Tuesday, June 24, 2014

मनाचिये गुंती ………भाग २

मनाचिये गुंती चा हा पुढील भाग पण त्यातील संदर्भांशिवायही वाचणे कठीण जाऊ नये. 

सकाळचे सात वाजलेत. शनिवारचा दिवस आहे, टेबलपाशी आजची वर्तमानपत्रे आणि सकाळ पासूनचा दुसरा कॉफीचा मग हाती घेऊन गायत्री बसून आहे. वर्तमानपत्राच्या पानांवरून नजर फिरतीये, वाचले काहीच जात नाहीये. आज सुट्टीचा दिवस. तसा काही विशेष सुट्टीचा प्लान नाही. तशीही सकाळी सात ही सारंगसाठी उठण्याची वेळच नव्हे. आजकाल गेली काही वर्षे तीही त्यास उठवण्याच्या फंदात नाही पडली कधी. 

"आठवावे लागेल शेवटचे सकाळी प्रेमाने त्याला, " उठ रे, उठ ना रे सारंग, बघ किती वाजलेत" म्हणत उठवले होते ते" 

"सगळ्या जोडप्यांचे पुढे असेच होते का? सहजीवनाची, एकमेकांच्या सोबतीची, त्यातून मिळणाऱ्या आनंदाची परिभाषा काळानुरूप बदलायला हवी. पण आपल्यासह अनेकांच्या बाबत असे घडताना दिसत का नाही? सध्या आपल्या आसपास जास्त अशाच गोष्टी का पाहायला मिळाव्यात? आज लग्नानंतर जवळपास चाळीस वर्षे होत आली आई-आप्पांच्या लग्नाला पण आजही त्याचे नाते कसे टवटवीत वाटते. म्हणजे ते तसे आहे की ते तसं दाखवतात? त्यांची लेक असून आपल्याला हा प्रश्न जर पडत असेल तर मग मात्र  ……"

" आसपास सगळी तकलादू नाती पाहिली कि कशाचाच भरवसा वाटू नये तसं झालंय आपलं." 

मधल्या काळात सखीचा रोहनशी घटस्फोटाचा निर्णय पक्का झाला, तिने तसा तो त्याला आणि दोघांच्या घरच्यांना सांगितला. बऱ्यापैकी घट्ट मनाने तिने हा निर्णय घेतला होता, ज्यावर ती तेवढीच ठाम ही होती, आहे. रोहन साठी हा धक्का होता, पण यास्थितीस तो ही कारणीभूत होताच,  सखीची बाजू इतकी पटण्याजोगी होती की रोहनची मैत्रीण असलेली गायत्री त्याच्याशी बोलण्याच्या किंवा दोघांत मध्यस्थी करण्याच्या मनस्थितीत नव्हतीच. 

इथे सारंग आकंठ कामात बुडालेला आहे. कधी कधी घरी पहाटे तीन चार वाजता येऊन सकाळी नऊ वाजता पुन्हा ऑफिसला जातो. कधी लवकर घरी आलाच तर, काम, ड्रिंक्स आणि तो हेच त्याचे जग झालेय. तो पुढच्या महिन्यात यु एस ला जाणार हे आता नक्की झालंय. किमान दोन वर्षांसाठी. त्याला हवी असणारी गोष्ट शेवटी तो मिळवणारच हे नक्की.  

या उलट गायत्रीची परिस्थिती आहे. तिचं आयुष्य काहीसं संथ पाण्यासारखं झालंय. घर आणि करिअर चांगल्यापैकी स्थिरावलेले. नवीन काही, का?, किती? आणि कोणासाठी?मिळवावे हा प्रश्न सतत छळतोय. लग्नाला दहा वर्षे होतील आता. सर्व शक्य होते ते प्रयत्न करून झाले, पण काही उपयोग झाला नाही. आता तर तिचीच इच्छा नाहीये. गेल्या काही वर्षातील तिच्यातील आणि सारंग मधील कोणत्याच कारणाशिवायचा वाढता दुरावा आणि आजूबाजूस असलेल्या इतर जोडप्यांमधील कुरबुरी पाहता कशासाठी अजून एका जीवाचे हाल असा प्रश्न पडू लागलाय. मूल नसल्याने दुरावा वाढतोय कि हा वाढता दुरावाच ते न होण्याचे कारण आहे? उत्तरेच नसणारे प्रश्न तरी का पडावेत? आणि हेच कारण होतं गायत्रीने यावेळी सारंग बरोबर सद्ध्या तरी जायचे नाही असे ठरवले त्याचे. त्यानेही विशेष आग्रह केला नाहीच म्हणा. 

"सद्ध्या त्याच्या अनेक विचारांत, निर्णयात आपण नसतोच तसे यातही नव्हतोच. अपेक्षितच होता का त्याला आपला हा त्यासोबत न जाण्याचा निर्णय, की त्यालाही थोडी स्पेस हवीच आहे? हे थोडे अंतर गोष्टी थोड्या सरळ करतील का की अजूनच बिघडवतील. पण  काय बिनसलंय हे न कळताच आपण गोष्टी सुधारण्याची अपेक्षा का करतोय? वर वर तर सारे छान चालू आहे, इतर कोणाला पुसटशी शंकाही यायची नाही. सारंग जाण्यापूर्वी त्याच्याशी एकदा बोलायला हवे आहे का? मुळात तो आपल्यात सारे काही ठीक नाहीये हे तरी मान्य करेल की हे सारे तुझ्या मनाचे खेळ आहेत म्हणत आपले म्हणणे ऐकूनच घेणार नाही?"

"मध्यंतरी विराजने जो सल्ला दिला…… हळूहळू त्याने डोके पोखरून टाकले आहे "रिलेशन्स जप" असे म्हणाला होता तो. म्हणजे मी नक्की काय करू? नक्की कोणत्या नात्यांविषयी, कि सगळ्याच? म्हणजे मी आणि सारंग, मी आणि त्याचे आई वडील आणि इतर नातेवाईक, कि प्रोफेशनल रिलेशन्स? तशीही सर्वच नाती प्रवाही असतात, त्यामुळे रोज थोडी थोडी बदलतातच. ती थांबली कि मगच संपण्याकडे वाटचाल करू लागतात. पण मग अशा वाहत्या पाण्यास जपायचे आहे मी म्हणजे नक्की काय करायचे आहे? 

बरं,ती जपण्यासाठी मीच एकटी का प्रयत्न करू? प्रयत्न करू म्हणजे तरी नक्की काय करू? सदैव मी पडती बाजू घेऊ, की कोणत्याही परिस्थितीत मी शांत राहू? पण हे करण्यासाठी तरी काहीतरी घडावे लागेल. नक्की करू तरी काय? कशाने काय बिघडणार आहे हे कळले तर कोणी काही उपाय तरी करेल ना, इथे आता सगळेच हवेत.काही न घडताच गोष्टी बिघडत चाललेल्या. 

"अनेकदा फोन हाती घेतला होता त्याला फोन करून त्याच्याशी यावर अधिक बोलण्यासाठी. पण धीर झाला नाही. एकतर मुळात तो सारंगचा मित्र आहे.तर मग त्याने जरी सारंगने सांगितले म्हणून आपली पत्रिका पहिली असेल तरी आपल्याशी बोलायला नको होते यावर. दुसरीकडे आपला यावर विश्वास कधी नव्हता. आजवर आयुष्यातली कोणतीही महत्त्वाची गोष्ट करण्यापूर्वी आपण ज्योतिष, कुंडली हे पहिले नव्हते. अगदी अजून मूल नाही यासाठी सुद्धा नाही. तर मग आज का वळावे आपण या साऱ्याकडे? त्याच्या या सल्ल्याने आपण का त्रास करून घेतोय. त्यालाही चांगलेच माहित आहे आपला या गोष्टींवर विश्वास नाही ते"

आई आप्पांशी यावर बोलावे का एकदा? पण त्यांना ह्या गुंत्यांचा तरी त्रास आता या वयात नको द्यायला. मुळात आपल्याच कल्पना इतक्या धुसर आहेत कि त्यांच्यापर्यंत हे सारे पोहोचवावे तरी कसे. त्या दोघांनी दिलेले समतोल विचारांचं बाळकडू विसरत चाललोय का आपण? त्यातून आप्पांच्या सडेतोड प्रश्नांची उत्तरे देणे जमणार नाही आपल्याला. खरे तर त्यांच्याशीच एकदा मनमोकळा संवाद घडायला हवाय, कदाचित एखादी नवी दिशा त्यातूनच सापडेल आणि त्यावाटेवर चालता सारे कसे स्वछ आणि निरभ्र होऊन जाईल………

Saturday, June 21, 2014

नात्यांची गुंफण...

