Friday, April 10, 2015

नेट न्यूट्रॅलिटी

२२ एप्रिल २०१५ रोजी भारतातील टेलेकॉम ऑपरेटर TRAI म्हणजे Telecom Regulatory Authority of India ला ११७ पानांचं एक निवेदन देतील. या निवेदनाचा सारांश असा :

सध्या आपण जे आंतरजाल वापरतो ते उभारण्यासाठी या कंपन्यांनी बरीच गुंतवणूक केलेली आहे. पण आता फेसबुक, गूगल इ. कंपन्या यांचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून नफा कमवित आहेत. यावर उपाय म्हणून या कंपन्यांना आपले दर हवे तसे, हवे तितके ठरविण्याची मुभा हवी आहे. आता तुम्ही म्हणाल मुभा तर आहेच की. एअरटेलला त्यांच्या ब्रॉडबँड कनेक्शनसाठी जो हवा तो रेट लावता येतो, कुणी अडवलंय? पण तसं नाही, एअरटेलला त्या कनेक्शनमध्ये तुम्ही कोणत्या सायटीवर जाता यावर आपला रेट ठरवायचा आहे. म्हणजे तुम्हाला गुगलवर जायचंय तर १०० रु., फेसबुकवर ५०, यूट्यूबसाठी ७५ इ.

हे करण्यामागचं कारण असं आहे. सुरुवातीला लोक बोलण्यासाठी मोबाइलचा वापर करायचे, कंपन्यांची चलती होती. मग व्हॉट्सअ‍ॅप आलं, व्हायबर आलं, गूगल व्हॉईस आलं, संपर्काचे इतके पर्याय उपलब्ध असल्यावर लोक फोन कशाला करतील? त्यांचा नफा कमी झाला आणि यावर उपाय म्हणून या कंपन्यांना आंतरजालावर एकाधिकारी सत्ता हवी आहे. तुम्ही कुठली साईट बघता यावर तुम्हाला किती पैसे पडतील हे त्यांना ठरवायचं आहे.

ही सरळसरळ लूट आहे. पहिला मुद्दा, एअरवेव्हज - म्हणजे संपर्कासाठी आपण जे वायरलेस वापरतो - ही राष्ट्रीय संपत्ती आहे, पाणी किंवा वीज यासारखी. लोकांना ही संपत्ती वापरता यावी यासाठी सरकारने रीतसर लिलाव केला आणि कंपन्यांना ठराविक मुदतीसाठी एअरवेव्हज वापरण्याची परवानगी दिली. उदा. उद्या जरा पाण्याचं खाजगीकरण करायचं ठरवलं तर कंपन्या पाइप टाकतील, पाणी देतील आणि त्यासाठी पैसे घेतील. पण हे पाणी तुम्ही कसं वापरता हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. फाईव्ह स्टार हाटेलातल्या स्विमिंग पुलामधलं पाणी महाग आणि धुणं धुवायचं असेल तर स्वस्त हे चालणार नाही. किंवा त्याहीपुढे जाऊन तुम्ही ओनिडाचं वॉशिंग मशीन वापरलं तर पाणी स्वस्त, व्हीडीओकॉनचं वापरलं तर महाग हे तर अजिबातच चालणार नाही. एअरवेव्हजच्या बाबतीत कंपन्यांना नेमकं हेच करायचं आहे.

दुसरा मुद्दा. फेसबुक वगैरेमुळे कंपन्यांचा तोटा होतो आहे. कंपन्यांचा टर्नओव्हर बघितला तर यात फारसं तथ्य नाही असं लक्षात येईल. शिवाय जरी तोटा झाला तरी त्याची किंमत लोकांनी का द्यायची? धंदा म्हटलं की हे होतंच असतं. परवडत नसेल तर कंपनी बंद करा. आणि लोक जितके पैसे देतात त्या मानाने कंपन्यांची सर्व्हिस काय लायकीची असते हे सर्वांना ठाऊक आहेच.

तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा. याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होऊ शकतो. समजा एखादं वर्तमानपत्र सातत्याने सरकार किंवा उद्योगपतींच्या विरोधात लिहीत असेल तर त्या वर्तमानपत्राची साईट बघण्यासाठी आवाच्या सव्वा दर लावला तर ती माहिती लोकांपर्यंत पोचणार नाही. धनको वर्गासाठी अडचण असणारे पत्रकार, कार्यकर्ते, संघटना यांना गप्प बसविण्यासाठी तर हा जालीम उपाय ठरू शकेल. (यासाठी आणीबाणी काय चीज होती, मुस्कटदाबी केल्यावर काय होतं  हे आजच्या पिढीला कळण्याची नितांत गरज आहे. )

काही  महिन्यांपूर्वी अमेरिकेत केबल कंपन्यांनी याच प्रकारचं विधेयक आणण्याचा प्रयत्न केला होता. जनजागृती आणि प्रचार यांच्यापुढे अमेरिकन सरकारला झुकावं लागलं आणि त्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. आता आपली पाळी आहे.

तुम्ही काय करू शकता?

१. या निवेदनावर सही करा.
२. TRAI ने लोकांकडून यावर प्रतिक्रिया मागविल्या आहेत. पत्राचा एका मसुदा इथे आहे. तो जसाच्या तसा किंवा वाटतील ते बदल करून advqos@trai.gov.in इथे पाठवा. राज्यसभा सदस्य राजीव चंद्रशेखर यावर संसदेत प्रश्न आणणार आहेत. पत्राची एक प्रत त्यांना digitalindia@rajeev.in इथे पाठवा.
३. दोन आठवडे आहेत, तोपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा.

(Random Thoughts - वरुन साभार)

Monday, March 30, 2015

मितवाची कविता .......माझ्यासाठी!

काल मी मनाचा चाले मनाशी संवाद म्हणत सर्वांशी मन:चित्रे शेअर केली होती. हा संवाद कसा तर दोन्ही बाजूने आपणच सारीपाट खेळावा, आपणच प्रश्न विचारावेत आपणच उत्तरही द्यावे, आपणच मनात भातुकली रचावी, आपणच खेळ रंगू द्यावा, आपणच त्याचा आनंद लुटावा तसा हा संवाद! हा परीकथेतील राजकुमार माझ्या मनात वसणारा. माझ्या आनंदाचा ठेवा पुन्हा पुन्हा गवसणारा. मला सुखावणारा. 
मी मनोगतासाठी कवितेचे माध्यम वापरून त्याच्यापर्यंत ते पोहचवले तर त्यास ही ते जमायला हवे ना! म्हणून मनातल्या त्याला मी म्हंटले तू कधी व्यक्त होशील माझ्यासाठी असा? असं मी म्हंटल्यावर तो थोडीच मागे राहील? झरझर लिहिती झाली लेखणी माझी, कारण काव्य त्यास स्फुरले अन मी लिहू लागले असा हा अनुभव. 

वेड लागेल नाहीतर काय!!!

अशी भेट असे तुझे बोलणे
वेड लागेल नाहीतर काय!

असा पाऊस, तुझे चिंब होणे
वेड लागेल नाहीतर काय!

असा सुगंध, असे तुझे फुलणे
वेड लागेल नाहीतर काय!

अशी सांजवेळ, असे तुझे आठवणे
वेड लागेल नाहीतर काय!

असा स्पर्श, असे तुझे शहारणे
वेड लागेल नाहीतर काय!

असे भांडण, मग  तुझे रूसणे
वेड लागेल नाहीतर काय!

अशा तुझ्या रूपांत असे माझे हरवणे
आता वेड लागायचं राहिलंय काय!

Saturday, March 28, 2015

मितवा......

कवितेच्या गावा जावे पण तितके सोपे नसते ते. मनातल्या भावनांना नेमक्या शब्दात गुंफत, मात्रेच्या गणितात बसवत कविता करणे खरेच खूप अवघड असते. त्यामानाने भारंभार लिहिणे सोपे. शब्दांची मर्यादा नाही, मात्रेची गणिते नाहीत, यमकांची जुळणी नाही. मनातले सारे नीटसे उतरले वाटेपर्यंत लिहित रहावे बरे हेच खरे… 

पण तरीही घालतातच कविता भुरळ मनाला. अनेकदा एखाद्या प्रसंगाचे चपखल वर्णन करण्यासाठी, एखादी प्रतिक्रिया म्हणून, एखादी उपमा देण्यासाठी मला अनेकदा कवितेच्या ओळीच आठवतात.पण स्वत: लिहायचे झाले तर मात्र सगळा आनंद आहे. विचार करून थकते मी लोकांना कशा असंख्य विषयांवर कविता लिहिता येतात ज्या मला जमणे शक्य नाही. पण तरीही कविता या लेखन प्रकारावर प्रेम आहे माझे आणि प्रेम ही जगातली एकमेव सुंदर भावना आहे यावरदेखील. प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तू मला असे म्हणणाऱ्या नायिका बघत मोठ्या झाल्याचा परिणाम असेल कदाचित. 

प्रत्येक स्त्रीच्या मनात तिचा एक सखा असतो. नकळत्या वयापासून त्याची अनेक रूपे मनात उमलत असतात. काहीना तो गवसतो काहींचे आयुष्य सरते मनातल्या त्याला शोधण्यात. कॅलिडोस्कोपच्या नवनव्या रचनांनी भुरळ घालावी तशी साकार होत राहणारी त्याची रूपे, त्याचे भास. कधी तो माझा मित्र, कधी सहचर, कधी वेगवेगळी नाती  उभी करणारा, तर कधी चक्क देव बनून साकारणारा. असा मितवा जो माझ्या मनात वसतो, सदैव माझ्या सोबत असतो, अखंडपणे माझा त्याच्याशी संवाद चालतो. कधी प्रेमाचा संवाद तर कधी नुसताच वाद, रुसणे, फुगणे, समजूत घालणे म्हणजे जणू  मनाचा चाले मनाशी संवाद! असे हे सुंदर मनातले जग त्याचे आणि माझे माझ्या मनातले!!!

माझ्या मनातला माझा रावा 
त्याचा मनातच घेते ठावा 
मनातच त्याचा वाजे पावा 
मनातल्या मनातच त्याला  
राधेने निरोप कसा धाडावा

अशी अवस्था करणारा तो मितवा. मनीचे गूज त्याला तरी कवितांमधून सांगावे, तसा प्रयत्न तरी करावा. मनालाच मन वाचून दाखवावे तसे जणू. त्यामुळे चुकलेमाकले आपले आपल्याशी असेही. तर अशा या काही ओळी माझ्या मनातल्या राव्याला, माझ्या मितवासाठी, माझ्या सखयासाठी.........चांगले वाईट याची पर्वा न करता त्याला कल्पून लिहिलेले. माहीत नाही किती काळ त्याच्यासाठी लिहिणे जमेल, माहीत नाही कधी शब्द दुरावतील… त्यामुळे जसे मनात साकारले ते हे असे……. अशाच काही कविता एक दोन भागात मिळून.

