Tuesday, October 16, 2012

ऐलोमा पैलोमा गणेश देवा.

परवा गाडीत माझी आई, आणि माझा अडीच वर्षाचा भाचा होता. बरोबरचे भरपूर समान बाजूच्या सीटवर ठेवून त्या दोघांना मागे बसू दिले. थोड्या वेळाने गडी गाऊ लागला. आधी शाळेत शिकवलेल्या "पोएम्स" झाल्या. मग गाडी घसरली "शिवाजी अमुचा राणा" वर . हे ऐकून मी चकित. पूर्ण गाणे त्याला म्हणता येत होते. मधेच अडले तर शेजारी आजी होतीच. त्याला विचारले "कोणी शिकवले तुला हे?"

"माज्या आईला येतं हे गाणं, तिला खूप खूप गाणी येतात."

"हुशारच आहे तुझी आई. अजून काय शिकवले तुझ्या आईने?"

"जिलेबीचे गाणे, कारल्याचे गाणे, लाडूचे गाणे आणि शिवाजीचे" (आम्ही सारे खवय्ये! गाणी पण सारी खाण्याच्या पदार्थांचीच?)

"पण तुला तर गुमामाम (गुलाबजाम) आणि सिंघम आवडतात ना? मग तुला आईने गाणे जिलबीचे आणि शिवाजीचे का शिकवले?"

"तिला तेच येत मणून"

नातवाच्या तोंडी ही गाणी ऐकून आजीपण खुश. या संवादाने माझ्या आठवणी ताज्या झाल्या. पितृ पंधरवडा संपत येतो तसे नवरात्राचे वेध लागतात. कसे ते ९/१० दिवस संपतात काही कळत नाही. तसे ते लहानपणी पण लागत. तेंव्हा कारण मात्र वेगळे असे. कारण नवरात्रीचे अप्रूप बाकी इतर कारणांसाठी नव्हे तर त्यातल्या "भोंडल्या" साठी असे. तेंव्हा "गरबा" नामक प्रकार बोकाळला नव्हता इतका. अगदीच तुरळक शक्यतो गुजराथी लोकानी आयोजित केलेला एखादा पारंपारिक गरबा असे. त्याचे फार कौतुक काही वाटत नसे. पण भोंडला महत्वाचा. भल्या मोठ्या अंगणात रोज एक किंवा दोघींचा भोंडला. सगळ्या मैत्रिणी, मैत्रिणींच्या मैत्रिणी जमा होत असत. आमंत्रणाची तशी गरज नसे. आणि आताच्या आयांसारख्या तेंव्हाच्या आयाही नव्हत्या. म्हणजे तेंव्हा शिस्त नव्हती का तर कदाचित आतापेक्षा थोडी जास्तच होती, आई-बाप मुलांचे फाजील लाड अजिबात करत नसत. आमच्याकडे तर म्हंटलेच जायचे "खायचे प्यायचे लाड, नसते लाड नाहीत". सहामाही परीक्षा तेंव्हाही असतंच पण त्या कधी या भोंडल्याच्या आड आल्या नाहीत. तेंव्हा या भोंडल्याला जायला आम्हाला पूर्ण परवानगी असे, अर्थात सातच्या आत घरात हा नियम पाळूनच.