मध्यंतरी एका ओळखीच्यांकडे त्यांच्या लेकाच्या लग्नाच्या आधी काही दिवस "व्याही भोजनाचा" कार्यक्रम होता. घर तसे भले मोठे, सर्वार्थाने, माणसांनी भरलेले, सुबत्तेने आणि माणुसकीने देखील. आई वडील आणि तीन मुले, त्या पैकी दोघांचे संसार त्यांच्या एक एक मुलांसह सुरळीत सुरु असणारे. आता शेंडेफळ बोहोल्यावर उभे राहण्याच्या तयारीत. जेवणे आटोपली, व्याही मंडळी घरी गेली. घरची आणि माझ्यासारखी काही घरच्यासारखी असणारी मंडळी गप्पा मारत बसली होती. तितक्यात एक मध्यमवयीन नऊवारी नेसलेली, डोक्यावर पदर घेतलेली स्त्री घरी आली. तिला पाहताच त्या घरच्या सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक आनंद जाणवला. त्या काकूंनी तिला बसायला सांगितले, वरकाम करणाऱ्या मुलीस पाणी आणायला सांगितले आणि आत तिचे जेवायचे पान घेण्यासाठीही.  त्या तिच्याशी गप्पा मारू लागल्या. उशीर का केलास अशी विचारणा झाली. आम्हा सगळ्यांचे लक्ष थोड्या कुतूहलाने त्या दोघींकडेच लागलेले. 

त्यातून समजलेली गोष्ट अशी कि त्या जेंव्हा हि मुले लहान होती त्यावेळी,या आलेल्या त्यांचे वयही १०/११ वर्षे होते आणि यांच्या घरी राहून त्यांनी मुलांना  सांभाळण्याचे काम केले होते. पाठोपाठची ३ मुले असल्याने अनेक वर्षे त्या या घरी राहत होत्या. नंतर कधीतरी त्यांचे लग्न झाले, आणि त्यांचे हे घर सुटले, पण घराशी, या माणसांशी असलेले संबंध  नव्हेत. त्याच आपुलकीने लग्न घरी आता त्या २/३ दिवस मुक्कामास आल्या होत्या. आता पुढचे दोन चार दिवस त्या या घराच्या किचनचा, वरकामाचा ताबा त्या घेणार हे स्पष्टच दिसत होते. येताना नवऱ्या मुलासाठी आणि त्याच्या आईबाबांसाठी चांदीच्या वस्तू आहेर म्हणून घेऊन आल्या. ते पाहून मला वाटलं की कशासाठी हे सारं? जीवनावश्यक खर्च सुद्धा मुश्किलीने भागवणाऱ्या व्यक्तींनी  तरी अशा गोष्टी करू नयेत ना. पण नाती जपण्याची, ती निभावण्याची प्रत्येकाची एक पध्दत असते. बाकीच्यांना त्याबद्दल काय वाटते हे तेंव्हा गौण ठरावे. 

अशी तुमची सपोर्ट सिस्टम म्हणून काम करणारी मंडळी आणि तुमचे त्यांच्याशी असणारे संबंध. दिवसाचे किमान १०/१२ तास घराबाहेर असणाऱ्या माझे तर पानही यांच्याशिवाय हालत नाही. तशीही आम्हा भारतीयांना यांची गरज तर फार असते, पण त्यांच्याशी छान संबंध ठेवावेत, थोडे माणुसकी दाखवत त्यांच्याशी वागावे हे मात्र अनेकांच्या पचनी पडताना दिसत नाही. अशा पार्श्वभूमीवर वरील प्रसंग वेगळा उठून दिसावा. 

तशीही मी थोडी इमो टाईप व्यक्ती असल्याने ज्या ज्या लोकांनी माझ्यासाठी असे कधी काम केले आहे त्यांच्या बद्दल मी थोडी हळवी असतेच. असे हळवेपण मग मला त्यांना सोडू देत नाही. पण कधीतरी निरोपाचे क्षण येतातच, आणि जड मनाने ते स्वीकारावेही लागतात. जसे कि लेकीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये ५/६ दिवस किंवा त्यानंतर दोन वेळा काही कारणांनी हॉस्पिटल मध्ये राहावे लागले तेंव्हा आपुलकीने मला मदतीचा हात देणारे डॉक्टर, नर्सेस, लेक लहान असताना तिला पहिले वर्षभर सांभाळले ती तिची ताई, गाडीवरून पडल्यामुळे काम बंद कराव्या लागणाऱ्या पूर्वीच्या एक पोळी काकू, आणि रेल्वेतून उतरताना पडून हात तुटल्या मुळे  काम सोडावे लागलेली एक घरकाम करणारी अशा काही मोजक्याच ज्यांना निरोप द्यावा लागला होता. वरवर जरी मी पैसे मोजते आणि ही लोकं माझ्यासाठी काम करतात असे असले तरी त्यांच्या कृतीतला ओलावा मी पैशाने विकत नाही घेऊ शकत ना?

नशिबाने अशी फार मंडळी माझ्या घरी नाहीत पण जी आहेत ती गेली कित्येक वर्ष आमच्या घरचाच भाग आहेत.निमूटपणे त्या दोघी आल्यात, आपापली कामे करून, काही न बोलता निघून गेल्यात असे शक्यतो आमच्या घरी कधी घडत नाही. मुंबईहून पुण्यात आल्यामुळे बदलावी लागणारी किंवा त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे सोडून गेलेल्या एक दोन जणी वगळता गेली अनेक वर्षे त्याच माझी सपोर्ट सिस्टम आहेत. या पैकी एकजण तर जवळपास १३ वर्षे माझ्या घरी कामाला येतात आणि दुसऱ्या गेली ५ वर्षे. उद्या काही कारणांनी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हायचे झाले तर यांच्यासह व्हावे लागेल. कोणत्याही अशा व्यक्तींबाबत असतात तशा तक्रारी अधून मधून त्यांच्याबद्दल, केलेल्या कामाबद्दल माझ्याही असतात, पण कधी दुर्लक्ष करत, कधी गोड बोलून, तर कधी चिडून मी त्यांच्याकडून कामे  करून घेते. पण आम्ही एकमेकींना सोडत नाही. इतक्या वर्षांची आपुलकी आम्हाला एकमेकीना सोडूच देत नाही. 

अनेकदा घरच्या एखाद्या व्यक्तीने  आपली गरज समजून करावीत अशी कामे त्या करतात, जसे कि शनिवारी लेकीची दुपारी शाळा आहे, आणि मी मात्र सकाळी लवकर ऑफिसला गेले आहे, तेंव्हा तिची वेणी घालून देणे, जाताना ती डबा घरीच विसरून खाली उतरली आहे तेंव्हा कोपऱ्यावर असणाऱ्या तिच्या बस स्टोप पर्यंत धावत जाऊन तिला तो देणे,  मशीनमध्ये कपडे धुऊन तयार आहेत पण ते वाळत घालायला मला वेळ नाहीये, तर ते घालणे, घरात साफ सफाईला लागणाऱ्या गोष्टी संपल्यात, मला सांगितले होते पण मी विसरले आहे, तर मग स्वत:च सकाळी येताना त्या घेवून येणे आणि मग माझ्याकडून त्याचे पैसे घेणे अशी एक न अनेक अवांतर कामे त्या समजून करतात. त्यांच्या गरजा  समजून त्याप्रमाणे लागेल ती मदत करायला मलाही काही वाटत नसते. त्यांच्या घरच्या माणसांविषयी, त्यांच्या परिस्थितीबद्दल मलाही माहिती असते त्यामुळे काही गोष्टींमध्ये त्यांना सपोर्ट करणे हे ओघाने आलेच. 