गोधडी प्रेमाची ........

जगणे जणू आपुले असे
गोधडीचे टाके जसे

एक टाका प्रेमाचा
वर्षाव आपुलकीचा

एक टाका मैत्रीचा
झरा अखंड हास्याचा

एक टाका हितगूजाचा
अव्यक्तातून व्यक्ताचा

एक टाका स्पर्शाचा
मोहरत हरखण्याचा

एक टाका नजरेचा
शब्देविण संवादाचा

एक टाका आठवणींचा
क्षण पुन्हा जगण्याचा

एक टाका विरहाचा
भरून आलेल्या आभाळाचा

एक टाका अश्रुंचा
सयींसह बरसण्याचा

एक टाका तुझा, एक टाका माझा
समांतर राहूनही, एकरूप होण्याचा


२) नाते.........
नात्यांचे बंध
बांधलेली मने
उमलणारी नाती
प्रेमाची झुळूक लाभताच
कोमेजणारीही नातीच
अंतराची झळ लागताच
जाणिवेतील बंध
नेणिवेत जाताना
क्षितिजच बदलून
टाकणारे तुझे माझे
नाते..........
नात्यांचे बंध
बांधलेली मने
मन तुझे मन माझे.....


३) सहजच.............
सहज कधी काही बोललो
सहज एका वाटेवर चाललो
चालता पावलांसवे एके दिवशी
सहजच प्रेमाच्या गावाशी पोचलो
सहजपणे जुळले बंध,
सहजच जुळले धागे
आपुले एकाकीपण मग
सहजच कसे मग पडले मागे
सहज मग लागे आस
सहजच नकळे जडला ध्यास
जगावेगळ्या अद्वैताचे
सहजच मग होती भास
सहज असा सूर सदा जुळावा
सहजच प्रवास मिळूनी घडावा
आनंदाच्या या वाटेवरती
सहजच अंतरातला गळो दुरावा


Monday, March 16, 2015

असे जगणे …

गेले चार दिवस प्राजक्ता  विचार करतीये खोलीत एक वेगळाच गंध जाणवतोय पण तो कशाचा हे काही पटकन सुचत नाहीये. कोणतेच नाव देता येणार नाही असा, ना गोडसर, ना तीव्र उग्र, ना विचित्र दर्प. कोणत्या फुलांचा नाही, एअर फ्रेशनरचा नाही, नवीन कपड्यांचा नाही.पण दर वेळी खोलीत शिरल्यावर तो जाणवतोय हे खरे. विशेषत: बाल्कनीचे दार उघडल्यावर. म्हणजे त्याचा उगम बाहेरून आहे हे नक्की. पण कशाचा नक्की आणि कोठून हे कोडे.

पण  तेही  सुटले जेंव्हा शेजारच्या ट्वीन बंगल्यात राहावयास आलेली श्वेता भाटीया तिच्या आठ नऊ महिन्याच्या मुलीस घेऊन, हिच्या घरी ओळख करून घेण्यास आली. आणि लक्षात आले हा गंध एखादे बाळ ज्या घरात असते तिथे येत असतो, त्याच्या साबणाचा, त्याला दिलेल्या धुरी शेकाचा, त्याच्या dettol मध्ये धुवुन वाळत घातलेल्या कपड्यांचा असे सगळ्याचे मिश्रण बनत जो येतो तोच हा गंध, जो काही दिवस जाणवतोय. त्या माय लेकी थोडा वेळ बसून गप्पा मारून गेल्या. सारावेळ हिचं लक्ष त्या मुलीकडे. कुरळे पण छान जावळ असणारी, गोबऱ्या गालांची परीच जणू. शांतही होती अर्धा तास आईला त्रास न देता बसू दिले म्हणजे. सुलक्षणाबाई प्राजक्ताच्या सासूबाई पण घरात होत्या. त्याही गप्पांमध्ये सामील झाल्या होत्या. त्यांचे सारे लक्ष त्या छोटीला न्याहाळणाऱ्या प्राजक्ताकडे होते.

त्या दोघी गेल्यावर मात्र प्राजक्ता सुन्न बसून राहिली सोफ्यावर. मनात पुन्हा तेच गुंजणारे वाक्य, " आपलं एक बाळ हवं होतं रे, तुझं माझं …. तुझ्यासारखे हुशार, देखणे, प्रेमळ, थोडे माझ्यासारखे." त्यावर त्याच्याकडून फक्त शांतता. कधी नुसताच एक  कटाक्ष तिच्याकडे टाकलेला, कधी बदललेला विषय तर कधी तिथून निघूनच जाणे. आज घरात रांगून गेलेल्या चिमुकलीला पाहून सारे आठवणे अगदी ओघानेच.

लहानपणापासून ती तशी गंधबावरीच जणू . हे तिच्या आईने तिला दिलेले विशेषण. पदार्थांच्या चवीपेक्षा सुंदर वासानेच सुखावणारी, फुलांच्या, फळांच्या  रंग रूपापेक्षा त्याच्या गंधावरच भाळणारी, घर साधेच पण महकणारे असावे असे म्हणणारी, धूप दीपाच्या सुगंधासाठी सकाळ संध्याकाळ घरच्या देवघरात जाऊन तो लावणारी. नवे कपडे तसेच न घालता धुऊन घालायची पद्धत असलेल्या घरात नवा ड्रेस दोन दिवस उशाशी ठेऊन त्याचा गंध मनात नाकात साठवून, मग धुणारी. इमारतीत रंगकाम काढले कि त्या रंगांच्या वासाने खूष होणारी, धुतलेले कपडे कडक उन्हात साठवुन त्यांचा तो वास नाकात भरून घेणारी अशा एक ना अनेक. 

तशात कॉलेजमधे असता तिची मोठी बहिण माहेरी आली. पहिल्या बाळंतपणासाठी. नव्या चिमुकल्याचे आगमन काय झाले, प्राजक्तास गंधांचे वेगळेच शोध लागले. बाळाच्या साबणाचा, त्याच्या तेलाचा, बेबी लोशनचा, धुरी शेकाचा, dettol चा मारा केलेल्या कपड्यांचा. कदाचित सर्वात जास्त वेड आतापर्यंत याच गंधाने लावले असावे. इतर सारे या पुढे फिके जणू. ह्याच वेळी अनेक जाणीवा विकसित झाल्या कदाचित, मुलामुळे मिळणारा आनंद, त्याच्या असंख्य छोट्या गोष्टी  करता मिळणारे सुख तिने तेंव्हाच अनुभवले.

पुढे लग्न झाले, देखणा आदित्य, एका नावाजलेल्या कंपनीत उच्च पदावर असणारा. आई वडिलांनी सारं पसंत करून बघून सवरून थाटामाटात लाऊन दिलेले लग्न. सासरी माहेरी कौतुकाच्या वर्षावात नहात पहिले वर्ष कसे गेले कळलेच नाही. तिला नोकरी करण्याची गरज नव्हती. एकुलता एक मुलगा असणारा आदित्य, अजूनही स्वत:चा व्यवसाय छान सांभाळत असलेले सासरे, सासूबाई आणि प्राजक्ता असं चौकोनी कुटुंब. सासूबाई त्यांचे महिला मंडळ, थोडे समाजकार्य यात मग्न. घरी प्राजक्ता एकटीच तशी दिवसभर. घरात कामाला दोन तीन नोकर त्यामुळे तो हि फारसा प्रश्न नव्हता. शॉपिंग, टी व्ही, अधून मधून माहेरी जात राहणे,, कधी आदित्य सोबत कधी मैत्रीणींसोबत सिनेमा, हॉटेल मध्ये जेवण, त्याच्या सोबत मधेच घेतलेला एखादा छोटा ब्रेक कधी देशात कधी परदेशात.

अजूनही ती तशीच गंधवेडी होती. आता उलट थोडं ते वाढतच चालले होते. देशी विदेशी उत्तम परफ्युम्स, घराभोवती नीट नेटकी ठेवलेली बाग ज्यात नानाविध फुले नित्य फुललेली. वासानेच भूक चाळवतील असे  विविध देशातील पदार्थांची रेलचेल कधी घरी, हवे तेंव्हा बाहेर. सारं कसं दृष्ट लागण्याजोगे. हिच्या आगमनानंतर घरच सुगंधाने दरवळू लागलं. दिवाणखान्यात, बेडरूम्स मध्ये फुले दिसू लागली. हिच्या खोलीत नित्य नियमाने निशिगंधाचा दरवळ असू लागला. सोनचाफा घरात वावरू लागला. आदित्यला खूप वेळ नसला ह्या साऱ्यात, तरी त्याची काही हरकतही नव्हती.

दोन वर्ष कशी सरली कळलंच नाही या साऱ्यात. लग्नाचा दुसरा वाढदिवस दोघांनी घरी सर्वांबरोबर साजरा करून दुसऱ्याच दिवशी आठवड्यासाठी केरळला प्रयाण केले. अधूनमधून आजकाल प्राजक्ताच्या मनात मुलाचे विचार येऊ लागले होते. पण आदित्यपाशी हे कधी आणि कसे बोलावे हे मात्र कळत नव्हते. केरळला जाऊन आल्यावर त्याच्याशी बोलायला हवे असे ती मनात घोकत राहिली. आई, सासूबाई यांनी अडून सुचवून झाले होते. तिलाही तसे वाटत होतेच. हवे तर अजून एखाद वर्षाने पण हवे नक्की होते. आपण लग्न करताना आदित्यशी या बद्दल कधी काही बोललोच नव्हतो, त्यानेही कधी हा विषय काढला नव्हता हे आजकाल तिच्या लक्षात येऊ लागलं होतं.
एकदिवस त्याला असलेला संध्याकाळचा निवांत वेळ पाहून तिने विषय काढला.

