस. तशी आपली नुकतीच थोडी ओळख होवू लागली होती. पण ना कळे का तुझ्या सोबत काही क्षण घालवण्याची एकही संधी मी सोडत नव्हतो. मंतरलेले दिवस ते. खरंच ती ट्रीप लक्षात राहावी अशीच होती. आपण सारे कुठल्याशा गडावर गेलो होतो, अगदीच भूरभूर असा तो पडत होता. तुझ्या बटांवर ते चिमुकले थेंब इतके गोड दिसत होते, की नजर हटत नव्हती. तेवढ्यात तुला कोणीतरी कविता म्हणायचा आग्रह केला. ती ऐकायला मी ही उत्सुक होतोच. तुझ्या तोंडून आली ती................


              "नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी अन दारात सायली"


तुझ्यामुळे कविता, गाणी काव्य आवडायला लागले, तशी तू ही. पण शब्दात व्यक्त करणं मला कधी जमलंच नसतं. तरीही हळू हळू आपण बाकी ग्रुपपासून वेगळे होत गेलो. तू एकदा बोलायला लागलीस की अखंड धारा बरसताहेत असे वाटायचे. मुळातच हुशार तू, त्यात अनेक कवितांची पाखरणी, तरीही ते सहज असे.....तुला पाऊस खूप आवडत असे. आकाशात जरा ढग दिसले की तू मोहरून यायचीस, अगदी त्या मोराप्रमाणे. तुला अशावेळी कितीतरी कविता आठवत. तू शब्दश: कविता जगायचीस. कवितेचे सारे भाव तुझ्या डोळ्यात दाटून यायचे, अन मी तुला पाहताच राहायचो. वाटायचं असं एखाद्या गोष्टीवर प्रेम करता यायला हवे.

असेच एकदा पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस होते. एम.बी. ए च्या दुसऱ्या वर्षाला होतो आपण तेंव्हा. थोडी हलकी सर होती, म्हणून लायब्ररीच्या पायऱ्यांवर आपण दोघे बसून होतो. तू "चल, ना भिजू" असा हट्ट धरून होतीस, आणि मी नेहमी प्रमाणे " नको" चा राग आळवत होतो. त्या दिवशी कसे आठवत नाही पण तू माझे ऐकलेस, आणि थांबलीस. आजूबाजूला फारसं कोणी नव्हतंच आणि तू हलकेच गुणगुणायला सुरुवात केलीस " ओ, सजना बरखा बहार आयी, रस की फुहार लायी, आखियोंमे प्यार लांयी" तू गुणगुणत होतीस आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. चटकन मी उठलो, म्हटलं, "चल जावू या" 

तुझ्या आग्रहाखातर, मी चक्क रागदारी, हिंदुस्थानी संगीत ऐकू लागलो. आठवतं? एकदा तुझ्या आग्रहाखातर आपण सवाई गंधर्वला गेलो होतो, तो तुझा सखा पाउस, तिथेही तुझ्या मागे आला, भर डिसेंबर महिन्यात, तू तर काय मग..........मध्यरात्री पावसात जितका भिजलो नाही तितका तुझ्या सुरात भिजून निघालो. तुला बाईकवरून तुझ्या घरी सोडायला जाताना. अवेळी पडून गेलेला पाऊस आणि तुझे गुणगुणणे.

शिक्षण संपले, अर्थार्जन सुरु झाले. आपण दोघे वेगवेगळ्या क्षेत्रात, मी आय. टी. वाला तर तू बँकेत. मी चिडवायचो तुला " या बँकेतून बाहेर पडणाऱ्या नोटा बघून घ्या, त्यावर कविता लिहिलेल्या आढळतील." तू चिडायचिस, ठणकावून सांगायचीस " investment बँकर आहे मी". एकदा मी घरी होतो, मार्च महिन्याचे शेवटचे दिवस, दुपारी चार वाजताच काळोख दाटू लागला, पावसाची चिन्हे दिसू लागली. मी, तुला फोन केला, म्हंटले " ए, बाहेर पाहिलयस का ? काय मस्त हवा आहे, बाहेर पडणार आहेस की investment ची गणिते मांडत राहणार आहेस? पिक अप करू का तुला थोड्या वेळात? चल लॉंग-drive ला जावू" तू हो म्हणालीस. खूप उत्साहाने मी तयार झालो. खाली पार्किंग मध्ये पोहचून गाडी काढणार, पाहतो तर काय, तू रिक्षातून उतरत होतीस. मी सुखावलो, वाटले जो विचार माझ्या मनात चालू आहे, तसेच काही हिच्याही. पण माहित नाही काही तरी बिनसले होते त्या दिवशी तुझे. गाडीत बसल्यावर मी तुझा हात हाती घेतला, पण तू काही न बोलता सोडवून घेतलास. मी म्हणालो " गाडीत सी. डी. नाहीयेत, आज आपण काहीतरी live ऐकूयात, पण काहीच प्रतिसाद नाही. आपण थांबलो एका ठिकाणी, मी पुन्हा पुन्हा तुला "काय झालंय" असं विचारले, पण तू "काही नाही" या पलीकडे काही बोलली नाहीस. 

ती आपली शेवटची भेट. वारंवार मी तुला काय झालंय असं विचारत राहिलो, फोन वर, मेल्स वर, पण सारे प्रयत्न व्यर्थ ठरत होते. नंतर नंतर तू माझे फोन घेणंही बंद केलंस. अनेक दिवसांच्या तुला बोलतं करायच्या माझ्या प्रयत्नांतून काहीच हाती लागले नाही. शेवटी सारे विसरून मी स्वत:ला माझ्या कामात गुंतून घेत गेलो. जगाच्या दृष्टीने एक मोठा माणूस. पैसा-अडका सारं काही बक्कळ कमावणारा. बाकी सारे दिवस तर ठीक जातात पण, तुझा तो मित्र "पाऊस" फार जीव नकोसा करतो. तुझ्या साऱ्या आठवणींचा चित्रपट माझ्या समोर उभा करतो. पहिले थेंब पडू लागतात आणि विचार येतो " कुठे असशील, काय करत असशील?" असा हा पाऊस तुला ही असं अस्वस्थ करत असेल का? जशा तुझ्या आठवणी मनात काहूर माजवतात माझ्या, तशा त्या तुझ्याही मनी दाटून येत असतील का? आज ही तू कविता, गाणी तशीच गुणगुणत असशील का? "काली घटा छाए" किंवा "पिया बिन नहीं आवत" हे आज ही तुझ्या ओठी येत असेल का?

घरी पोहोचलोय माझ्या मी. पाऊस पण थांबलाय आता बाहेरचा, आणि मनात सुरु झालाय. रात्र अशी आता भिजुनच संपेल. गाडीत मेहंदी हसन यांचे सूर आहेत.....

कर रहा था ग़म-ए-जहाँ का हिसाब
आज तुम याद बेहिसाब आये

इस तरह अपनी ख़ामुशी गूँजी
गोया हर सिम्त से जवाब आये..........................