अनेकदा मी न सांगता सुद्धा मला बरं नाहीये हे त्यांना कळते, किंवा कोणत्या कारणाने माझे काही बिनसले आहे हे त्यांच्या नजरेतून सुटत नाही. अशा वेळी आपल्याला काय करायचे अशी भूमिका त्याही घेत  नाहीत, चौकशी कर, औषधे दुकानातून आणायची आहेत का ते विचार, मला बरं नाहीये हे आवर्जून (मला कळवायचं नसलं तरी ) जवळच राहणाऱ्या माझ्या आईला जाऊन सांग हे त्या दोघी केल्याशिवाय राहत नाहीत. हे सारे करावे हि अपेक्षा नसते पण त्यांनी ते केल्याने बरे वाटते हे नक्कीच. 

हे आपलेपण आता जेंव्हा पुढच्या पिढीतही दिसू लागते तेंव्हा मला खरेच मनापासून बरे वाटते. लेकीने सर्वात आधी एक उत्तम माणूस बनावे आणि मग बाकी काय ते अशी भूमिका असताना, पण तरीही कटाक्षाने तिला कोणाशी कसे संबंध ठेवायचे ते आपले आपण अनुभवातून काही अंशी शिकू दे असे  ठरवलेले असताना, मी घरी नसताना ती त्यांना कधी चहा करून देणे, आता उन्हाळ्यात कधी सरबत, कधी पन्हे देणे. अनेकदा तिच्या नाश्त्याची आणि त्यातल्या एकीची काम करायला येण्याची वेळ सध्या साधारण सारखीच असते, मग त्यांना नाश्ता विचारणे किंवा देणे अशा काही गोष्टी मी न सांगता करते  हे नक्कीच सुखावणारे आहे. माया एकाने लावली कि समोरचा अलिप्त राहूच कुठे शकतो? मग सलग ३/४ दिवस ती दिसली नाही की या दोघीजणी सतत विचारत राहतात. आता सुट्टीत ती दापोलीला गेली तर कधी येणार ती, घर फार रिकामं वाटतंय असं मला अनेकदा दोघींनी विचारून झालं. तिला बरं नसलं तर त्या अस्वस्थ होतात, चारचारदा त्याबद्दल विचारत राहतात. लेकही आता अनेकदा मजेत त्या दोघींना सांगते कि पुढे माझ्या लग्नानंतर मी तुम्हाला दोघींना माझ्या घरी नेणार म्हणून तेंव्हा त्या आपुलकीने त्या दोघीही नक्कीच सुखावत असणार. 

एक महिन्याभरापूर्वी एक आळसावलेल्या रविवारी सकाळी  मी वाचत बसले होते. इतका हेवी नाश्ता झाला होता कि नवरा आणि लेकीने आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन मस्त ताणून देणे पसंत केले होते. घराची बेल वाजली, मी दार उघडले घराची साफसफाई करणाऱ्या कुसुमबाई आल्या होत्या. आत येताच संस्कृती कुठे अशी त्यांनी विचारणा केली, खोलीत झोपलीये असे सांगताच "का, बरे नाही का" अशी विचारणा झाली. तसे काही नाहीये असे सांगताच त्या तिच्या खोलीकडे वळल्या. हातात काहीतरी होतं त्यांच्या. पाच मिनिटात लेक बाहेर आली. हातात एक भली मोठी कॅडबरी सिल्क घेऊन, आणि म्हणाली "आई, कुसुमबाई बघ हे काय घेऊन आल्यात माझ्यासाठी". सातत्याने देश विदेशातील chocolates खाणाऱ्या लेकीलाही  त्या त्यांच्या कृतीचे वेगळेपण जाणवले होते. 

त्यांना विचारले "अहो, हे काय, कशाला आणलेत, लहान आहे का ती आता कॅडबरी खायला, स्वत:च्या दोन नातवंडाना अशा गोष्टी घरी न्यायच्या सोडून हिला कशाला देताय? आणि एवढी महाग देतात का? त्यावर त्यांचे उत्तर होते, " अहो पोरीने मधे किती अभ्यास केला. आम्हाला त्यातलं काही कळत नाही, कुठली परीक्षा आणि काय काय करते ते, पण त्याबद्दल तिला काहीतरी द्यायला नको? गेले आठ दिवस रोज म्हणते तिला काहीतरी नेईन म्हणत होते तेंव्हा आज जमलं" यावर काही बोलू नाही शकले मी. क्षणात काही वर्षांपूर्वी त्या लग्नघरी आलेल्या त्या बाई आठवल्या आणि नात्यांची संगती पुन्हा एकदा लागली. 

Sunday, June 15, 2014

तिसरा वाढदिवस!

जूनचा किंवा डिसेंबरचा दुसरा शनिवार म्हणजे इसाकाच्या परीक्षेचा दिवस. २०११ मध्ये अशीच एक परीक्षा देऊन निवांत रविवार घालवण्याचा विचार होता.पण होतं असं की थकवा वगैरे सारं परीक्षा होईपर्यंतच असतं, एकदा ती झाली कि मग एक अंगावर येणारे रिकामपण मागे उरते, तसेच काहीसे झाले होते. मग काय करावे असा मनात विचार चालू असतानाच अचानक त्यापूर्वी जवळपास २ वर्षे आधी सुरु केलेला आणि स्वत: काही न लिहिलेला ब्लॉग आठवला. तत्पूर्वी काही दिवस थोडे काहीतरी इन्फी ब्लॉग वर लिहिण्याचा प्रयत्न करून झाला होताच, आणि आता इन्फोसिस सोडायचे दिवस आता जवळ येत चाललेत याची जाणीवही तीव्र होत चाललेली. त्यामुळे आता अजून काही लिहिण्याचा प्रयत्न चालूच जर ठेवायचा असेल तर नवे माध्यम, नवे ठिकाण हवेच होते, जुना ब्लॉग आठवल्याने हा वेगळा शोध घेण्याची गरज मग उरली नाही. 


मग आधीच्या ३/४ महिन्यातले जे काही तोडके मोडके लिखाण होते ते या जूनच्या दुसऱ्या रविवारी या ब्लॉगवर घेऊन आले. म्हणजे तसे हे बाळ दत्तक आणण्यासारखेच झाले. पण तसे का होईना….… ते आले हे काय कमी? कसेही आलेले असले तरी बाळाचे आगमन सुखावणारेच असते. तर मग अशारितीने हे "ब्लॉगबाळ" आज ३ वर्षाचे झाले. पहिला वाढदिवस लक्षात होता, लिहिण्याचा उत्साह ही खूप होता. दुसऱ्या वर्षी लिहिण्याच्या प्रक्रियेला अशी काही खीळ बसली होती की या ब्लॉगबाळाचा वाढदिवस खुद्द आईच विसरली. हे चालू वर्ष पुन्हापहिल्यासारखेच लिहिते करून गेले, त्यामुळे जवळपास आठवडाभर आधीपासून याची आठवण होती. 