"आदित्य, आजकाल मला घरात एकटं वाटतं…… "
"कशात जीव रमव, काही नवे शिकायचे तर शिक, होम सायन्स मध्ये मास्टर्स केलेली तू, गरजेखातर नाही, हौसेखातर नोकरी केलीस तर माझी काही हरकत नाही"
"पण मी पण घराबाहेर जाऊ लागले तर घर कोण सांभाळेल?"
"तू नव्हतीस, तेंव्हा कोण सांभाळत होते, तसेच चालेल आताही ते, तू काळजी नको करूस"
"तसं नाही आदित्य, मी आज नोकरी करू लागणार आणि काही महिन्यांनी किंवा वर्षाने ती सोडणार मग कशाला?"
"का? का सोडणार तू नोकरी? कर की मजेत"
"परवा आई कडे गेले होते, ती म्हणाली वेळेत सारे होणे ठीक असते, दोन वर्ष झालीत आता तुमच्या लग्नाला, आता किमान विचार सुरु करा"
"स्पष्ट बोल…… कसला विचार, काय वेळेत व्हायला हवे आहे, घर दार, गाडी, भरपूर बँक शिल्लक सारे काही आहे आपल्याकडे. हे सारे मिळवण्यात लोकांची आयुष्य खर्ची पडतात"
"ते नव्हे रे…. आदित्य तुला नाही का वाटत, आपण आपल्या एका बाळाचा विचार करायला हवा. म्हणजे लगेच असे नव्हे पण काहीतरी यावर आपण बोलायला हवे, ठरवायला हवे"
" बोलू यावर आपण नंतर कधीतरी, जेवण तयार आहे का? भूक लागलीये"

यानंतरही तिने त्याला याबद्दल बोलते करायचे अयशस्वी प्रयत्न केले. वेळेस त्याने विषय टाळला, बदलला. प्राजक्ता ला नक्की काय चुकतंय तेच समजेना. कोणाशी बोलावे तरी कसे. गेली दोन अडीच वर्षे जीवाभावाचा ज्याला समजत होतो, आयुष्यभर एकत्र रहायची स्वप्न बघत होतो तो हाच आदित्य होता का? आयुष्यातील इतक्या महत्त्वाच्या निर्णयावर बोलायचं तो टाळू कसा शकतो? हा त्याचा किंवा माझा एकटीच निर्णय कसा असू शकेल? जे काही ते बोलून ठरवायला हवे ना? 

"आदित्य, आपण एकदा नीट बोलायला हवे ना?"
"कशावर ? तोच तुझा नेहमीचा हट्ट आहे का?
"हो, पण …. "
"मला हे मुल वगैरे नको आहे, एक जबाबदारी आयुष्यभरासाठी नको आहे. जे जसं आपलं आयुष्य आहे ते तसंच असायला हवे आहे मला, कोणासाठी तरी अडकून पडणे मला जमणार नाही. तू जशी आहेस तशीच हवी आहेस मला, एक मुल झाल्यानंतर तूच नाहीस तर सारे आयुष्यच बदलून जाईल आपलं, जे घडायला नको आहे मला. मिळालं उत्तर? चर्चा नाही करायचीये मला"
"अरे पण … असं नसतं रे, आपल्या आई वडिलांनी नाही का घेतली होती आपली जबाबदारी, ते तुझ्यासारखं म्हंटले असते तर? जगभर आई वडील हे सारे करतात ना आपल्या मुलांसाठी?"
" तर मग आपण ही चर्चा करत नसतो प्राजक्ता"
"तू नीट बोलायचं म्हणालीस म्हणून मी काय ते तुला सांगितलं, यावर अजून काही मला पटविण्याचा प्रयत्न्न करू नकोस"

असं म्हणून तो तिथून निघून गेला. नित्याचे आयुष्य वरकरणी तरी तसेच चालू दिसत होते, आत मात्र प्राजक्ता खोलवर दुखावली गेली होती. त्यानंतर दोघांच्यातील उत्कट क्षणांनंतर एक दोन वेळा तिने "आदि …. मला आपलं एक बाळ हवंय रे …. अगदी तुझ्यासारखं " असे म्हंटल्यावर त्याने तिला दूर सारले आणि तिच्याकडे पाठ करून झोपून गेला. 

एके दिवशी ती आणि सासूबाई दोघीच  घरात असताना तिने विषय काढला.
" आई, आदि पहिल्यापासून असाच आहे का? "
"असाच म्हणजे कसा प्राजक्ता? काय केले त्याने? भांडण वगैरे झाले आहे का तुमचे? गेले काही दिवस नेहमीसारखी प्रसन्न दिसत नाहीस, लक्षात येत होतं, पण तू काही सांगितल्याशिवाय मी आपणहून बोलणार नव्हते"
" नाही आई, भांडण नाही, वेगळाच मुद्दा आहे. तुमच्या कधी  पूर्वी लक्षात आले होते त्याला लहान मुले विशेष आवडत नाहीत ते? किंवा मुले हे त्याला लोढणे, जबाबदारी वाटते ते?"
"नाही … मुळात तो एकुलता एक, आणि दोन्हीकडच्या नात्यांत तोच शेंडेफळ. बाकी ती जबाबदारी म्हणशील तर तो विषय कधी निघालाच नाही, पण का गं, असं का विचारते आहेस? आता तुमचं आलं की घराचं गोकुळ होऊन जाईल, तुमचा विचार आहे ना?
प्राजक्ता हमसून रडू लागली. सुलक्षणा बाईंना काय झाले तेच कळेना.
" अगं, प्राजक्ता, आत्ता नको तर हरकत नाही तुमच्या मर्जीने काय ते होऊ दे" 
"आई, अनेकदा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न्न केलाय मी, त्याने परवा साफ सांगितले आहे, की त्याला मुल नको आहे, त्याला मुलाची जबाबदारी नको आहे, आहे त्या आयुष्यात, माझ्यात, त्याच्यात कोणते बदल नको आहेत"
"अगं, आत्ता नको असं म्हणाला असेल, तुझा काही गैरसमज झालाय का? नीट बोला एकदा दोघं"
"मी गेले चार महिने आदित्यला बोलतं करायचा प्रयत्न्न करते आहे, आम्ही केरळहून परत आल्यापासून, पण तो विषय टाळत होता, परवा त्याने हे सांगितले, मला कळत नाहीये  हे सारे असे का? लग्नापूर्वीच या विषयावर आम्ही बोलायला हवे होते का, जे नाही झाले पण…… "
"प्राजक्ता, तुला पश्चाताप होतोय का, आदित्यशी लग्न केल्याचा, आतापर्यंत तर दृष्ट लागण्याजोगा संसार होता तुमचा"
"तसं नाही पण हा मुल नको असा निर्णय त्याचा एकट्याचा होतोय, इतका महत्त्वाचा निर्णय त्याच्या एकट्याचा नाही असू शकत, पण मी ही माझे म्हणणे लादू नाही शकणार त्याच्यावर, इतका ठाम असेल तो तर काय करू शकते मी, काहीच नाही"
"पण मनापासून मला वाटते के आमचे एक असे मुल मला हवे आहे. आदित्यवर नाही फार जबाबदारी येऊ देणार मी, देव दयेने आपल्याला काही कमी नाही, मला नोकरी करण्याची गरज नाही, सगळी जबाबदारी मी पेलेन त्या मुलाची, त्याच्यावर कोणताही अजून भार पडणार नाही, हवं तर मी माझे चार खर्च कमी करेन, त्याला बाळाचे काही करायला सांगणार नाही"
"मला वाद, भांडण नको आहे, कारण त्यानंतर मनावरचे ओरखडे काही जात नाहीत, नात्यात दरी येतेच, विशेषत: अशा मुद्द्यांवर भांडून, पण मी काय करू कोणी मला सांगेल का? हे सारं आज तुमच्याशी बोलते आहे कारण तुम्ही दोघं त्याच्याशी काही बोलू शकाल तर, अजून हे सारे मी माझ्या आई-बाबांपर्यंत नेले नव्हते हा विचार करून की तुम्ही बोलून काही सुरळीत होणार असेल तर घरच्या गोष्टी बाहेर नकोत जायला."
"मी घालते यांच्या कानावर, बघतो, एकदा बोलून प्रयत्न्न करतो, वाटत नाही काही विशेष करू शकू असे, आदित्यने एखादी गोष्ट एकदा ठरवली की मग त्यापासून तो मागे फिरत नाही, अगदी लहानपणापासून. आत्तापर्यंत आम्हाला त्याचे याबद्दल कौतुक होते…… कदाचित आज त्यापायी निराश होण्याची वेळ येणार, तू खचून जाऊ नकोस, थोडा धीर धर"
"हम्म्म … ठीक आहे"

काही दिवसांनी सुलक्षणा बाई आणि विश्वासराव आदित्यशी बोलले, अर्थात ज्यातून काहीच साधले नाही. आदित्य त्याच्या मुल नको या निर्णयावर ठाम होता. हा आपलाच मुलगा आहे का जो इतर वेळी सरळ, सालस होता, पण याच एका महत्त्वाच्या विषयावर तो इतका आडमुठा कसा? आणि हे त्याचे विचार पूर्वी कधीच कसे लक्षात आले नाहीत या विचारांनी दोघं हैराण झाले.

ते दोघं त्याच्याशी बोलले ते प्राजक्ता समोरच, त्यामुळे वेगळे तिला काही सांगावे लागले नाहीच. पण ती अजून कोलमडली, हतबल झाली. काही दिवस मध्ये असेच जात राहिले. घरातला आनंद नाहीसा झाला, चार मुकी माणसे राहत आहेत असे घर होऊन  गेले. प्राजक्ता आदित्यमध्ये कोणताच संवाद उरला नाही.

आज त्यातच आलेली श्वेता आणि तिच्या मुलीमुळे घर थोडसं  हसलं. पण काही काळापुरतेच. नंतर एक प्रचंड उदासी घरात भरून राहिली. ज्यात जगणे दिवसेंदिवस प्राजक्तासाठी मुश्कील होत होते.आता पर्यंत हे सारे तिच्या आई-बाबांना हे कळले होते.  त्यांचाही  सूर "थोडे दिवस जाऊ देत, होईल सारे ठीक" असा होता, परंतु प्राजक्ता जे काही ठरवेल त्यात ते तिच्या पाठीशी असतील हे नक्की, हे तिला माहित होते.

असेच दोन महिने अजून गेले. गोष्टी तशाच होत्या, ज्यात बदलाची काही चिन्हे दिसत नव्हती. प्राजक्ताचे डोके विचार करून फुटायची वेळ आली होती. शेवटी एक दिवस तिने सकाळी चहा घेत असताना आदित्यला आणि त्याच्या बाबांना ते कधी येणार आहेत हे विचारून घेतले. रात्रीच्या जेवणानंतर मला तुम्हा तिघांशी बोलायचे आहे हे सांगितले. 