भोंडल्याच्या आधीपासून आईच्या मागे "सांग ना आपल्याकडे तू काय बनवणार?" ही भूणभूण सुरु असे. संध्याकाळी शाळेतून परत आल्यावर मग भोंडला असे. पाटावर हत्ती रेखाटण्यासाठी कोणालातरी पकडावे लागे.(इतकी ग्रेट चित्रकला होती माझी :) ) मग हत्ती काढून झाला की खाली टीपके काढायचे, जितके टीपके तितकी गाणी म्हणायची. जिचा भोंडला आहे, तिने पटावरच्या हत्तीची पूजा करायची मग त्या हत्ती भोवती फेर धरला की भोंडल्याची अशी खास गाणी गात तो सुरु. ऐलोमा पैलोमा ने सुरुवात होवून मग शिवाजीचे,कारल्याचे, कोथिम्बीरीचे, जिलेबीचे, एक लिंबू झेलू बाई अशी गाणी सुरूच राहत. तशी सगळ्या मुली आणि त्यांच्या आयांना ही सारी गाणी येतंच असत. कोणी कोणाला शिकवलेली नसत, जशा लहानपणी गणपतीत कशा ना सगळ्या आरत्या कोणी न शिकवताच पाठ होत तशी. जवळपास तासभर हा गाण्यांचा कार्यक्रम चाले. एकदा का "आड बाई आडोणी" वर गाडी पोहचली की शेवट. मग बाकी मुलीनी खिरापत ओळखायची. अनेकदा एक मुख्य खिरापत आणि सोबत अनेक छोटे छोटे पदार्थ असत. जसे की इडली-चटणी सोबत, घरी तळलेले वेफर्स, साबुदाण्याच्या पापड्या, कोणती तरी वडी किंवा लाडू,......अगदी काकडीचे काप, श्रीखंडाच्या गोळ्या इतक्या साध्या गोष्टींपर्यंत. जिचा भोंडला आहे तिचीच नव्हे तर शेजारच्या काकू, मावशी पण तिच्या भोंडल्यासाठी काहीतरी खिरापत बनवून देत असत. काय दिले ते महत्त्वाचे नसे तर त्यामागचे प्रेम. कोणालाच ओळखता येणार नाही अशी खिरापत आपल्या आईने बनवावी अशी फार इच्छा असे. शिरा, वाटलीडाळ, ढोकळा, आप्पे, घरी केलेला कुकर मधला केक, साटोरी, भाजणीचे वडे असे अनेक पदार्थ असत. एकदा का सर्व खिरापती आलेल्या मुलीनी ओळखल्या की मग सगळ्यांना अंगणात सतरंजीवर बसायला सांगून घरातून खिरापतीच्या प्लेटस आणायच्या, हसत खिदळत त्या फस्त करायच्या. असे सर्व होईतोवर सात साडेसात होत, दुसऱ्या दिवशी कोणाकडे ते पक्के करून सगळ्या पसार होत, पुन्हा दुसऱ्यादिवशी न चुकता भेटण्यासाठी.

संस्कृती जेव्हा लहान होती तेंव्हा हौसेने २/३ वर्षे मी तिचा हा भोंडला केला पण होता. पण आता ती मजा येत नव्हती, न तिला न मला. सर्वात मोठे कारण म्हणजे, तोच शाळेच्या परीक्षा असण्याचा काळ असतो. आणि आता स्पर्धेच्या युगात आई वडीलांना लहान मुलींच्या छोट्या छोट्या परीक्षांचाही खूप मोठा बाऊ वाटतो आणि मग या काळात या गोष्टींमध्ये २/३ तास त्यांना भोंडल्या सारख्या गोष्टींमध्ये घालवू देणे आता कदाचित कोणालाच शक्य नाही. करमणुकीची जेव्हा असंख्य साधने उपलब्ध आहेत तेंव्हा इतके कष्ट घेताय कोण मुलीना २/३ तास रमवण्यासाठी? दुसरा भाग असा ही असेल की नित्य नवीन चवी चाखणाऱ्या या पुढच्या पिढीला, भोंडला त्यातल्या खिरापती याचे विशेष अप्रूप उरले नसावे. मग जेमतेम २/३ लहान मुली, आणि त्यांच्या आया, संस्कृती आणि मी. काय मजा वाटणार?






पण पूर्वीच्या संदर्भात पहिले तर या एका गोष्टीतून अनेक गोष्टी साध्य होत असाव्यात. जसे कि मुलींसाठी एक करमणूक, त्यातली जास्तीत जास्त गाणी ही सासर-माहेर या गोष्टींवर बेतलेली आहेत. कदाचित अशा गाण्यांमधून त्यांची मानसिक तयारी करून घेणे हा एक उद्देश पण असेल. त्यातली काही गाणी तर इतकी मजेशीर आहेत जसं की वेड्याचं गाणं भोन्डल्यात कधी एकदा हे गाणे म्हणतोय आणि त्यातल्या प्रत्येक ओळीवर कधी खिदळतोय असे लहानपणी आम्हाला झालेले असे. ... कारल्याच्या वेलाच गाणं घ्या वेल लावण्यापासून त्याला कारली लागेपर्यंत, आणि ती लागल्यावर त्याची भाजी करून वर आपलं उष्टं काढून मग मुलीची वेणी-फणी करून मग तिला माहेरी धाडणार. म्हणजे इतकी वाट बघावी लागणार तेंव्हा कुठे माहेरी जायला मिळणार. मनात आलं आणि आणि लगेच गेली
असे घडत नाही. शेजारीच माहेर असणाऱ्या मला कदाचित त्याची एवढी किंमत वाटणार नाही, किंवा ऑफिसमधून परस्पर संध्याकाळी आईकडे जाऊन येणाऱ्या मुलींना पण नाही याचे फार अप्रूप वाटणार, पण माझ्या परदेशात असणाऱ्या मैत्रिणींना आजही हे भावेल, कदाचित अगदी सासरच्या लोकांनी जाऊ देण्याचा किंवा न देण्याचा  संदर्भ नसेल तरीही...