या साऱ्या लेखना मागे प्रेरणा खरे तर एकच, आणि ती म्हणजे स्वत:ला व्यक्त होण्याचे हे उत्तम माध्यम. पण एकदा ते तुम्ही जगापुढे ठेवलेत की ते सर्वार्थाने तुमचे असे उरतच नाही. लिखाण,त्यावरील प्रतिक्रिया मग पुन्हा त्यातून पुढच्या लिखाणातील बदल असा प्रवास सुरु होतो. गोष्टी थोड्या बदलतात,जेंव्हा कौतुक वाट्याला येऊ लागले की. मग एक त्याचीही छान नशा असतेच, चांगल्या रितीने ती तुम्हाला लिहिते ठेवते. मागच्या वर्षात म्हणजे २०१३ मध्ये फक्त ८ इतक्या कमी पोस्ट हातून लिहिल्या जाऊनही एकूण तीन वर्षात १२० पोस्टस........ not bad अशी शाबासकी मी स्वत:लाच देतीये. कारण माझ्यासारख्या आळशी व्यक्तीने स्वानंदासाठी  सुरु केलेला हा उपक्रम सलग तीन वर्षे टिकू शकला हेच खूप झाले. तसे हे लिखाण म्हणजे तरी काय रोजच्या जगण्याच्या कुपीत लपलेले काही सुगंधी क्षण, काही आठवणींचा उमाळा जो कोणा समोर व्यक्त करायला मन तयार होत नाही, काही सभोतालच्या घटनांवरील प्रतिक्रिया, तर काही स्वत:शीच घडवून आणलेला मोकळा संवाद. 

अनेकदा हे लिहिले पाहिजेच का हा विचार छळतो आणि लिखाण थांबते, काही वेळा प्रचंड इच्छा असून शब्द साथ देत नाहीत, तर कधी वेळ. कधी मनातल्या मनात अनेक कल्पना रुंजी घालतात पण laptop समोर बसल्यावर "शब्दरूपी उरावे" यासाठी एकही कल्पना तयार होत नाही. कधी लिहिले गेल्यानंतर ते स्वत:च्याच मनास येत नाही, म्हणून ते ब्लॉगपर्यंत पोहचत नाही, अशा अनेक  अडथळ्यांच्या शर्यती पार करत हा ब्लॉग लिहित्या अर्थाने आज तीन वर्षाचा झाला. 

वाढदिवशी मागील आढावा तर घ्यावाच पण पुढील वाटचालीचा पण मागोवा घ्यावा. पण जमेल तसं स्वत:ला व्यक्त होऊ द्यायचं हे एकच ठरवलेले असल्याने पुढील प्रवासाचा मागोवा कसा आणि काय घेणार म्हणा. पण मागे वळून पाहताना या ब्लॉगने ज्या प्रकारे मला श्रीमंत केले ते याचे एक ऋण राहील माझ्यावर, अनेक ब्लॉगर मित्र मंडळी, अनेक फेसबुकीय मित्र मंडळ मला या लिखाणातून मिळत गेले, मैत्र तुमच्या नकळत तुम्हाला समृद्ध करत राहतेच, तसे ते इथेही झालेच. त्यामुळे या सर्वांचे मनापासून आभार. असेही अनेक जण असतात की नित्यनियमाने ते तुमचे लिखाण वाचतात, प्रतिक्रिया देत नाहीत, पण वाचत राहतात, कधीतरी गप्पांच्या ओघात लक्षात येते की अरे ही / हा आपण लिहिलेले वाचतात याची खात्री पटते, तर या सर्वानाही मनापासून धन्यवाद. माझ्या आसपासच्या अनेक व्यक्तींच्या स्वभावाच्या अनेक छटा माझ्या लिखाणात उतरतात, त्यामुळे तशा छटा घेऊ द्यायची  संधी देणाऱ्या ह्या साऱ्यांचेही खरोखर आभार! 

मी पूर्वी म्हंटल्या प्रमाणे संवाद संपला की नाती संपतात, नात्यांशिवायचे जगणे रुक्ष, कोरडे होऊन जाते, या ब्लॉगने मला व्यक्त होणेच नव्हे तर सारे जगणेच आनंदमयी करण्यास मदत केली. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा ठेवा या "मी …. माझे … मला" ने मला मिळवुन दिला. अनेक अर्थानी जगणे समृध्द केले. एक प्रयत्न म्हणून सुरु केलेला हा संवाद आता नकळत माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक कसा आणि कधी होऊन गेलाय ते कळलच नाही. म्हणूनच हा संवाद असाच चालू ठेवण्यासाठी या ब्लॉगबाळाला आणि त्याच्या आईला अनेकोत्तम शुभेच्छा !






(सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

Friday, June 6, 2014

जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी.....

अनेक दिवसांनी हाती लेखणी धराविशी वाटते आहे. काय होतं ना अनेकदा शब्द असे काही रूसतात की काहीही करा, त्यांना मनवणे महाकठीण होऊन बसते. असे मनधरणी करण्यात अनेक अस्वस्थ दिवस रात्र जातात. मला मान्य आहे  की त्यांना काही माझ्या काही दावणीला  बांधलेले नाहीत, की माझ्या मनात यावं आणि त्यांनी मागुते यावे, पण थोडी मनधरणी केल्यावर तरी यावे ना!  "बाबांनो, तुम्हाला नसेल रे पण मला तुमची खूप गरज आहे, तुम्ही नसाल रे, पण  मी तर तुमच्या प्रेमात आहे ना कायमच, कधीतरी त्याची जाण ठेवा आणि माझ्यावर असे रुसू नका ना". सुरेश भटांनी जसे जीवनाकडे "सूर मागू तुला मी कसा " म्हंटले तशी मी शब्दांना साद घालत राहते.

अनेक आकृतीबंध निर्माण होत राहणे, अनेक कल्पनांनी नुसतेच मनात रूंजी घालणे हे सारे सारे  होत राहते पण तरीही  शब्दच न सापडल्याने ते आ
कृतीबंध, त्या कल्पना हवेतच विरून जाणे हे अशा वेळी नित्याचेच. अशी त्यांची वाट पहात शेवटी, "आपण आता नाद सोडावा, हे लिहिणे, व्यक्त होणे ही आपल्या सारख्या सामान्य व्यक्तीचे काम नोहे, तेथे पाहिजे जातीचे.... " अशी आपण आपलीच समजूत काढावी आणि घर, आँफीस यात गुंतवून घ्यावे  हे उत्तम.

पण आपलीही अशी सहज समजूत निघते? शब्दांच्या विरहाचे दु:ख तर जाळतेच, पण काही इलाज नसतो ते मान्य करण्याखेरीज. हे मान्य करायलाच आधी किती वाद घालावा लागतो  आपल्या एका मनाला दुसऱ्याशी आणि आपण असतो हतबल काहीही  करू न शकणारे.

मग अचानक एके दिवशी एखादी छोटीशी, साधीशीच गोष्ट घडते,  पण तेंव्हाच डोक्यात काही तरी लख्खकन चमकते, तीच चमक कुठूनशी आपल्या डोळ्यात उतरते, आत कुठेतरी त्यांची चाहूल लागते, याची तुलना ना  फक्त अवचित दारी उभ्या सजणाला पाहताना त्याच्या सखीची होते ना त्याच्याशीच होऊ शकते. ही चाहूल खरी कि केवळ भास हे पहावे तरी असे म्हणत आपण एखादी कल्पना उतरवू पहातो, लेखणीतून शाई झरझर पाझरावी तसे शब्द उतरू लागतात, अनेकदा एखादा बांध फुटावा आणि धबधब्यासारखे पाणी वाहते व्हावे असा त्यांचा वेग  असतो. अनेकदा  मग बोटांना त्याच्याशी जुळवून घेण्याची कसरत करावी लागते. पण त्यांचे हे असे येणेही तितकेच  सुखावणारे असते. हे अनुभूतीचे गारूड मग मनावरून काही काळ तरी मग उतरायचे नाव घेत नाही.

जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले द्वारी अशी ही अवस्था, हाती लेखणी धरायला आवडणाऱ्या  प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येणारी! जसं आज मी कित्येक दिवसांनी फेसबुकवर दोन ओळींचे स्टेटस टाकावे म्हणून तिथे जाते काय आणि माझ्या शब्दांशी असलेल्या या नात्याचा शब्दपट उभा करते, काय सारेच आकलनापल्याडचे!
 

Saturday, May 17, 2014

तुझी सखी ……

वाढदिवशी त्याने  "तुला काय देऊ सांग" असे म्हणावे ....
आपण "एक स्वतः लिहून कविता दे" मला असे आपल्याच नकळत मागावे
त्यानेही ते मनावर घेत आपल्याला कविता भेट द्यावी.
त्यातून नात्याचे आपल्या नात्याचे अनवट रूप जाणवावे ...
आणि ते रूप पुन्हा कवितेचाच आधार घेत आपण त्याच्यापर्यंत पोचवावे
सारेच खूप मोहक .... हवेहवेसे .... आपल्या नात्याइतकेच!



प्रत्येक स्त्री थोड्याफार प्रमाणात अशीच असते, किंबहुना असावी. तिच्या या साऱ्या छटा आयुष्याच्या रांगोळीत रंग भरत असाव्यात. प्रत्येक वेळी ते तिच्या जोडीदाराला दिसतात किंवा नाहीतही पण म्हणून तिच्या असं असण्याचं महत्त्व कमी होत नाही. मला अनेक स्त्रियांमध्ये अशी अनेक रूपे दिसतात, आणि ती मला भावतातदेखील. अनेक नाती गुंफताना स्त्रिया यातील अनेक मनमोहक छटा घेवून येतात. कधी त्या वेल बनूनही आधार देतात, कधी त्या त्याच वेलीच्या हक्काने जोडीदाराचा आधार घेण्यात आनंद मानतात. कधी बोलता संवाद साधतात, कधी अबोली होऊन सारे गुज पोहचवतात.कधी निरपेक्ष प्रेमाची पाखरण करतात, 

आज कोणत्याही कारणाशिवाय ही कविता अशा साऱ्याजणींसाठी ज्या सूर, ताल, लय सांभाळत आयुष्याची मैफल सुरेल करतात

कधी झुळुक हलकेच सुखावणारी
कधी मारव्याप्रमाणे कानात रूंजी घालणारी
कधी सोनचाफ्याप्रमाणे दरवळणारी
कधी नदीसारखी खळाळणारी
कधी सागराच्या गाजेसारखी साद देणारी
कधी मंद ज्योतिसारखी तेवणारी अन् तरीही 
तुझ्या मनाचा हरेक कोना ऊजळवून टाकणारी....

कधी प्रसन्न सकाळ तुला भेटणारी 
कधी कातर वेळ उदास करणारी
कधी हुरहूर उगाच जाणवणारी  
कधी पौर्णिमा तुझ्या मनातली 
कधी चांदणफुले अवसेच्या आकाशात  फुलवणारी   
कधी आषाढी बरसात अखंड धारांनी होणारी अन 
तुझ्या तप्त मनास भिजवून शांत करणारी ………. 

इतकी सारी रूपे तिची जाणवतात का रे तुला कधी…… 
इतक्या सारया छटा तिच्या दिसतात का रे तुला कधी………
इतके तुझ्याशी एकरूप होणे उमजते का रे तुला कधी…………

Tuesday, May 6, 2014

तुझ्या आठवणी

अशा कातर वेळी 
खिडकीशी उभी मी 
पहात राहते क्षितिजापर्यंत 
पोहोचलेले हे गाव 

नजरेच्या टप्प्यात अनेक 
ओळखीच्या जागा 
तिथपर्यंत नेतात मला 
आठवणींच्या पायवाटा 

आठवणी तरी कशा ?
नुसत्याच सैरभैर 
कोणाला आवतण देते कोण 
कोणाचा हात धरून येतं कोण 

असाच असतो 
एक एक दिवस त्यांचा 
त्यांच्या साथीने तुझ्यासह 
काही क्षण जगण्याचा 

भरभरून जगते मी हे क्षण 
ते माझे आपले असतात 
तुझ्यापेक्षा तुझ्या आठवणीच 
माझी जास्त सोबत करतात 

Tuesday, April 29, 2014

भातुकलीच्या खेळामधली ............................

गेट उघडून काव्या आत शिरली. सभोती फुललेल्या बागेकडे तिने नजर टाकली ती थोड्या आश्चर्यानेच  अन घराच्या दरवाज्यासमोर उभी राहिली. बेल वाजताच आतून "आलो आलो " हा आवाज ऐकला  मग  क्षणातच काकांनी दरवाजा उघडला.

"ये काव्या, कधी आलीस दुबईहून? किती दिवस आहेस आता इथे? आणि आज इकडे कशी?"
"काका, आठवडा झाला इथे येऊन, मधेच दोन दिवस तुषार कामासाठी मुंबईला गेलाय तर माझ्याकडे थोडा वेळ आहे. म्हणून आईला म्हटलं की आज पलीकडच्या बँकेत थोडे काम आहेच, म्हणून थोडा जास्तीचा वेळ काढून तुम्हाला भेटून येते, कसे आहात तुम्ही?"
"मी कसा असणार आता? वेळ घालवतो काही कामात, काही तुझ्या मावशीच्या आठवणीत. बस तू, काय घेशील, पन्हं की लिंबू सरबत? उन्हाची आलीयेस."
"काका पन्हं ? तुमच्या घरात? म्हणजे तसं नव्हे पण आता मेघना मावशी नाहीये तर?
"अगं, मीच बनवून ठेवलंय"
"तुम्ही? विश्वासच नाही बसत काका. मला अजूनही तेच लहानपणी पाहिलेले काका आठवतात सारा वेळ ऑफिसच्या कामात बुडवून घेतलेले, अगदी चहा सुद्धा स्वत:चा स्वत: न करणारे"
"खरंय तुझं काव्या तुमच्या लहानपणी होतोच  मी तसा, लहानपणीच कशाला अगदी आता आत्तापर्यंत तसाच होतो मी, पण बदललो, मेघना, तिने बदल घडवून आणला हा अगदी गेल्या पाच सहा वर्षात"

काव्याच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य लपून राहत नाही. आज इतक्या वर्षानी काकांचे हे बदललेले रूप, ते ही मेघना मावशी गेल्यावर!

"आहे ना वेळ, बस निवांत इथे, हे समोर पेपर आहेत, नाहीतर टी व्ही लावू का, ऊन फार वाढलंय, मी आपल्या दोघांसाठी कैरीचे पन्हे घेऊन येतो"

काका आत जायला वळतात, काव्या थोडी निवांत होत सोफ्यात मागे सरकते. क्षणात अनेक वर्षाचे चित्र तिच्या डोळ्यासमोर तरळून जाते. मेघना मावशी तिच्या आईची मैत्रीण अगदी हानपणीपासूनची. एकाच शाळेत, एकाच महाविद्यालयात आणि लग्नानंतर एकाच गावात. जिथे तिथे दोघी सोबत अगदी वर्षांपूर्वी मेघना मावशी जाईपर्यंत.
काव्याने या घरात काकांना नेहमी पाहिलेय ते कामात बुडून गेलेले, आणि बाकी वेळ मित्रांसोबत. घराला घरपण होतं ते फक्त मेघना मावशीमूळेच. रोहित आणि वीणा ही दोन मुले आणि मावशी यांचे एक वेगळेच जग होते. काका त्यात जराही कुठे नसत. काकांचा संबंध फक्त कदाचित पैसे कमावणे आणि घर, गाडी इतर गुंतवणूक या बद्दलचे निर्णय घेणे इतकाच, काव्याने त्यांना घरात सगळ्यांशी हसत खेळत गप्पा मारताना कधी पहिलेच नव्हते. मुलांची शिक्षणे, त्यांची आजारपणे, नातेवाईक, लग्न कार्य या साऱ्या साऱ्या मावशीने सांभाळलेल्या गोष्टी. 