गेले काही दिवस विचारात एक सुसूत्रता आणायचा ती प्रयत्न्न करत होती. सोपे नव्हते या निर्णयापर्यंत येणे.  दहा वाजता चौघे तिच्या सासू सासऱ्यांच्या खोलीत जमले. तिने सुरुवात केली.
"आई - बाबा आणि आदित्य, गेले काही दिवस आपल्या घरात आपल्यात संवाद नाही, हसते खेळते घर कसं उदास होऊन गेलंय, मी गेले दोन महिने साऱ्याचा खूप विचार करतीये, की मी आता काय करायला हवे? आदित्यचा जो निर्णय आहे त्यावर माझी प्रतिक्रिया काय आणि कशी असायला हवीये? मी त्याने निर्णय बदलण्याची वाट पहायला हवी कि हा त्याचा अंतिम निर्णय आहे हे मान्य करून तो स्विकारायला हवा?"
"काही ठरवणे सोपे नक्कीच नव्हते माझ्यासाठी! पण अशी इतका मोठा निर्णय तो एकटा घेत असताना त्याच्या हो ला हो म्हणणे मला शक्य नाही."
" आदित्य, तुझा हा अंतिम निर्णय आहे हे समजून मी पुढचं बोलतीये."
आदित्यचा चेहरा निर्विकार, आईबाबांचा व्याकूळ.

"आयुष्यातील सर्वात  फुलपंखी दिवस मी आदित्य सोबत घालवले आहेत, या घरात घालवले आहेत, फुलपंखी असल्यामुळेच कदाचित त्यांचे आयुष्यही फार थोडे असावे. अगदी चारचौघींची असावीत अशी माझी स्वप्ने होती, प्रेमळ माणसे, कर्तुत्ववान नवरा, एखादे मुल आणि सुखी आयुष्य. अनेक गोष्टींमध्ये मला अपेक्षेपेक्षा खूप अधिक काही मिळाले."

"आता लग्नाला जवळपास तीन वर्षे होत येत आहेत तेंव्हा आदित्यच्या "मूल नको" या एका निर्णयामुळे मात्र आज सारी स्वप्ने उध्वस्त होणार आहेत, मला ती सारी अर्ध्यावरच सोडून जावे लागणार आहे. आता हे सारे सोडून मी वेगळ्या वाटेवर चालू इच्छिते. अनेकदा मनात आले होते, की आदित्यावरील प्रेमापोटी त्याचा हा निर्णय मी मान्य करून पूर्वीसारखे आयुष्य जगले तर त्याच्या आणि तुम्हा दोघांच्या दृष्टीने ते ठीक राहील. पण मला हे शक्य होणार नाहीये, मला माफ करा."

" मी या घरात आणि आदित्य सोबत न राहण्याचे ठरवले आहे. आयुष्यातील सर्वात मोठ्या निर्णयावर मन मारून मी इथे नाही राहू शकणार. माझा आत्मसन्मान गमावला असे वाटत राहील मला सतत. कारण मला मुल हवे होते. ते इथे न राहून मला मिळणार आहे का? असाही प्रश्न येईल तर नाही मिळणार पण दुसरा मार्ग तर निघू शकेल."
"आई -बाबा, आदित्य मी हे घर सोडून जायचे ठरवले आहे. आदित्य आणि माझे नाते सोडून बाकी सर्व नात्यात माझ्याकडून काही बदल होणार नाहीत. मला घटस्फोटही नको आहे, कारण दुसरे लग्न वगैरे गोष्टी माझ्या डोक्यात नाहीत. आपला आनंद दुसऱ्याच्या इच्छेने मिळावा हेच मला आता नकोय. पण उद्या आदित्यला तो हवा असल्यास तो या बंधनातून कधीही  मोकळा होऊ  शकतो. मी त्यात मध्ये येणार नाही. मला त्याच्याकडून किंवा या घरातून काही म्हणजे काही नकोय. मी माझ्या आई बाबांकडेही न जाण्याचे ठरवले आहे. वाईट त्यानाही वाटेल आपल्या मुलीचे असे आयुष्य पाहून तेंव्हा किमान त्यांच्या समोर राहून मी त्यात भर घालू नये असे मला वाटते."

"आदित्य, इतर कोणतेही कारण असते, वैद्यकीयदृष्ट्या शक्य नसते तर मी ते स्विकारले असते. किमान योग्य चर्चेने आपण कोणतातरी निर्णय घेतला असता तर कदाचित मी याप्रत आले नसते. मी आता तुला दोष देण्यात काहीच अर्थ नाही कारण मनाने मी आपल्या नात्यातून तेंव्हाच मोकळी झाले ज्याक्षणी तू तुझा निर्णय ऐकवलास आणि यावर अजून चर्चा नाही असे सांगितलेस. माझी मते तुझ्यावर लादायची नाहीत, तू ते केलेस म्हणून मी ही तेच करण्याने आपण सुखी नव्हतो होणार. म्हणजे आज माझ्या या निर्णयाने आपण सुखी होणार ह्याची ही काही खात्री नाहीये. परंतु मनाविरुद्ध तुझा इतका मोठा निर्णय स्वीकारणे मला शक्य नाहीये आणि मग मी इथे असे राहण्यात ही कोणाचेच भले नाहीये. बाकी इतर कोणतेही छोटे मोठे मतभेद मी स्वीकारले असते पण हा नक्कीच नाही"

" मी या घराबाहेर पडून नोकरी करून एकटीने जगायचे ठरवले आहे. जिथे जगणे माझ्या मनासारखे असेल, माझा आत्मसन्मान जपला जाईल. नशिबाने स्वत:च्या पायावर पुन्हा उभी राहू शकण्याइतकी मी सक्षम आहे, थोडा त्रास नक्कीच होईल, सोपे नसेल कोणाच्याही आधाराशिवाय आयुष्य पुन्हा घडवणे याची कल्पना आहे मला. जर अगदी तशीच वेळ आली तर तुम्ही दोन्ही आई-बाबा आधाराचा हात पुढे कराल याची खात्री आहे. तेच माझे बळ असेल. पण मला प्रयत्त्न करू दे."

"आदित्य, इतका सालस, समजूतदार, एक कोणत्याही स्त्रीस हेवा वाटेल असा नवरा, तू या एकाच गोष्टीवर का असा अडून रहावास हे कोडे माझ्याच्याने सुटत नाही आहे, विचार करून मी थकले की तुझे कोणते रूप खरे, आधीचे प्रेमळ नवऱ्याचे की या तुझ्या या निर्णयानंतर बदलून गेलेल्या नवऱ्याचे, इतका कोरडा झालास तू मला तुझा हा निर्णय ऐकवल्यानंतर. आपला संवाद पूर्ण विझला. आपण एक सुखी संसार गेली अडीच वर्ष केला होता यावर विश्वास बसणार नाही इतका तू बदललास, ज्याने माझे बदलून जाणे हे ओघानेच. आजही  यावर अजून चर्चा करत, बदलण्याची संधी देणे यावर माझा विश्वास नाही. जे झाले ते झाले, तू तुझ्यासारखा वागणार असलास तर ती संधी मलाही मिळायला हवी, मलाही माझ्या मनासारखे जगता यायला हवे. इथून बाहेर पडून कदाचित लग्न न करता स्वत:चे एक मुल माझे  असणार नाही, कारण मला ते पटणार नाही. पण एखादे मुल मी दत्तक नक्कीच  घेऊ  शकेन. आई म्हणून एका जीवाचे आयुष्य घडवण्याची, त्यास आकार देण्याची क्षमता माझ्यात नक्कीच आहे. त्यातून मिळणारा आनंद नक्कीच हवा आहे मला, त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी आहे माझी. दोघांनी मिळून ते करणे जास्त आवडले असते मला पण तुला ते नको आहे म्हणून मी त्यावर पाणी सोडावे असे  नाही. पण हे सारे मी बोलतीये म्हणजे तू विचार बदलावास म्हणून नव्हे. हे फक्त मनातले एकदा बोलून मोकळे होणे आहे."

"आदित्य, तुझ्या माझ्या नात्यास मात्र इथेच पूर्णविराम देऊया, स्वल्पविराम देत नंतर पुढे चालू अशी संधी निर्माण व्हायला मला नको आहे. ते मला पटणार नाही, जे चांगले जगलो ते जपेन मी, जे झाले ते विसरणे मला शक्य नाही, कटुता नाही, दोष देत नाही तुला, जे नशिबात होते ते घडले हे खरेच. कागदोपत्री नाते आहे त्याचे काय करायचे हा निर्णयही सर्वस्वी तुझा. तसेही वेगळे होणे हवे असेल तर ते घडण्यास ही माझी ना नाही. फक्त शक्य असेल तर कोणते दोषारोप न करता सामोपचाराने घडले तर मला बरे वाटेल. तुलाही त्याची गरज वाटत नसेल तरी पुढे एक खात्री बाळग, घटस्फोट घेतला नाही म्हणून मी किंवा माझे दत्तक मुल हे नाव, हे घर दार किंवा तुझ्या कोणत्याही संपत्तीवर कोणताही अधिकार सांगणार नाही."

"मला ठाऊक आहे या माझ्या निर्णयाचा आदित्यसह तुम्हा सर्वाना थोडा त्रास होईल. पण कदाचित हे होतंय हे सारे योग्य वेळेत होतंय. प्रत्येकास आपल्या मनासारखे जगण्याची संधी मिळायला हवी. अजून काही काळाने ते न जाणो शक्य झाले असते नसते. आत्ताच जीव इतका लागला होता कि काही ठरवणे अवघड होते. आमच्या दोघांमुळे तुम्हां दोघांना या वयात ही शिक्षा नको मिळायला हे हि मान्य आहे मला, पण परिस्थितीपुढे हतबल आहोत आपण सारे. तेंव्हा  नंतर कुतरओढ होण्यापेक्षा हे बरे असा म्हणून सर्वचजण पुढे जाऊया"

"आई मी माझ्या खोलीतल्या कपाटात साऱ्या महागड्या साड्या, तुम्हां सर्वांकडून मिळालेल्या उंची भेटवस्तू, ठेवल्या आहेत. या साऱ्याची आता मला गरज नाही. जे सर्वात मौल्यवान होतं ते नाते मागे सोडून जाताना या गोष्टीत जीव का अडकावा? जे माझे दागिने तुम्ही दिलेले होते ते तुम्हाला परत करत आहे, जे आई बाबांनी घातले होते लग्नात, ते त्यांना तसेच परत करणार आहे. स्त्रीधन म्हणून हे तुम्ही ठेऊन घे असे म्हणाल पण तसे नको. प्रयत्न्न करेन मी सारी कटुता विसरत सुरुवातीच्या दोन वर्षातील आनंदक्षण फक्त सोबत घेऊन जाण्याचा. माझ्या नोकरीचे काम झाले आहे. आता राहायची सोय पुढच्या काही दिवसात बघेन. उद्या सकाळी मी इथून जाईन. घराची सोय होईपर्यंत एखादा आठवडा आई - बाबांकडे राहीन. एकदा माझ्या घरी गेले कि पत्ता कळवेन, तुम्ही कधीही हक्काने येऊ शकाल आणि याल अशी खात्री बाळगते. नमस्कार करते"

Tuesday, March 10, 2015

संधिप्रकाशात अजून जो सोने....... तो माझी लोचने मिटो यावी....