अगदी या भोंडल्याची सुरुवात ज्या गाण्याने होते हे गाणेच इतके मोहक आहे. त्यातल्या अनेक शब्दांचा अर्थ मला आजही कळला नाहीये तरी एवढं नक्की ही एक प्रार्थना, एक साकडंच आहे. माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा....अनेकदा वाटून जातं मला कि हा खेळ म्हणजे भातुकलीचा नव्हे तर खऱ्याखुऱ्या संसाराचा आहे. आयुष्याचे रंग त्यात ठळक दिसतात, त्यात आयुष्याचे मागणे मागितलेय,त्यात येता जाता पडणाऱ्या पावसाचे वर्णन आहेत, परतीचा पाऊस कसे कणसात धान्य धरायला मदत करतो याचे वर्णन आहे एवढेच नव्हे तर अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे असे ही वर्णन आहे. कदाचित सातव्या आठव्या वर्षी लग्न झालेल्या मुलींचाही १६ वर्षापर्यंत भोंडला करत असतील त्याकाळी. त्याकाळच्या अनेक गोष्टी ज्या अशा आखीव असत त्याचे आजही कुतूहल वाटल्याशिवाय राहत नाही.

ते दागिन्यांचे गाणे. म्हणजे त्यातूनही मोठी शिकवण आहे. कोणीही दिलेल्या दागीन्यापेक्षा नवऱ्याने दिलेला दागिना सर्वात महत्वाचा. आजच्या संदर्भात असे म्हणू हवे तर नवऱ्याने किंवा स्वत: घेतलेला. पण रुसून माहेरी आलेल्या मुलीने सासू, सासरे, नणंद, जाऊ हे सारे तिला परत न्यायला आले तर काय करावे की सगळे दरवाजे लावून घ्यावेत, त्यांनी दिलेले दागिने पण न घेता (अरे रे :(  सोनं किती महागलंय, असं नाही करायचं......)  झिपऱ्या कुत्र्याला सोडून द्यावे? संस्कार म्हणून पटत नाहीत पण कदाचित गमतीचा भाग असेल तो,  पण स्व-कमाईच्या वस्तूंची बात काही और असते हे लहानपणापासून याच गाण्याने ठसवलं.

पण एकंदरीतच ज्याकाळात ही गाणी बनली त्याकाळचे किमान मुली, स्त्रिया यांचे जगणे यातून प्रगट होत राहते. म्हणजे पहा एखाद्या लहानवयात लग्न लागलेली मुलगी, आपल्या वेडसर नवऱ्याचे वर्णन कसे करेल? "अस्से कसे झाले, माझ्या नशिबी आले?" असेच ना? माहेर सासर यामध्ये मुलीना वाटणारा फरक कसा जसा च्या तसा त्या गाण्यांमधून उतरतो. सासरची प्रत्येक गोष्ट कशी वाईट, माहेरची कशी चांगली, ते अंगण असो, तिथला वैद्य असो. मुलीना वाटणारी माहेरची कमालीची ओढ प्रत्यक गाण्यात दिसतेच. त्यातूनच हे शिकवले जात असेल कि "बाई ग असं असून देखील तुला तिथेच राहायचे आहे, तिथेच एकरूप होवून जायचे आहे. निसर्गाशी जवळीक अनेकदा गाण्यांमधून दर्शवतेच. म्हणजे कोथिम्बिरीच्याच गाण्याचं पहा कि आता मिळत असलेली म्हणजे अश्विन महिन्यापर्यंत असणारी कोथिंबीर हळुहळू मार्केट मधून गायब होईल, मग परत कधी मिळू लागेल तर चैत्रात. आजकाल १२ महिने सर्व भाज्या फळे मिळणाऱ्या आम्हाला नाही यात काही विशेष वाटणार. पण त्या काळी ते महत्त्वाचे असेल ना? 