तिची आई मावशीला नेहमी म्हणे, "मेघना असे कसे चालते तुला? काहीच कसं सतीशराव लक्ष घालत नाहीत घरात, मुलांत, हे सारे काय तुझ्या एकटीचे आहे का? कधीतरी तू बोलायला हवेस ना"
अशा वेळी मेघना मावशी नुसतीच हसून, "अगं, चालायचंच नसते एकेकाला आवड" असे म्हणत तो विषय संपवत असे. 

पण तिने अक्षरश: एकटीने नुसते मुलांनाच नाही तर अनेक गोष्टीना जपले. नाती जपली, आपल्या मैत्रिणींचा ग्रुप जपला. रोहित आणि वीणा यांना अनेक गोष्टींची गोडी लावली, त्यांचा सर्वार्थाने विकास घडवण्यात तीच तर झिजली. ते दोघे शिकले, पुढच्या शिक्षणासाठी परदेशी गेले, यथावकाश अनुरूप जोडीदार मिळून त्यांची लग्नेही झाली. त्याच सुमारास काव्याही लग्न करून दुबईला गेली आणि तिथलीच झाली. मावशी कॅन्सरने गेल्यावरही तिला येता आलेच नव्हते. फोनवरच ती रोहित आणि वीणाशी बोलली होती. 

काव्या अशी आठवणीत गढून गेली असताच काका ट्रे मध्ये दोन ग्लास पन्ह्याचे घेवून आले. 

त्यातला एक तिच्या हाती देत म्हणाले, " काव्या तुला आश्चर्य वाटणं सहाजिकच आहे ग, मला असे घरात काही काम करताना पाहून, आणि ते ही तुझी मावशी नसताना"

"हो काका, कारण तुम्हाला फारसे कधी आम्ही घरीच पाहिलेले नाही, घरातली काही कामे तुम्हाला करताना पाहणे मी कधी कल्पनेत पण नव्हता विचार केला" 

"खरं सांगू  …… मला घर संसार, नातेवाईक या  गोष्टींची मुळात कधी आवड नव्हतीच, त्यातून त्याकाळी आई वडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करावे लागले याचा राग होताच. त्या काळी बायका शिकत पण नोकरी वगैरे फारशा नसत करत. पण ना मला वाटे बायको नोकरी करणारी असावी, पण मेघनाची कधी नोकरी वगैरे करण्याची कधी इच्छाच नव्हती. एकंदरीतच माझ्यासाठी हे एक लादलेले लग्न होते. मग मी त्या रागापोटी घराकडे कधी लक्षच दिले नाही. ऑफिसमधल्या परीक्षा देत पुढे जात राहिलो, उरला सुरला वेळ मित्र मंडळ होतेच, सिंहगड, पर्वती किंवा बुद्धिबळाचे डाव मांडून बसायला. जेवा, झोपायला फक्त घरी असाच त्याकाळी माझा दिनक्रम होता. मेघनाने हळूहळू घराचा ताबा घेतलाच होता, यथावकाश मुले झाली, त्यांच्या मोठं होण्यातही माझा विशेष काही वाटा नव्हताच. तिने कधी या गोष्टीची तक्रार केली नाही, एकटीवर सारे पडते म्हणत कधी त्रागा नाही केला ना कधी आमचे भांडण झाले. संवादच नसेल तर विसंवाद तरी कुठून येणार होता म्हणा.  मेघनाने घर छान ठेवले, मुलांना शिकवले, संस्कार दिले त्यांना, नातेवाईक जपले. पुढे रोहित, वीणा शिकायला परदेशी गेले तेंव्हा कुठे पहिल्यांदा मला जाणवले हे सारे मेघनाचे कर्तुत्त्व आहे, त्या दोघांच्या मोठे होण्यात आपला पैसे देण्याखेरीज काही वाटा नाही. दोघांनीही तिथेच शिकत असताना आपापले जोडीदार निवडले ते ही असेच उच्चशिक्षित, सालस. मेघनाचा गाढ विश्वास होता तिच्या संस्कारांवर. तिचा पाठिंबा होताच, सारे कसे छान सुरळीत चालू होते. पण मी त्यात कुठेच नव्हतो."

"पण मी रिटायर झालो, आणि काही काळ तरी दिवसभराचा मला घरात घालवावा लागू लागला. म्हणजे तसे पर्वती, सिंहगड, बुद्धिबळाचा अड्डा हे होते पण तरीही.  नकळत का होईना मेघना दिवसभर घरासाठी काय काय करते ते लक्षात येऊ लागले. मी साठीत पोहोचलो म्हणजे ती ही पंचावन्न ची होतीच की. सकाळी उठून योगासने, चहा नाश्ता, मग पेपर वाचन, थोडे बागकाम, देवपूजा, रांगोळी मग स्वैपाक, इतर आवाराआवर, मग दुपारी अंध शाळेत ती जात असे, तिथे लहान मुलांना गोष्टी सांग, लहान सहान गोष्टी करायला शिकवायला, तिथून परत आली की मग संध्याकाळचे चहापाणी मग एखादी मैत्रीणींबरोबर चक्कर, घरी येवून पुन्हा स्वैपाक, रात्री टी. व्ही पाहून झोप. पण या तिच्या दिनक्रमात मी स्वत:ला कुठे आणि कसे बसवावे हेच मला कळत नसे. जो काही संवाद आमच्यात होता तो फारच कामापुरता असे."

"तेव्हाच नेमका मी एकदा सकाळी पर्वतीहून येत असताना स्कूटरला एका गाडीने ठोकले आणि पाय फ़्रक्चर होऊन सलग चार महिने घरी बसून राहायची माझ्यावर वेळ आली.तेंव्हा माझे करणे हे अजून एक वाढीव काम तिच्यासाठी होऊन बसले. हे सारे करत असताना काय त्रास आहे हि तिची भावना कधीच नव्हती. तिच्यावर सारा भार पडत होता हे नक्की. मुलांचा फोन येत असे, माझ्यापाशीच कॉर्डलेस ठेवलेला असे पण तो उचलताच तिकडून "बाबा कसे आहात, पाय बारा आहे का आता असे विचारून लगेचच "जरा आईला फोन देता?" असे विचारत, तिच्याकडे फोन गेल्यावर मात्र पुढचा कित्येक वेळ त्यांच्या गप्पा चालत. कुठेतरी दुखावला जात असे मी. पण त्या काळात झाले असे की सक्तीच्या विश्रांतीने मी या घराकडे, मेघनाकडे एकंदरीतच तिच्या घर आणि मुले यांच्यातील गुंतवणुकीकडे पाहू लागलो.  हळू हळू लक्षात येवू लागले की घर उत्तम रितीने सांभाळत तिने आपले एक वेगळेच विश्व निर्माण केले आहे. ज्यात तिचे पुस्तक भिशीचे ग्रुप्स आहेत, अंध मुलांची शाळा आहे. मी पुरता नास्तिक - कळता झाल्यापासून कधी मी देवाला हात जोडले नव्हते, पण मेघनामुळे घरात देव होते, त्यांची रोज पूजा होत असे, घराच्या बागेतली फुले त्यांच्यासाठी असत, दारात आमच्या रांगोळी असे, सांजवात कधी चुकत नसे. दिवसेंदिवस मला तिच्या या सगळ्या गोष्टी इतक्या जीव लावून करणाऱ्या स्वभावाचेच कौतुक वाटू लागले, आणि कुठेतरी खंत देखील, की हे विश्व आपले होते आणि आपण आपल्या हेकटपणाने या सगळ्या गोष्टींपासून दूर राहिलो."