एक  आजोबा… वय सत्तरीच्या आसपास, काही वर्ष गादीला खिळून, नंतर नंतर  तर कोणालाच न ओळखू शकणारे. आजी आजोबा दोघंही व्यवसायाने वैद्यकीय  क्षेत्राशी संबंधित. अनेक वर्ष मदतीला एखादी नर्स ठेवून आजी  देखभाल करत. म्हणजे घरात मुलगा, सून, नाती असा परिवार होता . ते लोकही आपल्या परीने काळजी घेत होतेच. सर्वांना वाटत असणारी शक्यता अशी की ते आजोबा आधी जातील, कारण आजी  तशा ठणठणीत होत्या. मग आजींच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण होऊ  शकेल कारण इतकं त्यांनी आजोबांच्या देखरेखीत गुंतवून घेतलं होतं  स्वतःला.

पण झाले उलटेच …… एक दिवस आजी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक गेल्या. आजोबा काही कळण्याच्या मनस्थितीत नव्हतेच, त्यांना काही सांगण्याचाही प्रश्न नव्हताच. पण सेवा करणारी प्रेमाची व्यक्ती आसपास नाहीये हे त्या जीवास कळत असावे का? स्पर्शाच्या, अस्तित्त्वाच्या जाणिवा टिकून होत्या का? मनाचे मनाशी असे घट्ट नाते तसेच टिकून असेल? कारण आजी गेल्यावर पाचव्या दिवशी आजोबाही गेले. मेंदूचा कल याला योगायोग मानण्याकडे झुकू शकतो. म्हणजे ते नक्कीच चुकीचे नाही कारण  तसं असू शकते. पण मग वर व्यक्त केलेली शक्यताही असू शकतेच की!

अजून एक आजी आजोबा  एकमेकांशी कधीही न पटणारे. आजी कर्तृत्त्ववान. आजोबा त्यामानाने कमी. आजी मोठ्या करारी, थोड्या हेकट सुद्धा म्हणाव्या अशा. आजोबा तितके नाहीत. एका शाळेची उभारणी करून, ती नावारूपास आणून, आपण थकल्या नंतर एका तितक्याच मोठ्या आणि तत्त्वनिष्ठ  शैक्षणिक संस्थेला ती सुपूर्त करण्याचे मोठे काम या दोघांनी मिळून केलेले.  दोघांनीही वयाची ऐंशी पार केलेली. पण आजी फारच थकल्या, दोघांनाही काही आजार नाही. म्हातारपण हेच आजारपण. पण आजी पार आडव्याच झालेल्या, त्यामानाने आजोबा हिंडून फिरून, घरात २/३ नोकर, स्वत: वयाची साठी पार केलेली त्यांची लेक तिच्या लेक सुनेसह घरात दिमतीला. आजींनी अशा अवस्थेतही सगळ्यांची आपल्या हट्टी हेकेखोर स्वभावाने त्रेधा तिरपीट केलेली. आपल्या तापट स्वभावाने सर्वाना नको नको करून सोडलेले.

सगळ्यांना वाटत असे आजी गेल्या कि आजोबा ज्यांची तब्येत तितकीशी वाईट नाही, विशेष कोणता आजार नाही ते थोडा मोकळा श्वास घेऊ शकतील. मोकळं आयुष्य काही काळ जगतील. अपेक्षेनुसार आजी गेल्या. पण आजोबांनी तेंव्हा ही त्यांची साथ सोडायची नाही असे ठरवले असावे कारण मोजून तिसऱ्या दिवशी आजोबांनी झोपेतच राम म्हंटले.

या दुसऱ्या घटनेने मात्र विचारांची आवर्तने निर्माण केली. एकापरीने त्या आजींच्या सोबत राहणे हा कोणालाही जाच वाटला असता, मग त्यातून सुटका मिळण्याचा आनंद ही खऱ्या अर्थाने मिळू नये? पण तसेही नसेल कदाचित. त्या साऱ्याची इतकी सवय असेल की त्याशिवाय आयुष्यात एक भली मोठी पोकळीच निर्माण झाली असेल की तिचा सामना करणे अशक्य झाले असेल. किंवा कोणता असा एकमेकांना बांधून ठेवणारा घट्ट धागा असतो जो वर वर पाहता कोणालाच दिसत नाही कोणालाही तो जाणवत नाही कदाचित त्या दोघांना ही तो जाणवलेला नसावा. वरकरणी मतभेद इतके तीव्र असले तरी, आत एकमेकांना घट्ट बांधून ठेवणारा ………

हिंदी चित्रपटात घासून गुळगुळीत झालेले "मै तुम्हारे बिना जिंदा नही रह सकता/ती" असे संवाद यांच्यात कधी घडले नसतील. असा विचारसुद्धा कधी दोघांपैकी कोणाच्या मनात आला नसेल,  एकंदरीत त्यांची असलेली घडण आणि विचारांची बैठक लक्षात घेता, हा अर्थात अंदाजच………… कदाचित याच्या अगदी विरुद्ध असू शकेल की मनात कुठेतरी हि स्पंदने असतील, ते विचारतरंग कधी बाहेर उमटले नसतीलही. पण मनाला मन उमजले असावे. तशीही मनाची ताकद खूप मोठी असते.

अशा साऱ्या विचारांतूनच बर्फी चित्रपटाचा शेवट योग्य वाटतो. त्याचा मृत्यू झालाय, याची कदाचित जाणीव सुद्धा नसलेली ती त्याच्या जवळ जाते, थोडा त्यास सरकवून स्वत:साठी जागा करत त्या पलंगावर  आडवी होते, नेहमीप्रमाणे त्याच्या करंगळीत आपली करंगळी अडकवते आणि कायमसाठी त्याच्यासारखीच निद्राधीन होते.  मृत्यूचे हे अनपेक्षित रूप मात्र विचारात पडणारे. अशा जोडीदारापाठी जगूच न शकणाऱ्या व्यक्तींच्या रूपात घडणारे.  म्हणजे माहित असतं कि  हे असे घडणे आपल्या हाती नाही, जोडीदाराच्या नंतर मागे उरण्याची कल्पना कितीही त्रासदायक वाटली, नकोशी वाटली, कितीही इच्छा व्यक्त केली की तुझ्याशिवाय हे जगणे नको तरीही…अशी अनेक शक्य-अशक्यते वर आधारित असल्यामुळेच असे मृत्यूचे येणे ही कल्पना तशी मोहात पडणारी!

पण दुसऱ्या बाजूस असंख्य जोडप्यांमधील कोणी तरी एक मागे राहतो, गेलेल्याच्या आठवणीत जगतो, आपली कर्तव्ये पुरी करतो, जगणे सुसह्य व्हावे यासाठी शक्य ते सारे प्रयत्त्न करतो. पण जाणाऱ्या व्यक्तीसोबत आपला काही हिस्सा गेलेला असतो. दोघांमधील तो बंध गेलेला असतो. असंख्य गोष्टी दोघांनी एकत्र बोललेल्या, पाहिलेल्या, जाणीवेत उमटलेल्या ज्या फक्त त्या दोघांमधील असतात त्या आता एकाच्या मनाच्या कप्य्याचा हिस्सा बनून जातात आणि त्याच्यासवे त्याही जातात. पण म्हणजेच यातली कोणतीच गोष्ट आपल्या हाती नाही. काही म्हणता काही आपला त्यावर कंट्रोल नाही.असं आपल्यातून काहीतरी जाणे, नाहीसे होणे हा देखील मृत्यूच ना? 

मन:पटलावर कधी कधी असंख्य तरंग उमटतात, आतून इतकं काही बाहेर येऊ पाहते की त्या  सारयास सावरताना, समेटताना माझी दमछाक होते. तरीही अनेकदा काही हाती  लागतंच नाही. विचारांचा वेग इतका जबरदस्त असतो आणि एकातून दुसऱ्यात जाण्याची गती………… की काही करू शकत नाही मी. हातातून वाळू सुटत राहावी तसे….  कशालाच धरून ठेवता येत नाही. एक येतो जातो, पाठोपाठ दुसरा…. तिसरा …… हे चालूच एकाच्या अस्तित्त्वाचा अंत…. दुसऱ्याच्या …. तिसऱ्याच्या … हे नाट्य लागोपाठ माझ्याच मन:पटलावर घडणारे… असे जोडी जोडीचे मृत्यू अनुभवणारी…. हतबल, निराश…. माझाच काही हिस्सा हरवताना पाहणारी अन तरीही काही
करू न  शकणारी मी .
अनेकदा एखादा विचार, एखादा धागा जोडीदार गेलेल्याच्या मागे उरावा तसा एकटाच मनात उरणारा, अधून मधून त्याच्या अस्तित्वाची जाणिव करून देणारा, जणू त्याचे ते कर्तव्य असावे असा. त्याला मनातच राहू देणारी , पण त्यास घडविण्यास, फुलविण्यास काहीच न करणारी मी. नकळत माझ्या मनात एकटेपणाचे, खुरटलेले जगणे नशिबी घेऊन मग मृत्यू पावणारा तो.

असे दिवसागणिक मनात विचारांच्या मृत्यूचे थैमान कधी कधी चालू असताही, खऱ्या मृत्युच्या विचारांना सतत दूर लोटणारी किंवा फक्त स्वत:चाच एकतर्फी विचार करत जोडीदाराच्या मनाचे काय होत असेल हा विचार न करता,
नको तुळशीचे पान, नको गंगाजल
हात तुझा हाती असता व्हावा संधिकाल
असे म्हणणारी मी.