कोणतही यातलं गाणं घ्या, काहीतरी शिकवण आहेच त्यात. जिलबी बिघडली हे त्याचे उत्तम उदाहरण. अनेक वर्षे "जिलबी बिघडली" हे माझ्या तोंडी वाक्य येतंच हमखास, जेंव्हा माझा एखादा पदार्थ हातून बिघडतो तेंव्हा. हीच शिकवण घेवून पुढे गेलेल्या मला मग त्या बिघडलेल्यातून काहीतरी घडवताही येतेच. यात याहीपेक्षा काही महत्त्वाचे काय तर काहीतरी बिघडत असतानाही सगळं कसं निभाऊन न्यायचे याचे शिक्षण. आजच्या आपल्या जगात या गोष्टी आता बदलून गेल्या आहेत, म्हणून त्या मागे पडल्या. इतकीच शिकवण पुरणार नाही, पण म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. या गोष्टीना करमणुकीचे साधन म्हणून विशेष आता महत्त्व नाही, पण त्या काळी या गोष्टीतून सणवार म्हणून, प्रथा म्हणून केल्या गेलेल्या या भोंडल्या मधून करमणूक, शिक्षण अशा कितीतरी गोष्टी साध्य होत असतील नाही? तर अशी ही विस्मृतीत गेलेली गोष्ट. माझ्या लहानपणी तरी आम्हा मुलींच्या दृष्टीने भोंडला ही अतिशय आवडती गोष्ट होती. याची आठवण झाल्याबरोबर मी जवळपास सगळी गाणी म्हणून पहिली. अजूनही सगळी पाठ होती. भोंडला करून नाही तर निदान त्या काळात एक फेरफटका मारून येवून् मला ते क्षण पुन्हा एकदा जगता आले हे काय कमी आहे?



3 comments:

  1. आम्ही पालघरला असताना भोंडल्याला जायचो त्याची आठवण झाली. अगदी सगळं तेच वर्णन. इथे अमेरिकेत करतात माझ्या मैत्रीणी पण आता फार निरर्थक वाटतं, त्यात मुलगी गाण्यांबद्दल प्रश्न विचारते त्यांना उत्तरं देणं तर कठीण होऊन जातं.

    ReplyDelete
    Replies
    1. मोहना - पण अगं मला थोडेसे असेही वाटते कि आता या गोष्टी निरर्थक वाटतात कारण यात कालानुरूप बदल घडवले नाहीत. आपल्या आधीच्या अनेक पिढ्यांनी जतन केलेला हा ठेवा तो काही काळाने कदाचित कुठेतरी हरवेल. पण आताच्या पिढीला त्यांच्या शैलीला साजेसे असे ठेवे, जे आपल्याकडून त्यांना सुपूर्त होतील ते तरी आपण निर्माण करतोय का?

      Delete
  2. खूप आवडला लेख. एक common comment दुसऱ्या अश्या प्रकारच्या लेखावर दिली आहे ती ह्या लेखालाही लागू पडते. माझी प्रत्येक नवरात्र गुजराथेत गेल्यामुळे 'भोंडला' ह्या प्रकाराबद्दल फारसे माहित नव्हते ते नीटपणे तुझ्या ह्या लेखामुळे कळले आणि त्यामुळे एक suggestion करावेसे वाटते आहे - जर भोंडला प्रकारावर कोणी लिहिले नसेल तर तू एक दीर्घ लेख व छोटे पुस्तक लिहि. त्यात ह्या प्रकाराविषयी सांगोपांग माहिती, त्यात म्हटली जाणारी गाणी आणि त्यांचे तू वर केले आहेस तसेच पण अधिक सघन समाजशात्रीय, मानसशास्त्रीय इत्यादी अंगांनी विवेचन अर्थात ललित अंगाने केलेले असवे. पुढच्या पिढीतल्या मुली भोंडला खेळणार नाहीत पण हा वारसा नित document झाला तर मागच्या पिढीचा ठेवा एका वेगळ्या रीतीने पुढच्या पिढीपर्यंत पोचेल.

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!