"पण याच जाणीवेने आमच्या दोघातला संवाद कुठेतरी पुन्हा जुळून येऊ लागला. मेघनानेही हा माझ्यातला बदल लक्षात घेत मनापासून साथ दिली आणि साठीला पोहोचता आमचे खऱ्या अर्थाने सहजीवन सुरु झाले. मेघना सोबतचे दिवस खरंच माझ्या आयुष्यातला एक अमुल्य ठेवा  आहे, ज्याने मला खूप समृद्ध केले. सकाळी पहिला चहा बनव, बागकाम कर, देव पूजेसाठी फुले ठेव, घराबाहेर पडताना आवर्जून बाहेरून काही आणायचे आहे का ते विचारून घेऊन ये, दर रविवारी आठवड्याची भाजी आण अशी अनेक छोटी छोटी कामे करण्यात मी रस घेऊ लागलो. तिच्यासाठी महत्त्व मी ती कामे करण्याचे नव्हतेच तर एकमेकांसोबत, एकमेकांसाठी ही कामे करण्याचे होते."

"अर्थात हे फार काळ नशिबी नव्हतेच, कारण त्यानंतर जेमतेम ३ वर्षांनी तुझ्या मावशीला कॅन्सर झाला. जिने इतक्या कष्टाने हे घर, ही माणसे घडवली तिच्या अखेरच्या काळात तिला थोडेतरी आनंदाचे क्षण वाट्यास आले आणि ते मी देऊ शकलो हेच फार झाले." 

"आज ती नाहीये पण ती करत असलेली प्रत्येक गोष्ट तशाच पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करत असतो. तिच्या इतक्या चांगल्या नसतील जमत मला पण तरीही…. जसे तिने ठेवले होते तसे घर, जी जी कामे ती या घरासाठी तन्मयतेने करे ते प्रत्येक काम करण्याचा मी प्रयत्न करतो, आता कळले मावशी नसतानाही घरी बनवलेले कैरीचे पन्हे तुला इथे कसे मिळाले ते ?" 

"काका मी समजू शकते आता तुम्हाला नक्की काय वाटते ते. आता सोडून द्या पूर्वी काय घडले ते कटू विचार. तिच्या आयुष्यातील शेवटची काही वर्षे तुमच्या साथीने आनंदात गेली हाच आनंद तिच्यासाठी खूप असणार. मी निघू आता? काळजी घ्या"

असं म्हणून काव्या पाणावलेल्या डोळ्यांनी बाहेर पडली खरी, पण बाहेर पूर्वीसारखीच फुललेली  टवटवीत बाग पाहताच चेहऱ्यावर पसरलेले एक हसू घेऊनच. 

Monday, April 28, 2014

कोणा कशी कळावी?…वेडात काय गोडी …

ऑफिसचा पहिला दिवस… म्हणजे  induction day. त्या दिवशी भेटलेली सगळीच माणसे काही लक्षात रहात नाहीत. तर त्या दिवशी एक खूप सुंदर मुलगी नवीन आलेल्यांच्या ग्रुपमध्ये असते. त्यामुळेच कदाचित लक्षातही राहते. थोडे दिवस जातात हळू हळू सगळ्या गोष्टी सेट होत जातात या नवीन ऑफिसमध्ये देखील. टीम सोबत चहा, जेवण एकत्र होऊ लागते. बऱ्याचदा फूड कोर्ट मध्ये ती पण दिसू लागते. तिच्यासोबत तिची टीम कधीच दिसत नाही. ती आणि तिचा एक कलीग…. म्हणजे हे ही माहित नाही की ते दोघे एका टीम मध्ये आहेत आहेत की नाहीत, कदाचित तो तिचा manager पण असू शकतो. फक्त तिला पहातीये त्या दिवसापासून एक मात्र नक्की की तो तिचा नवरा नाहीये. 

पण जेंव्हा जेंव्हा ती दिसते तेंव्हा तेंव्हा ते दोघं बरोबरच असतात. ती दिसायला खूपच सुंदर, वय असेल २४/२५ च्या आसपास, उंच आणि छान चाफेकळी नाकेली. तो पण उंच, गोरा, पूर्वी छान दिसत असेल कदाचित पण आता डोक्यावरचे छप्पर उडून चाललेले, थोडे पोट सुटलेले असा, वय असेल ३६/ ३८ असे काही. गेल्या अडीच वर्षात मीच काय इतर कोणीही एकदाही त्या दोघांना ऑफिसमध्ये एकटे पाहिलेले नसेल किंवा दुसऱ्या कोणाबरोबरही. मग माझ्यासारख्या काही लोकांना सतत प्रश्न पडतात जसे की या जोडीतला एकजण ऑफिसला येणार नसेल तर दुसराही येतच नाही का? एकाला बरं वाटत नसेल म्हणून किंवा खूप काम आहे, किंवा महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून जेवायला किंवा चहाला एकजण जाणार नसेल तर दुसराही उपाशीच राहतो का? हे दोघे जर एखाद्या मोठ्या टीमचा हिस्सा असतील तर बाकीचे लोक यांना बळेच कधी त्यांच्या बरोबर येण्याचा आग्रह कधी करतच नसतील का? असे एक ना अनेक!

न जाणे कसे पण आज इतक्या दिवसानंतरही आमच्या जेवायच्या, चहाच्या वेळा साधारण सारख्याच असतात. त्यामुळे आसपासच्याच टेबलवर ही जोडी दिसणे हे ओघानेच. त्यांचे हे असे एकत्र असणे गेली दोन अडीच वर्ष पाहताना, त्यांच्या नात्यात झालेला बदलही सहज टिपण्याजोगाच. नवीन ओळख असतानाचा अवघडलेपणा केंव्हाच निघून गेलाय. एका छानशा comfort zone मध्ये असलेले ते दोघं आता अजूनच छान वाटू लागतात.   आजकाल मात्र त्यांच्याकडे पहिले की  एकमेकांत गुंतलेले दोन जीव असावेत तसे ते दोघे दिसतात. एक एक कप कॉफी घेऊन तास अन तास गप्पा मारत बसलेले. एकमेकांची साथ मनापासून आवडते ते त्यांच्या चेहेऱ्यावर वाचताही येते, त्यांची देहबोली पण तशीच प्रकटते. म्हणजे ऑफिसमध्ये वागू नये असं काहीही ते वागत नाहीत पण तरीही! सुरुवातीला त्या दोघांकडे पाहताना त्यांच्या वयातला जाणवणारा फरक मला फारच खुपायचा (???? खुपायचा ????? काय संबंध???????? उगाच काहीपण :)) मधल्या काळात हिचं लग्न झालं असेल का नाही, त्याचं? जर असं असेल तर मग त्या नात्याचं काय, किंवा दोघे live- इन मधे असतील …. खरतर काहीही असू शकेल.  असे सगळे विचार येतानाच शेवटी मी स्वत:लाच एकदा बजावलं, " ते दोघे एकमेकांचा करत नसतील एवढा विचार तू त्या दोघांचा करतीयेस…. stop here". पण तसं घडत नाही. हा खरंच त्यांच्यातला बदल आहे की माझ्या नजरेतला ते ही माहित नाही. पण तरीही त्यांचे असे हे सोबत असणे, पाहताना तरी काहीसे सुखावणारे आहे. 

मुळात प्रत्येक नात्याला समाजाच्या रूढ नात्यांच्या चौकटीतच बसवलं जायला हवं का की काळानुरूप समाजानेच आपल्या नात्यांच्या चौकटी विस्तारायला हव्यात? बदलत्या काळानुसार माणसांच्या, त्यांच्या विस्तारणाऱ्या क्षितीजांसह बदलणाऱ्या मैत्री च्या, जोडीदाराच्या संकल्पना समाजाने पण त्याच्या चौकटीत सामावून घ्यायला हव्यात ना?