अनेक रूपात भेटणारा तो ,
आणि तरीही त्याच्या बद्दलचे
कुतूहल कधीही न शमणारे .
कधी चोर पावलाने येऊन
मागून कवेत घेणारा
कधी येतोय येतोय म्हणत
चकवा देत राहणारा
कधी परतीचे तिकीट
न मागताच हाती ठेवणारा
दोन बाजूस दोन रस्ते
खुणावत असतानाच
डेढ एंडचा फलक हाती
घेऊन सामोरा येणारा
चिंतेतून दर्शन घडवणारा
कधी चितेवरही विश्वास
न बसू देणारा
कधी शांत सात्त्विकतेने
कधी थैमान घालत
मनातल्या विचारांचा
फुटणाऱ्या लाटेचा
अंधार दाटून येताना
हातातून निसटून
जाणाऱ्या वाळूचा
संपणाऱ्या नात्यांचा, बंधांचा
मृत्यू ……………

Sunday, December 28, 2014

धर्म … तुम्ही, आम्ही.......................



एक लहानपणी वाचलेली गोष्ट होती, आठवतंय त्याप्रमाणे संत एकनाथांची. ते नदीवर स्नान करून येत असता एक निंदक त्यांच्या अंगावर थुंकतो, ते परत नदीवर जाऊन स्नान करून येतात, परत परत तेच घडते, कोणतीही वाईट प्रतिक्रिया न देत ते पुन्हा पुन्हा स्नान करून येत राहतात, शेवटी तो माणूस खजील होतो, क्षमा मागतो …. वगैरे वगैरे 
ते "संत" एकनाथ होते या विचाराने हि गोष्ट अशीच घडली असेल यावर सहज विश्वास बसतो. आज समाजात अनेक तथाकथित संत, महाराज, बाबा, बुवा, बापू आहेत, त्यांच्यापैकी एखाद्याच्या बाबतीत असे घडले तर ते असेच वागतील असे वाटते? 

आजही ज्ञानेश्वरी, गाथा,दासबोध या ग्रंथांचे महत्त्व शेकडो वर्षानंतरही असाधारण असे आहे,असे कोणते संत साहित्य आज निर्माण होते आहे, ज्याने आजच्या समाजाचे प्रबोधन तर होतेच आहे  पण अजून सात आठशे वर्षानंतरही त्यांचे महत्त्व टिकून राहील? समाज प्रबोधनाची गरज काय फक्त त्याच काळात होती? आज नाहीये ? वाढलेल्या तणावांच्या, जागतिकीकरणाच्या. नाते संबंधांच्या ताणातून, वाढीव महत्त्वाकांक्षा यासाऱ्यामुळे ती कितीतरी पटीने जास्त आहे. मग त्यातून बाहेर पडण्यास तुम्हाला कोण मदत करते? कोणते संत, महात्त्मे, बापू बुवा? कि तुम्ही तुमचेच मार्ग शोधता, स्ट्रेस किलर्स  शोधता? कि या जीवनालाच शरण जाता? आसपास अनेक समाजोपयोगी चांगली कामे करणारी माणसे आसपास आढळतील. सर्वचजण धर्माचे लेबल लावून आपल्या समोर येतात. त्यांच्या कामापेक्षा त्यांचा धर्म श्रेष्ठ ठरतो? किंवा एखाद्या विशिष्ठ धर्माचे असण्याने अशी महान कार्ये त्यांच्या हातून घडतात? 

शिवाजी महाराजांनी पाठवलेला ऐवज गरज असतानाही नाकारणाऱ्या संत तुकारामांची गोष्ट अभिमानाने सांगताना, कोट्यावधींची माया गोळा करणाऱ्या बापू, महाराज यांना तोच नियम आपण का लावत नाही? साधे जगण्याची मूलतत्त्वेही अपवादानेच पाळणारी मंडळी आजच्या समाजाचे संत म्हणून कसे प्रतिनिधित्त्व करतात? अनेक बेकायदेशीर कृत्ये करणारी, व्यभिचार करणारी  हि तथाकथित संत मंडळी जर आपल्या समाजात आहेत, राजरोसपणे आपले धंदे चालू ठेऊन आहेत, अनेक बाबा अतिशय चीड आणणारी बाष्कळ बडबड आणि कृत्ये करताना आपण पाहतो तर मग तरीही आपल्या समाजाचे चित्रीकरण कसे कोणी करावे आणि आपल्या समोर ठेवावे अशी आपली कल्पना आहे? की सत्याला आपण कधी खुल्या मनाने सामोरे जाणारच नाही? अशी तमाम मंडळी कोणा  एका धर्माचे प्रतिनिधित्व करणारे नसतातच, तसे सर्वच धर्मात या प्रवृत्ती बोकाळलेल्या आहेतच. 

रेहमान एक से एक उत्तम रचना घडवतो तेंव्हा त्याच्या धर्माचे आहे म्हणून "कून फाया, किंवा ख्वाजा मेरे ख्वाजा" अतिशय उत्तम बनवतो आणि त्याच्या धर्माचे, देवाचे नसलेले "मनमोहना" हे मात्र  त्याच्या हातून उत्तम रचना घडत नाही असे घडते का? मग जर नक्की धर्म कुठे आड येतो? एखाद्या धर्मावर चित्रपटातून टीका केली म्हणून एखादा दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीवर आपण टीका करत असू तर त्याच्या धर्माचे नसतानाही मनमोहना सारखे उत्तम गाणे बनवणाऱ्या संगीतकाराचे विशेष कौतुक जाहीरपणे आपण करतो का? 

लगेच कोणीतरी बाह्या सरसावून असे म्हणायची गरज नाही की "फक्त एकाच धर्माला का टार्गेट केलं गेलंय?" सोपं उत्तर म्हणजे आपण बहुसंख्यांक असणाऱ्या आपल्या देशात, आपलेच देव, संत, महात्त्मे जास्त संख्येने असणे आणि मग त्यावर टीका होणे हे स्वाभाविकच. दुसऱ्या एखाद्या दुसऱ्या धर्मबहुल देशात, प्रांतात त्यावर कोणी टीका केली असती, असे बोचरे चिमटे चित्रपटाच्या माध्यमातून काढले असते. आता तसं केल्यानंतर काय परिणाम झाले असते हे कोणत्या देशात, कोणत्या धर्मावर टीका होतीये, तो धर्म, तो समाज किती सहिष्णू आहे यावर ठरेल.म्हणजे कदाचित सोशल मिडीयावर चर्चे इतके त्या विरोधाचे स्वरूप मर्यादित राहिले हि नसते, अगदी तडीपार होण्याची वेळ तो तसा चित्रपट बनवणाऱ्यावर येऊ शकते, चित्रपटावर बंदी येऊ शकते, अगदी त्या कलाकार, निर्मात्याच्या हत्येचा फतवाही निघू शकतो. म्हणूनच मला हे हि मान्य आहे कि हे सारे इथे घडू शकणार नाही, हा धर्म इतका सहिष्णू आहे कि त्या धर्मात राहूनच मी त्यावर सरेआम टीका करू शकते. पण मग माझ्यावर अशी टीका करण्याची वेळ येतेच का? 

धर्म, देव, जात, पोटजात या साऱ्या गोष्टी ना माणसाची मुलभूत गरज आहेत. त्याच्या अस्तित्त्वाशी निगडीत अशा. या कि त्या धर्माची आहे मी? धर्माच्या कोणत्या जातीचा, पोटजातीचा  भाग आहे … या अनेक गोष्टी व्यक्तीचे आजचे अस्तित्त्व, समाज, विचारप्रक्रिया ह्या गोष्टींच्या मुळाशी काही प्रमाणात असतात. देव, धर्म, धार्मिक आचार विचार या साऱ्या गोष्टी खरंतर किती वैयक्तिक असाव्यात…. कोणता धर्माचे आहात, त्याच्या मुल्यांवर किती विश्वास ठेवता, आस्तिक आहात कि नास्तिक? नास्तिक कसे खरे खुरे कि सोयीने? आस्तिक असाल तर कशा प्रकारे, मुर्तीस्वरूप देवावर श्रद्धा असणारे,  कर्मकांड मानणारे कि एका अनादी अनंत अशा विश्व चालवणाऱ्या शक्तीवर विश्वास ठेवणारे, हर इच्छेसाठी देवाला माणसासारखे समजून देवाण घेवाणीचे व्यवहार करू पाहणारे, की प्रत्येक चांगली, योग्य गोष्ट माझ्या हातून घडण्यासाठी बळ दे, चांगल्या दिवसात माझे पाय जमिनीवर ठेव, वाईट दिवसांना सामोरे जाण्यास मनाला शक्ती मागणारे. अशा असंख्य छटा या संकल्पना सोबत घेऊन येतात. म्हणूनच या संकल्पना प्रत्येक व्यक्ती नुसार वेगळ्या असताना त्या सर्वात जास्त वैयक्तिक होऊन जात नाहीत का? 

पण जर धर्म हि माणसाची इतकी मुलभूत आणि वैयक्तिक गरज असेल तर मग मला त्यास घराबाहेर का न्यावे लागावे आणि प्रदर्शन करावे असे वाटावे? का मला कोणी घराबाहेर, शाळेत, महाविद्यालयात, नोकरीच्या ठिकाणी माझा धर्म , माझी जात विचारावी? एक माणूस असणे आणि जी गोष्ट करायची आहे ती करण्यासाठी सक्षम असणे इतकेच बास नाही का? म्हणजे शाळेत जायचय तर योग्य वय, शिक्षण घेण्यासाठी सक्षमता पुरे झाल्या कि या गोष्टी, नोकरी करायची आहे तर गरज आहे ते शिक्षण आणि तो अनुभव माझ्या गाठीला असणं पुरेसे नसावे का? 

या अमुक एक धर्माचे आहोत आणि त्यातीलही अमुक एका देवाला पुजतो ते रस्त्यावर येऊन कोणाला का सांगावे वाटते? म्हणजे का रस्त्यावर कोणत्या देव धर्माशी संबधित कृत्ये रस्त्यावर उतरून प्रदर्शन करत करावीत? ना ताबूत निघावेत, ना गणपतींना रस्त्यावरून वाजत गाजत न्यावे, ना कान्हा ने रस्ते अडवून दही हंडी फोडावी. घराच्या, समाज केंद्रांच्या आत जे काय धर्मिकपण जपायचे असेल ते जपावे ना? 

याच युगाचा एक महान क्रिकेट पटू माझ्या मनातून तेंव्हा उतरला जेंव्हा त्याने एका आपण एका बाबांचे भक्त आहोत हे समाजापुढे येऊ दिले. मला नाही वाटत प्रसार माध्यमांपुढे हि मंडळी इतकी हतबल असतात कि त्यांना या गोष्टी रोखता येत नाहीत. सारी कारकीर्द तोलून मापून वागण्या बोलण्या बद्दल प्रसिद्ध हा माणूस. त्याची श्रद्धा त्याने कोठे कशी ठेवावी हे वैयक्तिक आहे, होते. ते त्याने तसेच ठेवले असते तर जास्त चांगले झाले असते. 

माझ्या या पूर्वीच्या नोकरी मध्ये माझा एक सहकारी होता, जो दुसऱ्या धर्माचा, दुसऱ्या शहरात काम करणारा होता. सर्वात जास्त काळ मी त्याच्यासोबत काम केलं  होते  आणि त्या कालावधीत कधीही आमचे भिन्न धर्म आमच्या कामाच्या आड आले नाहीत, ते कधीही आमच्या चर्चेचा विषय नव्हते.  काम करतानाची आमच्यातील chemistry हि सर्वात चांगली आणि महत्त्वाची गोष्ट होती. माझ्या तिथल्या शेवटच्या दिवशी मला निघायला एक अर्धा तास असताना, त्याचा फोन येणे जे मी स्वाभाविकपणे अपेक्षिले होते आणि त्याप्रमाणे तसा त्याने केल्यावर, अपेक्षित होते ते सारे काही (कामात एकेमकांना किती पूरक होतो, कशी उणीव भासेल, पुढील वाटचालीसाठी एकमेकांना शुभेच्छा इ.)आम्ही दोघे बोलल्यानंतर अचानक त्याने, " अनघा, आयुष्यात एकदा तरी XXX (त्याच्या धर्माचा पवित्र ग्रंथ) हे वाच, तुला नवीन दृष्टी मिळेल जगण्याकडे पाहण्याची" वगैरे सांगितले. माझ्या सहिष्णू स्वभावाने मी फार शार्प प्रतिक्रिया न देता ते संभाषण  थांबवू शकले, आजही आम्ही अधून मधून बोलतो, दोन चांगल्या व्यक्ती म्हणून, पण धर्माचे असे प्रदर्शन पुन्हा एकदा रुचले नाही ते नाहीच.

अजून एक टीम होती माझी ज्यात दोन जण इतर पण एकाच धर्माचे  होते. आणि बाकी सारी टीम माझ्यासारखी. त्यामुळे वेगवेगळे, सण, पूजा त्याचा प्रसाद ऑफिसला नेणे हे ओघानेच. त्यातला एक जण असा प्रसाद म्हणून नेलेला कोणताही पदार्थ खात नसे, आणि दुसरा मात्र आठवणीने तो ऑफिसला आण असे सांगत असे. एक दिवस बोलताना मी याला विचारले, त्याला माझ्या देवाचा प्रसाद चालत नाही, तुला कसा चालतो रे? त्याचा उत्तर होते, "तुझ्यासाठी तो प्रसाद आहे, माझ्यासाठी तो फक्त शिरा किंवा पेढे बर्फी आहे, ते मला मनापासून आवडते आणि मी ते खातो. मी आणतो तो केक तूही असंच आवडतो म्हणून खातेस ना, यात कुठे आला आपला देव आणि धर्म?"  या उत्तरावर मी एक सेकंद चमकले, पण मान्य केलं हे म्हणणं मी अगदी खुल्या दिलाने. 

आज इतकं सारं मन:पटलावर येण्याचं कारण म्हणजे तो चित्रपट ज्याच्यावर एकाच धर्माला टार्गेट केलंय अशी टीका करत असंख्य लोक अधिकाधिक प्रसिद्धी देत आहेत. एखादी चुकीची गोष्ट खरतर अनेक वेळा दुर्लक्षून किंवा अनुल्लेखाने जास्त चांगली मारता येते. जो पर्यंत खरंच गरज पडत नाही तोवर कलाकृतीकडे कलाकृती म्हणून आणि रचना घडवणाऱ्याची अभिव्यक्ती म्हणून पाहावे आणि सोडून द्यावे. बघा पटलं तर …………  साऱ्या श्रद्धा, विश्वास माझ्या चार भिंतींच्या आत ठेऊन एक माणूस म्हणून समाजात राहणे मला मनापासून आवडेल, आणि तुम्हाला?

Sunday, December 14, 2014

फिर आपके नसीबमें ये बात हो ना हो …

रात्रीची वेळ. घरपरतीची वेळ अनेकांची कधीच होऊन गेलेली. आपापल्या घरट्यांत पक्षीच नव्हे, तर माणसेही जाऊन विसावलेली. आपल्या माणसांत रमलेली, हास्यविनोदात, जेवण, मनोरंजन यात रंगून गेलेली. अशावेळी आँफीसमधून बाहेर पडणारी मी. अनेकदा गाडीत एकटी. मुळात ही वेळच हळवी, कातर! मुसमुसायला, डोळ्यांच्या कडांना ओलसर व्हायला काहीही कारण यावेळी पुरतं. म्हणजे असंच घडतं असंही नाही आनंदाचे क्षणही असतात, आनंद मनात मावेना अशी अवस्थाही अशीच, किती सांगू मी सांगू माझे मलाच अशी. कधी काय घडेल काही सांगता येऊ नये अशी. दिवसभरातली एखादी कडवट घटना आठवावी, कोणाच्या आठवणीने उदास वाटावे, कधी कोणा दुसरयाच्या दु:खाने,   दुःखद प्रसंगाने आपल्यालाच घेरून टाकावे, कधी विनाकारण उदासीने मनावर राज्य करावे तर कधी अगदी काही नाही तर एखाद्या गाण्यानेच अस्वस्थ करावे.  

एखादे गाणे पुर्वी असंख्य वेळा ऐकले असावे, तेंव्हा न रूतलेला काटा नेमका आत्ता, अशावेळीच रूतावा आणि मन घायाळ होऊन जावे. यापूर्वी न जाणवलेले कंगोरे आता जाणवू लागावेत, न उमजलेले अर्थ समोर यावेत, असंख्य वेळा ऐकलेल्या त्याच त्या शब्दातून नवाच विचार गवसावा. किती वेळा ऐकलं असेल हे गाणं, अगदी नकळत्या वयापासून, शब्दांचे अर्थ कळू लागल्यापासून एकच अर्थ जो सर्व सामान्यपणे घेतला जाऊ शकतो … तोच मी ही घेतला होता आजवर याचा. बरं, हे घडतं तेंव्हा सांगणारी मीच, ऐकणारीही  मीच, आपुला संवाद हा आपणाशी. तशी ही अवस्था ही नेहमीच! कालही असंच थोडं झालं. आधी या गाण्याने दिवसभर घेरून टाकलं, उदास केलं. आपण आपल्या जीवलगांसह नसू या विचाराने डोळे भरून वाहू दिले. काही वेळा असे आपले मनाने घट्ट असणेही कमी येत नाही. थोडे स्वत:ला शांत होऊ दिल्यावर हा मनात डोकावलेला विचार…. "का, मीच कोणाला हे सांगावं"

फिर आपके नसीबमें ये बात हो ना हो …
शायद फिर इस जनममें मुलाकात हो न हो ……. 

का नाही मी हे स्वत:लाच सांगावे आणि का नाही ते मनात ठेऊन त्याप्रमाणे वागावे? कधी काही प्रसंगातून जात असताना आपण आपल्यालाच हा प्रश्न विचारतो का?  "के फिर अपने नसीबमें ये बात हो न हो …. ", तो विचार मनात ठेवुन त्या व्यक्तीचा, त्या क्षणांचा आदर करतो? काळाचे आभार मानतो? आनंददायी, आयुष्यातील महत्त्वाचे धडे देणारे, जगणे समृद्ध करणारे असे असंख्य क्षण....... का नाही त्यांच्या ऋणात राहू?

शेवटच्या काही दिवसात मी मोठी व्हायची स्वप्ने बघणारे माझे बाबा ती जेंव्हा बोलून दाखवत होते त्या क्षणी हे सत्य उमजायला हवे होते की हे सारे पुन्हा नशिबात असेल नसेल. स्वप्न बघणारे बाबा असण्याचे सुख देणाऱ्या काळाचे मी आभार मानू  शकते पण हे त्यांच्या पर्यंत ना तेंव्हा पोचवले आणि ना आता पोचवू शकते. 
यथा काष्ठम च काष्ठम …. या उक्ती नुसार अनेक व्यक्ती कारणांनी भेटतात, त्या छोट्याशा काळात तुम्हाला समृद्ध करतात आणि ते कारण संपल्यावर स्वाभाविकपणे दुरावतात देखील. तेंव्हा कधी हे मनात येतं? "बाळे, अजूनही ओठ पिळले तर दूध निघेल इतकी लहान आहेस, म्हणून तुझी काळजी वाटते" असं मला सांगत ज्यांनी माया लावली ते  मुकुंद कासट, शब्दातून व्यक्त न होत माया लावणारे मुकुंद रानडेआबा आणि सुधा आत्या, आरती काकू अशा अनेकांसोबत असताना मनात हे यायला हवे होते. जेंव्हा एकदा साक्षात समोर, मोजून काही पावलांवर जोत्स्नाबाईंच्या तोंडून "क्षण आला भाग्याचा" ऐकले होते तेंव्हा  हे मनात यायला हवे होते. तेंव्हा त्या त्या व्यक्तींपर्यंत त्यांनी काय दिले मला हे मी पोचवायला हवं होतं. असे एक न दोन अनेक क्षण, अनेक व्यक्ती, अनेक घटना. 

अनेकदा अनेक भावना, परिस्थिती कायम राहील ही आपली समजूत इतकी ठाम असते की त्यापलीकडे आपण काही पाहायला तयारच नसतो. मग आपण आपल्या माणसांना, इतर साथ सोबत असणाऱ्यांना, परिस्थितीला, काळाला इतकं गृहीत धरतो की मग आपल्याला हे विचार शिवतच नाहीत. असे अनेक मैत्रीचे धागे, असे अनेक मायेचे हात, मदतीचे हात, पाठीवरची कौतुकाची थाप…. प्रत्येक क्षणी मनात कुठेतरी डोकावायला हवा माझ्या हा विचार …न जाणो हे सारे पुन्हा नशिबात असेल नसेल. 
आता मागे वळून पाहताना मला तेंव्हा हा विचार मनात येऊन तो मनात ठेऊन त्या त्या क्षणांना दिलेले प्रतिसाद अधिक समर्पक ठरले असते. आता अर्ध्याहून अधिक डाव संपला असताना का होईना हे मनास उमजलय हे काय कमी आहे. कारण "हमको मिली है आज ये घड़िया नसीबसे" हे ही तितकंच खरं!