Tuesday, April 22, 2014

रंगूनी रंगात सारया रंग माझा ......……

कितीतरी दिवसांनी आजकाल  थोडा निवांत वेळ असतो माझ्याकडे! अर्थात हे फार काळ टिकणार नाहीच म्हणा. निवांत वेळ आहे या  कल्पनेनेच कसेनुसे वाटू  लागेल आणि कशातरी मी  स्वत:लाच गुंतवून घेईन . तसंही नव्याने करायच्या, नव्याने शिकायच्या गोष्टींची यादी मुळातच इतकी मोठी आहे आणि सातत्याने त्यात भर पडतच राहते. या वर्षी, घर आणि ऑफिस या व्यतिरिक्त  ज्योतिष शिकायला सिरीअसली सुरुवात करायची आहे, अर्थशास्त्र पुन्हा नव्याने शिकायचे आहे, म्हणजे खरंतर अर्थशास्त्रात मास्टर्स करायला यावर्षी admission घ्यायची आहे, एकदा ते केले की रिकामा किंवा निवांत वेळ हा उरणारच नाही. तरी पण याच वर्षी  ओरिगामीची सुरुवात तर केली आहे त्यातले सातत्य टिकवून ठेवायचे आहे, टेरेस आणि खाली असलेली बाग या वर्षी अजून चांगल्या प्रकारे फुलवायची आहे,  संस्कृत स्तोत्रे विष्णू-सह्स्रानामापर्यंत शिकून मधेच सोडून दिली होती आता रुद्र आणि सप्तशती एकदा शिकायची आहे. परवाच,  एके दिवशी दुपारी ऑफिसमधून लवकर घरी  गेले, माझ्या दोन मैत्रिणी जिन्यात भेटल्या, आता इथे कशा असे त्यांना विचारले तर म्हणे " तुझ्या चुलत सासूबाई सध्या गीता शिकवत आहेत, तो क्लास आताच संपला आता घरी चाललोय" ह्याला म्हणतात दिव्याखाली अंधार! पण असो. 

सदा सर्वकाळ सगळ्याच वेड लावणाऱ्या गोष्टी तुमच्या  बरोबर राहतात  असंही नाही, काही काही सोबत करतात, काही चुकारपणे मधेच रस्त्यात तुमचा हात सोडून देतात. पण हरकत नाही, त्या काळापुरत्या तरी त्या आनंददायी असतात हे  नक्की! त्या थोड्याशा सोबतीने देखील त्या  तुम्हाला अधिकाधिक समृद्ध करत असतात. प्रत्येक वेळी त्याच माझा हात सोडतात असेही  नाही, तर माझ्यातही एक लहान मूल दडलेले आहेच ना, त्यामुळे ते ही दरवेळी नवीन खेळाच्या शोधात असतेच, कुतूहल संपले की दिला नाद सोडून असेही  वागत असते. पण  मग अशावेळी माझ्यातल्या त्या लहान मुलाला, माझ्यातली जी एक आई आहे न ती कधी त्या गोष्टींकडे पुन्हा पुन्हा वळवू पाहते किंवा त्याचे  ते "मूलपण" समजून घेत "असे चालायचेच" म्हणत सोडून देते. मूळातच फार आखीव  रेखीव आयुष्याच्या कल्पनांशी मी स्वत:ला बांधून ठेवले नाहीये ते एका परिने  बरेच आहे. घर आणि करिअर ही एकच  मध्यवर्ती आयुष्य रेखा ठरवून, त्या सभोती मग आपल्या आवडी, इच्छा, आकांक्षा यांची हवी तशी सजावट करावी. पण जर घर किंवा करिअरच धोक्यात येणार असेल तर मात्र ती माझी सर्वात मोठी हार असेल, म्हणूनच या जीवन रेखेस  डिस्टर्ब न करताही स्वत: मुक्त आयुष्य कसे जगायचे हे चुकत माकत शिकण्याचा हा प्रयत्न! 

तर या निवांत वेळाचं मी काय करतीये?  सध्या तर फक्त पुस्तके आणि मी!  एक पुस्तक उशाशी ठेवलेले असते, एक सोफ्यावर, आलटून पालटून मी दोन्ही वाचतीये. दुसरीकडे  मला कविताही आवडतात मात्र त्या  वृत्त, मात्रा, छंद यांचे साज लेलेल्याच! आणि कदाचित  म्हणूनच शांताबाई, इंदिरा संत, रॉय  किणीकर, महानोर, आरती प्रभू किंवा बोरकर यांच्या कविता जास्त भावतात. नव्या कवींमध्ये  संदीप खरे किंवा वैभव जोशी जे लिहितात ते आवडते. दुसरे म्हणजे न कवितेचे स्वत:चे एक प्रसन्न व्यक्तीमत्त्व  असायला हवे, अगदी दु:खाची, विरहाची, वेदनेची कविता वाचताना, ऐकताना ते दु:ख, ती वेदना आपल्या पर्यंत पोहचली पाहिजे जरूर पण तिने आपला ताबा घ्यायचा नाही, ते दु:ख, वेदनेचे मळभ आपल्या मनावर सोडून जायचे नाही, आणि अशाच कविता फक्त मला गुंतवून ठेऊ शकतात. आजकाल कवितांनी थोडे वेड लावलेच आहे तर पुरतेच त्यात रंगून जावे म्हणत परवा "उत्तररात्र" वाचून काढली. त्यातूनच रोज एक मला आवडलेली कविता किंवा  ओळी  स्वत:च्याच ब्लॉगवर पोस्ट करायची कल्पना सुचली आणि ताबडतोब ती मी अमलात पण आणली. अनेकदा कवितेची सुरुवात आठवत असते किंवा काही ओळी, पण संपूर्ण कविताकाही आठवत नसते किंवा तोंडपाठही नसते. पण मग होते काय की किमान ब्लॉगवर ठेवण्यासाठी तरी मी त्या कवितेचा  थोडा शोध घेते, मला हव्या असतात त्यातल्या चार ओळीच पण  त्यामुळे पुन्हा एकदा ती कविता मात्र पूर्ण वाचून होते. 

हे ही वेड टिकेल वा मागे पडेल, पण त्यातून मला जो आनंद गवसेल त्याची तुलना दुसऱ्या कशाशीच नाही ना होऊ शकणार! म्हणूनच "रंगुनी रंगात साऱ्या" म्हणत मी हे सारे आनंदाने करतीये. 

Monday, April 21, 2014

नाते तिचे अन माझे

आपल्यात इतके गहिरे नाते नव्हतेच कधी 
तरीही  सुखी होतो आपापल्या जगात आपण दोघी 
ओळख होती फार पूर्वी पासूनची तुझी 
मलाच कधी इतकी ओढ वाटली मात्र नव्हती  

तुझ्या  नावासरशी समोर येतात अनेक दिग्गज नावे  
यांच्याशी नाते जोडल्यावर तू दुसऱ्या कोणाकडे का पाहावे?
आवडले नव्हते मला कधीच तुझे  मुक्त जगणे 
मुक्त कसले केविलवाणी धडपड ती 
रोजच्या जगण्याला दिवसाच्या चोवीस मात्रात बसवण्याची 

तुला अशी दूर ठेवता ठेवता,
नकळता डोकावू लागली आहेस मनात 
रुजत चालली आहेस कुठेतरी खोलवर काळजात 
आजकाल दिवसरात्र सोबत असतेस,
माझे क्षण माझ्या ऐवजी तूच जगतेस 
उघड्या डोळ्यांनी पाहते मी सारी धडपड तुझी 
माझ्या प्रत्येक क्षणाला स्वत:शीच बांधून टाकण्याची 
अशीच व्यापून मन माझे  राहशील 
एक दिवस माझी स्वप्नेही तुझीच होऊन जातील

तुझ्या साथीने छोट्या आनंदाचीही व्हावीत चांदणफुले 
आणि हलक्या दु:खानेही उरावे रितेपण कोवळे 
का ग करतेस असे? 
जगू दे ना काही क्षण मला माझ्यासवे 
तुझ्याशिवायही घेता येवू दे 
आयुष्याला मला माझ्या कवेत