Saturday, December 6, 2014

अंतर .....


एखादी कल्पना मनात यावी आणि शब्दांनी तिचा पाठलाग करत एका पाठोपाठ हात धरून यावे आणि कवितेचा जन्म व्हावा, हे भाग्य कधीतरीच लाभणारे. त्यामुळे जशी सुचत गेली तशी च्या तशी कोणत्याही संस्कारांशिवाय ही कविता! 

दु:खाची परिभाषा 
अश्रुंचे पूर 
ते पुसणारे हात 
का कितीतरी दूर 

आठवणींचा उमाळा 
वेदनेचे कातर सूर
ते ऐकू जाणारे कान 
असती मैलोनमैल दूर 

नजरेची साद 
नयनच आतूर 
प्रतिसाद देणारे डोळे 
आता कितीतरी दूर 

पौर्णिमेची रात्र 
चांदणे टिपूर 
चांदण्यांनी ओंजळ भरणारा 
मात्र चंद्रासारखाच दूर

सहवासाची ओढ 
शब्दांचे काहूर 
समजणारया मनानेही 
का राहावे मनापासून दूर 

Wednesday, December 3, 2014

कविता जगताना....... जगण्याची कविता होताना.......

शब्दांच्या प्रेमात असाल, काव्यात आयुष्य जगत असाल तर अनेक कविता मनात घर करून राहिलेल्या असतात. कधी कोणती मन:पटलावर उमटेल आणि तुमचा ताबा घेईल सांगता येत नाही. अशा माझ्या मनात घर केलेल्या कवितांमध्ये शांताबाईंच्या बऱ्याच कविता असतात. शांताबाईंचे नाव घेताच उभे राहते समोर एक सात्विक व्यक्तीमत्व! ठसठशीत गोल कपाळावरचे कुंकू, डोक्यावरून घेतलेला तो साडीचा पदर आणि एक हास्य चेहऱ्यावर.

शांताबाईंच्या कविता, गाणी व लेखन आवडतं याचा अर्थ मी ते सारे वाचले, ऐकले आहे असे मुळीच नाही. पण त्यामुळे होते काय की अनेक कविता प्रथमच वाचल्या, ऐकल्या जातात. प्रथम वाचल्या पासून तिने मनाचा ताबाच घेणे इथपर्यंत चा प्रवास सुद्धा कायम सारखाच नसतो. मनाशी संबंध आला की कशाचाच भरवसा नाही हे एकमेव सत्य. कधी पहिल्याच वाचनात ती कविता इतकी भावेल, कधी एकदा वाचली चांगली वाटली या पुढे जाणार नाही, एखादी एकदा वाचली आवडलीच नाही असेही घडेल. पण प्रत्येक कवितेचे एक ऋण मात्र नक्की असते माझ्यावर. माझ्याही नकळत ती मला घडवते, बदलवते, समृद्ध करते. 

बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा तन्वी थत्ते हिने मला त्यांच्या गाण्यांची "शुभ्र कळ्या मुठभर" दिली होती, जिला कौशल इनामदार यांचे संगीत होते. अनेक सुंदर गाणी त्यात होती. अनेकदा मी ती ऐकली, आवडली देखील. ते कॅसेटचे दिवस होते. यातच  "घर परतीच्या वाटेवरती" हे पण गाणे होते. त्या गाण्याचे असे झाले होते, ऐकले, आवडले पण मनात खोलवर पोहोचले का, आणि तसे असेल तर ते मनाला जाणवले का तर उत्तर नाही असे असले असते. 

पण त्यातला आशय, ते भाव मनात कुठेतरी इतके पक्के झाले होते, कि योग्य वेळी मन:पटलावर ते उमटून येण्यास अजिबात वेळ लागला नाही. सगळे दिवस सारखे नसतात. एखादी गोष्ट मनास कधी कशी गुंतवेल सांगता येत नाही . एके दिवशी रात्री उशिरा मी गाडी चालवत घरी येत होते. खरंच, असतो एखादा मनाला थकवून टाकणारा दिवस, कुठल्याही छोट्याशा गोष्टींनी हळवे होऊ पाहणारे मन आणि या साऱ्यांशी जुळवून घेत असणारी मी. अशावेळी अचानक हेच गाणे आठवावे, त्याने मनाचा पूर्ण ताबा घ्यावा  आणि जीव अजूनच व्याकूळ व्हावा असा तो अनुभव. 

घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे
अंधूक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे
घर परतीच्या वाटेवरती पडल्या-झडल्या शीण खुणा
मावळतीच्या किरणांमधुनी क्षण झळझळुनि उठती पुन्हा
घर परतीच्या वाटेवरती पायांवाचून पाय-ठसे
अश्रूंत चाहूल येते कानी एक हुंदका, एक हसे
घर परतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके
सावलीत सावली मिसळते अन्‌ पुटपुटती ओठ मुके
घर परतीच्या वाटेवरती मलूल, वत्सल, सांज उन्हे
कुरवाळीती मज स्‍नेहभराने विसरून माझे लाख गुन्हे

शांताबाईंची अजून एक कविता वाचली आणि नि:शब्द झाले "एकाकी". एक छोटीशी कविता. एकदा वाचून सोडून सुद्धा देईल कोणी अशी. पण नीट वाचली, समजून घेता आली तर दुःखाची खोली दाखवेल अशी. दु:खाचे कायम डोंगारेच पिटले जावेत असे नाही. पण तसे न केल्याने ते नसते असेही नाही. स्त्री- पुरुष या नात्यात सारं काही ठीक दिसत असताना, एकाकीपणातून जाणारी स्त्री. अनेकदा मला असा वाटलंय स्त्रीयांकडे एक वेगळीच दृष्टी असते, नात्यांकडे पाहण्याची, त्यातले असंख्य पदर समजून घेण्याची, त्यातल्या विविध छटांचे भावार्थ लावण्याची. त्यामुळेच अनेकदा तिच्या जोडीदाराच्या दृष्टीने "यात काय विशेष, उगीच काहीही अर्थ लावत बसतेस" अशी प्रतिक्रिया येऊ शकते तेंव्हा तीच स्त्री मोजक्या शब्दात हे दु:ख मांडून जाते. या स्त्रियांना नक्की हवे तरी काय असते हे देवाला सुद्धा कळणार नाही हा सूर अनेकदा लागतो, कानी पडतो. पण खरंच इतकं अवघड असतं का त्यांना समजून घेणे? 

सोबत कोणी नसण्यातून येणारे एकटेपण बरे, ते तुम्हाला संपवत नाही, मनाने उमदे असलात तर एकटेपण एकटे असूनही तुमच्या वाटेस जात नाही. पण सारे काही असूनही जर एकाकीपण वाट्यास आले असेल तर ते तुम्हाला खाऊन टाकते, मिटवून टाकते. स्त्री पुरुष संबंधात फक्त स्त्रीच्याच वाट्याला हे येत असेल असेही नाही, पण एक स्त्री म्हणून मला त्याच्याशी जोडले जाता आले इतकंच. जळणारा जीव कळला कदाचित इतकेच, स्त्रिया अनेकदा जास्त चांगल्या व्यक्त होतात इतकेच. 

ही कविता म्हणजे म्हंटल्या तर चार साध्या ओळी, उमजले तर जन्माचे दु:ख, तरीही त्याचे भांडवल न करता फक्त परिस्थिती समोर ठेवणारे. नात्यात असूनही वेधून टाकणारे एकाकीपण, बिलागणाऱ्या बोटांच्या पलीकडे जाऊन हवा असणारा नात्याचा एक कॅनव्हास, आणि तो मिळत नाहीये ही विफलता. म्हटलं तर हे दु:ख उगाळायला आयुष्य कमी पडेल असे … ते एका "त्वचेमागील एकाकीपण कधी सरते काय " या प्रश्नावर अनुत्तरीत ठेवणे हे फक्त त्यांनाच जमू शकते. 
एकाकी- 
तुझा आणि तुझ्यासाठी 
शब्द सारे खोटे 
खरी फक्त क्वचित कधी 
बिलगणारी बोटे 
तीही बिलगून सुद्धा दूर 
खोल खोल भुयारात 
कण्हणारे सूर. 
दूर देशीच्या ओसाडीत 
भटकणारे पाय 
त्वचेमागील एकाकीपण 
कधी सरते काय?

Tuesday, December 2, 2014

मोजपट्ट्या

दरक्षणी उभे असते समोर कोणी
मापत तुम्हांला तुमच्याही नकळत
हातात निरनिराळ्या मोजपट्ट्या घेऊन


अनेकांच्या हाती पट्टी तशी साधी...
पण तुम्हाला खुजे ठरवत,
स्वत:ची काडी मोठी करू पहाणारी


सतत कोणीतरी तुम्हांला त्यांच्या मोजपट्टीवर मापायचे
पट्ट्या कधी कर्तृत्त्वाच्या, कधी दातृत्त्वाच्या
कधी कष्टाच्या तर कधी मायेच्या


खोडून काढत राहायची तुम्ही ती मोजमापे, किंवा परिमाणे
नाहीतर त्या मापांना अनुसरत सतत
मोठे होत राहायचे, स्वत:ची उंची वाढवत


अन तसे करूनही खुजेच तुम्ही कारण
मोजपट्ट्या सतत बदलतच राहतात, मोठ्या होत जातात
भावना कायम ठेवत अधुरेपणाची, अपूर्णतेची


अनेकदा राग आलाय या मोजपट्ट्यांचा
अनेकदा वाटलय काढून घ्याव्यात या साऱ्या
मोडून काढाव्यात सपासप यांना


कोण देतं कोणाला असे मोजमापाचे हक्क
लहान मोठेपणाची परिमाणे
बनून जावे त्यांनी जगण्याचा भाग अविभाज्य

 
अन् तरीही आता या साऱ्यातून शोधतीये
एक आरसा माझ्या मनाचं प्रतिबिंब दाखवणारा
एक खरी मोजपट्टी मला खरे खुरे मापणारी......


माझ्या अस्तित्त्वाच्या, माझ्या व्यक्तित्त्वाच्या
लांबी रुंदी खोलीची परिमाणे
खरी खुरी मला दावणारी